❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

रविवार, १५ डिसेंबर, २०२४

घोणस

समुद्रमंथनातुन जशी उपकारक रत्ने निघाली तशी अपकारकही निघाली. देवांनी चलाखी करुन अपकारक रत्ने असुरांच्या गळ्यात मारली. हलाहलसारखे रत्न तर स्वतःच्याच पार्टीच्या भोळ्या शंकराच्या शब्दशः गळ्यात मारलं. अगदी तसंच आमच्या भागात झालेल्या धरणांमधुनही उपकारक-अपकारक रत्ने निघाली. मात्र अपकारक रत्ने कुणाच्या गळ्यात मारण्यासाठी आमच्याकडे पर्याय नव्हता. दोन्हीही आम्हालाच स्विकारावी लागली. यातली काही तर हलाहलपेक्षाही जहाल होती. म्हणजे जमिनी पाण्याखाली गेल्या तर जाऊद्या हो, पण शेकडो हजार वर्षांपुर्विची मंदिरेही पाण्याखाली गेली. गावकऱ्यांना नवं गाव वसवून दिलं सरकारने, मात्र जुनी गावे कायमची पाण्याआड गेली त्याचे काय! शिवकालाच्या कितीतरी आधिपासून असलेली ही गावे. येथल्या प्रत्येक ऊंबऱ्याला ईतिहास होता, वडा-पिंपळाच्या पाराभोवती कहाण्या होत्या. येथल्या गावमारुतिंच्या देवळाने कित्येक पिढ्या पाहिलेल्या. येथल्या तालमींनी कित्येक सत्ता ऊलथताना पाहिल्या असतील, त्यात मदत केली असेल. गावच्या वेशींनी कित्येक विरांचे वाजत गाजत स्वागत केलं असेल, कित्येक पालख्या बेल-भंडाऱ्याच्या झडीत वेशीतून आत आल्या असतील, रगेल बांडी पोरं याच वेशीतून कंबरेला तेग बांधून शिवकार्यासाठी बाहेर पडली असतील. ते सगळं गेलं. पार नजरेआड झालं. सासरी खुप जाच असल्याने वर्षांनुवर्षे माहेरी न आलेली लेक कधीतरी अवचीत घरी आली तर तिचं माहेर जसं हरखून जातं, तसं कधी कधी एखाद्यावर्षी पाऊसमान कमी झालं की धरणाचं पाणी ओसरतं आणि हे मंदिरांचे कळस दर्शन देतात. तेव्हा गावकरी सगळं काम टाकून त्याचं दर्शन घ्यायला धावतात. आता या मंदिरांच्या आठवणी जागवणारी पिढीही संपत आली.
असो, तर या अशा अनेक अपकारक रत्नांपैकी अजुन दोन रत्ने आम्हाला मिळाली, ती म्हणजे घोणस आणि बिबट्या. धरणांच्या बॅकवॉटरमुळे अनेक जनावरे घाट ऊतरुन खाली सरकली व अनेक जनावरे आमच्या भागात सरकली. त्यात ही दोन रत्ने आमच्या वाट्याला आली. या दोन्ही रत्नांनी अगदी धुमाकूळ घातलाय आमच्याकडे. या बिबट्यांनी कित्येक गावे ग्रामकेसरीविरहीत करुन टाकलीत. मळ्यात कित्येक बंगल्यांपुढे हे असे रिकामे, सुनेसुने पिंजरे व मोकळ्या पडलेल्या साखळ्या दिसतात. त्या पिंजऱ्याचे धनी खंड्या, मोत्या, वाघ्या वगैरे गायब झाले. निदान एक बरे आहे, घोणस चावल्याच्या फारशा केसेस नाहीत आमच्याकडे. तरी वैताग आहेच ना.


सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

गण्या

गण्या सातवीत सातव्यांदा नापास झाला आणि वैतागलेल्या गुरुजींनी त्याला मनसोक्त हाताखालून काढला. गण्या त्यादिवशी गुरुजींच्या हातातून जो सुटला ते पुन्हा म्हणून त्याने शाळेचे तोंड काही पाहिले नाही. बापालाही गण्याच्या मेंदुचा आवाका लक्षात आला आणि त्याने त्याच्या बुद्धीची किव येऊन त्याला गुरांकडे धाडला. गण्या आता घरच्या चार व गावकीच्या पाच सहा म्हशी घेऊन रानात जायला लागला. गुरं कुरणात सोडून प्रशस्त वडाच्या झाडाखाली बासरी वाजवण्याईतपत तरलता गण्याकडे असती तर तो कशाला शाळा सोडून आला असता? गण्याने शाळा सोडली आणि फेसबुक धरले. अल्पावधीत गण्या फेसबुकवर फेमस झाला. त्याच्या मनमिळावू, हरहुन्नरी स्वभावामुळे त्याची फ्रेंडलिस्ट भरुन वाहू लागली. गण्याला लोक ओळखायला लागले. गण्या फेसबुकवर चांगलाच रमला आणि येथेच घोटाळा झाला. गण्या फेसबुकवर रत राहू लागला व त्याची गुरे ईतरांच्या रानात घुसून पिकं खाऊ लागली. गण्याच्या बापाकडे रोज नविन तक्रार यायला लागली. तो वैतागला. वैतागलेल्या बापाने एक दिवस गण्याला बेदम चोपला. गुरुजींनी तुडवलं तेंव्हा शाळा सोडली होती, आता बापाने हात साफ केल्यावर घर कसे सोडायचे? गण्याने मग फेसबुक सोडले. रिवाजाप्रमाणे त्याने “येथे काही आता मजा राहीली नाही. सगळा कचरा झालाय फेसबुकचा. मित्रांनो रामराम घ्या. संपर्कात राहूच” अशी पोस्ट त्याने टाकली आणि ‘खातं’ डिलिट केलं.
गण्या गेला आणि फेसबुकवर गदारोळ ऊसळला. ‘सर तुम्ही परत या” “टिका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका सर” “आमच्यासाठी तरी लिहिते व्हा” अशा आशयाच्या अनेक पोस्ट पडल्या. गण्या काही परत येत नाही हे लक्षात आल्यावर त्याचं गुणगाण गाणाऱ्या काही पोस्ट पडल्या. गण्या कसा हरहुन्नरी होता! कसा अजातशत्रू होता! त्याला कशी माणुसकी होती! वगैरे वगैरे. गण्याच्या जाण्याने फेसबुकचं कसं नुकसान झालय यावर तर चर्चासत्र आयोजित होता होता राहिलं. हे सगळं सुरु आहे तोच गण्याच्या एका मित्राची पोस्ट पडली. “अरे गण्यावर चिखल ऊडवताना लाज वाटत नाही का? गण्याला खुशाल गाढव म्हणताय म्हणजे काय! गण्या काय गाढव होता का? तो काय होता ते समजायला तुम्हाला चार जन्म घ्यावे लागतील. गण्याला गाढव म्हणताहेत म्हणजे यांचे धारिष्ट्य पहा किती आहे ते! आमचा गण्या आणि गाढव? अरे ह्यॅट!” पोस्ट आली आणि कॉमेंटकर्त्यांची गर्दी ऊसळली. सुरवातीला “कोण आहेत ते” किंवा “लिंक द्या फक्त, आम्ही पाहून घेतो” अशा काही कॉमेंटस् आल्या. मग बाकीच्यांनीही आपापले मत मांडायला सुरवात केली. “अरे गण्याला गाढव म्हणताहेत ‘ते’ लोक पण काल तर एक जण गण्याला डुक्कर म्हणत होता. अरे यांना काय कळणार गण्या काय चिज होती ते” असंही कुणी सांगुण गेलं. त्याला ऊत्तर देताना गण्याचा दुसरा मित्र पेटला. “अरे हे तर काहीच नाही. एकजण गण्याला गव्हाणीतलं कुत्रं म्हणाला. आता बोल. किती हलकट आहेत ‘हे’ लोक” त्यावर चौथा मित्र शंका घेऊन आला “हे गव्हाणीतलं कुत्रं म्हणजे काय रे?” पुढच्या विस पंचविस कॉमेंटस् ‘गव्हाणीतलं कुत्रं’ म्हणजे काय हे समजावणाऱ्या आल्या. एवढ्यात नविन पोस्ट पडली. “गण्याला गव्हाणीतलं कुत्रं म्हणनाऱ्यांचा निषेध. याच लोकांमुळे गण्या फेसबुक सोडून गेला. याच लोकांनी सगळ्या सोशल मिडीयाचा रंडीखाना केला” मागची पोस्ट मागे पडली, नव्या पोस्टवर प्रतिसादांचा पाऊस सुरु झाला. एकाने कळवळून लिहिले “अरे ‘ते’ कसेही लोक असले तरी आपण सभ्य आहोत. रंडीखाना हा शब्द काही पटला नाही मला” त्याला मागे सारुन पुढचा मित्र म्हणाला “मान्य आहे गण्या काही गुणांचा पुतळा नव्हता. होते त्यात काही गव्हाणीतल्या कुत्र्याचे गुण. पण तो त्याच्या वैयक्तीक आयुष्यात काय करतो याच्याशी आपले काही देणेघेणे नाही. आपण त्याच्या पोस्ट वाचून जो आनंद घेतला तो महत्वाचा. वैयक्तीक आयुष्यात गण्या एक काय दहा नालायक असेल, आपल्याला काय त्याचे. कलंदरच होता तो. असे लोक मनस्वीच असतात” या प्रतिसादाला अनुमोदन देणारे पाच पन्नास प्रतिसाद येताहेत न येताहेत तोवर गण्याच्या नविन मित्राने नविन पोस्ट नवं काहीतरी सांगत असल्यासारखी टाकली. “एकदा गण्या गुरांकडे गेला असता चंxxच्या नादी लागला होता. (तिही फेसबुकवर असल्याने मी नाव घेणार नाही.) तिच्या बापाने रंगेहाथ पकडले दोघांना आणि गण्याला रानातच घोळसला. तोंडात गेलेली काळी माती तशीच घेऊन माझ्याकडे आला होता रडत. मिच त्यावेळी त्याला आधार दिला. होतात माणसाच्या हातून चुका. आपण तरी कुठे धुतल्या तांदळासारखे आहोत? म्हणून कुणी ऐऱ्यागैऱ्याने गण्याला ‘चमडी’ म्हणावं? तेही या फेसबुकवर, जेथे गण्याच्या पोस्टसाठी लोक वेडे व्हायचे! असेल गण्याला जरा तसला नाद म्हणून गण्या काय अगदीच चवचाल नाही ठरत. आणि ‘हे’ लोक गण्याच्या नथीच्या नादावर पोस्ट टाकताहेत! यांची लायकी आहे का? कुठे फेडाल हे पाप?” आणि मग पुन्हा ते प्रितीसाद आणि लोकांची ती गण्यावरची थक्क करणारी प्रीति. “अरे बुडवले गण्याने माझे हजारभर रुपये. त्याने काही माडी बांधली नाही आणि हजार रुपयाने मीही काही भिकारी झालो नाही. दोस्तीत पैसा महत्वाचा मानतच नस्तोय आपण. गण्यासारख्या मित्रावर करोडो रुपये कुर्बान. गण्याला नावे ठेवणारे नरकात जातील आणि आम्ही ते पाहू” वेगेरे वेगेरे, वेगेरे वेगेरे!
सुरवातीला गण्याचं गुणगाण गाणाऱ्या पोस्ट पाहून आधिच मी गहिवरलो होतो. त्यातच या नविन पोस्ट. एका सातवी नापास असणाऱ्या, म्हशींमागे जाणाऱ्या पोराच्या समर्थनार्थ ईतके मित्र ऊभे राहीलेले पाहिले आणि माझा कंठ दाटून आला. गण्याला नावे ठेवणारे ‘ते’ लोक व त्यांच्या ‘तसल्या’ पोस्ट मी खुप शोधल्या पण एकही पोस्ट सापडली नाही हा भाग वेगळा पण हे दुर्मिळ मित्रप्रेम पाहून मला मात्र गण्याचा हेवा वाटला. गण्यालाही बरं वाटलंच असेल पण तो काही अजुनही फेसबुकवर पुन्हा यायला तयार नाही. असो, सगळ्यांनाच आयुष्यात असे मित्रप्रेम मिळो, असे यार दोस्त मिळोत. गण्याला माझी वैयक्तीक विनंती आहे की “सर, मी तुम्हाला ओळखत नाही, तुमच्या पोस्टही कधी वाचण्यात आल्या नाहीत, पण तुमच्या मित्रांच्या निर्व्याज प्रेमाखातर तरी तुम्ही परत या. मी तुमच्या नुतन पोस्टची वाट पहात आहे.”
(कुणी म्हणते की गण्या फेक आयडीने फेसबुकवर आहे आणि त्याने या ‘कौतुकाच्या’ सगळ्या पोस्ट वाचल्यात. त्यामुळे तो आता फेक अकाऊंटही डिलिट करायच्या विचारात आहे म्हणे.)

रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

तत्वज्ञान

संध्याकाळी तळ्यावर फिरायला येणारी दोन तिन मंडळे आहेत. आठवी दहावीची मुलं. ती आपापल्या सायकल्स, स्केटींग गिअर्स वगैरे घेऊन येतात व तळ्याला चकरा मारत बसतात. नंतर तळ्यात मासेमारी करणारी मुलं येतात. मासेमारी सकाळी करतात, संध्याकाळी मात्र सहज कट्ट्यावर येऊन बसतात. कदाचित त्यांना तळ्याशिवाय करमत नसावे. मग सात आठ म्हातारे येतात. जांभळाखाली त्यांची जागा ठरलेली आहे. यातले सगळेच कोळी समाजाचे म्हातारे आहेत. मोठ्यांमधे बसायचं वय नव्हतं तेव्हाही माझी सलगी नेहमी मोठ्यांबरोबरच असे. आतातर हळू हळू त्यांच्यातलाच व्हायला लागलोय, त्यामुळे प्रश्नच नाही. यात सत्तरी पार केलेले एक बाबा आहेत. स्वच्छ धुवट बंडी व फिकट गुलाबी रंगाचा सुरका घालून येतात. सुरक्यावरच्या फुलांचा पॅटर्न बदलतो फार तर, पण ड्रेसकोड असल्यासारखा बाकी ड्रेस सेम. फारसं बोलत नाहीत. शांत असतात. चेहरा नेहमी प्रसन्न असतो. जाणारे येणारे सगळेच त्यांना अदब बजावल्याशिवाय पुढे जात नाही. आयुष्यभर मासेमारी आणि त्यांच्या समाजाचे नेतृत्व करण्यात गेलं. समाजासाठी, स्थानिकांच्या अडचणींसाठी, एकोप्यासाठी सदैव संघर्ष केलेला. तो चेहऱ्यावरच्या सुरकत्यांमधे दिसतो. रंगात आले की आनंद दिघे, बाळासाहेब यांच्या आठवणी सांगतात. त्यांच्या काळातल्या मासेमारीबद्दल फार कौतूकाने बोलत रहातात. वादळात भरकटलेली नाव, गमावलेले दोन मित्र, ऊरलेल्या सोबत्यांना जीवावर ऊदार होऊन कुठल्याशा किनाऱ्यावर पोहचवल्याचे किस्से असं बरच काही सांगत रहातात. समुद्र पुर्वी होता तसाच आताही आहे, मात्र हे जास्त दिवस रहाणारा नाही याची खंत बोलून दाखवतात. मासेमारी करणाऱ्या यांत्रीक बोटींबद्दल फार तिटकाऱ्याने बोलतात. मुलगी लग्न करुन जर्मनीला गेलीय. दोन मुलं मात्र पारंपारीक व्यवसाय न करता कपड्यांचा व्यवसाय करतात. अर्थात त्याबद्दल बाबांची तक्रारही नाही आणि खंतही नाही. ऊलट कौतूकाने पोरांचं कर्तृत्व सांगत रहातात. मात्र हे सगळं कधीतरी क्वचित. ईतर वेळी म्हातारा नेहमी मिश्किल हसत कुणाची ना कुणाची मस्करी करत रमलेला असतो. बाजूच्या लिंबाच्या पानांच्या काड्या घेऊन पक्षी बनव, पाम ट्रिच्या पानांच्या पट्ट्या घेऊन होड्या, मासे बनव असे ऊद्योग सुरु असतात. जांभळाच्या दिवसात बोळक्या तोंडात जांभळे चघळून जीभ किती रंगलीय हे निरखून पहायचा प्रयत्नही करत असतात. नातवाकडून एखादा ईंग्रजी शब्द शिकून येतात आणि मग कुठेही तो वापरत बसतात. मजेत दिवस कंठतात एकूणच सगळे म्हातारे.
आज पावसाने ऊघाड दिला. चार पाच दिवस बाबा दिसले नव्हते. आज दिसतील म्हणून तळ्यावर गेलो. सगळी बुढ्ढी गॅंग जांभळाखाली बसली होती. बाबांनी शेजारची जागा साफ केल्यासारखं केलं व मला बसायला सांगितलं. 'आज लांडगा नाही आणला सोबत?' अशी रुमीची चौकशी केली. मग मात्र समोरच्या तळ्यातल्या एकुलत्या एक प्लॅस्टिकच्या बोटीला निरखत शांत बसुन राहीले. मीही पाण्यावरचे तरंग पहात शांत बसलो. जरा वेळाने बाबांनी अचानक विषय काढला. "पद्माकर, तुला आज संसाराचं रहस्य सांगतो, ऐक." आज काहीतरी नवीन ऐकायला मिळेल म्हणून मी मांडी मोडून निवांत बसलो.
बाबा म्हणाले "आयुष्यात जे काही करशील. भलं, बुरं सगळं काही. ऊंबऱ्याच्या आत आणि बाहेरही. अभिमानाने सांगावं असं आणि लाज वाटेल असही, सगळं काही घरच्यांना विश्वासात घेतल्याशिवाय करायचं नाही. कितीही किरकोळ निर्णय असुदे, बायकोला, पोरांना समोर बसवायचं. सविस्तर सांगायचं, आणि त्यांनी होकार दिला तरच पुढं पाऊल टाकायचं. मग तुला धोका नाही."
बाबा एवढे पुढारलेल्या विचारांचे असतील, बायकोच्या मताला किंमत देणारे असतील असं वाटलं नव्हतं. म्हणजे बाबा गोडच आहेत पण त्यांचा काळच अशा गोष्टींना मान्यता देणारा नव्हता. निरक्षर असुनही बायकोला, मुलांना एवढी किंमत देणारा पुरुष मी प्रथमच पाहीला. मला बाबांचं कौतूक वाटलं. मी तसं बोलून दाखवल्यावर बाबा मिश्किल हसले व म्हणाले...
"नशिब फार हलकट असतं पद्माकर. कधी गचांडी धरुन गोत्यात आणेल सांगता येत. कोणती वेळ घातवेळ असेल ते कुणी सांगावं! कधी कोणत्या टायमाला बायको पोरं आपला वाल्या कोळी करतील याचा काही भरोसा नाही. अशा टायमाला बायका पोरांना ऊलटायला जागा ठेवायचीच नाही कधी. सगळी संतमंडळी सांगून गेली ते ऊगाच का. तुकारामबाबा ऊगाच नाही म्हणत 'तुका झाला सांडा ! विटंबती पोरे रांडा' आपण सावध रहायचं पद्माकर. आपुलिया हिता जो असे जागता"
एकूण बाबा बिलंदर निघाले. 🥰😘😂
असो..
मला ऊगाचच कबिर आठवून गेला.
खानेपिनेकूं पैसा होय तो जोरू बंदगी करे ।
एक दिन खाना नहीं मिले तो फिरके जबाब करे ॥



गुरुवार, २३ मे, २०२४

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव. अशात जर वाफाळती मिसळ समोर आली तर मोह आवरत नाही. एक वेळ रंभा मेनका समोर आल्या तरी चित्त चळणार नाही पण मिसळ म्हटल्यावर ताबा जातोच मनावरचा. ‘जी मेनकेसी परौते सर म्हणती’ अशी मिसळ समोर असल्यावर त्या रंभेला काय चाटायचय? (माफ करा माऊली)
जसा मानवतेला कोणताही धर्म नसतो तसेच मिसळला कोणतेही गाव नसते. हे कोल्हापुर, पुणे व नाशिकवाले उगाच मिसळवरुन भांडत असतात. (मी पुणेकर आहे तरीही हेच मत आहे माझे) मी तिनही शहरांमधे नावाजलेल्या सगळ्या मिसळ खाल्या आहेत. त्या आपापल्या जागी ठिक असल्या तरी गावाकडच्या मिसळची चव त्यांना नाही. एक तर शहरांमधल्या मिसळमधे असणारी शेव ही अस्सल बेसनपिठाची असण्याची शक्यता फार कमी. निर्भेळ बेसन पिठाची शेव रस्स्यामधे पडल्यानंतर तिस सेकंदात मऊ होते. शहरांमधल्या मिसळमधे असणारी शेव ही मिसळ संपत आली तरी कुरकुरीत रहाते बऱ्यापैकी. यावरुन समजा काय ते. आणि मसाल्याचे म्हणाल तर क्वचितच कुणी मिसळसाठी घरी मसाला करत असतील. गावाकडे तेल, बेसन या गोष्टी निर्भेळच वापरल्या जातात. गावाकडे म्हणजे माझ्या गावाचे कौतूक नाही करत मी. तुम्ही कुठल्याही गावात मिसळ खा. ती उत्तमच असेल. गावच्या मिसळचा नाद शहरातल्या मिसळणे करुच नये. शहरी मिसळ म्हणजे मेंढराच्या कळपामधे वाढलेले व स्वत्व विसरलेले वाघाचे बछडे. नुसते रुप वाघाचे, सवयी सगळ्या मेंढीच्या. अशा मिसळमधे फरसानच असेल, बटाटे-पोहेच असतील, चिंच-गुळच असेल काहीही असेल. आजकाल तर चिज मिसळही मिळायला लागलीय. उद्या न्युटेला मिसळ मिळाली तरी आश्चर्य वाटायला नको. बरं तिची सजावट एवढी की नाकापेक्षा मोती जड. स्टिलच्या मोठ्या ताटात, जिलेबीचे दोन वेढे, गुलाबजाम, बासुंदीची वाटी, पापड, बिटाचे तुकडे, लोणचे वगैरे काय वाट्टेल ते असते. मिसळ बिचारी ताटाच्या कोपऱ्यात हिरमुसून बसलेली असते. ‘माणूस अगोदर डोळ्यांनी जेवतो व मग तोंडाने’ असं म्हणतात. हे असलं मिसळच ताट पाहीलं की माझी भुक मरते.
गावाकडे जरा वेशीबाहेर, शेतीभातीने वेढलेले एखादे मिसळचे हॉटेल असते. येथे फक्त मिसळ मिळते. समोरुन अरुंद पण नेटका डांबरी रस्ता गेलेलला असतो, तिनही बाजूने हिरवीगार शेती असते, शेजारीच दोन तिन आंब्यांची झाडे असतात, शेतांमुळे हवेत जास्त गारवा असतो, हॉटेलवाला मित्रच असल्याने मिसळच्या अगोदर गप्पांचा फड जमतो. मिसळही अगदी घरी पंगतीला बसल्यासारखी आग्रह करकरुन वाढली जाते. पाव खाण्याच्या पैजा लावत रस्स्याचे भांडे रिकामे केले जाते, ज्या वेगात ते भांडे रिकामे होते त्याच वेगात हॉटेलवाला ते भरत रहातो. खिशातले रुमाल हातात व मग हातातले रुमाल नाका डोळांपर्यंत जातात. पंगतीत पाळायचे नियम येथेही पाळले जातात. सगळ्यांची मिसळ खाऊन झाल्याशिवाय कुणी हात धुत नाहीत. मग मजेत एकमेकांच्या हातावर पाणी घालत ओट्याच्या कडेला उभे राहून हात धुवायचे. तोवर गोड व घट्ट चहा आलेला असतो. मिसळनंतरचा चहा हा फक्त ‘जिभेच्या शेंड्याला चटका’ म्हणून घ्यायचा असल्याने दोन चहा पाच जणांना पुरतो. मग बिल देताना ‘मी देतो, मी देतो’ असा वाद न होता ‘तू दे, तू दे’चे भांडन होते. एखाद्या कंजुष मित्राच्या खिशाला चाट मारल्याच्या आनंदात, जिभेवर मिसळ व गोड चहाची चव घेऊन मग दिवसाची सुरवात होते. ही असते आमच्या गावाकडची मिसळ.








सोमवार, २० मे, २०२४

माळशेज


आमचा माळशेज देखना आहे, रौद्र आहे पण त्यापेक्षा जास्त तो लहरी आहे. लहान मुलासारखा हट्टी आहे. अडेलतट्टू देखील आहे. एकवेळ तट्टू अडलं तर फिरवून मार्गावर आणता येतं, पण माळशेजचं घोडं अडलं तर फिरवायची सोय नाही. आपलच गाडं बोरघाटाकडे वळवावं लागतं. सध्या जाळ्यांचे लगाम लावून त्याला बरच वठणीवर आणलय, तरीही शहाणा माणूस मुंबईतुन निघताना फोन करुन माळशेजचा ‘मिजाज’ कसा आहे याची चौकशी करुन मगच निघतो. या सगळ्या खोडी माळशेजमधे असल्या तरी तो भिषण मात्र नाहीए. “त्याची वेळ झाली की तो चार पाच जीवांचा घास घेणार म्हणजे घेणारच” अशी बहुतेक पश्चिम घाटांची ख्याती आहे. त्यासाठी त्यांची खास हेअर पिन बेंडस् बदनामही आहेत. आमचा माळशेज मात्र तसा नाहीए. एखादी दरड रस्त्यावर ढकलून वाट अडवेल पण काही तासात मार्ग मोकळाही करुन देईन. जीवावर मात्र उठणार नाही. आता कुणी त्याच्या अंगाखांद्यावर चढून त्यांच्या कानात उंगली केली तर त्याचाही नाईलाज होतो. पण अशी उदाहरणे विरळा.
सध्या त्याला प्लॅस्टिकच्या व बिअरच्या बाटलीचं गालबोट लागलय त्याला काय करणार! माणूस शेवटी आपली औकात दाखवतोच.
माणसाचाही नाईलाज आहे. जे जे स्वर्गिय आहे त्याची वाट लावायची हे त्याच्या रक्तातच आहे.
उगाच नाही स्वर्गातून हाकललं माणसाला!


आजोबांच्या गोष्टी - १

नगराच्या उगवतीच्या बाजुला सावकारपुत्राचा प्रशस्त असा चौसोपी वाडा होता. वाडा पहाताच त्याच्या सांपत्तीक स्थितिचा, कलादृष्टीचा, रसीकतेचा अंदाज सहज बांधता यायचा. वाड्यासमोरच्या गजशाळेत दोन हत्ती झुलत असायचे. गजशाळेच्या शेजारीच असलेल्या पागेत नामांकीत जातीचे दमदार अश्व चंदी चघळताना दिसायचे. वाड्याच्या परिसरात प्रवेश केल्यावर एक हलकासा सुगंध दरवळत असल्याचे जाणवायचे. सावकारपुत्राने वाड्याचा गिलावा करताना मातीत कस्तुरी मिसळली होती म्हणे. वाड्याच्या आतिल भागात ‘घोट्यापर्यंत पाय रुतावेत’ असे पर्शीयन गालीचे अंथरले होते. छतावर परदेशी व्यापाऱ्यांकडुन खरेदी केलेली अत्यंत नवलाईची अशी प्रचंड काचेची झुंबरे टांगलेली होती. वाड्यातील सर्व नोकरांना अपेक्षापेक्षा कितीतरी जास्त पगार होता. सावकारपुत्राची नुकतीच लग्न झालेली, अतिशय सुंदर पत्नी या सर्वांवर लक्ष ठेवून होती. राजाकडून ‘पालखीचा’ सन्मान मिळालेला होता. सावकारी फक्त नावालाच होती. पिढ्यान् पिढ्या जमवलेली संपत्तीची मोजदाद करणे अशक्य होते. त्यामुळे सावकारीच्या नावाखाली सावकारपुत्र गरीब, गरजु लोकांना मदत करत असे. इतकी संपत्ती असुन सावकारपुत्राला त्याचा ना दंभ होता ना मद. अत्यंत पापभीरु असलेल्या सावकारपुत्राच्या दारातुन कुणीही याचक कधी रिक्त हस्ते माघारी गेला नव्हता. अंगणात रोज शेरभर साखर पडे मुंग्यासाठी. तितकेच धान्य पक्षांसाठी छतावर पडे. रोज किमान शंभर माणसांचा स्वयंपाक रांधला जायचा वाड्यावर आणि नगरातील गरीबांपर्यंत पोहचता व्हायचा. आपल्या हातुन कधीही पापकर्म होउ नये यासाठी सावकारपुत्र नेहमी दक्ष असे.
आज संपुर्ण वाडा विशेष सजवला होता. दर्शनी भाग वेगवेगळ्या फुलांनी शृंगारला होता. दिंडी दरवाजाऐवजी आज वाड्याचे मुख्य द्वार पुर्ण ऊघडे होते. दरवाजाच्या दोन्ही बाजूला सनई-चौघडे वाजत होते. दारावर सोनेरी पानांचे तोरण शोभत होते. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर कनौजी अत्तर शिंपडले जात होते. मुदपाकातुन पक्वान्नाचा सुरेख दरवळ येत होता. सावकारपुत्राला आज पुत्ररत्न प्राप्त झाले होते. पुत्रजन्माचा सोहळा वाड्याबरोबर सगळ्या नगरात साजरा होत होता. आज विशेष भिक्षा मिळेल हे ओळखून अनेक याचकांची वाड्यावर गर्दी होत होती. सावकारपुत्रही मुठी मुठीने मोती, मोहरा, मुद्रा उधळीत होता. आज त्याच्या आनंदाला पारावार नव्हता. दिवस डोक्यावर येता येता वाड्यात नगरातील प्रतिष्ठीतांच्या पंगती बसायला सुरवात झाली. तसेच वाड्याच्या प्रांगणातही नगरवासीयांच्या पंगती बसल्या. मुक्तहस्ताने सुग्रास अन्नाचे वाटप सुरु झाले. वाड्यातील आणि बाहेरील पंगतींवर लक्ष देता देता सावकारपुत्राची आणि इतर नोकरवर्गाची तारांबळ उडाली. दिवसभरात किती पाने ऊठली त्याची मोजदादच नव्हती. दिवस मावळला तरी वाड्याचा दरवाजा बंद नव्हता झाला. अजुनही तुरळक माणसे येत होतीच. उरली सुरली कामे नोकरावर सोपवून सावकारपुत्र जरा चंदनाच्या झोपाळ्यावर विसावला होता. अतिव आनंदाने त्याला किंचीत ग्लानी आल्यासारखे झाले होते. नोकरांनी कार्यक्रम संपला असं समजुन सर्व आवरायला घेतले होते. समया, झुंबरे प्रकाशीत करायला सुरवात झाली होती. वाड्याचा मुख्य दरवाजा बंद करता करता सावकारपुत्राच्या कानावर साद आली “भिक्षां देही” त्याने बाजूलाच असलेली छोटीशी रेशमी थैली उचलली. मोत्यांनी भरली आणि नोकराकरवी पाठवून दिली. आता त्याच्यात ऊठण्याचेही त्राण राहीले नव्हते.
इतक्यात थैली घेवून गेलेला नोकर माघारी आला आणि हात जोडून म्हणाला “महाराज, दारावर साधूमहाराज आले आहेत. पण ते कोरड्या शिध्याव्यतिरीक्त काहीही घ्यायला तयार नाहीत.”
इतक्या निर्मोही साधूला स्वतःच्या हाताने भिक्षा घालावी असा विचार करुन सावकारपुत्राने कोरडा शिधा मागवला आणि स्वतः दरवाज्याकडे वळाला. साधूला पहाताच सावकारपुत्राला खुप समाधान वाटले. तरुण वय, काळीभोर दाढी, तेजस्वी डोळे, चेहऱ्यावर प्रभा असावी अशी कांती. एका हातात झोळी तर दुसऱ्या हातात योगदंड. एकुनच प्रसन्न करणारे व्यक्तीमत्व होते साधूचे. सावकारपुत्राने शिधा असलेले तबक पुढे केले. साधुनेही आपली झोळी पसरली आणि मंद स्मित करत सावकारपुत्राकडे पाहीले. पण क्षणभरातच साधूच्या चेहऱ्यावरचे मंद स्मित मावळले. गंभीर होत त्याने आपली झोळी मागे घेतली. सावकारपुत्रालाही आश्चर्य वाटले. साधूने झोळी परत खांद्यावर अडकवली आणि भिक्षा न स्विकारताच सावकारपुत्राकडे पाठ करुन तो चालू लागला. रिक्त हाताने जाणारा याचक पाहून सावकारपुत्र गोंधळला. जाणाऱ्या साधूच्या मागे धावत त्याने साधूचा रस्ता अडवला. हात जोडून त्याने भिक्षा न स्विकारण्याचे कारण विचारले.
साधू थोडा विचारमग्न होत म्हणाला “मला स्पष्ट दिसत नाही तुझे भविष्य बाळ, पण तुझ्या हातुन ब्रह्महत्या होणार आहे हे नक्की. आणि कोणत्याही प्रकारे हे पातक तुला टाळता येणार नाही. परिणामी मी तुझ्या हातुन भिक्षा स्विकारु शकत नाही.”
हे ऐकताच सावकारपुत्राच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याचे भान हरपल्यासारखे झाले. साधू कधी निघुन गेला हेही त्याला समजले नाही. सुन्न होवून तो वाड्यावर परतला. मुंगीलाही रोज साखर भरवणारे आपण, आणि आपल्या हातुन ब्रह्महत्या होणार हे समल्यावर त्याचे चित्त अस्वस्थ झाले. रात्रभर त्याला झोपही लागली नाही. हे काय होवू घातलेय आपल्या सुखी आयुष्यात तेच त्याला समजेना. यावर त्याला काही उपाय सापडेना. आत्महत्येचाही विचार त्याच्या मनात येवून गेला. पण ब्रह्महत्येइतके मोठे नसले तरी आत्महत्या हेही पातकच. शेवटी पत्नीबरोबर चर्चा करुन सावकारपुत्राने निर्णय घेतला. तरुण वयातच वानप्रस्थ स्विकारायचा. अत्यंत जड अंतःकरणाने पत्नीनेही परवानगी दिली. दुसरा पर्यायच नव्हता. पुढील दोन दिवसात त्याने आपल्या सर्व संपत्तीची व्यवस्था लावली. पत्नीला सर्व समजावून सांगीतले. चार दिवसांच्या आपल्या मुलाला एकदा कुशीत घेतले. सर्व नोकरांचा, नगरवासीयांचा निरोप घेतला. आणि एका शुभ मुहुर्तावर त्याने आपला वाडा, संपत्ती, नातेवाईक सगळं काही सोडून वनाचा रस्ता धरला.
वानप्रस्थ स्विकारण्यामागे फक्त ‘ब्रह्महत्या टाळणे’ एवढाच हेतू होता त्याचा. संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पुर्ण करुन, पितृऋण, समाजऋण फेडून, जपजाप्य, तप-साधना करने वगैरे उदात्त हेतुने त्याने वानप्रस्थ स्विकारलाच नव्हता. त्यामुळे सावकारपुत्राचे मन सदैव अस्वस्थ राही. पत्नीची, मुलाची आठवण त्याला शांतता मिळू देत नसे. त्याने नदिच्या काठी थोडी जागा साफ करुन तेथे लहानशी झोपडी बांधली. आहारासाठी जंगलातली कंदमुळे, फळे उपलब्ध होती. परांच्या मऊ गादीवर झोपणारा सावकारपुत्र आता दर्भावर झोपत होता. चंदनाच्या चौरंगावर बसुन सोन्याच्या ताटात जेवणारा तो, आता रानकेळींच्या पानावर जेवत होता. सदैव मानसांच्या गराड्यात असणाऱ्या सावकारपुत्राला आता मात्र मनुष्य दिसणेही मुश्कील होते. त्याला सोबत होती ती फक्त जंगली श्वापदांची. दिवसांमागुन दिवस जात होते. सावकारपुत्र आता जंगलात रमला जरी नसला तरी ते आयुष्य त्याच्या बरेचसे सवयीये झाले होते. अंगावरची वस्त्रे कधीच फाटली होती. त्यांची जागा आता वल्कलांनी घेतली होती. दाढी वाढली होती. केसांच्या जटा झाल्या होत्या. आहारात फक्त फळे, कंदमुळे आणि वनगाईंचे दुध असल्याने शरीर मात्र पिळदार आणि काटक बनले होते. जंगलात अन्नाच्या शोधात भटकताना दिवस पुरत नसे. श्वापदांच्या भितिने हातात दणकट, वजनदार काठी असे. दिवस सरले, महिने गेले, वर्षे उलटली. सावकारपुत्राचा दिनक्रम मात्र बदलला नाही. आता तो उतारवयाकडे झुकला होता. दिवसभर त्याचे विचारचक्र फिरत असत. आताआताशी त्याला ‘घेतलेल्या निर्णयाचा’ पश्चाताप व्हायला लागला होता. आपण पाप-पुन्याच्या नादात आयुष्य व्यर्थ घालवले असे त्याला वाटू लागले होते. काय ब्रह्महत्या व्हायची होती हातुन ती झाली असती पण तोवर आपण, आपली संपत्ती कितीतरी लोकांचे आयुष्य सावरुन गेली असती याची त्याला नव्याने जाणीव व्हायला लागली होती. एका यःकश्चीत साधूची भविष्यवानी ऐकून आपण समाजऋणाकडे पाठ फिरवली, स्वार्थी वागलो याचे त्याला अतोनात वाईट वाटे. त्याला त्या साधूचा चेहरा आठवे आणि त्याच्या जीवाची रागाने तगमग होई. एक उमेदीचे आयुष्य आपण मुर्खपणाने वायाला घालवले या विचाराने त्याला आजकाल झोप येत नसे. नेहमी प्रमाणे आजही सावकारपुत्र पहाटे ऊठला. नदिवर जावून स्नान वगैरे ऊरकून तो येतानाच काही फळे, कंदमुळे घेवून झोपडीकडे परतला. हातातली काठी दाराला टेकवून त्याने केळीची दोन पाने खाली अंथरली. त्यावर जमा केलेली फळे व्यवस्थीत मांडून तो जेवायला बसणार इतक्यात त्याच्या कानावर इतक्या वर्षांनी मानवी आवाजातली साद पडली. “भिक्षां देही!” पंचवीस वर्षांपुर्वी हीच साद, याच आवाजातली साद आपण ऐकली होती आणि आयुष्याची वाट लावून घेतली होती हे त्याला आठवले. पण मुळ स्वभावानुसार त्याने काही फळे उचलली आणि भिक्षा घालण्याकरता तो झोपडीच्या दारात आला. समोरच्या साधूला पाहून मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. तेच ओळखीचे तेजस्वी डोळे, तोच कांतीमान चेहरा. दाढी मात्र आता पांढरी झाली होती. त्या साधूला पुन्हा आपल्या दारावर पहाताच सावकारपुत्राचा संताप अनावर झाला. त्याच्या हातातली फळे खाली पडली. डोळ्यात संताप उतरला. दाराला टेकवलेली मजबुत काठी हातात घेत तो ओरडला “अरे मुर्खा, तुझ्यामुळे माझ्या पत्नीची, मुलाची आणि माझी ताटातुट झाली. अगणीत संपत्ती असुनही मी निर्धनाचे आयुष्य जगलो. का केलेस असे?” असे म्हणत त्याने सगळा जीव एकवटून समोरच्या साधूच्या मस्तकावर काठीने प्रहार केला. क्षणात साधू खाली कोसळला. अतीशय रागाने त्या ब्राह्मण साधूच्या निष्प्राण देहाकडे पहात सावकारपुत्राने आपल्या नगराच्या दिशेने धाव घेतली.
(कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे)

नागराज


हाताला इतर काही उद्योग नसला की गावाच्या हद्दीवर असलेल्या खिंडीच्या परिसरात भटकणे हा माझा आवडता उद्योग. काल मित्राला सोबत घेऊन या खिंडीत उतरलो होतो. सगळा परिसर लहान टेकड्यांनी वेढलेला आहे. हिरवी मखमली शाल पांघरुन हत्तींचा कळप विसावल्यासारखं देखणं दृष्य. या टेकड्या कमी, हिरवी पठारेच जास्त आहेत. वाऱ्याची झुळूक आली की एका टेकडीच्या अंगावर शहाऱ्याची जी लाट ऊठते ती हळूहळू टेकड्या ओलांडत जात मधेच कुठेतरी विरते. या वेळोवेळी शहारणाऱ्या टेकड्यांच्या मधून बारमाही वहाणारा ओढा आहे. त्यालाही कदंब-करवंदं व वेड्या बाभळींनी अगदी येरगाटून टाकलय. जिथे टेकड्या जरा सप्पय होतात तेथे हा ओढा डोह बनुन विश्रांती घेतो. रानफुले हुडकत आम्ही दोघे एका मागून एक टेकड्या भटकत होतो. रानफुले आता बरीच कमी झालीत. बाजरीच्या दाण्याएवढी गुलाबी फुले मात्र सगळीकडे पसरलीत. मध्ये मध्ये सोनकीच्या फुलांच्या पिवळ्या बिंद्या खुलून दिसतात हिरव्या शालूवर. टेकड्यांना नजर लागू नये म्हणून मधेच एखादी ऐसपैस खडकाची लालसर राखाडी तिट पोपटी मखमलीवर उठून दिसत होती. दुपारचे दोन वाजत आले होते. सुर्य डोक्यावर होता. फुलपाखरे तुरळक दिसत होती. सकाळचे पक्षी कुठेतरी अदृष्य झाले होते व दुपारच्या शिफ्टचे चंडोल, खडपाकोळ्या वगैरे पक्षी दिसायला लागले होते. चालून चालून आता मला दमायला झाले होते. टेकडीच्या अगदी माथ्यावरच असलेल्या एका झाडाखाली आम्ही टेकलो.
तिन चार तास गप्पा मारत भटकल्याने आता बोलायला काही विषय राहीला नव्हता व उत्साहही उरला नव्हता. मी कॅमेऱ्याची लेन्स उगाच एखाद्या गवताच्या पात्यावर फोकस करायचा खेळ खेळत होतो. ईतक्यात शेजारी बसलेल्या मित्राने दोन्ही हात डोक्यावर नेत नमस्कारासाठी जोडले व तो मोठ्याने म्हणाला “शंभोऽऽऽ हर हर!” त्या निरव शांततेत त्याच्या त्या शंभोने मला दचकवलेच. भानावर येत मी आजुबाजूला पहात त्याला विचारले “कुठे दिसला रे?”
माझा हा मित्र जरा विचित्र आहे. तो अनेक डोळस अंधश्रद्धा बाळगून आहे. शंकराला आवडतो म्हणून तो बेलाचे झाड जपतो. कृष्णाला आवडते म्हणून तो कुठे कदंबाचे रोप दिसले की त्याला लगेच आळे करतो. वेगवेगळ्या देवांना आवडतात म्हणून वेगवेगळ्या रंगांची फुलझाडे जपतो, जोपासतो. शंकराचे वाहन म्हणून तो बैलांवर कधी आसूड ओढत नाही. कार्तिकेयाचे वाहन म्हणून कधी मोरांना त्रास देत नाही. खंडोबाचा व दत्तगुरुंचा आवडता म्हणून नेहमी कुत्र्यांना भाकरी वगैरे वाढतो. लक्ष्मीचे वाहन म्हणून घुबडांना मारत नाही. (कोंबडीला कोणत्याही देवाने वाहन म्हणून निवडले नाही म्हणून तो देवांचे आभारही मानतो.) शंकराचा दागीना म्हणून कधी नाग व ईतर साप मारत नाही. देवराई देवाची असते म्हणून त्यातल्या झाडांची पानेही तो तोडत नाही. त्याच्या शेतातल्या बाजरीवरचा पाखरांचा, चिमण्या-राघूंचा अधिकार त्याला मान्य असतो. तो कधी शेतात बुजगावणे उभारत नाही. एकून काय तर, प्रत्येक गोष्ट या ना त्या मार्गाने तो निसर्गाशी नेऊन भिडवतो व जपतो. मला त्याचं असं अंधश्रद्ध असणं आवडतं. असो.
“कुठेय रे?” असं विचारुन मी आजुबाजूला नजर फिरवली. मित्र म्हणाला “हलू नकोस. डाव्या हाताला पहा.” मी सहज डाव्या बाजूला नजर फिरवली आणि माझ्या सगळ्या अंगातून भितीची लहर अगदी स्पष्ट जाणवेल अशी सरसरली. हातावरचे केस एकदम शहारा आल्यासारखे भितीने उभे राहीले. माझ्यापासून अगदी पाच-साडेपाच फुटांवरच गवताच्या पात्यांमधून अर्धवट उघडलेला फना वर काढून तो आमच्याकडेच पहात होता. कॉलेजमध्ये असताना अमावश्येच्या मध्यरात्री स्मशानातली खापरे उचलून आणायच्या पैजा सहज जिंकल्यात मी. पण साप पाहीला की माझी तंतरते. मग तो विषारी असो अथवा बिनविषारी. मी त्या प्राण्यापासून हजार फुट दुर असतो. आणि येथे हजार फुट तर सोडाच, तो शेषाचा वंशज माझ्यापासून फक्त पाच फुटांवर होता व चक्क आमच्याकडेच पहात होता. भितीने माझी बसल्या जागी अहल्येची शिळा झाली. मित्राचा आवाज दुर कुठल्या डोंगराच्या मागून यावा तसा ऐकायला यायला लागला. भितीचा पहिला आवेग ओसरल्यावर मी भानावर आलो. तो अजुनही आमच्याकडेच पहात होता. अगदी न हलता. ईतका स्तब्ध की कुणी प्लॅस्टिकचा नाग समोर ठेवलाय की काय अशी शंका यावी. कॅमेरा माझ्यासमोर जमिनीवरच होता. त्याची लेन्स किंचीत वर उचलून मी एक फोटो काढला. भिती कमी झाली असली तरी गेली नव्हती. विचार केला, एखादा रेकॉर्ड शॉट मिळाला तरी खुप झालं. आपण आज नाग पाहिला एवढी नोंद करण्यापुरता फोटो असला की झाले. (ईतकं घाबरुन काढलेला हा पहिलाच क्लिक मला सगळ्या फोटोंमध्ये जास्त आवडला.) मी मित्राकडे पाहीले. तो शांत होता. मला घाबरलेले पाहून तो म्हणाला “बस रे शांत. जाईल तो त्याच्या वाटेने.” जरा निर्ढावल्यावर मी अजुन दहा बारा फोटो काढले. तो अजुनही हलत नव्हता. एकाच जागेवरुन किती फोटो काढणार म्हणून मी कॅमेऱ्याचा नाद सोडला व त्याच्याकडे पहात राहीलो. दोन तिन मिनिटे तो तसाच उभा राहीला व मग अर्धवट उघडलेला फना मिटवत तो पुढे सरकला. आता गवतामुळे तो मला दिसत नव्हता. मी मित्राला तेथून निघायची घाई करत होत पण त्याला काही फरक पडत नव्हता. आपल्यापासून पाच सहा फुटांवर नाग आहे आणि तो आता आपल्याला दिसत नाहीए याचं त्याला काहीच वाटत नव्हतं. “तो स्वतःहुन जवळ येणार नाही. कदाचित गेलाही असेल तो.” यावर मित्र ठाम होता. हा शेष माझ्यापासून काही फुटांवर असुन नजरेआड होता. त्याची एकही मुव्ह मला कळत नव्हती. समोर ब्रम्हराक्षस जरी उभा ठाकला तरी मला काही वाटणार नाही पण नजरेआड असलेला किंचितसा धोकाही मला जास्त धडकी भरवतो. माणसाला यामुळेच अंधाराची भिती वाटत असावी. मधे चार पाच मिनिटे गेली आणि अगोदर तो जेथे दिसला होता त्या ठिकाणापासून उजवीकडे काही फुटांवर त्याने पुन्हा अर्धवट उघडलेली फना वर काढली. नजर अजुनही आमच्यावरच होती. मीही बुड हलवून माझा त्याच्याकडे पुढा केला. पुन्हा एक दोन फोटो काढले. मिनिटभर तो तसाच डोलत राहीला व पुन्हा त्याने फना खाली केली. माझी नजर सारखी भिरभिरत होती. पुन्हा पाच दहा मिनिटाने त्याने आणखी उजवीकडे पाच सहा फुटांवर फना वर केली. आता मात्र मी फोटो काढायचे सोडून दिले व त्याला न्याहाळत राहीलो. पुढील अर्ध्या तासात या शेषमहाराजांनी आमच्याभोवती जवळ जवळ वर्तूळ पुर्ण केलं होतं. एवढ्या वेळात मला त्याची फक्त फनाच दिसत राहीली. त्याला पुर्ण पहायला मिळाले नाही. तो जसजसा फिरत होता तसतसे मीही माझा मोहरा वळवत होतो. त्याच्यासोबत माझी बसल्या जागीच स्वतःभोवती एक प्रदिक्षणा पुर्ण झाली होती. एव्हाना आता तो पाच सहा मिनिटाने कुठून फना वर काढेल याचा मला अंदाज आला होता. मी अपेक्षीत ठिकाणी नजर रोखून होतो. बराच वेळ झाला तरी त्याने मान काही वर केली नाही. इतक्यात मित्राने समोरच्या कातळाच्या पट्टीकडे बोट केले. मी पाहीले तेंव्हा हा संथपणे त्या कातळाच्या शेजारुन पुढे सरकत जात होता. फना अजुनही अर्धवट उघडलेलाच होता. उघड्या फन्यासह चालणारा नाग मी प्रथमच पाहीला. पंधरा एक फुटांवर असणाऱ्या खडकाच्या मागे तो हळूहळू दिसेनासा झाला तेंव्हा मी ईतक्यावेळ अनियमित असलेला श्वास सोडला व पुन्हा छाती भरुन घेतली.
एकदाचा हा प्रसंग टळला. तो अर्धा तास मला दोन तासांसारखा वाटला होता. तो गेला त्या खडकाकडे माझी अधूनमधून नजर जात होती. नशिब आम्ही गाडी पार्क केली होती त्याच्या उलट दिशेने तो गेला होता. आता मागच्या मागे निघून येणे जास्त सुरक्षित होते. मी लेन्स कव्हर खिशात टाकले व उठायची तयारी केली. (जोवर स्पॉट सोडत नाही तोवर मी कॅमेरा कधीच बॅगेत ठेवत नाही. मला मिळालेले काही उत्तम फोटो हे निघताना ऐनवेळी मिळालेले आहेत.) उठायच्या अगोदर सहज सोमरच्या खडकाकडे नजर टाकली आणि मी चकीतच झालो. हा त्या खडकावर शरीराचा जवळ जवळ तिस टक्के भाग उभा करुन पुर्ण फना उघडून आमच्याकडे पहात होता. ईतक्यावेळ तो आम्ही बसलेल्या झाडाच्या सावलीत होता. पण आता दुपारची तळपती किरणे त्याच्या फन्यावर पडली होती. आम्ही बसलो होतो त्या जागेपासून खडक बराच उंचावर होता त्यामुळे त्याच्या मागे निळेशार आकाश दिसत होते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभुमीवर हातभर शरीर उचावलेला तो सर्पराज उन्हात तळपत होता, चमकत होता. ओंजळीएवढी फना काढलेल्या नागावर समोरचा बेडूक मुग्ध होतो. नागाची नजर त्याला मोहित करते असं म्हणतात. फना काढल्या मृत्यूवर मोहून गेलेला मंडूक ही कविकल्पना वाटत होती मला. पण जेंव्हा मी त्याला असं तळपताना पाहिलं तेंव्हा मला तो प्रचंड सुंदर दिसला. माझ्यावर गारुड झाल्यासारखं मी त्याच्याकडे पहात राहीलो. आता भितीचा लवलेशही नव्हता मनात. मी चटकन कॅमेरा काढला व आभाळाच्या बॅकग्राऊंडवर त्या सर्पराजाचे अनेक फोटो काढले. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणारा फोटोग्राफर नेहमी अतृप्त असतो. कितीही चांगला फोटो मिळाला तरी त्याचे "जरा हा ऍंगल पाहीजे होता" किंवा "तमूक बॅकग्राऊंड मिळायला हवे होते" असं काही ना काही सुरुच असते. तासाभरापुर्वी रेकॉर्ड शॉट मिळाला तरी खुप झाले असं म्हणत होतो मी पण मला आता त्याचा वेगळ्या ऍंगलने फोटो हवा होता. त्याची नजर कॅमेऱ्यावरुन हटतच नव्हती व मला त्याने आजुबाजूला पहातानाचे फोटो हवे होते. मी मित्राला हे सांगितल्यावर "हायला, एवढंच ना?" म्हणत तो उठला व त्याने अत्यंत सावकाश व दुरुन त्या नागाला प्रदिक्षणा मारली. आता मित्र जसा फिरेल तसा नाग आपली फना फिरवत होता. मला अगदी हव्या त्या सगळ्या ऍंगलने फोटो मिळाले. कितीही फोटो काढले तरी मन भरणार नव्हतेच पण अचानक बॅटरी एक्झॉस्ट झाल्याचा मेसेज स्क्रिनवर झळकला व कॅमेरा बंद झाला. नंतर पाच दहा मिनिटे त्याच्याकडे पहात आम्ही झाडाखाली बसलो व शेवटी निघालो. मी अगदी गाडीत बसेपर्यंत त्याचा फना मला अधून मधून दिसत राहीला. आम्ही गेलो तरी तो तेथेच होता.
एक मात्र जाणवलं. त्याने क्वचितच त्याची फना पुर्ण उघडली होती व त्याची जिभही मला अगदी क्वचित लवलवताना दिसली होती. याचा अर्थ त्याला आमच्याकडून काही धोका जाणवला नव्हता. आम्ही तेथे होतो तोवर त्याने फक्त सावधगीरी बाळगली होती. पहिली पंधरा मिनिटे सोडली तर नंतर मलाही त्याची भिती वाटेनाशी झाली होती.
टेकडी उतरुन मी गाडी हायवेवर वळवली तेंव्हा मित्र पुन्हा हात जोडून म्हणाला "सोमवारी दर्शन दिले शंभू महादेवाने."
त्याच्या या वाक्याची मी टिंगल करायला हवी होती पण मीही म्हणालो "खरय रे. भाग्यच म्हणायचं"
या मित्राच्या अंधश्रद्धा मला नेहमीच भावतात.
अंधश्रद्धा नसावीच आणि असलीच तर ती अशी असावी.



जिव्हाळा

मला पहाटे चार वाजता उठायची सवय असली तरी कामाला मात्र मी दहा-साडेदहापर्यंत हात लावत नाही. पण परवा सासवडला अत्यंत निकडीचे काम निघाले आणि दहा वाजेपर्यंत पुण्यातही असणे गरजेचे होते. त्यामुळे कधी नव्हे तो माझा पहाटेचा नियम बाजूला ठेवून मला सहा वाजता घर सोडने भाग होते. इतक्या लवकर निघण्याचा हेतू हा होता की सासवड परिसर पक्षिनिरीक्षकांचा आवडता भाग आहे, कदाचित आपल्यालाही काही फोटो मिळतील व अकरापर्यंत पुण्यात येता येईल. रात्री गुगल काढून शोध घेतला आणि एवढ्याशा सासवडमधे कुठे कुठे जायचे याची यादी वाढतच चालली. सासवडजवळील काही भागात रॅप्टर्स पहायला मिळतात. गरुड, ससाणे वगैरे. तेथूनच काही किलोमिटर गेले की हरणांचे भरपुर कळप अगदी सहज दिसतात. सासवड गावात सोपानकाकांचे, महादेवाचे वगैरे मंदिरे पहाण्यासारखी आहेत, दोन मिसळची ठिकाणे यादीत अगोदर होतीच. या सगळ्याला दिवस पुरणार नव्हता. त्यामुळे सगळ्यावर काठ मारुन फक्त काम डोळ्यापुढे ठेवून सकाळी लवकर निघालो. काही दिसलेच तर सोबत असावा म्हणून कॅमेरा मात्र घेतला. मिसळ पुन्हा कधीतरी चाखू म्हणत काही बिस्किटचे पुडे, चॉकलेटस, चार केळी व ज्युसची बाटली गाडीत टाकली आणि निघालो. तोच तोच रस्ता काय पहायचा म्हणून आणि रुट बदलला तर प्रवास जरा सुखकर होतो हा नेहमीचा अनुभव असल्याने दिवे घाटाचा रस्ता टाळून मी गाडी कोरेगावकडे वळवली.
सात आठ किलोमिटर अंतर पार केल्यानंतर सोलापुर महामार्ग सोडून मी उजवीकडे वळालो आणि काही क्षणातच फिरत्या रंगमंचावरील दृष्य बदलावे तसे परिसराचे दृष्य अचानक बदलले. रस्ता एकपदरी झाला. त्याच्या दुतर्फा बाभूळ, वडाची झाडे दिसायला लागली. रस्ता एकपदरी असल्याने दोन्ही बाजूला असलेली शेते अगदी रस्त्याला भिडली होती. अधून मधून असलेल्या कौलारु घरांची अंगनेही जवळ जवळ रस्त्याला लागून होती. अनेक घराच्या कौलांवर हलका धुर रेंगाळताना दिसत होता. दोन्ही बाजूस शेती होती. हवेतला गारवा वाढल्यासारखा वाटला. सुर्योदयाला अजुन वेळ होता पण चांगले फटफटले होते. मागे जाणाऱ्या शेतात माणसांची लगबग जाणवत होती. रस्ता लहान लहान टेकड्यांमधून जात होता. त्या टेकड्यांनी गळ्यात मफलर घालावा तसा विरळ धुक्याचा गोफ गुंडाळला होता. हवेला मातीचा, गवताचा, शेणाचा व धुराचा सुरेख वास होता. थंड वाऱ्याने माझ्या नाकाचा शेंडा हुळहूळल्यासारखा झाला होता. हे वातावरण पाहू गरमागरम, कडक चहा हवा असे फार तिव्रतेने वाटायला लागले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडीत काकडा लावला होता. त्या सुरांना सगळ्या वातावरणामुळे वेगळीच झिलई चढली होती. त्यातील अभंगांचे अर्थ नव्याने उमगायला लागले. हातावर हात चोळत बायकोने खुप वेळा काचा वर करायला सांगूनही मी त्या तशाच ठेवल्या होत्या. गाडीचा वेग मात्र जरा कमी करुन मी अगदी रमत गमत चाललो होतो. एका हाताने गाडी चालवत मी माझा उजवा हात गाडीबाहेर काढला होता. थंडीमुळे त्यावर डोळ्यांना स्पष्ट दिसेल असा काटा उभा राहीला होता. मी समोरच्या टेकडीला वळसा घातला आणि समोरच सुर्यनारायणाचे दर्शन झाले. लहान मुलाने उत्सुकतेने खिडकीवर हनुवटी ठेवून पलीकडे चालली एखादी मिरवनूक पहावी तसे समोरच्या टेकडी मागून सुर्य हलकेच डोकावून पहात होता. अलीकडे असलेल्या विजेच्या खांबात तो अडकल्यासारखा वाटत होता. अगदी तापहीन असलेला तो सुर्याचा गोळा डोळ्यांना चक्क सुखावत होता. पंधरा मिनिटांनंतर याच्याकडे पहानेही असह्य होणार होते. मी गाडी बाजूला घेतली. खरेतर कॅमेरा काढून फोटो वगैरे काढण्यात उगाच वेळ घालवावा वाटत नव्हते पण सवयीचा गुलाम असल्याप्रमाणे मी काही स्नॅप घेतले. पुन्हा एकदा चहाचा वाफाळता कप डोळ्यांपुढे फिरुन गेला. मी गाडीत बसलो. निघायला तर पाहीजे होते. बायको का आली नाही म्हणून पाहीले तर ती रस्ता ओलांडून पलिकडे गेली होती. मी पाहिले आणि पहातच राहीलो. रस्त्याच्या कडेलाच अगदी खेटून एक लहानसे कौलारु घर होते. त्याच्या अंगणात बऱ्याच कोंबड्या चरत होत्या. काही शेळ्याही दिसत होत्या. चवड्यावर बसुन एक म्हातारी अंगन झाडत होती. झाडताना ती सारखी डोक्यावरचा पदर आणि नाकातली नथ सावरत होती. पलिकडे अतिशय लहान असलेल्या शेतात एका शेतकऱ्याने नांगर धरला होता. त्याच्या नांगराच्या पुढे मागे अनेक बगळे, कोंबड्या ढेकळातले धान्य, किडे वगैरे टिपत होते. त्या काळ्याभोर रानात त्या रंगीत कोंबड्या आणि पांढरेशुभ्र बगळे छान उठून दिसत होते. एक कुत्रा अधून मधून बगळ्यांच्या मागे लागत होता. बैलही अगदी जीवा शिवाची जोड असावी तशी पांढरी शुभ्र, लांब शिंगाची होती. ती लाल रंगात रंगवलेली शिंगे लांबूनही उठून दिसत होती. शेत अगदी लहानसे होते. बहुतेक घरचा भाजीपाला करण्यासाठी असावे. त्याच्या मागे झाडी दिसत होती. झाडीच्या मागे दुरवर अस्पष्ट डोंगर धुक्यात हरवले होते. एकून ते सगळे दृष्य अगदी चित्रात असावे तसे दिसत होते. चित्रही कसे, तर लहान मुल हट्टाने एखादे चित्र काढते व त्यात त्याला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी काढते. निळे आकाश, त्यात उडणारी पक्ष्यांची रांग, दोन डोंगरांच्या मधून उगवणारा सुर्य, शेजारून वहानारी नदी, नदीवर मासे पकडणारा कोळी वगैरे सगळे ते मुल एकाच चित्रात बसवायचा प्रयत्न करते तसे येथे बहुतेक सगळ्या गोष्टी एकाच फ्रेममधे होत्या. आणि त्याही अगदी खऱ्याखुऱ्या. माझ्या गावीही साधारण असेच वातावरण असते तरीही ते परिपुर्ण चित्र पाहून मला हरखल्यासारखे झाले. मी काहीही न बोलता गाडी लॉक केली आणि कॅमेरा घेवून शेताकडे निघालो. बायकोही मागोमाग होती. मला या पक्षीनिरीक्षणाचा छंद जडल्यापासून तिलाही एक नविन विरंगुळा सापडला आहे. मला दिसायच्या अगोदर एखादा पक्षी शोधायची तिला घाई असते. असा एखादा पक्षी दिसला की मला दाखवून तिला कोण आनंद होतो. “मी आहे म्हणून तुला पक्षी दिसला, नाहीतर तुला दिसला असता का तो?” असा टोमणा मला ऐकवून ती दुसरा पक्षी शोधत बसते. आताही तिला शेतकऱ्याच्या नांगराऐवजी पलीकडे असलेले लहानसे तळे व तेथे अजुन न दिसलेले पक्षी दिसत असाावेत. आम्ही समोरचा बांध उतरलो आणि बगळ्यांच्या मागे लागणारा कुत्रा आमच्याकडे पळत आला. एकून वातावरणामुळे मला त्याची भिती वाटायच्या ऐवजी मीच त्याला “वाघ्या इकडे ये” म्हणत हाका मारल्या. (त्याचे नाव टायग्या म्हणजे टायगर होते हे नंतर समजले) दिसायला जरा उग्र असलेले ते गावठी व म्हणूनच चलाख असलेले कुत्रे जवळ आले. त्याने प्रथम मला, मग बायकोला समाधान होईपर्यंत हुंगले व काही धोका नाही हे समजल्यावर ते शेपटी हलवत पुन्हा मागे पळाले. चला, सुरवात तर चांगली झाली होती. आम्ही अंगणात आल्यावर म्हातारीने झाडू खाली ठेवून आमच्याकडे डोळे किलकिले करत पाहीले. मग तेथेच रचलेल्या गोधड्यांच्या चळतीमधून तिने एक वाकळ बाजूच्या लोखंडी कॉटवर टाकली व “बसा, वाईच पानी आन्ते” म्हणत वाकतच आतमधे गेली. म्हातारीचा मोकळेपणा पाहून मला छान वाटले. मी कॅमेरा तेथेच ठेवून निवांत बसलो. बायको एव्हाना शेजारच्या शेतात पोहचली होती.
म्हातारीने पाण्याचा तांब्या माझ्या हातात दिला व जमीनीवर बसत मला विचारले “कोन गावचं पाव्हनं म्हनायचं?”
पाणी प्यायलावर तांब्या बाजूला ठेवत मी म्हणालो “पुण्याहून आलोय आज्जी. नांगर पाहिला शेतातला म्हणून जरा थांबलो”
“आस्सं! चांगलय. जेजूरीला चाललाय जनू” आज्जीचा पुढचा प्रश्न तयारच होता.
“जेजूरीला नाही आज्जी. येथेच सासवडला काम आहे जरा. दुपारपर्यंत माघारी फिरु” आज्जीचे वय पाहून माझा आवाज उगाच चढा लागला.
“आस्सं! मंग गडावं नाय जात तर. आसुंदे, आसुंदे! बस लेकरा, जरा लेकाला हाकारते. नांगूर धरलाय त्यो थोरला हाय. धाकला रातीच सासवडाला गेलाय. गरम हाय डोक्यानी पर चांगला हाय” असं म्हणत म्हातारी जमीनीला रेटा देत “इठ्ठला, पांडूरंगा” म्हणत उठली. तिच्या थकल्या तनूची धनूकली झाली होती. सहज ऐंशीच्या पुढे असावी. बाजूच्या कुडाचा आधार घेत ती घराच्या टोकापर्यंत गेली. नांगर अगदी समोरच चालला होता. तिने शेताकडे पहात एक दोनदा फक्त हात हलवला व पुन्हा माझ्या समोर येवून बसली. समोरच्या झाडूच्या काड्या निट करायचा चाळा आज्जीने सुरु केला. दहा मिनिटातच घुंगराचा आवाज आला. मागोमाग बनियन व पायजमा घातलेला, डोक्यावर गांधी टोपी असलेला, तिचा मुलगा अंगणात आला. पन्नाशीच्या आसपास असावा. कुडाला पाठ टेकवून त्याने आरामशीर मांडी घातली. डोक्यावरची टोपी मांडीवर आपटून साफ केल्यासारखी केली आणि माझ्याकडे पाहून त्यानेही अगदी तोच प्रश्न मला विचारला “कोन गावचं पाव्हनं म्हनायचं?”
मी आज्जीला सांगितलेले पुन्हा एकदा त्यांना ऐकवले. यावर त्यांचा प्रतिसाद अगदी आज्जीसारखाच होता.
“आऽऽस्सं! जेजूरीला चाल्लाय जनू दर्शनाला?”
मला उगाच वाटून गेले की गालाला काही हळद वगैरे लागलीय की काय माझ्या.
मी हसुन म्हणालो “नाही. सासवडला जरा काम आहे. तुमचा नांगर पाहिला म्हणून थांबलो”
“ब्येस केलं” म्हणत त्याने आत पहात आवाज दिला “अगं ये! चहा ठ्येव पाव्हन्यांना”
मग माझ्याकडे पहात तो म्हणाला “तुमी चहा घ्या तवर माझा तास उरकीतो. मग भाकर खावूनच निघा”
मला काही समजेनाच. आमच्याकडे कुणी पाहूणे येणार असतील तर आमचे तोंड वाकडे होते आणि येथे ओळख पाळख नसलेल्या माणसांना पाहुणा समजून बडदास्त ठेवली जात होती. एक वेळ चहाचा आग्रह मी समजू शकलो असतो पण “जेवूनच जा” या आग्रहाचा अर्थ समजण्याइतका दिलदारपणा मी कधी कुणाला दाखवलाच नव्हता. कधी कुणा अनोळखी व्यक्तीला पंक्तीला घेवून प्रेमाने खावू खातले असते तर कदाचीत त्या माय-लेकांच्या प्रेमाचा अर्थ मला समजला असता. “भाकर खावूनच निघा” यातली सहजता पाहून चोविस तास दार बंद असलेल्या घरात रहाणाऱ्या माझ्यासारख्याला ठेच लागली. पाचच मिनिटात शेतकरी दादांच्या बायकोने चहाचे कप आणले. बायको अजुन शेताकडेच होती. त्यामुळे एक कप माझ्या हातात देवून तिने एक कप पुन्हा मागे नेला. चहा कपभरुन तर होताच पण बशी देखील अर्धी भरलेली होती. मी बशीतील चहा संपवला व निवांतपणे कपातील चहाचा आनंद घ्यायला सुरवात केली. चहा जरा जास्तच गोड होता. किंचित स्मोकी फ्लेवरही होता चहाला. मला मघापासुनच चहा प्यायची खुप इच्छा झाली होती त्यामुळे तो गोड चहा मला फार टेस्टी लागत होता. मी कप घेवून कॉटवरुन उठलो. रस्त्याच्या कडेला उभा राहून चहा पित राहीलो. समोरचा दिनमनी आता टेकडीमागून बराच वर येवून एका मोठ्या लिंबाच्या झाडामागे लपला होता. टेकडीवर असलेल्या ज्वारी बाजरीच्या शेतातील पिके काळी पण रेखीव दिसत होती. असे वाटत होते की गारव्यामुळे त्या टेकडीच्या अंगावर रोमांच उठले आहेत. हवेत थंडी नसली तरी चांगलाच गारवा होता. धुक्याचा आता मागमुसही नव्हता. पक्ष्यांचा किलबिलाट वाढला होता. आकाशही क्षितीजावर शेंदरी होत माथ्यावर निळेभोर व्हायला लागले होते. त्या निळसर शेंदरी आकाशात बगळ्यांचे चंद्रहार उडत होते. त्यांच्यामागून करकोच्यांचीही माळ उडताना दिसत होती. “गेल्या त्या बगळ्यांच्या माळा आणि ‘बगळ्या बगळ्या कवडी दे’ म्हणायचा भाबडेपणा देखील हरवला आता” असं मी कैकदा मित्रांकडे गाऱ्हाने गायलो होतो. पण समोरच्या बगळ्यांच्या आणि करकोच्यांच्या उडणाऱ्या रांगा पाहून ‘सगळे जेथल्या तेथे आहे, आपणच या बेगडी जगण्यात हरवलोय’ हे लक्षात आले.
मी रिकामा कप खाली ठेवून शेतात गेलो तेंव्हा शेतकरी दादांनी नांगर पुन्हा सुरु केला होता. तेथे शेजारी एक लहानसे डबक्यासारखे तळे होते. बायको अजुनही तेथे उभी राहून काहीतरी शुट करत होती. मी जवळ गेल्यावर मला काही बोलू न देता तिने काय काय दिसले याची यादीच वाचायला सुरवात केली.
“समोर बघ, ते सँडपायपर अजुन बसलेत तेथे आणि वर पहा, किंगफिशर आहेत दोन” असं म्हणत तिने समोर बोट दाखवले.
मी बायकोच्या हातातला कॅमेरा बंद करत घराकडे हात करुन म्हणालो “तु अगोदर घरी जा. आज्जीबरोबर गप्पा मार. मी येतो येवढ्यात”
मी प्रथम तेथे फिरणाऱ्या कोंबड्या व अगदी घोळका करुन बसलेल्या बगळ्यांचे फोटो काढले. नांगराचे फोटो काढले. मग कॅमेरा गळ्यात अडकवून मी नांगराच्या सोबतीने शेतकरीदादांच्या बरोबर गप्पा मारत चालू लागलो. त्यांच्या कोण? कुठले? गाव कोणते? कुठे चाललोय? वगैरे प्रश्नांना उत्तरे देता देता दोन तिन चक्कर पुर्ण झाल्या. घरामागे येताच दादांनी नांगर शेताबाहेर काढला. बैल मोकळे करुन अंगणातल्या खुंट्याला गुंतवले. त्यांच्यासमोर काही गवत टाकून ते मला म्हणाले “लई वखूत थांबावलं तुमाला. चला पह्यली भाकर मोडू. आईबी वाट बघत आसन”
मी त्यांच्या मागून घरात आलो. घर म्हणजे चांगली तिस बाय बारा फुटांची लांबलचक खोली होती. साधारण विस फुटांवर मधेच एक चार फुट उंचीची मातीने सारवलेली भिंत होती. पलीकडे स्वयपाकघर असावे. रांगेत मांडलेली पितळी भांडी दिसत होती. आम्ही होतो त्या भागात एका बाजूला पोत्यांची लहान थप्पी व काही शेतीची औजारे होती. एक मोठा लाकडी पलंग होता. त्यावर दोन पाच सहा वर्षांची मुले खेळत होती. आम्ही आत आलो ते दार सोडून त्या खोलीला अजून दोन दारे होती. त्यातील एका दाराने मागे जात शेतकरी दादा म्हणाले “तुमी बसा. मी पाय खंगाळून आलोच”
मी भिंतीपलीकडील स्वयपाकघरात डोकावलो. बायको विनोदी चेहरा करुन पाटावर बसली होती, समोर बसलेल्या म्हातारीच्या डोळ्यात मिश्किलपणा दिसत होता. बाजूलाच गॅसची शेगडी होती. चहा मात्र चुलीवर ठेवलेला होता.
मी बायकोकडे पाहून म्हणालो “काय झाले? छान गप्पा रंगल्यात की तुमच्या”
बायकोऐवजी म्हातारीच गालभर हसत म्हणाली “काय नाय ओ. तुमच्या बायकूला इचारीत व्हते का केसं भुंडी कशापायी केली? पण एवढी गड्यावानी काम करती बाय तर भांडी धुनी, येनी फनी कव्हा करायची? चांगलं हाय. आसंच एकुनाराला धरुन राह्यचं बाबांनो. दुसरं काय हाय सांग?”
मी बायकोकडे पाहीले. तिला काही वाटलेले दिसले नाही. उलट गंमत वाटली असावी. आज्जीने तिच्या मशरुम की कोणत्या हेअरकटला बिनदिक्कत भुंडे केले होते.
मी शेतकरी दादांच्या शेजारी येवून बसलो. त्यांनी बसल्या जागेवरुनच “आई वाढती का गं? भुका लागल्यात” म्हणत आवाज दिला. मी इतक्या काकूळतीला येत त्यांना सांगितले की खरच जेवणाचे काही काढू नका आता. हवं तर पुन्हा एकदा चहा घेतो आम्ही. तसेही आम्ही अकरानंतरच जेवतो. त्यामुळे आता भुक नाही. खरे तर मला रोज सकाळी आठ वाजता पोटभर जेवायची सवय आहे. आता आठ वाजलेही होते. पण त्या कुटूंबाएवढा मनाचा मोकळेपणा माझ्याकडे नव्हता. अस्थानी संकोच मला पिठलं भाकरी खावू देत नव्हता. आम्ही जेवत नाही म्हटल्यावर आज्जी बरीच नाराज झाली.
“इतक्या वखूत बसलासा, थोडा वखूत आजून बसा. घडीभरात गरम भाकर वाढीते” म्हणत आज्जीने खुप आग्रह केला. “आमचं पुन्य कशापाई दवडता” म्हणत ब्लॅकमेलही केले. पण मला आणि बायकोला खरच तेथे इच्छा असुनही जेवायला मन करेना. कोण कुठले कुटूंब. पाणी दिले, चहा दिला, प्रेमाने चौकशी केली यातच आम्हाला खुप काही मिळाले होते.
मी पलंगावरुन खाली बसत म्हणालो “आज्जी चुलीवरचा तो चहाच द्या आता कप भर. जेवायला पुन्हा कधी तरी नक्की येवू आम्ही”
शेवटी अतिशय नाराजीनेच आज्जी कबूल झाली. तोवर बायकोने गाडीतून बिस्किटचे पुडे, चॉकलेट आणले होते. मी बिस्किट आज्जीकडे दिली आणि चॉकलेट त्या मुलांच्या समोर धरली. त्यातल्या एकाने चटकन चॉकलेट घेतले पण दुसऱ्या लहान मुलाने मात्र माझ्याकडे शंकेने पाहीले. त्याने बनियन घातले होते आणि खाली तो दिगंबरच होता. एका हाताचे बोट लाल करगोट्यामधे गुंतवून दुसऱ्या हाताने तो चक्क नुन्नीबरोबर खेळत होता. मान तिरकी करुन माझ्याकडे रोखून पहात होता. त्याच्या आईने त्याला भिंतीमागूनच आवाज देवून “घे बाळा, काका हायेत ना आपले? घे” असं सांगताच मात्र त्याने चटकन चॉकलेट घेतले व धावत आईच्या पदरामागे जावून लपला. तोवर आज्जीने चहा आणला. एका पितळी प्लेटमधे मी दिलेली बिस्किटे होती. माझीच बिस्किटस शेतकरी दादांनी मला आग्रहाने खायला लावली. या चहापानात आमची दहा मिनिटे गेली. बाहेर आता उन चढले होते. चहा घेता घेता मी पक्ष्यांचे फोटो का काढतो? त्याचे मला पैसे मिळतात का? किती मिळतात वगैरे माहिती शेतकरी दादांनी विचारुन घेतली. हा फक्त छंद आहे हे समजल्यावर त्यांना आश्चर्य वाटले. माझे हे पक्षी-वेड पाहून त्यांनी मला जाताना कुठे कुठे पक्षी दिसतील याची एक जंत्रीच दिली. मला माहित असलेली नावे आणि ते सांगत असलेली नावे यात बराच फरक असला तरी त्यांना पक्ष्यांची अगदी बारीकसारीक माहिती आहे हे सहज लक्षात येत होते.
“आवं हे तं कायीच नाय. आमचं वडील व्हते तव्हा हे एक एक गिधाड उतरायचं रानात. दांडग्या गड्याला भ्या वाटन असा एक एक पक्षी. पन या कैकाड्यांनी आन फासेपारध्यांनी पार मारुन खाल्ली सम्दी गिधाडं. वस्तीवरच्या कोंबड्या चोरायच्या आन फास लावून गिधाडाला चारा म्हणून ठिवायच्या. कोंबड्या देवून गिधाडं मारनारी ही इपारी मानसं. पाक साफ केली गिधाडं. ढोक तर औशीदालाबी ठिवला नाय. आन काय काय पाखरं व्हती पन सम्दी गेली. पघायला मिळना आता ही पाखरं”
मी सर्व माहिती हरखल्यासारखी ऐकत होतो. छान वाटत होते.
“जाताना आपन नांगूर धरला व्हता का, त्या अंगाला चक्कर मारा एक. दोन चार खंडूबा असत्यात तिथ दिसभर. ढोकरीबी दिसन. तुताऱ्या तर इळभर असत्यात तिथं. आन इथून चार मैल गेलं का मंग एक चढ लागन. तिथं कुनालाबी इचारा फॅक्ट्री कुठशीक हाये. आपली पत्रावळीची फॅक्ट्री हाय ओ. तिथून खालच्या अंगाला कासराभर आत एक रस्ता उतारलाय. तिथून मैलभर गेलं की मोप हरनाचे कळप दिसतील. एखादा गरुड तर दिसनच दिसन. ससानं बी मोकार हायीत. उशीर व्हत नसन तर तसच पुढं निगायचं. मोठं तळं हाय. तिथं काय बाय दिसनच. तिथच दुपार केली त हरनं तिथच पान्यावर येत्यात. दिसतील तुमाला. पार ताप आनत्यात मानसाला. उभं पिक नासावत्यात. लई हावरी आन चवन्याची जात हाय ती. कोल्हं बाकी गेल्या दहा वर्षात दिसलं न्हाई पघा”
हे सगळं ऐकून मला उगाच तासभर वाया घालवल्यासारखे वाटले. या दादांना घेवून बसलो असतो तर तासाभरात त्यांनी सासवड परिसरातील पक्षी, प्राणी, त्यांची ठिकाणे यांची इत्यंभुत माहिती मला दिली असती. मी एकदोन बिस्कीटे खावून चहा संपवला. त्यांच्या सुनेने (सुनच असावी) बायकोला हळदी कुंकू लावले. मग बायको आज्जीच्या चक्क पाया पडली. (ही तिची जुनी सवय आहे) आम्ही निघालो तेंव्हा ती दोन पोरं, त्यांची आई, शेतकरीदादा, आज्जी अगदी डांबरी रस्त्यावर निरोप द्यायला आले. आज्जीचे अजुनही “दोन घास खाल्लं अस्त तर बरं वाटलं अस्त जीवाला” हे पालूपद सुरुच होते. आम्ही गाडीत बसलो. दोघांनीही पुन्हा जेवायला यायचे अगदी वचनच घेतले. “पुढच्या टायमाला आला की लेकाचीही भेट व्हईन तुमची” म्हणत शेतकरी दादांनी हात हलवला. मघाशी बुजलेली पोरेही आता अगदी हसत, ओरडत टा टा करत होती. गाडी दुर जाईपर्यंत मला रस्त्यावर उभी असलेली म्हातारीच्या शरीराची धनूकली आरशात दिसत राहीली.
किती वेळ घालवला आम्ही त्या लहानशा घरात? फार तर दिड तास. पण या दिड तासाने मला पुढच्या पुर्ण आठवडाभर पुरेल इतकी उर्जा दिली. मला एक सुफी शेर आठवला. “हैराँ हूं मेरे दिल मे समाये हो किस तरहा, हालाके दो जहाँ मे समाते नही हो तुम” याचे उत्तर त्या शेतकरी कुटूंबाने मला दिले.






होळी

पुर्वी आमच्या गावी होळीच्या दिवशी संध्याकाळी ‘सोंगे’ निघत. ही सोंगे करणारे काही ठराविक कलाकार असत गावात. यात अर्थात आवडीचा भाग असे, जाती-धर्माचा नाही. होळी महिनाभर पुढे असताना या कलाकारांची गावमारुतीच्या देवळात बैठका बसायला सुरवात होई. यावर्षी कुणी कोणते सोंग काढायचे यावर चार चार तास चर्चा रंगे. या बैठकांना चहा पाणी न सांगता पुरवला जाई, संध्याकाळी मारुतीरायाची आरती सुरु झाल्याचे भानही या मंडळींना नसायचे. होळीपर्यंत यांचे जग वेगळेच होऊन जात असे. एकदा का कुणी काय सोंग काढायचे हे ठरले की मग त्याची तयारी सुरु होई, तालीम सुरु होई. जे कलाकार देवादिकांची सोंगे काढणार असत ते ‘म’कार वर्ज्य करत. मद्य, मदिरा व मदिराक्षी त्याज्य असे त्यांना. काहीतर मारुतीच्या देवळातच झोपायला येत. घर नको आणि घरधनीनीच्या संगाचा मोहही नको. या नियमांमागे पावित्र्य वगैरे जपण्याचा हेतू नसे, तर ते पात्र अंगी भिनवण्याचा हा एक प्रयत्न असे. आजच्या भाषेत ‘कॅरेक्टरमधे घुसण्याचा’ भाग असे. अर्थात शंकराची जास्त सोंगे निघण्यामागे हेच कारण असे. कारण महादेवाच्या सोंगासाठी चिलिम सोडायची गरज नसे. उलट राजरोस बैठक जमवायची परवानगीच मिळे या कलाकारांना. होळीच्या दिवशी दुपारी अकरा बारा वाजता मारुती मंदिराशेजारी असलेल्या मोठ्या तालमीमधे हे कलाकार रंगरंगोटी करायला बसत. हे रंगकाम पहायला ईतरांना मज्जाव असे. तिन साडेतिनच्या दरम्यान एकेक सोंग बाहेर यायला सुरवात होई. हलगी, डफ, ताशा व तुतारीवाले हजर होत. यातून सनई, पिपाणी यासारखी वाद्ये वगळत. रणवाद्यांना प्राधान्य असे. तासाभरात या सोंगांच्या मिरवणूकीची सुरवात तुतारीच्या ललकारीने होई. ऊभी पेठ संपता संपता वाद्ये गरम झालेली असत, तुतारीची वादी तटतटलेली असे, सोंगे पेटायला सुरवात झालेली असे. या सोंगामधे वाघ, दैत्य, मारुतराया व महादेवाची सोंगे आघाडीवर असत. वाघांच्या डरकाळ्या मारत आजूबाजूच्या ओट्यांवर झेपा मारणे सुरु असे. महादेवाच्या तांडवाने रस्त्यावर धुळ ठरत नसे. हनूमानाला आळीतल्या प्रत्येक घरामधे लंका दिसत असे. या गदारोळामागे राम, गणपती, काळ्या व पांढऱ्या दाढीवाले ऋषीमुनी यांचा शांत जथा चालत असे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केलेल्या लोकांना आशिर्वाद देत गणपती व राम पुढे सरकत असत. या रामाला व गणपतीला महादेवाच्या तांडवापासून व हनुमानाच्या सत्राणे उड्डाणापासून वाचवण्यासाठी चारपाच गावकरी सावध होऊन कडे करुन चालत. महादेवाच्या हातात असलेल्या लाकडी त्रिशुळाच्या टोकांवर मोठ्ठी लिंबे टोचून ती भगव्या फडक्याने घट्ट बांधलेली असत. त्रिशुळाचे वजन वाढवण्यासाठी त्याच्या टोकाला जडशिळ डमरु बांधलेले असे. बेभान झालेल्या शंकराचे हे गरगरणारे त्रिशूळ कुणाला लागू नये म्हणून ही काळजी घेतलेली असली तरीही या त्रिशूळाचा भक्कम दणका कुणाला बसेल हे सांगता येत नसे. त्यामुळे भोलेनाथाच्या आजूबाजूला आपोआप एक रिकामे रिंगण तयार होत असे. ही मिरवणूक वरच्या आळीला येऊन बाजारपेठेकडे वळेपर्यंत अगदी बेभान झालेली असे. हलगी खळीला आलेली असे, तुतारीवाल्याच्या तोंडाला फेस आलेला असे. तुतारी फुंकूण फुंकूण त्याचा अगदी मारुती व्हायच्या बेताला आलेला असे. हलगीवाला अधून मधून शेजारी चालणाऱ्या मशालजीच्या हातातल्या मशालीवर हलगी तापवून घेई. डफवाला कातडी पानावर ओला रुमाल फिरवून डफाचा घुमारा वाढवी. मिरवणूकीच्या पुढे असणाऱ्या मारुतीच्या व वाघांच्या डोळ्यात रक्त उतरलेले असे. या सगळ्याच सोंगांचा त्या दिवशी निरंकार ऊपवास असुनही त्यांना कुठून तरी सातत्याने उर्जेचा पुरवठा होत असल्यासारखे ते घुमत असत. ही मिरवणूक बाजारपेठतून माघारी वळून धनगर आळी, सुतार आळी, बामणवाडा फिरत पुन्हा मारुतीच्या देवळापुढे येई. तेथे मारुतीच्या समोर पुन्हा एकदा सगळ्या वाद्यांचा गजर होई. तुतारीचा नाद आकाशाला भेदून जाई. सोंगे स्प्रिंग लावल्यासारखी नाचत व एकदाची मिरवणूक संपे. मारुतीची आरती होऊन गावकरी पांगत. घरोघरी होळीचा नैवेद्य भरायला घेतला जाई. रचलेल्या होळीभोवती ब्राम्हण ताटकळलेले असत. त्यांचे मंत्रोच्चार सुरु होत. तासाभरासाठी सगळे गाव शांत होई. सातच्या आसपास मारुती, रामराया व शनीपुढली होळी पेटत असे. मग विजेच्या माळेतले बल्ब पेटावेत तसे उभ्या आळीत प्रत्येक घरासमोर होळीचा शेंदरी ठिपका पेटत असे. तासभर शांत असलेले गाव पुन्हा एकदा ठोकलेल्या बोंबांच्या गदारोळात हरवून जाई. गावाच्या डोक्यावर हलक्याशा धुराची टोपडी अंधारातही दिसायला सुरवात होई.
ही होळी रात्रीत विझुन जाई. दुसऱ्या दिवशी धुळवड करुन गावासाठी होळीचा सण संपून जाई. मात्र या होळीत नाचलेल्या सोंगांपैकी काही सोंगासाठी ही होळी संपत नसे. दोन चार जणांसाठी हमखास डॉक्टर पहावा लागे. महिनाभर आधीपासून तयारी केलेल्या या कलाकारांच्या अंगातून सोंगांची पात्रं निघता निघत नसत. वाघ नाचवलेला माणूस धुळवडीच्या दिवशीच घरात बांधून घालावा लागे. पुढे आठाठ दिवस हा वाघ हातापायाला बांधलेल्या दोरखंडांना झटके देत डरकाळ्या फोडत असे. होळीनंतर साताठ दिवस गावात फिरणारा त्रिशूळधारी शंकर हमखास दिसे. दरवर्षीचाच हा प्रकार असल्याने आम्हाला यात काही नाविन्य नसे.
हळू हळू सोंगांची प्रथा बंद होत गेली. वाघाची एखाद दोन सोंगे तेवढी शिल्लक राहीली. आमच्या आगोदरची पिढी गेली आणि हे वाघही त्यांच्यासोबतच गेले. आता घरटी होळी पेटत नाही. पुरणावरणाचे महत्व राहिले नाही. ब्राम्हणांच्या मंत्रोच्चाराशिवाय होळी पेटू लागली. तिचेही महत्व कमी होत गेले, धुळवड महत्वाची झाली. धुळवडीचे नैवेद्य मागे सरले व भांग आणि रंग आले. सोंगे गेली, ते कलाकार गेले. ‘कॅरेक्टरमधे घुसणं’ हा प्रकार निव्वळ वाक्प्रचार बनुन राहीलाय. पात्रांविषयी कलाकारांच्या मनात असलेला आदर गेला. आता एखादा ऋषी ग्लासात दाढी भिजणार नाही याची काळजी घेत व्हिस्की प्यायला लागला व सिताही हातवारे करत अर्वाच्य शिव्या द्यायला लागली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चांगले दिवस आलेत.
मी मात्र आजही मारुतीच्या देवळापुढे तांडव करणाऱ्या महादेवाचे त्रिशूळ चुकवून त्याच्या पायाखालची माती कपाळाला लावण्यासाठी धडपडतो आहे. पेटत्या हुडव्यातून नारळ काढताना भाजलेला माझा हात अजुनही हुळहूळतोय. कालाय तस्मै नमः म्हणत मला आजच्या पिढीशी जुळवून घेता येत नाहीए. माझ्यापुरता काळ त्याच आळीत मारुतीच्या देवळापुढे थांबलाय, गोठलाय.

हगामा

काल उरफाड्या घाटातली धुळ बैलांच्या तोंडच्या फेसानं जाग्यावर बसली होती. गाड्यांच्या शर्यतीने भल्याभल्यांच्या बैलांची रग जिरली होती. दुसऱ्या जत्रेच्या गाड्यांचे नियोजन करत बैलमालक आपापली जनावरं घेऊन दुपारपर्यंत वाटेला लागले होते. उरल्या सुरल्यांची जत्रा तमाशात पहाटपर्यंत हवेत शेमले, टोप्या फेकत संपली होती. आज यात्रेचा दुसरा दिवस. दंगलीचा दिवस, हगाम्याचा दिवस.
गाड्यांचा व तमाशाचा तसाही फारसा काही शौक नसल्याने मी तिकडे फिरकलो नव्हतो. पण कुस्ती माझा जिव्हाळ्याचा विषय. अर्थात फक्त पहाण्यापुरता. कधी पाचवी सहावीला असताना अंगाला आखाड्यातली लाल माती लागली असेल तेवढीच. त्यानंतर माझी वर्दी नेहमी प्रेक्षकांमधेच. जमलं तर जाऊ असा विचार करत असतानाच खालून काकोबाची खणखणीत हाक आली “हय अप्पा, हायेस का रं?”
मी गॅलरीत येऊन पाहीलं. समोर काकोबा उभा. सत्तरीच्या पुढची उमर. डोईला विटकरी रंगाचा घट्ट पटका. डाव्या खांद्यावरुन पुढे आलेला शेमला. पांढऱ्या शुभ्र छपरी मिशा. जत्रेच्या निमित्ताने घोटून केलेली दाढी. धुवट पांढऱ्या रंगाचा नविन बनशर्ट. त्याला साखळ्यांमधे गुंफलेल्या चांदीच्या गुंड्या. खाली धुवट शर्टाला न शोभणारे निळसर पांढरे, लाल काठाचे धोतर. तेही एका पायावर गुडघ्यापर्यंत व दुसऱ्या पायावर गुजराथी शेटजीसारखे अघळपघळ. पायात नविनच बांधून घेतलेल्या करकरीत वहाना. उमरीच्या मानाने ताठ कणा. शिडशिडीत पण काटक कुडी. आयुष्य पहिलवानकी करण्यात गेल्याने कमरेला धोतर असलं तरी चाल मात्र लुंगी घातल्यासारखी व काखेत लिंबं धरल्यासारखी डौलदार. रामोशाची जात सांगणारे सतेज डोळे. कपाळावर फासलेला भंडारा व त्यावर कोरलेली कुंकवाची रेष.
डाव्या खांद्यावरच्या शेमल्याने गळ्यातली चांदीत गोठलेली वाघनखे आजूबाजूला सारत घाम पुसत काकोबा माझ्या गॅलरीकडे डोळे लावून उभा होता.
मी गॅलरीतूनच विचारलं “एवढ्या सकाळी सकाळी ईकडे कसा रे काकोबा? ये वरती.”
शेमला पाठीवर फेकत काकोबा म्हणाला “वर नगं अप्पा. आदीच वखूत झालाय. जरा रानातली कामं, जित्राबांचं सम्द बैजवार वाटंला लाऊन आलोय. हगामा हाय नव्ह आज. तू कव्हा येशीन म्हणं?”
मी त्याला पुन्हा वर यायची खुण करत म्हणालो “येतोय रे मी. अगोदर तुझ्याकडेच येणार होतो, मग सोबतच जायचा विचार होता. किती वाजता सुरु होतोय हगामा?”
वर यायचे टाळत काकोबा म्हणाला “आता नाय वर येत. उन्हं कलायच्या वखताला हुतील रेवड्याच्या कुस्त्या सुरु. तू सिद्दा आखाड्याकडंच ये. मी हायेच. आता हालतो.”
माझ्या ऊत्तराची वाट न पहाता काकोबाने धोतराचे एक टोक हाताच्या तर्जनीला गुंडाळले व सोगा फलकारत तो डौल घालत निघालाही.
मी गेलो तेंव्हा रेवड्याच्या कुस्त्या सुरु झाल्या होत्या. पोरासोरांच्या कुस्त्या असल्या तरी आखाडा खचाखच भरला होता. घड्याळाचे काटे फिरावे तसे दोन हलगीवाले तडतडत आखाड्यात फिरत होते. दहा बारा वर्षांची दोन पोरे मातीत झोंबाझोंबी करत होती. मी काकोबाला शोधलं. तो आयोजकांच्या टेबलवर मांडी घालून सप्पय बसला होता.
मी त्याच्याकडे गेल्यावर काकोबा उगाचच कुणावर तरी खेकसला “उठ रं बेन्या, माणसं बी कळना झाली व्हय रं तुला” त्या बिचाऱ्या पोराने गुमान खुर्ची खाली करुन दिली. मी निवांत टेकलो. तोवर आखाड्यातल्या पोरांची कुस्ती निकाली निघाली. काकोबाने जिंकलेल्या पोराला रेवड्या, भगवा फेटा व शंभर रुपये दिले. दोन्ही बालपहिलवान उड्या मारत आखाड्याच्या गर्दीतून वाट काढत सुसाट पळाले. तोवर दुसऱ्या दोन जोड्या मातीत उतरल्या होत्या. अर्ध्या तासात सात आठ जोड्या माती खंगाळून गेल्या. काकोबा रितीप्रमाणे जिंकणाऱ्याला रेवड्या, पटके व शंभरची नोट देत होता. पाया पडणाऱ्या पोरांच्या पाठीवरुन हात फिरवत होता. मला मात्र काही कुस्त्या पहाण्यात रस वाटेना.
न रहावून मी म्हणालो “काय रे काकोबा, अशी कशी रे ही पोरं! अशी कुठं कुस्ती असते का? जोर नाही एकाही कार्ट्यात आजकालच्या. उगी आपलं एकमेकांची अंगे रापतायेत. जीवावर आल्यासारखी खेळतात. एकाही पोराचा हात शड्डूसाठी उठला नाही की रगेलपणे एकमेकांना भिडले नाहीत. ह्या, मजा नाही.”
काकोबा मोठ्याने हसला व म्हणाला “यांच्या या खेळण्यावं जावू नगस अप्पा. लय बाराची बेनी हायती. ईळभर डोंगर कोळपत हिंडत्यात. येळला करडापायी लांडगा घेत्यात अंगावं. नखऱ्याला आली तर मस्तवाल गोऱ्ह्याला खळीला आणत्यात. हायस कुठं! दम तुला गम्मत दावतो.”
आता काकोबा काय गम्मत दाखवतोय ते समजेना. काकोबा उठला. आखाड्यात उतरलेल्या तेरा चौदा वय असलेल्या पोरांना थांबवत त्याने माईक हातात घेतला. हलगीवालेही थांबले. काकोबाने टेबलवरचा पटका हातात घेऊन उंचावला व म्हणाला “आस्मान दाखवणाऱ्याला जेवढं बक्षीस मिळंन तेवढंच बक्षीस आभाळ पाह्यनाऱ्यालाबी मिळन. जिकलेल्या पैलवानाला पंचायतीतर्फे शाळेची कापडं मिळत्याल. जिकणाऱ्यानं जाताना गोपीनाथाकं माप देवूनच आखाडा सोडायचा हाये. आता हुंद्या जोरात. घ्या हनमंताचं नाव आन् भिडा एकुनाराला.”
काकोबा खाली बसला आणि आखाड्यातली पोरं पळत त्याच्या पाया पडायला आली. काकोबाने दोघांच्याही पाठीवरुन हात फिरवला. दोन्ही हातांचे अंगठे लंगोटामधे सारुन पुढेमागे फिरवत पोरं आखाड्याकडे वळाली. एकमेकांचा अंदाज घेत त्यांनी खालची लाल माती एकमेकांच्या हातात सरकवली. मधे क्षणभर एकमेकांचा अंदाज घेत ते दोन्ही पहिलवान थांबले आणि पापणी लवायच्या आत एक पोरगं विजेच्या गतीने समोरच्या मुलाच्या पटात शिरले. पण त्याच्या अपेक्षापेक्षाही समोरचं पोरगं जास्त सावध होतं. त्याने किंचीत सरकत बगल दिली आणि पटात घुसणाऱ्याचे डोके अलगद त्याच्या कचाट्यात सापडले. मुख्य दंगलीची वाट पहात गप्पा मारणारा आखाडा एकदम स्तब्ध झाला. समोर काहीतरी वेगळं चाललय हे लक्षात येताच पहाणारे सावरले. प्रेक्षकांकडे पहात हलगी वाजवणारे क्षणात मागे फिरुन हलगी वाजवू लागले. त्यातला एक त्या दोन पोरांच्या अगदी जवळ जात त्यांना चेव येईल अशी हलगी तडतडवू लागला. बोलून चालून हलगी म्हणजे रणवाद्य. ते चढीला लागल्यावर भिडलेले पहिलवानही एकदम ईरेसरीला येत भिडले. खळीला आले. नागापेक्षा त्याचं पिल्लू घातकी असतं. तशी ही पोरं थोरल्या पहिलवानांना लाजवतील अशी चपळाई दाखवत एकमेकांचा पट काढायच्या मागे लागली. कालच्या घाटातल्या दारु पाजलेल्या बैलांनी काय धुरळा उठवला असेल अशी लाल मातीची धुंद उठवली पोरांनी. बिनावस्तादी पहिलवान ते. फिरत जत्रेत आलेले व गम्मत म्हणून आखाड्यात उतरलेले. त्यांना चेतवायला कुठला आलाय त्यांचा वस्ताद! पण जशी आंधळ्याची गुरे देव राखतो तसेच विनावस्तादाच्या पहिलवानाला त्याची आळी राखते. एक पोरगं आपलं आहे हे लक्षात येताच सगळा रामोसवाडा त्याला पेटवायला उभा राहीला. आपसुकच दुसऱ्या पोरासाठी सगळी पारवाडी पुढे सरसावली. जो आखाडा दिवस मावळतीला नामी पहिलवानांच्या दंगलीने उसळायचा तो आताच या पोरांनी रंगाला आणला. तसेही नामी पहिलवानांची कुस्ती म्हणजे ख्याल. ते अंदाज घेत बसणार, जपून भिडणार, बचावाचा खेळ करणार, एकमेकांना कैची घालून पंच सोडवत नाही तोवर मातीत अजगरासारखे पडून रहाणार वगैरे. या पोरांची कुस्ती म्हणजे एकदम द्रुत लयीतली बंदीशच. स्वरविस्तार वगैरे भानगडच नाही. नुसता विजेचा खेळ, सौदामिनीची मस्ती, वळवाची झड. चार मिनिटही पोरं एकमेकांना भिडली नाहीत तोवर एकदम सगळा आखाडा उभा राहीला. टोप्या हवेत उडाल्या. “भले शाब्बास!” “वा रं वाघरा” चा गजर झाला. त्या लाल धुळीतून ती कुस्ती निकाली काढलेली दोन्ही पोरं चालत काकोबाकडे आली. नामवंत पहिलवानाला द्यावा तसा मान देत काकोबा पुढे झाला. बंडी खराब होईल याची फिकीर न करता जिंकलेल्या पोराला त्याने खांद्यावर घेतले. हाताने त्याच्या तोंडात खडीसाखर भरवली. त्याच्या लहानग्या डोक्यावर कौतूकाने पटका बांधला. बक्षिसाचे शंभर देवून वर स्वतःचे पाचशे त्या बालमारुतीच्या हातात कोंबले. एव्हाना गोपीनाथानं मापं घ्यायला टेप आणन्यासाठी पोरगं गावाकडं पिटाळलं होतं.
जरा वेळाने मी काकोबाला विचारलं “एवढा वेळ थातूरमातूर खेळणारी पोरं एवढी पेटली कशी रे काकोबा? वाटलं नव्हतं पोरं एवढी जालीम दंगल करतील म्हणून!”
काकोबा हसुन म्हणाला “अप्पा अरं येडाय तू. तुला ईकून येतील ही बेनी. आरं ती आदीच ठरवून येत्यात आखाड्यात. जरा वखुत झोंबाझोंबी करायची. मंग एकान पाडायचं, दुसऱ्यानं पडायचं. हाय काय त्यात. बक्षिसाचं शंभर मिळालं की गावात जावून भेळ, भजी, लाडू खायचं. उरलेलं पैसं वाटून घ्याचं.”
मी डोक्याला हात लावला.
काकोबा म्हणाला “आता जो जिकन त्याला कापडं. आन् ते बी माप द्यावं लागणार, वाटून घ्यायचा सवालच नाय. मंग कसा सौदा तुटायचा? पैशाचं म्हणावं तर ते दोगांनाबी मिळत्यात. मंग भिडली पोरं. आन् पहिलवान एकदा भिडलं की मंग त्ये कुणाचं नस्त्यात अप्पा. ईरेसरी जशी चांगली तशी वाईटबी हाय. पोरं हाय गुणाची पण लबाडी त्यांना ईरंला पडू द्येत नाय. हाय ते बरंय.”
पोरं कितीही बिलंदर असली तरी काकोबाने पोरांच्या बापाच्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात. असं असलं तरी मला काकोबाचा स्वभाव फार आवडतो. सगळं काही समजत असुन तो कधी “आमच्या वख्ताला असं नव्हतं गा” असं रडगाणं लावत नाही. काकोबाने त्याचं असंख्याचा अभाव असलेलं लहानपणही आनंदाने स्विकारलं असणार आणि आताच्या पोरांचं बिलंदर लहानपणही तो तेवढ्याच सहजपणे स्विकारतो. ‘आमच्या वेळी असं नव्हतं’ या रोगाला बळी न पडलेला एवढा एकच म्हातारा मी पाहीलाय.



Share

आज्जी

दिवस कलला की आज्जी अंगणात बसायची. तुळशीवृंदावनाला टेकून, एक पाय मुडपून, दुसरा लांब करुन ती सप्पय टेकायची. शेजारी मोठी चाळण, आठवा-निठवा, सुप,...