❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

मैत्र - ८

(काही कारणामुळे हा भाग बराच विस्कळीत झाला आहे. समजुन घ्याल, तसेच सुचनाही द्यालच.)
इन्नीने त्याला वर्गाच्या दारातच गाठलं आणि आधार दिला. दत्त्याही धावला. शकील गाडीच्या चाव्या माझ्या अंगावर फेकत म्हणाला “अप्पा, गाडी काढ. ठोब्बा, पानी ला जलदी.” मी रामला सगळ्यांच्या वह्या गोळा करायला सांगीतल्या आणि शकीलबरोबरच वर्गाबाहेर पडलो.
सखाराम आमच्या या धावपळीकडे डोळे विस्फारुन पहात राहीला…
मी आणि शकील बाहेर आलो. शाम्या इन्नीच्या हातातून दंड सोडवायचा प्रयत्न करत होता. इन्नी घाबरली होती, रडतही होती. शाम्याच्या खांदा हलवण्याबरोबर ती पुढे मागे धडपडत होती पण तिने शामचा दंड दोन्ही हातांनी अगदी गच्च पकडला होता.
“तू बाजूला हो गं इन्ने” म्हणत शकीलने एका हाताने शामचा दंड पकडला आणि दुसऱ्या हाताने शर्टची कॉलर पकडली आणि त्याला बाजूच्या बाकावर बळेच दाबून बसवले. शाम्याची अस्वस्थ चुळबूळ सुरु होती. इन्नी भेदरून बाजूला उभी होती. मी ठोब्बाने आणलेले पाणी शामसमोर धरले
“घे, थोडं पाणी पी, बरं वाटेल शाम.”
पण त्याचे लक्षच नव्हते. कुठेतरी शुन्यात पाहत त्याने मी समोर केलेला पाण्याचा ग्लास हाताने झिडकारला. डोळ्यातल्या पाण्याबरोबर आता त्याचे हुंदकेही सुरु झाले होते. ओठ गच्च आवळल्याने त्याचा चेहरा विचित्र दिसत होता. त्याचा एकूण रागरंग पाहून माझ्या छातीत धस्स झाले. मी असहाय नजरेने शकीलकडे पाहीले. त्याने ठोब्बाच्या हातातला पाण्याचा जग घेतला आणि सरळ शामच्या डोक्यावर ओतला.
“ऐ शाम, शाम्या. अरं काय झालं? बोलल्या बिगर कसं कळंन आम्हाला?” म्हणत दत्त्या त्याच्या दोन्ही गालांवर हलकेच थोपटत होता, तर राम त्याच्या पाठीवरुन हात फिरवत नुसताच भांबावल्यासारखा उभा होता. एवढ्या वेळात ठोब्बाने जोशीसर कोणत्या वर्गात क्लास घेत होते ते शोधून त्यांना घेऊन आला. इन्नी हाताची गच्च मुठ तोंडावर दाबून पहात होती. तिच्या डोळ्यातली भिती स्पष्ट दिसत होती. सरांच्याही लक्षात आलं की काहीतरी गंभीर प्रकार असावा. त्यांनी ठोब्बाला प्रथम इन्नीला वर्गात न्यायला सांगीतले.
शकील माझ्याकडे पाहून जवळ जवळ ओरडलाच “पागल, तुला गाडी काढायला सांगीतली होती ना?”
मी त्याच्याकडे पाहुन माझा प्लॅस्टर केलेला हात वर केला. इतक्यात कुणाला काही समजायच्या आत शाम मुसंडी मारल्यासारखा उठला आणि धावत सुटला. ते पाहून दत्त्याही धावला. त्याच्या मागे शकील आणि शकीलच्यामागे हात सांभाळत मीही धावलो. मी व्हरांड्यातुन उतरता उतरता रामला मळ्यातुन धोंडबाला बोलवायला पिटाळले. इन्नी वर्गात गेली होती पण खिडकीतून ती आमच्यावर लक्ष ठेवून होती. आम्ही सगळे शामच्या मागे धावल्याचे पाहून तीही आमच्यामागे पळत आली. ना तिला चप्पलचे भान होते ना ओढणीचे. शाम शांत होता पण भानावर नव्हता. दत्ताला बुलेट चालवता येत नव्हती आणि माझा हात प्लॅस्टरमधे होता. शकील काही शामला सोडायला तयार नव्हता. दत्ताने आणि शकीलने शामचे दोन्ही दंड धरले होते. मी आणि इन्नी त्यांच्या सोबत चाललो होतो. दत्त्या सारखा “शाम अरं बोल तं खरं. काय झालं?” विचारत होता. त्याला शकीलने गप्प केले. डेअरीच्या शेजारुन गावात जायला एक छोटासा रस्ता होता. त्यावरुन आम्ही घरी निघालो. डेअरी मागे पडली, तेवढ्यात मागून धोंडबा आणि राम सायकलवरुन आले. आम्हाला मधेच थांबवत धोंडबाने सायकल रामच्या अंगावर सोडली आणि त्याने शामचे दोन्ही खांदे धरले.
“शाम्या, काय रं? काय झालं?” शाम अजुनही शुन्यातच कुठेतरी पहात होता.
धोंडबाने इन्नीला विचारले “काय गं, काय झालं? हे राम्या बी काय सांगंना. माझा जीव थाऱ्यावं ऱ्हाईना मळ्यातून येवूस्तवर.”
इन्नी प्रथमच बोलली “धोंडीदादा, काही झालं नाहीए. तुम्ही सगळे शांत रहाल का? आपण घरी जाऊ अगोदर. राम तू पुढे जा सायकल घेऊन आणि मोडककाकांना घरी बोलाव.”
इन्नी बरीच सावरली होती. आमच्याही डोक्यात डॉक्टरांना बोलवायचे आले नव्हते. आम्ही घरी पोहचलो तर काकू आणि राम ओट्यावरच उभे होते. काकू घाबरलेल्या दिसत होत्या. या राम्याने काय काय सांगितले होते त्यांना कोणास ठाऊक. त्यांनी पायरीवरच शामवरुन भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. “इथेच थांबा, मी अंगारा आणते.” म्हणत त्या परत आत गेल्या. शकीलने शामला ओट्यावर बसवले. आम्हीही काळजीत तसेच बसुन होतो. इन्नी आत गेली होती काकूंच्या मागे. मोडककाका अजुन आले नव्हते. शामचे हुंदके आता थांबले होते. आमचे लक्ष नव्हते. त्याने डोळे मिटले आणि तो एका बाजूला कलंडला. एका बाजूला शकील बसला होता पण दुसऱ्याबाजूला कुणी नव्हते. शकीलच्या लक्षात काही यायच्या आत शाम ओट्यावरुन खाली कोसळला. ओटा किमान पाच फुट तरी उंच होता. शाम चांगलाच जोरात खाली आपटला आणि त्याचे उरलेसुरले भानही हरपले.
धोंडबा धावला. तो प्रथमच शकीलवर चिडला “ध्यान कुठं असतं रं कसाया तुझं?” म्हणत धोंडबाने शामला उचलले आणि घरात नेले. कुणीतरी चिंतूकाकांना निरोप पाठवला होता. तेही घाई घाईत आले. त्यांनी रामाचा अंगारा शामच्या कपाळावर लावला. एवढ्यात मोडककाकाही आले. आम्ही शामभोवती कोंडाळे केले होते. त्यांनी आम्हाला प्रथम बाहेर काढले. काही मिनिटे तपासल्यानंतर त्यांनी शामला एक इंजेक्शन दिले आणि “काळजी करण्यासारखे काही नाही.” म्हणत शकीलला जीप आणायला पिटाळले. आम्हाला थोडा अंदाज आला की काहीतरी गडबड आहे. पण आम्हीच ढेपाळलो असतो तर काकूंचे काही खरे नव्हते. मोडककाका घरी गेले. त्यांनी तेथून तालूक्याला फोन करुन तेथील डॉक्टरांना थोडीशी कल्पना दिली आणि ते त्यांची ॲम्बॅसीडर घेऊन आले. आम्ही शामला डॉक्टरांच्या गाडीत व्यवस्थीत बसवले. मागे धोंडबा आणि दत्ता बसले. चिंतूकाका डॉक्टरांच्या शेजारी बसले. इन्नीला काकूंसोबत ठेऊन मी, राम आणि ठोब्बा शकीलच्या गाडीतुन निघालो. मी शकीलला गाडी थांबवायला सांगुन खाली उतरलो. काकू आणि इन्नी अजुन ओट्यावरच उभ्या होत्या. काकूंचा पदर सारखा डोळ्यांकडे जात होता.
मी आवाजात जरा सहजता आणून म्हणालो “काकू, काही चिंता करु नका. शामला फक्त धक्का बसलाय कसलातरी. आम्ही संध्याकाळी येताना त्याला सोबतच घेऊन येतो.” काकूंनी डोळे पुसत फक्त मान हलवली.
मी इन्नीकडे पहात हसत म्हणालो “इन्ने, काकू रामरायाला पाण्यात ठेवतील लगेच. त्यांना ठेऊ देऊ नको. आधी पाण्यात ठेवायचा आणि मग पुरणावरणाचा नैवेद्य दाखवायचा. वैतागेन अशाने रामराया.”
इन्नीने कसाबसा हसायचा प्रयत्न करत मान डोलावली आणि म्हणाली “काय होतय ते लगेच फोन करुन सांग अप्पा मोडककाकांकडे. नरु निरोप देईल लगेच.” 
आम्ही हॉस्पीटलला पोहचलो तेंव्हा तिथले डॉक्टर तयारीतच होते. शामला लागलीच ॲडमीट करुन घेतले. आम्ही वेटींगरुम मधे बसलो होतो. अर्ध्यातासाने मोडककाका बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर हसु पाहून आमचा सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. मी घाईने विचारले “काका, व्यवस्थीत आहे ना शाम? मी करु का फोन घरी? काकू काळजीत असतील फार.”
मला हातानेच थांबवत काका म्हणाले “हे पहा, शाम व्यवस्थीत आहे. कसलातरी शॉक बसला आहे त्याला. शिवाय एक्सरे काढावे लागतील. पडला होता ना तो? काही इनज्युरीज असतील, ते तासाभरात कळेल. पुण्याला न्यावे लागणार नाही हे नक्की.”
आमच्या पुन्हा वेटींगरुममधे येरझाऱ्या सुरु झाल्या. ताण थोडासा कमी झाला होता. तरीही जरा मोकळेपणा यावा म्हणून मी दत्ताला विचारले “काय दत्ता, भुक वगैरे नाही ना लागली?”
दत्त्या एकदम अंगावर आल्यासारखा बोलला “आयला, कुनाला कशाचं अन् बोडकीला केसाचं. गप बसशीन का अप्पा उलसाक.”
एकून डॉक्टरांनी नक्की काही सांगीतल्याशिवाय कुणाच्या डोक्यावरचा भार उतरणार नव्हता. एकाचे दोन तास झाले. मला वाटले मी त्या वेटींगरुममधे युगानूयुगे बसुन आहे आणि कुठे काहीही होत नाहीए. एकदाचे मोडककाकांचे बोलावणे आले. मी आणि शकील डॉक्टरांच्या केबीनमध्ये गेलो तेंव्हा काकांबरोबर अजुन एक डॉक्टर बसले होते. चिंतूकाकाही बसले होते. आम्ही बसल्यावर एका मुलीने कॉफीचे कप आणून आमच्यापुढे ठेवले. कॉफी संपेपर्यंत कुणीच काही बोलले नाही. मग मोडककाकांनी आम्हाला सगळे सविस्तर सांगीतले. शामला कसलातरी मानसीक धक्का बसला होता पण आता तो बराचसा ठिक होता. पण ओट्यावरुन पडल्यामुळे त्याच्या उजव्या हाताचे हाड मनगटाच्या वर मोडले होते. हलकासा क्रॅक होता. प्लॅस्टर केले होते. पण त्याला झोपेचे इंजेक्शन दिल्यामुळे आम्ही आज त्याला भेटू शकणार नव्हतो. म्हणजे फक्त पाहू शकत होतो. इतर ऑब्जर्व्हेशनसाठी त्याला आज आणि उद्या हॉस्पीटलमध्येच रहावे लागणार होते. चिंता करण्याचे काहीही कारण नव्हते.
आम्ही हुश्श करत बाहेर आलो. मागोमाग चिंतूकाकाही बाहेर पडले. दत्त्या, राम, धोंडबा आमच्या तोंडाकडे पहात होते. शकीलने मानेनेच सांगीतले “सब ठिक।”
दोन दिवसानंतर दिवेलागनीला शामला घरी आणले. आम्ही सगळेच हॉस्पीटलेमध्ये आळीपाळीने थांबलो होतो. इन्नीही दोन दिवस हॉस्पीटलमधेच होती. फक्त काकूंनी शामला गेले दोन दिवस पाहीले नव्हते. शाम आता बराच सावरला होता. चेहऱ्यावर थोडासा तजेला आला होता. मात्र तो दोन दिवस मंद हसण्याव्यतीरिक्त काही बोलला नव्हता आणि त्याला कुणी काही विचारलेही नव्हते. शकीलने घरासमोर जीप थांबवली. धोंडबाने आणि इन्नीने शामला हात देवून खाली उतरवले. मागोमाग मी, दत्ता, राम होतो. काकू दारातच उभ्या होत्या. त्या रडतही होत्या आणि हसतही होत्या. आम्ही आत गेलो. काकूंनी लाकडी पलंग बाहेरच्या दालनात हलवून घेतला होता. शामला त्यावर बसवले. इन्नीने आम्हाला पाण्याचे घंगाळे ओट्यावर आणून दिले. आम्ही पायावर पाणी घेऊन शामच्या पलंगांच्या आसपास निवांत बसलो. दोन दिवस कुणालाच झोप, विश्रांती, जेवण काहीही व्यवस्थीत मिळाले नव्हते. चिंतूकाका अंघोळीला जाता जाता म्हणाले “अगं, पोरं सकाळपासून उपाशी आहेत. जरा तिखटाचा सांजा कर.”
“हो की, माझ्या मेलीच्या कसं लक्षात आलं नाही.” म्हणत काकू पदर सावरीत लगबगीने आत गेल्या. जाताना जरा दारात थांबून म्हणाल्या “येथेच बसा रे. बाहेर ओट्यावर बसून खाता अन् मग असं काहीबाही होतं. कुणाची नजर कशी तर कुणाची कशी.”
काकू आत गेल्यावर शकीलही उठला.
“शाम, तू आराम कर. मीही सकाळपासून अंघोळ वगैरे केली नाही. मी येतो घरी जाऊन. तासाभरात परत येतो.” म्हणत त्याने सँडल पायात चढवले. इन्नीने ते पाहीले मात्र, ती घाईत उठली आणि तिने शकीलचा हात धरला.
“ते पायातले सँडल काढ अगोदर आणि तिथे बस गुपचुप. आलाय मोठा अंघोळ करणारा.” म्हणत तिने शकीलला पुन्हा मागे ओढले. माझ्या लक्षात सारा प्रकार आला. काकू काही आज ओट्यावर बसुन खाऊ देणार नव्हत्या आणि चिंतूकाकांना शकीलचे उष्टे घरात सांडलेले आवडणार नव्हते. त्यामुळे शकीलने अंघोळीची पळवाट काढली होती. पण इन्नीही इरेला पडल्यासारखी वागत होती.
शकील कळवळून म्हणाला “सुन तो इन्ने। तू तो सब जानती है। मी तासाभरात परत येतोना. अप्पालाही घरी सोडवायचे आहे अजुन.”
पण इन्नी निग्रहाने म्हणाली “मला सगळं माहितये. तू बस अगोदर अप्पाशेजारी. मी आईला मदत करतेय आत, गेला तर बघ.”
शकील नाईलाजाने सँडल काढून माझ्या शेजारी बसला. आम्ही सगळेच खाली बसलो होतो मात्र दत्त्या शामशेजारी पलंगावर बसुन हे सगळं पहात होता.
शकील थांबलेला पाहून त्याने शामकडे मोर्चा वळवला. “काय शाम्या, लेका दोन दिवस पार आमचा घामटा काढला राव तू.”
मग माझ्याकडे पहात म्हणाला “अप्पा, कायबी म्हण, नजर लागली कुनाची तरी. अदुगर तू हात गळ्यात बांधून घेतला. तुझं कमी व्हतं म्हनुन आता या बामनानं नंबर लावला.” इतक्यात चिंतूकाका कसलेसे स्तोत्र पुटपुटत बाहेर आले. त्यांना पाहून दत्त्याने जीभ चावली.
चिंतुकाका हसत म्हणाले “काय रे घेणेकऱ्या, काय घोडे मारले तुझे ब्राम्हणांनी?
दत्त्या चाचरत म्हणाला “नाय, ते आपलं चुकून ग्येलं तोंडातून काका.”
काकांनी हातातली सतरंजी शकीलच्या हातात देत म्हटलं “शकील ही सतरंजी अंथर व्यवस्थीत. मी निरांजन लावतो रामापुढे मग करु पोटपुजा. दत्ता, नुसता बसलायस काय, उठ, दुसरे टोक धर सतरंजीचे.”
काकांचे हे बोलणे ऐकून शकील बरोबर मीही भांबावलो. शकील निमूट उठला. त्याने आणि दत्त्याने सतरंजी अंथरली. इन्नीही आतुन सांज्यांच्या प्लेट्स घेऊन आली.
“जसा लागेल तसा घ्या रे हाताने. मला कामे आहेत आत.” म्हणत काकूंनी एका मोठ्या थाळीत सांजा आणून मध्ये ठेवला.
चिंतूकाकांचीही दिवाबत्ती झाली होती. बाहेर येऊन त्यांनी शामच्या कपाळावर अंगारा लावला. त्याच्या जीभेवरही अंगाऱ्याचे हलकेसे बोट टेकवले आणि आमच्यातच बसत म्हणाले “अरे वास तर छान येतोय आज. छान झाला असणार सांजा.”
इन्नीने काकांच्या हातात एक प्लेट दिली आणि एक प्लेट हातात घेऊन ती शामला भरवायला त्याच्या शेजारी बसली.
“वाढलय ना सगळ्यांना? मग करा सुरवात” म्हणत काकांनी पहिला घास घेतला. मग आम्हीही सुरवात केली. नुसतं तिखट मिठ घालूनही सांजा अप्रतिम झाला होता. धोंडबा आणि दत्ता पलंगाला टेकून बसले होते तर मी आणि शकील काकांच्या दोन्ही बाजूलाा बसलो होतो. काकांच्या शेजारीच काय समोरही शकीलने कधी काही खाल्ले नव्हते. आज मात्र एकदम काकांच्या मांडीला मांडी लावून सांजा खाताना शकील भयंकर संकोचला होता. गप्पा मारत आम्ही खात होतो.
काका शामला म्हणाले “शाम, अरे या दत्ताकडून रामरक्षा घोटून घे रे जरा.”
दत्त्या हसत म्हणाला “काय उपेग नाय काका. कितीका रामरक्षा म्हना, तुमचा राम काय पावायचा नाय आपल्याला. आपल्यासाठी तुमचा राम फक्त सुंठवड्यापुरता.”
काका हसुन म्हणाले “अरे गाढवा, राम व्हायचा तेंव्हा होईल प्रसन्न पण जरा जीभेला वळण तरी लागेल. काय बोलतो काही समजत नाही कधी कधी.”
सगळ्यांच्याच प्लेटमधला सांजा संपत आला होता. काकूंनी मला दारातूनच नजरेने खुणावले. मी डाव्या हाताने थाळीतला सांजा अगोदर काकांच्या प्लेटमध्ये वाढला. मग शकीलकडे वळालो.
इतक्यात काका गडबडीने म्हणाले “अरे, विचारुन वाढावे रे अप्पा. मला भुक नाहीए अजिबात. तुमच्यासाठी बसलो होतो.”
इन्नी म्हणाली “काही होत नाही बाबा. खा तेवढा आता.”
“नाही सरणार गो. काय करावे या अप्पाला?” म्हणत काकांनी कुणाला काही समजायच्या आत त्यांच्या प्लेटमधला निम्मा सांजा शेजारी बसलेल्या शकीलच्या प्लेटमधे टाकला.
शकील एकदम बावरुन काकांकडे पहायला लागला.
काका म्हणाले “काय पहातोस शकील, माझ्या उष्ट्या ताटातले नकोय का तुला? अरे वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद असतात रे.”
हे सगळं पाहून आम्ही सारेच चक्रावलो. काकू दारात उभ्या होत्या. त्यांनी हात जोडत अज्ञातातल्या रामरायला हवेतल्या हवेत नमस्कार केला. इन्नीच्या डोळ्यातही टचकन पाणी भरुन आले. तसं हे आक्रीतच घडलं होतं. इन्नी आणि काकूंना चिंतूकाकांचे शकीलबरोबरचे वागणे आवडत नव्हते पण बोलताही येत नसे. तेवढे जेवणाचे सोडले तर काकांचा आमच्या सगळ्यांपेक्षा शकीलवर जास्त विश्वास असायचा. पण स्वयंपाक घर मात्र त्याला आजवर निषिध्द होते.
“डोळ्यातलं पाणी पडतय बघ सगळं प्लेट मधे. खारट होऊन जाईल सगळा सांजा. अगोदर खा मग रड हवं तितकं.” म्हणत इन्नी मोठ्याने हसली. मागोमाग आम्ही हसलो. इतक्यावेळ अगदी निर्विकार होऊन आमच्या गप्पा ऐकणाऱ्या शामच्या चेहऱ्यावरही प्रथमच हसू उमटले.
काका धोतर झटकत उठले आणि म्हणाले “पोटभर खारे सगळे. मी बसतो जरा ओट्यावर हवेला. खाऊन झाले की या बाहेर.”
आमचं खाऊन झालं. काकू रिकाम्या प्लेटस् न्यायला आल्या. त्यांच्या डोक्यावरचा भार उतरला होता आता. त्यामुळे कुणाकुणाचा राग आता जरा बाहेर आला.
प्लेट घेऊन जाताना इन्नीच्या पाठीत जोरात धपाटा घालत त्या म्हणाल्या “काढ आता याच्याही हातावर रांगोळ्या. जीभ काळी आहे की काय कार्टीची कुणास ठाऊक.”
इन्नी चांगलीच कळवळली पण दत्त्या “आंगं आश्शी!” म्हणत जोरात खिदळला त्यामुळे तिलाही हसावे लागले. 
आम्ही ओट्यावर येऊन हात धुतले आणि काकांशेजारी बसलो. काकांनी शकीलला स्वतःच्या शेजारी बसवून घेतले. जरा वेळ त्याच्या पाठीवर थोपटत राहीले.
“आवडला ना रे सांजा तुला?”
शकीलने फक्त मान डोलावली. तेवढ्यात दत्त्या म्हणाला “तिखट शिऱ्याचं काय नाय ओ काका, त्याला डाळ भात द्या फक्त इन्नीच्या हातचा.”
या दत्त्याला कधी प्रसंगाचे गांभीर्य येणार ते देवच जाणे.
काका हसत म्हणाले “असु दे, असते आवड ज्याची त्याची.”
काकांनी शकीलचा हात हातात घेतला आणि म्हणाले “शकील, तू मागे बरेचदा वाद घातलास माझ्याशी की नाथांनी गाढवाला गंगाजल पाजले मग तुम्ही असे का वागता?”
शकील मध्येच काहीतरी बोलायला लागला. त्याला मध्येच थांबवत काका म्हणाले “थांब, मला बोलूदे आज. मी तुझ्या प्रश्नाला कधी उत्तर दिले नाही. आज देतो.”
त्यांनी दोन्ही तळवे एकमेकांवर चोळले आणि स्वतःच्या चेहऱ्यावर फिरवले. मग शांत आवाजात म्हणाले “हे बघ बाळ, नाथमहाराज काय, माऊली काय, ती माणसे मोठी, त्यांचे अधिकार मोठे. त्यांना अशा गोष्टींनी दोष लागत नाही. आपण सामान्य माणसे. होता होईल तो धर्माने घातलेली बंधने पाळावीत. त्यानेच निर्माण केलेल्या या विश्वात कोण वाईट असेल? हे नियम कुणी वाईट आहे म्हणून किंवा कुणी त्याज्य आहे म्हणून नाही पाळायचे, तर ते आपल्या आत्मशुध्दीसाठी पाळायचे असतात. शिवाय त्यात संस्कारांचाही भाग असतोच की नाही. शाम तुम्हा सगळ्यांबरोबर रहातो, अभक्ष्यही खातो हे मला माहीत आहे. मला फारसे वाईट वाटत नाही. दिवस बदलतायेत. पण माझ्यावर माझ्या वडीलांचे, आजोबांचे संस्कार आहेत. त्यातले काही चुकीचेही असतील पण ते आता अंगात मुरले आहेत. मी तुला असं वागवलं इतके वर्षं पण तू कधी वाईट वाटून नाही घेतले. माझ्यापेक्षा तुच मोठा आहेस शकील. तू नक्कीच गतजन्मीचा कुणीतरी भ्रष्ट साधक असशील. तुझे आमच्याशी काहीतरी पुर्वजन्मीचे ऋणानुबंध असतील म्हणूनच इतका खपतोस आमच्यासाठी.”
काकांचा आवाज भरुन आला. तरीही ते म्हणाले “मला सांगता येत नाहीए व्यवस्थित शब्दात शकील पण माझ्या असं वागण्यामागे अजीबात तिरस्कार नव्हता कधी एवढेच समजुन घे. आणि आजपासुन तुला ओट्यावर बसुन खायची किंवा हिला तुमच्या घरी डबा पाठवायची काही आवश्यकता नाही. तुझंच घर आहे हे.”
काकांनी धोतराच्या सोग्याने डोळे पुसले. शकील काहीच बोलला नाही. इन्नी आणि काकू दारात उभ्या राहून ऐकत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. तसं वातावरण गंभीरच होतं पण दत्त्याच्या नेहमीच्या सवयीने वातावरण क्षणात निवळले. दत्त्या म्हणाला “हे एक बरं झालं. काय तो एकदाचा कंडका मोडला. इन्नी पार वैतागली व्हती डाळ भाताचे डबे या मियाच्या घरी पोचवुन पोचवुन. नाय तं काय!”
काका उठत म्हणाले “चला बरं, निघा आता सगळे. अंधार पडलाय किती. आणि हो शकील, भाभींना सांग शामच्या आईने बोलावले आहे म्हणून. त्यांच्याही जीवाला घोर लागला असेल या शाममुळे. काय?”
एकूण इतके वर्ष असलेली आमची अडचण आजच्या या ओटाकट्यावर एकदाची सुटली. शामचे हात मोडणे आमच्यासाठी इष्टापत्तीच ठरली.
आठ दहा दिवस झाले. शाम आता कॉलेजला यायला लागला होता. महत्वाचे म्हणजे त्याने गेल्या काही दिवसातला बराचसा अभ्यास भरुन काढायला सुरवात केली होती. शकील त्याचे नोटस् काढत होता तर इन्नी माझे नोटस् काढत होती. शामला नक्की काय झालं हे कुणीही त्याला या दिवसात विचारले नव्हते. अगदी दत्त्यानेही. आम्हा दोघांचे गळ्यात बांधलेले हात सोडले तर बाकी सगळं अगदी नेहमी प्रमाणे चालले होते. मात्र एक झालं होतं, शाम त्या दिवसापासुन खुपच अबोल झाला होता. दहा वेळा काही विचारले तर एका वाक्यात उत्तर द्यायचा. हसनं खेळनं तर बंदच झाले होते. या सगळ्याचा श्रीपादबरोबर काहीतरी संबंध होता हे आमच्या लक्षात आले होते पण इन्नीने कुणालाही तो विषय काढायचा नाही अशी तंबीच दिली होती. एका रविवारी आम्ही ओट्यावर बसलो होतो. काकूंनी मला आणि शकीलला काकांनी बोलावल्याचे सांगीतले. आम्ही माडीवर गेलो तर काका काहीतरी वाचत बसले होते. आम्हाला पाहून हातातली पोथी कपड्यात गुंडाळून ठेवत त्यांनी बसायला सांगीतले. विषय शामचाच असणार हे सांगायची गरज नव्हती. काकांनी एकदाचे विषयाला तोंड फोडले.
“हे बघ अप्पा, शामचे काहीतरी बिनसलय हे तर तुम्ही पाहताच आहात. पण त्याचे जेवणही खुप कमी झालेय. कॉलेजमधून आला की कुठे बाहेर जात नाही. आईबरोबर, बहिणीबरोबर जास्त बोलत नाही. घरातली शांतता खायला उठते रे बाळांनो. बरे त्याला त्याच्या काकांकडे पाठवले असते पण हात असा गळ्यात बांधलेला. कसं पाठवायचं?”
काकांनी आवंढा गिळला. त्यांनी उगाचच जानव्याच्या किल्ल्या खुळखूळवल्या आणि म्हणाले “आता तुम्ही दोघे बोला त्याच्या बरोबर काय ते. असं कोठवर चालेल? हळवं आहे रे पोरगं. आणि त्याला त्याच्या हळवेपणाची लाज वाटते म्हणून असा व्रात्यपणा करत असतो सारखा. पण आता सगळेच कसे ठप्प झालय. त्याच्या कलाकलाने घेत पहा, काय खातय त्याच्या मनाला. एकदा तो मन मोकळं करुन बोलला की मग अडचण नाही.”
“आम्ही बोलतो काका त्याच्या बरोबर.” एवढं बोलून आम्ही जीना उतरलो. यापेक्षा जास्त काही बोलायला आमच्याकडेही फारसे काही नव्हते. 
एक रविवार पाहून दत्त्याने मळ्यात ‘खळगोटा’चा कार्यक्रम आखला. खळगोट (कांद्याची मसालेदार रस्साभाजी) आणि खरपुस भाकरी म्हणजे शामचा जीव की प्राण.
इन्नीने दुपारीच त्याला विचारले होते “दादा, आईने मळ्यात बोलावलेय जेवायला आज. काय सांगू दत्तूदादाला? येशील ना तू?”
शामने मुक्यानेच मान हलवून ‘होकार’ दिला होता. तेवढ्याच आधारे आम्ही संध्याकाळी मळ्यात निघालो होतो. रामला आणि ठोब्बाला शकीलने वगळले होते पण शामला अंदाज आला होता. त्यामुळे त्याने आवर्जुन सगळ्यांना सोबत घ्यायला सुचवले होते. तो निदान काहीतरी सुचवतोय हेच पाहून मला फार बरे वाटले होते. सहा साडेसहालाच आम्ही दोन कंदिल घेवून बारवेवर जावून बसलो होतो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या. अंधारुन आलं होतं. दत्ताने आणि त्याच्या भावाने भाजीचे भांडे, भाकरीचे टोपले आणि पितळ्या आणून दिल्या. तवलीभरुन दही आणुन दिले. कधी नव्हे ते इन्नी आज बारवेवरच आमच्यासोबत जेवायला थांबली होती. आम्ही वाढून घेत होतो इतक्यात दत्ताच्या भावाच्या मुलीने ‘भाजलेले बोंबील आणि बिबड्या’ आणुन दिल्या तोंडी लावायला. मी इन्नीकडे पाहीले. पण तिने आज काही बोंबिल पाहून नाक नाही मुरडले. आमची हसत खेळत जेवणे उरकली. भाकरीच्या टोपलीत खाली ठेवलेले भाजलेले शेंगदाने आणि गुळ काढून दत्त्याने केळीच्या पानात काढून घेतले आणि टोपली झाकून ठेवली. मळ्यात जेवायला असलो की दत्ताची आई नेहमी एका माणसाचे जेवण जास्त करत असे. पण आज भाजीच्या पातेल्यात काहीही शिल्लक राहीले नव्हते. टोपल्यात सुध्दा इन्नीने ऐनवेळी अन्नपुर्णेसाठी बाजूला काढलेला भाकरीचा लहान तुकडा राहीला होता फक्त. सगळेच तब्बेतीने जेवले होते. शामही नेहमीसारखा जेवला होता. हे चांगले लक्षण होते. इन्नीने सगळी भांडी आवरली व निघाली तो दत्त्याने तिला थांबवून घेतले. तिलाही थांबायचेच होते. मी वाकळ गुंडाळून उशाला घेतली होती आणि मोटेसाठी बांधलेल्या दगडी जोत्याला रेलून छोटे छोटे दगड बारवेत टाकत होतो. त्यांचा येणारा डुबूक टुप्पूक आवाज ऐकत सगळेच काही क्षण बसून राहीले. किती वेळ बसून रहाणार म्हणून मी निट बसत काहीतरी म्हणनार तोच शकीलने माझ्या मांडीवर हात ठेवून गप्प बसायला सुचवले. मला न सांगता त्याचे आणि दत्ताचे काही ठरले असावे बहूतेक. त्याने खाली पडलेली काडी दत्त्याच्या अंगावर फेकली. दत्त्याला तेवढा इषारा पुरेसा होता.
बसल्या जागीच दत्त्या दोन्ही हात जमिनीवर टेकवत पुढे सरकला आणि म्हणाला “हे पघ शाम, तु जो काय खेळ चालावलाय तो आता बास झाला. दोन हफ्ते झाले या इन्नीच्या आन काकूच्याबी पोटात काय सुकाचा घास नाय. चिंतूकाकान्ला काय रडायचं गागायचं असन ते रामच्या देवळात रडत असतीन. तो मानूस काय घरी कळू द्यायचा नाय कवा. आरं मी काय म्हन्तोय समजांतय का शाम्या?”
“ऐकतोय, तू बोल.” म्हणत शाम परत हातातल्या वाळलेल्या पानाचे तुकडे करायला लागला.
माझ्याकडे पहात दत्त्या म्हणाला “मला आता काय बोलायचंच नाय. तुला वाटलं तं मनाची गाठ सोड. काय असंन ते बोल. याउपरबी तुझं मन तुला खात असंन तर सरळ या बारवंत उडी मार. कोन तुला आडवायला येनार नाय. कसं शकील!”
मला वाटले आता इन्नी मध्ये पडते की काय पण ती शांत बसुन राहीली. दत्त्याचे शेवटचं वाक्य शकीलला उद्देशून असुनही त्याने मान वर केली नाही. सगळेच शांत बसुन राहीलो. उगाचच अस्वस्थ करणारी शांतता रातकिड्यांच्या आवाजाने अजुनच अस्वस्थ करत होती. पलिकडच्या शेतातल्या घराच्या अंगणात दत्त्याचा भाऊ आणि वहिणी बसलेले दिसत होते. त्यांनाही पोरांचे काय चाललय हे समजत नव्हते.
शाम्याचा चेहरा प्रथम विचारी झाला. मग बदलत बदलत केविलवाना झाला. हुंदका आवरन्याचा प्रयत्न करत असल्यामुळे ओठ वेडेवाकडे झाले. हा परत त्या दिवशी सारखं करतो की काय असं अम्हाला वाटायला लागले पण तोवर त्याने डोळ्यातले पाणी मागे परतवले आणि गंभीर होत पुन्हा शांत झाला. दत्त्याला काही ही जिवघेणी शांतता सहन होईना.
तो अगतिक होऊन म्हणाला “बामनदेवा, ऐकूद्या तुमची वानी आमच्या कानांना.”
त्याच्याकडे दुर्लक्ष करुन शाम म्हणाला “अप्पा तुला आठवतय, येथेच आपण इर्जीकच्या वेळेस शेकोटी केली होती. कॉलेजमध्ये स्पर्धा होती.”
मला आता साधा हुंकार देवूनही त्याला बोलताना थांबवावे वाटत नव्हते. मी नुसतीच मान डोलावली. शामलाही बहुतेक ऐकणाऱ्यांचे हुंकार नको होते. त्याचे सगळेच बोलणे नाटकातले स्वगत असल्यासारखे सुरु होते.
शाम दुरच्या रस्तांवरील दिव्यांकडे पाहून म्हणाला “आपण कुणीच भाग घेणार नव्हतो म्हणून तुम्ही सगळे स्टेज सजवायला मदत करत होता. अप्पाने पाणी मागीतले म्हणून मी पाण्याच्या टाकीकडे गेलो.”
मला आता अचानक आठवले. सगळेच स्टेजवर असल्याने मी शामकडे पाणी मागीतले होते. पण तो अर्धातास झाला तरी फिरकलाच नव्हता. स्पर्धेच्या धामधूमीत माझ्याही ते लक्षात आले नव्हते.
शामचे स्वगत सुरु होते “मी पाणी पिलो, अप्पासाठी जग भरुन घेतला तर श्रीपादन थांबवले. खुप घाईत आहे सांगुनही तो बळेच गार्डनमध्ये घेऊन गेला. खुप महत्वाचे काम आहे, आजच केले पाहीजे म्हणत होता. ही ब्याद अशी टळणार नाही म्हणून मग मीही त्याच्या सोबत गेलो. त्याचे म्हणने होते की कॉलेजला आणि घरच्यांना धक्का द्यायची एक आयडीया आहे त्याच्याकडे पण नक्की काय करावे हे समजत नाही. आणि कल्पना होती सगळ्यांनाच चकीत करेल अशी आत्महत्या करायची. पण सगळ्यांना चकीत करेल, कायमची लक्षात राहील अशी आत्महत्या कशी करावी हे त्याला सुचत नव्हते. मला सुरवातीला तो काय म्हणतोय तेच समजेना. मग वाटले की हा आपली टिंगल करतोय. पण तो अगदी काकूळतीला येवून विनवायला लागला. मग मात्र मला त्याचा राग आला खुप. वैतागून म्हणालो की एवढाच जीवावर उदार झालाय तर जा पुण्याला आणि शनिवारवाड्यात जावून आत्महत्या कर. तसंही नारायणरावांच्या मृत्युनंतर वाड्यावर एवढा सणसणाटी मृत्यू झाला नाही. किंवा त्यापेक्षा असं कर, ज्या नगारखान्यातून दिल्लीच्या मोहीमांचे नगारे झडले त्या नगारखान्यातुन दिल्लीकडे तोंड करुन मार खाली उडी. असेल तुझ्या नशिबात तर जाईल तुझा जीव. मग तुझ्या वडिलांना सांगून आम्ही तिथे तुझी समाधी बांधू” एवढं बोलून शाम थरथरत राहीला.
आम्ही कंदिलाच्या अंधूक प्रकाशात शामकडे पहात होतो. हे ऐकून आमचे आ वासले गेले. इन्नीही शहारल्यासारखी दिसत होती. आम्ही सगळेच मित्र तसे फार उपद्वापी होतो पण तो रात्रीचा अंधार, कंदिलांचा प्रकाश, शेजारचे अंब्याचे झाड आणि आम्ही बसलो होतो ती विहिर या सगळ्या पार्श्वभुमीवर शाम जे काही सांगत होता ते भयकथेसारखं वाटत होतं. माझ्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाल्यासारखे वाटत होते. पण शामची गेले पंधरा दिवस जी अवस्था होती त्यावरुन आणि तसाही त्याचा स्वभाव लक्षात घेता तो खोटं बोलणं शक्य नव्हते. ठोब्बा आणि इन्नी चांगलेच गांगरले होते. इतक्या वेळ मारे रुबाबात शाम्यावर ओरडणारा दत्त्या तर दातखीळी बसल्यासारखा गप्प होता. शकीललाही हे अनपेक्षीत होते. थोडी थरथर सोडली तर शाम बराच धिर धरुन होता.
समोर तसेच पडलेले शेंगदाने, गुळ बाजूला सारीत धोंडबा म्हणाला “इच्या भन या शीरप्याच्या. मंग पुढं!”
“मला टाळी देत ‘हे बेस्ट सगळ्यात’ म्हणत श्रीपाद हसत हसत गेला तेथून. पुढचं सगळ्यांनाच माहीत आहे. त्याने नगारखान्यातूनच उडी घेतली रे.” शाम एवढं वाक्य बोलला आणि मग इतकावेळ त्याने आणलेले अवसान गळून पडले. त्याच्या डोळ्यातून वहाणाऱ्या पाण्याच्या धारा कंदिलाच्या लाल प्रकाशात चमकू लागल्या. तो लहान मुलासारखा हुंदके देत रडू लागला. पण यावेळी त्याचे रडणे अगदी मोकळे होते. त्यात कुठेही विक्षिप्तपणा नव्हता. पंधरा दिवसांचा त्याच्या मेंदूवरच्या ताणाचा प्रत्येक हुंदक्यातून निचरा होत होता. त्याला कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. दहा मिनिटात त्याचे हुंदके कमी कमी होत थांबले. अधुन मधून डोळे मात्र भरुन येत होते. दत्त्याला हे ऐकून काही सुचेना तसं त्याने एकेका कंदीलाची काच काढून कपड्याने साफ करायला सुरवात केली. काजळी काढल्याने आता कंदिलांचा प्रकाश लख्ख पडला होता. इन्नीला मात्र तो सर्व ताण जरा असह्य झाला होता.
तिने धोंडबाला विचारले “धोंडीदादा, उशीर झाला रे फार. निघायचे का आपण?”
पण धोंडबा ऐवजी दत्त्याच म्हणाला “व्हय धोंडबा, इन्नीला नेवून घाल घराकं. आन इन्ने, तू झोप बिनघोर. शकील सोडंन सगळ्यांना. तसाही अप्पा रामच्याच वखारीत झोपन आज. सकाळी भाकर खावूनच जावू कालेजला. ऐ ठोब्बा, तुबी जा.”
आम्ही बराच वेळ धोंडबाच्या हातातला बांधाबांधाने जाणारा हलता कंदिल पहात राहीलो.
इतक्यावेळ शकील काहीच बोलला नव्हता. तो म्हणाला “बघ शाम, जो हुआ त्यावरुन कुणाचाही होईल तसाच तुझाही समज झालाय. यात तुझी गलती नाही. और मै किसीका वास्ता नही देता हू कभी, पण आमच्या पेक्षा शिरप्या मोठा आहे का तुझ्यासाठी? जे झालं ते वाईटच झालं लेकीन कितने दिन दिल को लगाए बैठेगा यार तू?”
आज शकीलची गाडी सारखी हिंदीवर जात होती त्यावरुन माझ्या लक्षात आलं की त्याचा सुलझा हुवा दिमाग पण आज चांगलाच उलझन मध्ये आहे.
शेवटी मीच मधे म्हणालो “हे बघ शाम, तू त्याला सुचवलं म्हणून त्याने असं केलं असं म्हणनं चुकीचे आहे. त्याच्या डोक्यात किती दिवस चालले असेल हे कुणास ठाऊक. एखाद्या कथा-कादंबरीत वाचून त्याने असं काही केलं असतं तर काय तू त्या कादंबरीच्या लेखकाला दोष दिला असता का? तसाही शिरप्या आचरटच होता.”
शाम भरलेल्या आवाजात म्हणाला “आचरट होता म्हणूनच असं अपराधी वाटते रे अप्पा. त्याला जर अशी विचित्र कल्पना मी सुचवली नसती तर ‘मरण्यात काय गम्मत नाही’ म्हणून त्याने विषय सोडून दिला असता रे. मी त्याला वैतागून का होईना हे सुचवलं तेंव्हा त्याचे डोळे कसे विलक्षण चमकले होते ते तू पहायला पाहीजे होतं अप्पा.”
शामचा मुद्दा मला पटत होता पण समजुन घ्यायचा नव्हता. कारण शामच्या डोक्यातले हे विचार काढले नाही तर काय होईल ते मी पंधरा दिवस रोज पहात होतो.
दत्त्या मधेच म्हणाला “आयला हे साऱ्या गावावरुन ववाळून टाकलेलं बेनं. त्याचं काय मनावं घेतो शाम्या. तू नसतं सांगीतलं तरी चाराठ दिसात त्यानं टाळकं लावलच असत की. च्यायला, बाराचं गेलं, तरी त्याचा तरास संपना त्याचा.”
शाम म्हणाला “हे बघ दत्ता, तो कितीही नालायक असला तरी मला काय अधिकार हे असलं काही सुचवायचा? त्याने उडी मारली काय आणि मी त्याला ढकलले असते काय, दोन्ही तेवढेच गंभीर आहे. उद्या त्याच्या सांगण्यावरुन आपल्यातल्या कुणी असं काही केलं असतं, तर दत्ता, सगळ्यात पहिल्यांदा तुच त्याच्या पोटावर धोंडा बांधून या विहिरीत ढकलला असता की नाही?”
मला एवढ्या गंभीर वातावरणात देखील शामचे हसू आले. तो कुणाची तुलना कुणाबरोबर करत होता. पण ते धोंडबाच्या नेहमीप्रमाणे लक्षात नाही आले.
तो म्हणाला “एकदा का चारदा टाकला असता. भले वरीसभर यीहीर वापरता आली नसती तरी. हैला, जीव यांच्या पोरानं द्यायचा आन तरास आपल्याला का? आता काय त्याच्या बापाचे पाय धरायचे का?”
दत्त्याचे बोलणे ऐकून शामचे डोळे एकदम चमकले. कधी नव्हे तो या पंधरा दिवसात पहिल्यांदाच चेहऱ्यावर उत्साह दिसला.
तो घाईने दत्त्याला म्हणाला “काय म्हणालास दत्ता?”
दत्त्या गडबडला “हे पघ शाम्या, तुझा शामळू सभाव तुह्याकडंच राहूदे. आयला रागावायची पन चोरी झाली की काय आता. तू लेका, मस्त तोंड शिवून बसला व्हता पंधरा दिस पन आमच्या उरावं सारी जिनगानी पेटायची बाकी राह्यली व्हती. उगा या सगळ्यांपाई गप राह्यलो नायतर पयल्या दोन दिवसातच खेटारनार होतो तुला. पोपटावानी बोल्ला असता.”
शाम म्हणाला “रागावलो नाही रे दत्त्या. शकील, आपण त्याच्या वडिलांना काय ते खरं सांगून माफी मागूयात. आई बाबांनाही खरं काय ते सांगूयात. त्याशिवाय माझ्या मनावरचा हा भार काही कमी नाही होणार रे. अप्पा, तुलातरी समजतेय का मी काय म्हणतोय ते?”
मला सगळं काही समजत होते, शकीललाही लक्षात आले चटकन शाम काय म्हणतोय ते. पण आम्हा दोघांनाही ही कल्पना पटली तर नाहीच, उलट भयानक वाटली. पण आता हे माफीप्रकरण शामच्या चांगलच डोक्यात बसलेलं दिसत होतं.
दत्त्याने तर ही कल्पनाच पार उडवून लावली “खड्यात जावा तुमी. आपल्या बाच्याने हे व्हनार नाय आन कुनी मला यात वढू बी नका.”
मरता क्या न करता सारखी आमची अवस्था झाली होती. अजुन काही वेळ जर कुणी काही बोलले नाही तर शाम्या मैत्रीची शप्पथ वगैरे घालून “याच साठी मैत्री केली का?” वगैरे विचारायला कमी करणार नाही हे दिसतच होतं. दत्त्याने अंग काढून घेतले होते. धोंडबा इन्नीला पोहचवून परत आलाच नव्हता. आणि रामच्या चेहऱ्यावरुनच कळत होतं की त्याच्यातला ‘हरिश्चंद्र’ जागा झालाय ते. शेवटी असं ठरलं की मी आणि शकीलने काका काकूंना जमेल तसं सांगायचे आणि श्रीपादच्या वडीलांकडे अम्मीने आणि मोठ्याईने जायचे. सोबत गुर्जी असतील. तेंव्हा कुठे शाम ऊठला. रात्रीचे दिड वाजून गेले असावे. घरी जाताना आम्ही बांधावरुन चाललो होतो. सगळ्यात पुढे दत्ता कंदील घेवून चालला होता, त्यामागे शाम आणि मी, मागे राम आणि शकील. मघाशी शामची ही माफी मागायची कल्पना मला भयानक वाटत होती पण आता बांधावरुन चालताना शाम ज्या उत्साहात चालला होता ते पाहून मला तो निर्णय घेतल्याचे खुप समाधान वाटत होते. शकीलने मळ्याच्या बाहेर जीप काढली तेंव्हा शामचा चेहरा फाशीची शिक्षा माफ झालेल्या गुन्हेगारासारखा दिसत होता.
मी आणि शकील रामाच्या देवळाच्या ओवरीत बसलो होतो. आम्ही दोघांनीही ‘काकांना कसं सांगायचं?’ याची मनातल्या मनात हजारदा तरी उजळणी केली होती. जरा वेळाने काका पुजेचं तबक घेऊन बाहेर आले. सोवळे नेसलेले काका आज प्रसन्न दिसत होते. शामच्या वागन्यात दोन दिवसात झालेला बदल पाहून त्यांची चिंता बरीच कमी झाली होती. बहुधा त्यामुळेच आज त्यांची पुजा घटकाभर लांबली असावी.
आम्हाला ओवरीत बसलेले पाहून ते म्हणाले “अरे येथे काय करताय? आणि अप्पा, आज इतक्या सकाळी गावात आलास ते?”
आम्हाला गप्प बसलेले पाहून ते म्हणाले “काय रे शकील, बोलेनासे झालात ते. काही बोलायचे आहे का? चला घरी जावूयात.”
“नाही काका, येथेच बोलूयात. दहा मिनिटे लागतील.” असं म्हणून मी शकीलला कोपराने ढोसले.
आमच्या ‘तु सांग. नाही, तु सांग’ अशा खाणाखुणा पाहून काका म्हणाले “बोला रे पटकन. मी सोवळ्यात आहे. काही झालय का?”
शेवटी शकीलने खसा साफ केल्यासारखे करुन एकदाची सुरवात केली. त्याने जमेल तितक्या कमी आणि सौम्य शब्दात ‘काय झाले’ ते सर्व सांगीतले. तो जसं जसं बोलत होता तसतसे काकांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते.
काका ताम्हणातील फुले उगाचच निवडल्यासारखे करत गंभीर आवाजात म्हणाले “असो! बरे केलेत सर्व सांगितले ते. पाहूया रामराया काय करतो ते.”
मागे वळून त्यांनी रामला हातातले ताम्हण कपाळाला लावत पुन्हा नमस्कार केला आणि “जानकी जीवन स्मरण…” असं पुटपुटत घराकडे चालू लागले. 
मी कालच आई बाबांना सर्व सांगीतले होते. ते ऐकून बाबाही गंभीर झाले होते.
चिडून ते म्हणाले होते “हजारदा तुम्हा मुलांना कुसंगती करु नका सांगीतले होते. त्यात परत बोलायचा पाचपोच कसा तो नाहीच. आम्ही तुमच्या वयाचे नव्हतो का कधी? आता हे काय होऊन बसलेय पहाताय ना?”
कधी नव्हे ते आई माझी बाजू घेत म्हणाली “ते पाटलाचे पोर तसं अवगुणीच होते. आपल्या पोरांनी काही मैत्री वगैरे केली नव्हती त्याच्या सोबत. आपण रस्त्याच्या कडेने व्यवस्थीत चाललेलो असताना समोरुन एखादा सांड हुंदाडून गेला तर आपला काय दोष? काही चुकलं नाही आपल्या मुलांचे. मी येते रे अप्पा उद्या त्या पाटलांना भेटायला.”
मी दुपारी आईला घेऊन अम्मीच्या घरी गेलो. शकीलनेही आज कॉलेजला दांडी मारली होती. आज कसही करुन आम्हाला हे प्रकरण संपवायचे होते. आम्ही आल्यावर शकीलने गफुरला श्रीपादच्या वडीलांना बोलवायला पाठवले.
अम्मी आणि चहा पित बसल्या होत्या. आम्ही तेथेच रेंगाळत होतो.
आई चिडून म्हणाली “तुम्ही काय करताय येथे? जा, बाहेर जावून बसा. तुम्ही करा आणि आई बापाला निस्तरायला लावा. निघा येथून.”
आम्ही दोघेही निमूटपणे माडीवर जाऊन बसलो. दोघांच्याही मनावरचा ताण वाढत होता. हे नसतं खटले आमच्या गळ्यात मारुन शाम मात्र निवांत झाला होता. आम्ही दोघे काहीही न बोलता माडीवरच्या सज्जात उभे राहून खाली रस्त्याकडे पहात होतो. काही वेळाने गफूरच्या मागे मागे दमल्या सारखे चालत येणारे पाटीलकाका दिसले. त्यांनी पायरीखाली चप्पल काढल्याचे आम्ही पाहीले आणि आम्ही दोघेही जीन्यात येऊन बसलो. तेथून बाहेरच्या खोलीत बसलेले पाटीलकाका दिसत नव्हते पण अम्मी आणि आई दिसत होती. आईने लहान मुलीसारखा अम्मीचा हात धरला होता. ते पाहून माझ्या पोटात कालवले. शाम्यामुळे या साध्या भोळ्या मानसांना किती त्रास होत होता ते पाहून मला भयानक राग आला त्याचा. बाबांनाच पाटीलकाकांबरोबर बोलायला सांगायला पाहीजे होते असं मला क्षणभर वाटून गेलं. पंधरा विस दिवसांपुर्वी ज्याचा एकूलता एक मुलगा गेला त्याच्या पुढे आई-अम्मी काय बोलणार? तिकडे आईने अम्मीचा हात धरला होता तर इकडे शकीलने माझा.
अम्मी आणि आईने आळीपाळीने पाटीलकाकांना जे घडले ते सांगीतले. पाटीलकाकांचा काही आवाज येत नव्हता.
आई म्हणाली “दादा, तुम्हाला जे घडलं ते सगळं सांगीतले आहे. माफी मागायला आम्हाला तोंड नाही. श्रीपादच्या बाबतीत जे झाले ते फारच वाईट झाले पण चिंतूकाकांचे सगळे घर गेले काही दिवस ज्या अवस्थेतून चालले आहे ते त्याहून वाईट आहे. हे सगळं आमच्या ऐवजी चिंतूकाकांनी बोलायला हवे खरं तर पण ते तुमच्यासमोर उभेही राहू शकणार नाही. बोलायचे दुरच.”
काही वेळाने पाटीलकाकांनी जोरात नाक शिंकरल्याचा, खसा साफ केल्याचा आवाज आला. बहुतेक रडत असावेत. मग त्यांचा खोल गेलेला आवाज आला “कुणाला दोष द्यायचा आता? दैवच रुसले. भाभी तुम्ही सांगीतलं म्हणून मला हे सर्व कळलं, मला काहीच माहीत नव्हते या बाबत. मीच काकांची माफी मागायला हवी खरं तर. आमच्यामुळे त्या देवमानसाला किती त्रास झाला याचं वाईट वाटतय. या सगळ्यात माझीच मोठी चुक झाली. नको ती गोष्ट मी प्रतिष्ठेची केली. आणि आजही हे सगळ्या गावापासुन लपवून ठेवलं. पण यामुळे एक सज्जन ब्राम्हण जर स्वतःला त्रास करुन घेत असेल तर मला बोलावेच लागेल. नाहीतर मला नरकातही जागा मिळायची नाही. एका ब्राम्हणाचे शाप नाही घ्यायचे मला.” एवढं बोलून पाटीलकाका थांबले. आई अम्मी गोंधळलेल्या दिसत होत्या. आम्हीही इकडे जीन्यात बावचळलो होतो. हे काय नविनच काढलेय पाटीलकाकांनी? की श्रीपादच्या जाण्यामुळे असं वागतायेत ते? काही समजेना. इतक्यात अम्मीने हाक मारली “शकील बेटा पाणी आण थोडे काकांसाठी.”
शकील किचनमधून पाणी घेवून आला. त्याच्या मागोमाग मीही बाहेरच्या खोलीत आलो. श्रीपादच्या प्रसंगानंतर मी त्यांना प्रथमच जवळून पहात होतो. आजारी माणसा सारखे, अगदी खंगलेले दिसत होते.
ते गळ्याची घाटी वर खाली करत पाणी प्यायले. बाहीनेच तोंड पुसत म्हणाले “तुम्हीही बसारे बाळांनो.”
आम्ही निमुटपणे बसलो. काका म्हणाले “चिंतूकाकांच्या मुलाने हे सगळं इतकं मनाला लावून घ्यायला नको होतं. पण हाच त्या माणसांचा मोठेपणा आहे. माझ्यासारखा कुणी असता तर कोडग्यासारखा विसरुन गेला असता. श्रीपादचं वागणं गेले वर्षभर विचित्र होतं. गेल्या सहा महिन्यात ते जरा जास्तच होत चालले होते. अगोदर दुर्लक्ष केलं पण शेवटी पुण्याला डॉक्टरकडे नेलं. त्यांनी रोगाचं कसलंस नाव सांगुन मानसोपचारतज्ञाकडे पाठवले. त्यांनीही तपासुन सांगीतले होते की प्रकरण गंभीर आहे. त्याच्या स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या जीवालाही धोका होईल. त्याला काही दिवस पुण्यातच ठेवा. पण मी घाबरलो. आपला पोरगा वेडा झालाय हे गावात कळालं तर काय अब्रू राहील? बरं त्याच्या थोरल्या दोन बहिणींचीही लग्ने करायचीत अजुन. त्याचे वेड गावभर झाले असते तर पोरी आयुष्याच्या घरी बसल्या असत्या. शेवटी आठवड्यातुन एकदा पुण्याला न्यायच्या अटीवर डॉक्टरांनी सोडलं. औषधं घेतली की बराच शांत असायचा. पण महीनाभराची औषधे त्याच्या पुस्तकांमधे सापडली. घेतलीच नव्हती त्याने. फार हुषार होता हो. नाव काढलं असतं घरादाराचं. पण नशिबाने खो घातला. मी त्याला पुण्याला ठेवायला हवा होता हो. या अब्रुपायी मीच मारलं हो माझ्या पोराला, मीच मारलं त्याला.” म्हणत पाटील काका हमसुन हमसुन रडायला लागले.
बऱ्याच वेळाने ते शांत झाले. अम्मीने त्यांना सरबत प्यायला दिले. मी आणि शकील सुन्न झालो होतो. सरबत पिवून झाल्यावर काका म्हणाले “शकील तु चल माझ्यासोबत. त्याची फाईल देतो मी तुझ्याकडे. मला त्यातले काही कळत नाही. ती फाईल दाखव चिंतूकाकांना आणि शामला. म्हणावे उगाच माझ्या पापाची शिक्षा तुम्ही भोगू नका.”
मी, शकील, इन्नी आणि शाम चिंतूकाकांच्या समोर बसलो होतो. “अरे, तुम्ही सांगा रे तोंडाने. मला अडाण्याला यातले काय कळणार आहे?” म्हणत काका फाईल चाळत होते. त्यांना त्यातले काही समजत नव्हते. मग इन्नीने वाचायचा प्रयत्न केला पण त्यातले बरेचसे शब्द ती पहिल्यांदाच वाचत होती. मी आणि शकील खुश असल्याने ‘काळजीचे कारण नाही’ एवढेच सगळ्यांना कळत होते. शेवटी शामने ती फाईल हातात घेवून चाळली. मेडीकलला जायचे असल्याने त्याने मेडीकलवरची मिळतील ती पुस्तके ‘अवांतर वाचन’ म्हणून वाचायला सुरवात केली होती वर्षभर. तरीही त्याला व्यवस्थित वाचता आले नाही पण मतिथार्थ मात्र सजमला. त्याचे डोळे भरुन आले. फाईल बाजूला ठेवत तो उठला आणि “बाबा, रामरायाने तारले हो शेवटी” म्हणत काकांच्या पाया पडला. मग शकीलने काकूंनाही बोलावून घेतले आणि पाटीलकाकांनी सांगितलेले सर्वकाही अगदी इत्यंभुत सर्वांना सांगीतले. क्षणात तेथे दिवाळीचे वातावरण तयार झाले.
काका म्हणाले “अरे रे, बिचारे पाटील. असो. रामरायाने परिक्षा घेतली म्हणायचे आपली. पण जरा अवघड पेपर काढला यावेळी त्याने. शाम, उठ, देवापुढे साखर ठेव अगोदर. आणि शकील संध्याकाळी भाभींना बोलाव जेवायला. सगळ्यांच्याच घरी सांगून ये. नैवद्य करुयात. गेले महिनाभर बिचाऱ्याला निट स्नान नाही की नैवेद्य नाही.”
काका आनंदाने उठले. बाहेर जाता जाता म्हणाले “अगो, थोड्या पुरणाचे दिंडेही कर हो. त्या दत्ताला आवडतात फार.”
कितीतरी दिवसांनी संध्याकाळी आमचा ओटाकट्टा आनंदाने भरला होता आणि आतमध्ये तव्यावर पुरणपोळी चरचरत होती. आमच्या गप्पांबरोबर आत कटाच्या आमटीलाही उत आला होता.

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

मैत्र-७

आजचा दिवस धावपळीचा गेला होता तरी सगळे आनंदी होतो. कॉलेजमध्ये वर्षभर होणाऱ्या स्पर्धा, उपक्रम या सगळ्या भानगडींपासून दुर रहाणाऱ्या शकीलने आज ‘वक्तृत्व स्पर्धेचा’ करंडक अनपेक्षितपणे खेचून आणला होता. हा करंडक गेला असता तर जोशीसरांचे आठवडाभर शिकवण्यात लक्ष लागले नसते. थकवा जाणवत होता तरी आम्ही नेहमीप्रमाणे शाम्याच्या ओट्यावर जमलो होतो. शाम आणि दत्ता माझी स्कुटर घेऊन सगळ्यांना कप दाखवायला गेले होते. त्यांना बराच वेळ झाला होता जाऊन, एव्हाना यायला पाहिजे होते. मी, ठोब्बा, राम, शकील सगळेच ओट्यावर बसलो होतो. आज कुणीही ओटाकट्याला दांडी मारणार नव्हताच. काकूंनी धोंड्याला मळ्यात पिटाळलं होतं केळी आणायला. म्हणजे आज मस्त केळी घातलेल्या साजुक तुपात केलेल्या शिऱ्याने ‘सेलिब्रेशन’ होणार होते. आम्ही गप्पा मारत होतो तोवर धोंडबा केळीच्या फण्या घेऊन आला. दोन आमच्याकडे दिल्या. इन्नीला हाक मारुन दोन फण्या आत पाठवल्या आणि ओरडून म्हणाला
“काकू, तुच कर गं, इन्नीला नको सांगू हां अजिबात! उगा थोड्यासाठी मजा नको जायला.”
इन्नी त्याला नाक मुरडत आत गेली. शाम आणि दत्ता दोघेही आले तेव्हढ्यात. दत्त्याने करंडक अजुनही डोक्यावरच धरला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता.
त्यांना पहाताच धोंडबा म्हणाला “काय दत्त्या, अप्पाच्या स्कुटरला झुल तरी घालायची आन चार बेगडं तरी घालायची स्वतःच्या कानात, हातात. आरं काय नाचतंय सकाळधरुन!”
“गपरं धोंडबा, तुला अडान्याला काय कळायचं वक्तृत्व काय अस्तय त्ये” म्हणत दत्त्याने करंडक ओट्यावर ठेवला. त्याला एकूनच तो करंडक कॉलेजला द्यायचा नव्हता.
“काय एक एक नाटक आस्तय या जोशीसराचं. आता कप ज्यानं जिकला त्याच्या मान्नीवर सोबन का कालेजात?” हा त्याचा सरळ प्रश्न होता.
काकूंनी शिऱ्याच्या डिश बाहेर ओट्यावरच आणुन दिल्या. इन्नीने पाण्याची कळशी आणि फुलपात्रे बाहेर आणून ठेवली आणि मुठभर स्केचपेन घेऊन माझ्या शेजारी बसली.
धोंडबा शिऱ्याचा छातीभरुन वास घेत म्हणाला “च्यायला शाम्या, काकूला सत्यनारायेन परसन्न असनार. आमची म्हतारी करती मस जीव काढून पन असा शिरा काय साधत नाय राव तिला.”
मी एक घास खाल्ला. खरच शिरा अप्रतिम झाला होता. आज तर तो जास्तच चवदार लागत होता.
इकडे इन्नीची भुनभून चालली होती “अप्पा काढू दे ना थोडी डिझाईन. थोडीच काढते. छान दिसेल.” वगैरे. मी “नाही, अजिबात नाही” लावून धरलं होतं.
शिरा कसा झालाय विचारायला काकू दारात येऊन उभ्या राहिल्या होत्या. म्हणाल्या “असं रे काय करतोस अप्पा? एवढी म्हणतेय पोर तर काढूदे की तिला काय रांगोळी काढायची ती.”
आता काकूंनीची तिची बाजू घेतल्यावर इन्नीला अजुन हुरुप आला “बघ ना आई, उगाच आगाऊपणा करतोय. डिझाईन काढायला काय परत परत हात मोडणारे का याचा?”
हे ऐकून मात्र काकू वैतागल्या “काय नतद्रष्ट कारटी आहे. घाला काय गोंधळ घालायचा तो.” म्हणत त्या आत गेल्या. धोंडबा ठसका लागेपर्यंत हसला, म्हणाला “तु काढ गं इन्ने रांगोळी. जागा कमी पडली तं आपुन त्याचा दुसरा हात मोडू उद्याच्याला. तु्ह्यासाठी अप्पा यवढं बी करायचा नाय का?”
“काहीही बोलू नको धोंडीदादा.” म्हणत इन्नीने माझा प्लॅस्टर केलेला हात हळूवार मांडीवर घेतला. एवढं होऊनही डिझाईन काढायचा हट्ट मात्र तिने सोडला नव्हता. “कर काय करायचे ते” म्हणत मी प्लॅस्टर केलेला हात तिच्या हवाली केला आणि डाव्या हाताने शिरा खायला सुरवात केली. शाम्या आत जाऊन अजून थोडा शिरा घेऊन आला. आम्ही गप्पा मारत शिरा खात होतो. मी अधून मधून इन्नीलाही एक एक घास भरवत होतो. "हलवू नको नाहीतर तुलाच दुखेल म्हणत इन्नीचे डिझाईन काढणे सुरु होते. तिने अगोदर एक छोटीशी कोयरी काढून तिच्याभोवतीने नाजूक डिझाईन रेखाटायला सुरवात केली. आता सुटका नव्हतीच.
शामने विचारले “चहा हवा काय रे थोडा? उगाच जीभेच्या शेंड्याला चटका.”
“चहा पेत्यात व्हयरं शिऱ्यावं? उगा तोंडाची चव घालवायची” म्हणत धोंडबा सगळ्यांच्या डिश घेऊन आत गेला.
चिंतूकाकांनी बाहेर येत म्हटलं “शाम, दिवाबत्ती नाही करायची का आज?”
ही “आता उठा!” अशी सुचनाच होती आम्हाला. अंधारुनही आलं होतं. प्लॅस्टरवर एक रेषाही काढायला जागा नव्हती तरी इन्नीचं मन काही भरलं नव्हतं. शेवटी उठलो. दत्ताने स्कुटरला किक मारली. त्याची सायकल माझ्या घरीच होती. ती घेऊन तो परस्पर मळ्यात जाणार होता. धोंडबानेही “गेलो रं” म्हणत सायकलवर टांग मारली.
“अप्पा, सकाळी मी आणि शाम चाललोय मुंबईला. संध्याकाळपर्यंत येऊ. दत्ता सोडवेल तुला कॉलेजला” म्हणत शकील आणि राम दोघेही निघाले. आजचा दिवस खरच फार छान गेला होता. अगदी लक्षात रहावा असा. 

सकाळी दत्त्या कॉलेजला न्यायला आला आणि सायकल व्यवस्थित लाऊन प्रथम बाबांना शाळेत सोडवायला गेला. तोवर मी कपडे बदलले. बिनबाहीच्या शर्टमधून हातावरचे प्लॅस्टर फारच उठुन दिसत होतं. इन्नीने त्यावर कुयरी, मोर असली काय काय डिझाईन काढली होती. अगदी एखाद्या शालूचा पदर दिसावा तसं ते प्लॅस्टर दिसत होतं. माझी अडचण आईला कळाली. तिने बाबांची खांद्यावर घ्यायची शाल आणून तिची लांब घडी घालून ती प्लॅस्टरवर टाकली. आता माझं ध्यान एखाद्या ऐतिहासीक नाटकातल्या पात्रासारखे दिसत होते. छातीवर हात, त्यावर लटकणारी काळी शाल. काही विचारु नका. पण शालूच्या पदरापेक्षा हे जरा बरं दिसत होतं. दत्त्या बाबांना सोडून आला. अगदी तिरकी करत, एक डौलदार वळण घेत त्याने स्कुटर वळवली आणि हॉर्न वाजवायला सुरवात केली. हजारदा सांगुनही त्याची ही सवय जात नाही. एखाद्या दिवशी माझ्यासारखा गळ्यात हात बांधून घेईल तेंव्हाच त्याला अक्कल येईल. वह्या डिक्कीत टाकून मी हात सांभाळत स्कुटरवर बसलो. दहा मिनिटात दत्त्याने गाडी कॉलेजच्या आवारात आणुन उभी केली. हायस्कुलचा ड्रेस घातलेल्या मुलांमध्ये कॉलेजची रंगीबेरंगी कपडे घातलेली मुलं वेगळी दिसत होती. प्रार्थनेला वेळ होता, त्यामुळे काही मुले उगाचंच खो खो च्या मैदानावर धुळ उडवत खांबाला झोंबत होती. काही सिंगलबारला लोंबकळत होती. तरीही आज सगळ्या मैदानावर कसलीतरी मरगळ जाणवत होती. आज शकील आणि शाम येणार नव्हते कॉलेजला. कदाचित त्यामुळेही मरगळ जाणवत असावी. इतक्यात सखारामने प्रार्थनेसाठी टोल वाजवला. रोजची पध्दत ठरलेली असल्याने धुळ उडवत पाच मिनिटात व्हरांड्याकडे तोंड करुन रांगा उभ्या राहील्या. आडव्या व्हरांड्यात सरांची रांग उभी राहीली. समोर सर्व विद्यार्थी. पाचवी सहावीची मुले अगदी उत्साहाने प्रार्थनेत भाग घेत तर नववी दहावीची मुले गंभीरपणे प्रार्थनेला उभी रहात. आमचा कॉलेजचा रंगीबेरंगी कळप अगदी एका बाजूला पडल्यासारखा सगळ्यात वेगळा उभा राही. आमच्या शाळेची आणि कॉलेजची प्रार्थना अगदी साग्रसंगीत असे. प्रथम ‘स्थिरावला समाधीत, स्थितप्रज्ञ कसा असे’ ही गीताईतली स्थितप्रज्ञाची लक्षणे होत, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, पसायदान आणि मग जन गन मन होई. हे सर्व झाल्यावर आमचे मराठीचे सर एखाद्या सुविचारावर दहा मिनिट बोलत. आणि मग जो तो आपापल्या वर्गाकडे धावत असे. 
आजही नेहमीप्रमाणे प्रार्थना झाली पण जोशीसर सुविचारावर बोलायच्या ऐवजी काही क्षण फक्त उभे राहीले.
मग गंभीर आवाजात म्हणाले “एक दुःखद बातमी. काल आपल्या कॉलेजचा विद्यार्थी कु. श्रीपाद बलमे याचे आकस्मीक निधन झाले आहे. ईश्वर त्याच्या कुटूंबीयांना हे दुःख सोसण्याची शक्ती देवो. आपण सगळे दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्याच्या आत्म्याला श्रध्दांजली वाहू.”
सखारामने हलक्या आवाजात टोल वाजवला. आम्ही सर्व मुलं स्तब्ध उभे राहीलो. दोन मिनिटानंतर परत टोल वाजला. सगळी मुले फारसा गोंगाट न करता वर्गाकडे वळाली. शाळेच्या गेटवर उशीरा आलेली मुलं प्रार्थना संपायची वाट पहात उभी होती. आज त्यांना ‘छडी’ न खाताच प्रवेश मिळाला.
मी कॉलेजच्या इमारतीकडे जाताना दत्त्याला विचारले “कोण रे हा बलमे? आपल्या कॉलेजमध्ये असुन मला कसा माहीत नाही?”
दत्त्या कोरडेपणाने म्हणाला “अरं ते पाटलाचं शिरप्या रे.”
मी आश्चर्याने विचारले “अरे पण शिरप्याचं आडनाव पाटील ना? मग हे बलमे काय मध्येच?”
“अरं लई बाराचं बेनं व्हतं ते. नगरमधी कुठं तरी त्यांचं गाव हाय. त्या गावची पाटीलकी व्हती म्हनं त्यांच्या खानदानीत. म्हनुन बलमे पाटील. आतरंगी व्हतं रे ते. मरुंदे ते सगळं. तू चाल.”
“अरे पण दत्ता, असं कसं अचानक. हुशार होता राव शिरप्या. जरा आगावू होता पण मन लावून अभ्यास करता तर पहिला नंबर सोडला नसता त्याने कधी. वाईट झाले रे.”
मला खरच वाईट वाटलेले पाहून दत्त्या जरा चिडला “ तू काय सुताक पाळनार हायस का त्याचं अप्पा? तुला त्याचं लिळाचरीत्र माहीत नाय म्हनून. सांगीतलं तर तू एक काय दहापन बोटं घालशील तोंडात.”
एव्हाना आम्ही वर्गापर्यंत पोहचलो होतो त्यामुळे तो विषय तेवढ्यावरच राहीला. जोशीसर आले. पण आज त्यांचेही लक्ष नसावे फारसे. कारण वर्गात आल्या आल्या फळा स्वच्छ पुसून घ्यायचा. डस्टर, खडू, पुस्तक सगळं एका रांगेत टेबलवर मांडून ठेवायचे मग मुलांकडे हसुन पाहून क्लासला सुरवात करायची ही त्यांची नेहमीची सवय. पण आज त्यांनी आल्या आल्या खुर्ची ओढली आणि बसुनच शिकवायला सुरवात केली.
शेजारच्या बाकावर शकील आणि शाम नसल्याने दत्त्याची सारखी चुळबूळ सुरु होती. सर काय शिकवतायेत याच्याकडे त्याचे लक्षच नव्हते. त्याचं सारखं चाललं होतं “अप्पा, मी जातो घरी. रानात आज मोकार काम हाय.” सरांनी त्याला दोन तिन वेळा खडू फेकून मारला तरी त्याचं “घरी जातो” सुरुच होतं अधून मधून.
सर आज जरा त्रासलेलेच होते. शेवटी चिडून म्हणाले “दत्तात्रय, काय चाललय तुझं? घरी जायचय का?
सर विचारत नसुन रागावत आहेत हे दत्त्याच्या गावीच नाही. तो उठून म्हणाला “व्हय सर, आज बायका बोलावल्यात खुरपायला.”
मी डोक्याला हात लावला. सर म्हणाले “अरे दत्ता, तू खरच भोळा आहे की मला त्रास द्यायला कोडगेपणा करतो आहेस? खाली बस आणि लक्ष दे जरा कवितेकडे.”
“व्हय सर” म्हणत दत्त्या खाली बसला आणि वहीत रेघोट्या काढीत राहीला. 

माझंही फारसं लक्ष लागत नव्हतं वर्गात. शिरप्याचं फारसं दुःख झालं नव्हतं मला पण वाईट मात्र वाटत होतं. हे एक महा ईरसाल कारटं होतं आमच्या कॉलेजमधलं. प्रचंड हुशार. पण सगळी हुशारी खोड्या करण्यातच जायची. एकदा घरी वडीलांबरोबर कशावरुनतरी भांडला. वडील नेहमीच्या शिव्या घालत म्हणाले “घराच्या बाहेर पड. बघू कुणी एक दिवसतरी भाकरी वाढतय का!” यानेही “काय रोजची कटकट तुमची” म्हणत घरं सोडलं. बुवाच्या पानाच्या गादीवरुन चुना घेतला, त्यात हळद कालवली आणि त्याच्या पुड्या बनवून तालुक्याच्या गावी गेला. तेथे एसटी स्टँडवर येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बस मधे कसलंसं मलम म्हणून विकल्या दोन दिवसात. झोपलाही स्टँडवरच. दोन दिवसांनी घरी येऊन वडीलांच्या हातावर पैसे ठेवत म्हणाला “खानावळीच्या हिशोबाने हे चार महिन्याचे पैसे. बाकीचे नंतर देईन.” वडीलांनी कपाळाला हात लावला.
एकपाठी होता. वर्गात कधी वह्या घेऊन गेला नाही. कधी नापासही झाला नाही. चाचणी परीक्षा असो की वार्षीक, हा लिहिणार चाळीसच मार्कांचे. तेही अर्धा तासात. मग पेपर देऊन वर्गाच्या बाहेर.
एकदा मॅथच्या सरांनी मुलांना जरा जास्तच लेक्चर दिलं “अरे अभ्यास करा, नाहीतर हमाली करावी लागेल. आईबापाचा जरा विचार करा. पुण्या-मुंबईच्या शाळेतली मुलं बघा, कशी ८०/९० टक्के मिळवतात” हे आणि ते. शिरप्या उठला आणि वर्गाच्या बाहेर निघाला.
सरांनी विचारल्यावर म्हणाला “घरीही हेच ऐकतो, तुम्हीही तेच ऐकवा! गणित शिकवायला सुरवात केल्यावर सांगा. परत वर्गात येऊन बसेन.”
सरांना चांगलच झोंबलं. मग व्हायचं तेच झालं. सरांची आणि शिरप्याची वरात मुख्याध्यापकांच्या ऑफीसमध्ये. मुख्यध्यापकांनी सगळं ऐकून घेतल्यावर खुप प्रेमाने “बाळ श्रीपाद” अशी सुरवात करुन बराच वेळ समजावून सांगीतले.
पण शिरप्याचे तेच पालूपद “गणित शिकवायचं सोडून आमची लाज काढायला लागल्यावर कोण ऐकून घेईन? सर असले म्हणून काय झालं?”
मुख्याध्यापकही मग चिडून म्हणाले “हे बघ श्रीपाद, मी सरांना उद्याच चाचणी परीक्षा घ्यायला सांगतो. जर तुला ८० टक्के मार्क मिळाले तर उद्यापासून कोणतेच सर तुला काहीही म्हणनार नाहीत. चालेल का? नाही पडले तर मात्र हातात लिव्हींग सर्टिफिकेट ठेवीन.”
“हो चालेल” म्हणून शिरप्या बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी फक्त ‘ब’ तुकडीचीच चाचणी परीक्षा आहे हे समजल्यावर आम्हाला हा प्रकार कळला. पण एवढं होऊनही संध्याकाळी शिरप्या माळावर कबड्डी खेळायला हजर. अभ्यासाचे नाव नाही की भिती नाही. दुसऱ्या दिवशी चाचणी झाली. नेहमी प्रमाणे इतर क्लास झाले. दुसऱ्या दिवशी प्रार्थनेनंतर हा सरळ मुख्याध्यापकांच्या ऑफीसमध्ये हजर.
“सर, माझा गणिताचा पेपर?” म्हणत उभा राहीला. सरांनी ड्रॉवरमधून पेपर काढून याच्या हातात दिला. किती मार्क पडलेत वगैरे काही न पहाता हा सरळ बेफिकिरसारखा ऑफीसमधून बाहेर पडला आणि आम्ही डबलबारजवळ उभे होतो तेथे येऊन पेपर आमच्या हातात दिला. शामने घाईने पेपर ऊघडून पाहीला. पन्नास मार्कांपैकी पन्नास मार्क मिळाले होते. निदान आमच्या तरी ऐकीवात हायस्कुलच्या इतिहासात कुणी पैकीच्या पैकी मार्क मिळवलेले नव्हते. शामच्या हातातून त्याने पेपर घेतला. उभ्या उभ्या एका पायाची मांडी वर करत त्यावर घड्या घालून त्या पेपरचं विमान केलं आणि शेपटीत फुंकर मारुन हवेत उडवून निघून गेला. असा हा श्रीपाद. अमावस्येला स्मशानात जाऊन यायची पैंज लाऊन ती जींकणारा. 

हा तसा आमच्या ग्रुपकडे सहसा फिरकत नसे पण गेले सहा महीने तो बराच आमच्या मागे मागे अचायचा. जास्त करुन शामच्या. त्याला कारणही तसेच होते. या शिरप्याचे आणि मुलींचे साप मुंगसाचे नाते होते. दोन फुटाजवळ जरी एखादी मुलगी आली याच्या की हा लगेच तिच्या अंगावर फिसकारणार. आम्ही एकदा असेच कॉलेजच्या बागेजवळ टाकलेल्या बाकावर गप्पा मारत बसलो होतो. हे ध्यान समोरुन आलं. हातात कसलसं पुस्तक होतं. त्यात डोकं घालून शिरप्या चालला होता. समोरुन एक मुलगी आली आणि मुद्दाम त्याला धक्का दिला. शिरप्या धडपडला. पण तो सावरायच्या आतच तिने त्याला शिव्या द्यायला सुरवात केली. “मुलींना मुद्दाम धक्के मारतो का? लाज वाटत नाही का? निर्लज्ज कुठला!” तिच्या या आकस्मिक हल्ल्याने शिरप्या बावचळला. आम्ही त्याची गम्मत पहात होतो. हसत होतो.
शाम्या चिडला “हसता काय रे. कसाही असला तरी पोरींच्या बाबतीत सरळ आहे तो.” म्हणत त्याने त्या मुलीची चांगलीच हजेरी घेतली. “काय गं हेमे, शिव्या कसल्या घालतेस त्याला? आम्ही पाहीलय सगळं. आता एक शिवी जास्तीची दिली ना भवाने तर बघ. तुझ्या वडीलांना बोलावून घ्यायला सांगतो सरांना. आगाऊ कुठली. पळ इथनं.” हेमीने काढता पाय घेतला पण शिरप्या मात्र तेंव्हापासून शामच्या गळ्यात पडला.

मी शिरप्याच्याच विचारात होतो तोच क्लास संपल्याची बेल झाली. नेहमीप्रमाणे ‘उद्याचा टॉपीक’ न सांगताच सरांनी पुस्तके उचलली आणि बाहेर पडले. दत्त्याही “मी जातो गड्या. शाम्याशिवाय काय मन लागना” म्हणत बाहेर पडला. “काय करावं या दत्त्याला?” म्हणत मीही वर्गाबाहेर पडलो. माझ्या मागे शेपटीसारखा ठोब्बाही आला. मी व्हरांड्यातच दत्त्याला थांबवलं. तिथे ठेवलेल्या बाकावर त्याला बसवत म्हणालो
“दत्त्या लेका, कशाला उगाच कॉलेज बुडवतो? दुपारपर्यंत थांब मग जा हवं तर.”
“च्यक” आवाज करत दत्त्या म्हणाला “नाय, नको. मी आपला जातो. तू बस.”
इतक्यात कसलेसे कागद घेऊन सखाराम समोरुन गेला. त्याला पहाताच दत्त्याने हाक मारली.
“ओ सखारामभाऊ, या जरा इकडं.”
सखाराम दोन पावले मागे आला आणि न बोलता दत्त्याच्या तोंडाकडे पहात उभा राहीला.
“काय रं सखा, या शिरप्याची काय भानगड हाय?” दत्त्याने विचारले.
सखारामची बुबूळे हवेत तरंगल्यासारखी फिरली. डोळे भरुन आल्यासारखे झाले. तो फक्त “काय की बुवा. जीव दिला म्हंत्यात त्यानं.” एवढंच बोलून चालायलाही लागला. या सखारामला शिरप्याच्या वडीलांनी खुपदा मदत केली होती. हायस्कुलमधेही प्युन म्हणून त्यांनीच सखाला चिकटवला होता. हे सगळं आठवून कदाचीत त्याला भरुन आलं असावं.
सखाच्या तिरसटपणाचं आश्चर्य वाटण्याऐवजी दत्त्या वेगळ्याच गोष्टींनी हैरान झाला. त्याने सकाळपासून एकदाही शिरप्याचा विचार केला नव्हता पण आता तोही गडबडला.
“हैला अप्पा, हे शिरप्या जीव देनाऱ्यातलं नव्हतं रं. म्हसनात जावून भुताच्या मानगुटीवं बसनारं हे बेनं जीव कह्याला दिन रं?”
‘मला काय माहीत’ अशा अर्थाने मी खालचा ओठ पुढे काढून खांदे उचकले फक्त.
दत्त्या स्वतःशीच बडबडावा तसं म्हणाला “पोरीची भानगड म्हनावी तं हे पोरीसोरींपासुन कासराभर दुर ऱ्हायचं. बाप रोज श्या घालायचा पन हे बापालाच काय समद्या गावाला फाट्यावं मारत हुतं. काय झालं असन रं अप्पा?”
मी म्हणालो “हे बघ दत्ता, तुझ्याबरोबर मलाही अत्ताच कळतय. तू चल वर्गात. जे असेल ते कळेलच की.”
“नाय, आता हा भुंगा डोक्यात घेवून काय वर्गात बसायचं व्हायचं नाय माझ्याच्यानी. त्यात फिजिक्सचा तास हाय. ते बेनं काय मला सुखानं शिकू देनार नाय. पन अप्पा, या शिरप्याची कायतरी मोठी भानगड असनार पघ.” म्हणत दत्त्या निघाला. ठोब्बाने माझी बाही खेचली आणि वर्गाकडे खुण केली. मीही दत्त्याचा नाद सोडून वर्गाकडे वळालो, इतक्यात शकीलच्या बुलेटचा आवाज आला. मी वळून पाहिले तर शकील गाडी स्टँडवर लावत होता आणि शाम्या मागून उगाचच गाडी ओढून मदत करत होता.
तेवढ्यात “ऐ अप्पा, दम जरा. मरुंदे ती खुरापनी. आपली जोड आली. चल वर्गात जावू.” म्हणत दत्त्यानेच मला हसत वर्गाकडे खेचले. या दत्त्याइतका मनस्वी मानूस मी पाहीला नाही. जे त्याच्या मनात येईल तेच करणार. तोवर शाम्या शकीलही येवून आम्हाला मिळाले. सर वर्गात आले होते. आम्हाला दारात पाहून “आत येवू का?” विचारायच्या अगोदरच “या!” म्हणाले.
आम्ही बेंचवर बसत असताना सर दत्त्याकडे पाहून म्हणाले “बसा दत्तात्रेया, आपल्याशिवाय एकूनच भौतिकाला काय अर्थ आहे? नाही का? बसा.”
दत्त्या खाली मान घालून कुजबुजत मला म्हणाला “पघीतलं, याच्या घरी औंदा पोतंभर गहू घालतो. झालं गप तं झालं.”
सरांनी फळ्यावर टॉपीक लिहिला.“एवढे निट वाचून ठेवा. पुढच्या क्लासला यावरच आपण चर्चा करणार आहोत. आज मिटींग आहे. दत्ता, पुढच्या क्लासला तुझ्यापासून सुरवात करणार आहे त्यामुळे निट लक्ष देऊन वाच.” म्हणत सर वर्गाबाहेर पडले. सरांच्या मागोमाग वर्गातली शांतताही बाहेर पडली.

मी विचारले “काय रे शकील, मुंबईला जाणार होतास ना? काय झाले?
“अरे निघालोच होतो. दुकानात गाडी लावायला गेलो तर गफूर म्हणाला ‘चाचांचा फोन आला होता’. तेच परसो येणार आहेत. मग इकडे गाडी वळवली.”
दत्त्या शामच्या पाठीत गुद्दा मारत म्हणाला “अरारा, हे काय आक्रीत केलं मियाभाऊ? आमच्या बामनाची खिमा रोटी हुकावली तू. तुला सोबत करायच्या नावाखाली खिमा रोटी खायला जातय हे ममईला.”
मी दत्त्याला गप्प करत म्हणालो “सुन ना शकील, आपला शिरप्या माहित आहे ना?”
“पाटलांचा ना? आपला कधीपासुन झाला तो अप्पा? येडी मा का चाँद आहे रे ते. त्याचं काय?” शकील हसून म्हणाला. शिरप्याचे नाव ऐकून शाम्यानेही आमच्या गप्पात लक्ष घातलं.
“अरे त्या येडी माँच्या चाँद ने जीव दिला.” मला ही बातमी कधी एकदा शकीलला सांगतो असं झालं होतं.
माझ्या अपेक्षेप्रमाणे शकीललाही धक्का बसला “क्यु रे! अच्छा लडका था यार. काय झालं?”
शाम्याने कान टवकारले “काय म्हणालास अप्पा? जीव दिला? कधी? का?”
“अरे मला तरी कसं माहीत असेल? काल दिला कधीतरी. सकाळी सरांनी सांगीतले तेवढेच मला माहीतेय.”
शकीलने ठोब्बाला बाहेर पिटाळले “जा वो सखाराम को बुला ठोब्बा. मेरा नाम बोल उसे।”
थोड्याच वेळात ठोब्बा सखारामला समोर घालूनच घेऊन आला. रामही पुढच्या बाकावरुन आमच्यात येऊन बसला.
शकीलने विचाराच्या अगोदरच शाम्याने विचारले “सखाराम काय झालं रे? तु गेला होतास का पाटीलकाकांकडे?”
सखाराम नुसता मख्ख सारखा बसुन होता. शकील ओरडला “सख्या, सुनाई नही देता क्या? क्या माजरा है?”
सखाराम कसंनुसं म्हणाला “देवाच्यान मला काय म्हाईत न्हाई. त्यो पुन्याला गेला आन् शनवारवाड्यावं चढून उडी मारली. आज आनत्याल त्याला गावात. यवढंच कानावं आलय माह्या.”
आम्ही आवाकच झालो. शिरप्या पुण्याला कशाला गेला? तिकडे काय झालं? सगळंच त्रांगड होतं. दत्त्या माझ्याकडे पहातोय, मी शकीलच्या तोंडाकडे पहातोय. सगळेच गोंधळलेले. वर्गात इतर मुलांचा गोंधळ सुरु होता. इतक्यात इन्नी मुलींच्या बेंचमधून पळत पळत आमच्याकडे आली. “दादा, दादा काय होतय?” म्हणत तिने शामचा खांदा हलवायला सुरवात केली तेंव्हा कुठे आमचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्याचा चेहरा अगदी पांढरा पडल्यासारखा झाला होता. डोळ्यातून अक्षरशः अश्रुधारा सुरु झाल्या होत्या. डोळे हळू हळू लाल व्हायला लागले होते.
“शनिवाारवाड्यावरुन कसं शक्य आहे? नाही! नाही!” असं काहीसं पुटपुटत तो उठला आणि दरवाज्याकडे निघाला. चालतानाही तो अडखळत होता. त्याचे ते रुप पाहून ठोब्बा शकीलचे मनगट गच्च धरुन, घाबरुन मागे सरकला. मी तर अवाकच झालो. इन्नीने त्याला वर्गाच्या दारातच गाठलं आणि आधार दिला. दत्त्याही धावला. शकील गाडीच्या चाव्या माझ्या अंगावर फेकत म्हणाला “अप्पा, गाडी काढ. ठोब्बा पानी ला जलदी.” मी रामला सगळ्यांच्या वह्या गोळा करायला सांगीतल्या आणि शकीलबरोबरच वर्गाबाहेर पडलो.
सखाराम आमच्या या धावपळीकडे डोळे विस्फारुन पहात राहीला…

क्रमशः

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...