लग्नानंतर बायकोला खुष करण्यासाठी मी काही गोष्टी केल्या. पण त्यातला फायदा लक्षात आल्यावर मी त्यातल्या काही पुढे कंटिन्यू केल्या. त्यातल्या दोन म्हणजे पैशाचे पाकिट व मोबाईल स्वतःजवळ न ठेवणे. जे काही लागतील ते तिच्याकडून घ्यायचे. हिशोब ठेवायची भानगड नाही, काटकसर करायची यातायात नाही, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुणाला ‘नाही’ म्हणायचे संकट नाही. मोबाईलचेही तेच. येणारे कॉल व्यवस्थित फिल्टर होऊनच येतात. नको असलेले कॉल बायको परस्पर निकालात काढते. पण या सवयीमुळे एकदोन वेळा अडचणीत आलो आणि मग मोबाईलच्या कव्हरमधे, गाडीच्या सन व्हायजरमागे, लॅपटॉपच्या केसमधे, कार्ड होल्डरमधे वगैरे ठिकाणी ईमर्जन्सिसाठी एखादी मोठी नोट ठेवायची सवय लागली. आता गावी असल्याने या दोन्ही गोष्टी जवळ ठेवाव्या लागतात व सवय नसल्याने त्या कुठेही विसरतात.
परवा बायकोचा टेलेग्रामवर मेसेज आला की दिवसभर तुझा फोन लागत नाहीए. नानाला फोन केलाय. संध्याकाळी येईल तो घरी. त्याच्याच मोबाईलवरुन फोन कर लगेच मला. मेसेज दुपारी पडला होता. मी तो संध्याकाळी पाहीला. खरेच, दोन दिवस मलाही मोबाईल दिसला नव्हता. विसरलो की काय कुठे? असं म्हणत शोधायला ऊठणार तर बेल वाजली. दार ऊघडले तर नानासाहेब दारात ऊभे. ‘संधी मिळूनही शिव्या न देणारा मित्र’ ही कविकल्पना आहे. दोघेही मोबाईल शोधायला सुरवात केली. नानाच्या शिव्या सुरुच होत्या. “तुझा निष्काळजीपणा मला भोगायला लागतो नेहमी. साधा मोबाईल सांभाळता येत नसेल तर व्यर्थ आहे तुझं आयुष्य. (बापरे) वेगेरे वेगेरे.” एकदाचा मोबाईल सापडला. बॅटरी पुर्ण संपली होती. त्याला अगोदर चार्जिंगला लावला. सुरु झाल्यावर सिमकार्डसंदर्भात काही मेसेज पॉपप झाला. शेवटी सिमकार्ड काढण्यासाठी नान्याने मोबाईलचे कव्हर काढले. आतली नोट पाहून त्याने कचकचीत शिवी घातली आणि म्हणाला “गाढवा, मोबाईलच्या कव्हरमधे कुणी दोन हजाराची नोट ठेवतो का? मोबाईल हरवला किंवा कुणी चोरला तर गेले ना दोन हजार फुकट. म्हातारा होत आला पण मोठा काही झाला नाही तू” मी कपाळावर हात मारुन घेतला. च्यायला मोबाईल जर चोरीला गेलाच तर मला पाऊन लाखाला फटका बसल्याचे टेन्शन येईल की दोन हजार गेल्याचे? पण नान्याला काय बोलणार? मी चेहरा निरागस करत म्हणालो “जर कधी माझा मोबाईल हरवलाच तर ज्याला सापडेल त्याला ‘मोबाईल सापडल्याची’ पार्टी करण्यासाठी मी ते पैसे ठेवतो नेहमी. कुत्र्याने नाही का नाथांची भाकरी पळवली तर नाथ त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले! तसच आहे हे.”
त्या दिवशी संध्याकाळी माझ्याच घरात हरवलेला माझाच मोबाईल मिच शोधून काढल्याबद्दल माझ्याच दोन हजारच्या नोटेचा बळी देऊन नान्याने माझ्याकडून पार्टी ऊकळली. 


चालायचंच. यार कुछ भी हो, यार होता है.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.
-पद्मनाभ (हरिहर)