❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, १४ मार्च, २०२२

मुंगी साखरेचा रवा

घरातून पळून जायचं मोठं होऊन खुप पैसा कमवायचाहे माझं लहानपणच्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न होतं. ड्रायव्हर व्हायचं, पोस्टमन व्हायचं आणि हे काही नाहीच जमलं तर गेला बाजार निदान पिंजारी तरी व्हायचंच व्हायचं ही देखील स्वप्न होतीच. पिंजारी होऊन त्या भल्या मोठ्या धनुकलीने टॉन्गऽ टॅईऽन्गऽऽ असा मस्त आवाज काढत चौफेर मऊसुत कापूस ऊधळत पिंजून काढायचा. दुसरं काय हवं मग आयुष्यात असं वाटायचं. बाकीची स्वप्ने ही अगदी मनापासूनची होती पण पळून जायचे स्वप्न मात्र आई-बाबांवरच्या रागामुळे होतं. व्हायचं काय की, शाळा सुटल्यावर शाळेपासून ते घरी येईपर्यंत ईतकी प्रलोभने असत की मन अगदी मोहून जाई. मग घरी येऊन अगोदर आईच्या मग बाबांच्या मागे लागून हट्ट करावा लागे. तोही पुर्ण होईलच याची शाश्वती नाही. किती तरी ईच्छा मग अशाच राहून जात. शाळेसमोर बसणाऱ्या मावशीकडची बिस्किटे, पाराखाली दुकान लावणाऱ्या मामांकडे असणारी खेळणी, रामकाकाच्या दुकानात असलेल्या त्या सुरेख वासाच्या कव्हरच्या वह्या, ते निळ्या, विटकरी रंगाचे चमकदार पेन्स, त्यांचे ते लखलखते निब, सुट्टीच्या दिवशी सायकलवर येणारा तो आईस्क्रिमवाला, ती वडाच्या पानावरची घट्टमुट्ट कुल्फी एक की दोन ईच्छा होत्या? त्यात पुन्हा मधेच येणारी आमची यात्रा, मग आत्याच्या गावची यात्रा. त्यातली प्रलोभने वेगळीच. यातल्या एक एका ईच्छेसाठी आईकडे तास तास भर हट्ट करावा लागे. तिचा पदर धरुन ती जाईल तेथे फिरावे लागे, ती सांगेल ती सगळी कामे करावी लागत. एवढं करुनही आई प्रसन्न होईलच याची खात्री नसे. मग तासभर भोकाडही पसरावं लागे. तेंव्हा कुठे मग कुल्फीचा गोळा दाबलेलं ते हिरवेगार वडाचं पान हाती येई. थोडी का यातायात होती. मला वाटतेहजारो ख्वाहीशे ऐसी की हर ख्वाहीश पे दम निकलेही गझल गालीबला त्याचे बालपण डोळ्यापुढे आल्यानेच सुचली असणार. त्याचे आई बाबा काय वेगळे असणारेत का? ईथून तिथून सारखेच असतात हे आई-बाबा. यावर एकच जालिम ऊपाय-पळून जाणे. नको ते सारखं सारखं आई-बाबांपुढे भोकाड पसरायला. मोठं व्हावं, भरपुर पैसा कमवावा, हवी तेवढी बिस्किटं खावीत, हवी तेवढी शाईपेनं घ्यावीत, पाहिजे तेवढ्या वह्या घ्याव्यात. दोन आईस्क्रिमवाले सायकल घेऊन घरापुढेच ऊभे करावेत दिवसभर. वडाच्या पानांना काही तोटा नाहीच्चे. हवी तेवढी झाडे आहेत आपल्या गावात. कुणाला काही विचारायचे नाही कुणाकडे काही मागायचेही नाही. मग हे पळून जायचं अगदी नक्की व्हायचं. पण मग विचार यायचा; पळून जाऊ, पैसाही कमावू पण आजोबा अधून मधून जी काकवी आणतात ती कुठे मिळणार आपल्याला? आजोबांच्या गुऱ्हाळातली काकवी मधाच्याही तोंडात मारेल अशी असायची. गरम पोळीला हे काकवीचे मध लावून खाणे म्हणजे स्वर्ग. आजीच्या हातच्या रेशमी शेवया कुठे मिळायच्या? दुध संपल्यावर ती पातेल्यातली सायी शिंपल्याने खरवडून देते तसं कोण देणार? आणि आईच्या हातच्या मऊसुत पोळ्या मिळतील का? दुधात ही पोळी गुळ कुस्करला की तोंडाला पाणी सुटे. बरं जगात फक्त माझ्या आईच्याच हातच्या पोळ्या मऊ होतात. तिच्यासारखा सांजा आख्ख्या दुनियेत कुणालाच करता येत नाही. मोदकही फक्त तिलाच जमतात. शेजारच्या काकूसुद्धा तिला विचारुनच करतात दर वेळी मोदक यावरुन पहा मग. आणि रात्री बाबांच्या दंडाची ऊशी नसेल तर झोप येईल का? असा भारी दंड कुणाचा असेल का कुठे? मग वाटे नको तो पैसा कमावनं आणि नको ते पळून जाणं.


मग हळू हळू मोठा झालो. नुसताच मोठा झालो. ‘ऊगाच मोठा झालोअसं वाटेपर्यंत मोठा झालो. यथाशक्ती पैसाही कमावला. आता मी माझ्या कोणत्याही ईच्छा पुर्ण करु शकत होतो. पण दुर्दैवाने आता त्या ईच्छाच राहिल्या नाहीत. ऊलटकाय बावळट ईच्छा होत्या आपल्या!” असा स्वतःच्याच ईच्छेंची टिंगल करण्याचा निगरगट्टपणा अंगात आला. मित्र, भाऊ, नातेवाईकआलोच तालूक्याला जाऊनअसं म्हणावं ईतक्या सहजतेने जगभर भटकतात. येताना आवर्जुन माझ्यासाठी चॉकलेट्स, बिस्किटस्, महागडे पेन्स आणतात. तेवढ्यापुरते कौतूकही वाटते. पण आता तो शाईपेनमधला रस राहीला नाही पुर्वीचा. एकदा आईने तिचा वापरताएअरमेलकंपनीचा शाईपेन मला दिला होता तेंव्हा मी तो मुठीत घेऊनच झोपलो होतो रात्रभर. आणि परवा थोरल्याने त्याच्या खिशाचा महागडा क्रॉसचा पेन काढून मला दिला तर मी फक्त एक सही करुन पाहीली छानेम्हणत पेनच्या मगमधे ठेऊन दिला. मला आठवतय, ओट्यावर बसुन बाबा मला शिकवायचे की बांबू कसा धरायचा, कोणत्या बोटाचा त्याला खालून आधार द्यायचा, सुरी कोणत्या ऍन्गलने कशी चालवायची. बोरु तयार झाला की त्याचे टोक कोणत्या कोनात कापायचे. अगदी मनासारखे चारपाच बोरु तयार झाले की मग मोठा तक्ता शाईची दौत घेवून बसायचे देवनागरी अक्षरे गिरवायला शिकवाचे. तो कुरु करु आवाज करत चालणारा बोरु का मिळत नाहीए मला आज? कुठे गेला तो कुरु कुरु असा येणारा नाद? कुठेय ती काळीभोर शाई आणि तिचा तो मिरमिरीत वास? काय करु हे दहा दहा हजाराचे पेन घेऊन? कशात होता माझा आनंद नक्की? वस्तूंमधे होता तर मग आता हाताशी ईतक्या वस्तू असताना तो लहानपणीचा आनंद का होत नाहीए मला? ती पाच पैशाची बिस्किटे खिशात असली की मला जग माझ्या पायाशी आल्यासारखे वाटायचे. दिवसभर ती बिस्किटे पुरवून पुरवून खाताना त्यासमोर ब्रम्हानंद तुच्छ वाटायचा. मग आज ही एवढी वेगवेगळी बिस्किटे, कुकिज का घशाखाली ऊतरत नाहीत? तांब्यात विस्तव टाकून ईस्त्री केलेला माझा शर्ट मऊ रेशमाशीही पैजा घ्यायचा. मग आज हे दुनियाभरचे ब्रॅन्ड माझ्या मनाला, शरीराला का रिझवत नाहीएत? कुठे गेले आजोबा आणि त्यांची तीमधाच्या तोंडात मारणारीकाकवी? कुठय ती आज्जी आणि तिने माझ्या कानशिलावर सुरकुतलेली बोटे मोडून घेतलेल्या आलाबला? ती शाळेबाहेरची मावशी, तो पारावरला दुकानदार, ते रामकाकाचे दुकान कुठाय सगळं?

मला पळून जाऊन खुप खुप मोठं व्हायचं होतं. आज मला पळून जाऊन खुप खुप लहान व्हायचय.
तेंव्हाही पळने शक्य झाले नाही आणि दुर्दैवाने आजही ते शक्य होत नाहीए.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...