❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

रविवार, २६ जून, २०२२

नानासर

मी दहावीला हायस्कुलमध्ये असताना आम्हाला मराठी शिकवायला 'नानासर' होते. माझ्या संपुर्ण शालेय जीवनात नावाने किंवा आडनावाने न ओळखता घरच्या नावाने ओळखले जाणारे हे एकमेव सर. त्यांची मुले व एकूणच घरचे सगळे त्यांना नाना म्हणत. हायस्कुलमध्येही हेडमास्तरांपासून शिपायापर्यंत सगळे त्यांना नानासर म्हणत. साडेपाच फुट उंची, अंगात हाफ बाह्यांचा पांढरा शर्ट, ग्रे रंगाची बेलबॉटम पॅंट, हातात तळहाताच्या बाजूला डायल येईल असे घातलेले एचएमटीचे घड्याळ. खिशात निळा व लाल असे दोन बॉलपेन्स, डोळ्यांवर जाड, काळ्या फ्रेमचा चष्मा. मान किंचित खाली करुन चष्म्यावरुन समोरच्याकडे पहात बोलण्याची लकब. चेहऱ्यावर सदा मिश्किल हसू. हात सदैव खडूच्या पावडरने पांढरे झालेले व शरीराचाच अवयव झालेले फळा पुसायचे डस्टर. वर्ग सोडला तर माणूस अगदी मितभाषी. वर्गावर असले की मात्र त्यांच्या जिभेवर चिवी जोशी नाचत. महामिश्किल माणूस. जितके प्रेमळ तितकेच तिरकस. एखाद्या विद्यार्थ्याला काही सुचना करायची असेल तर ती तिरकीच केली पाहीजे असा त्यांचा नियम होता. आमचा शिपाई अतिशय भोळा होता. सखाराम. नानासर त्याचीही गम्मत करत असत. एकदा सरांनी सखाला काही काम सांगितले. सखाराम ते रितसर विसरला. 
सरांनी त्याला विचारले तर सखा म्हणाला "बुड खाजवायला सवड नसते सर. विसरलो तुमचे काम." 
सर हसत म्हणाले "म्हणजे सवड मिळाल्यावर तू बुड खाजवतोस?"  

नानासरांना कधी कधी फार कंटाळा यायचा शिकवायचा. मग ते पुस्तक बाजूला ठेवत व आमच्याबरोबर गप्पा मारत बसत. मग तास संपल्याची घंटा होईस्तोवर वर्गात हास्याचे बॉम्ब फुटत. ईतकी चौफेर माहिती मिळे त्यांच्या बोलण्यातून, तेही अगदी विनोदी भाषेत. आम्ही मुलं कधी कधी म्हणायचो "नानासर, आज तुम्हाला नक्की कंटाळा आलाय शिकवायचा. हो ना?" मग मुड जरा बरा असेल तर सर "कार्ट्यांनो आज गप्पा मारयच्यात वाटतं! चला आज तुम्हाला शनवारवाडा दाखवून आणतो" असं म्हणत मग पेशव्यांचा ईतिहास न शिकवता पेशवाईतल्या मजेशिर गोष्टी सांगत. अनेकदा या गोष्टी वरवर मजेशिर असल्या तरी मनावर आसूड ओढणाऱ्या असायच्या. आम्ही सरांपुढे हसत असलो तरी आतून अगदी हललेलो असायचो, अस्वस्थ व्हायचो. हा गप्पांचा तास संपता संपता अनेक मुलांनी मनातल्या मनात निश्चय केलेले असत, संकल्प सोडलेले असत. कुणी जातपात न पाळण्याचा, कुणी नेहमी सत्य बोलण्याचा, कुणी संयम पाळण्याचा वगैरे वगैरे. कधी कधी सर मिश्किलपणा विसरुन फार गंभीर होत. विशेषतः आमच्या भविष्याविषयी बोलताना त्यांचा आवाज कातर होई. वर्गातल्या गरिब मुलांना उद्देशून म्हणत "शिका रे बाळांनो. लक्ष द्या जरा वर्गात. अभ्यास करा. अन्यथा फार मागे पडाल जगाच्या. नंतर पश्चाताप करुन काही होणार नाही. आई बाप राबराब राबतात त्याची तरी जाण ठेवा रे बाळांनो. मी का पगार मिळतो म्हणून शिकवतो का तुम्हाला?" वगैरे वगैरे. एकदा असेच ते कळवळ्याने बोलत होते. बोलून झाल्यावर मागे बसलेल्या एका वात्रट मुलाने म्हटले "बरं मग?" आणि मग आधिच शांत, गंभीर असलेला वर्ग अगदी चिडीचुपच झाला. नानासर क्षणभर गोंधळले. काहीवेळ भ्रमात असल्यासारखे आमच्याकडे पहात राहीले आणि मग खळ्ळकन त्यांच्या डोळ्यातून आसवे ओघळली. ती न पुसताच ते झटकन वर्गाबाहेर पडले. त्यांचे डस्टरसुद्धा न्यायला विसरले ते. खरं तर कुणा सरांची टिंगल करायची असली की आमचा सगळा वर्ग आपापसातले मतभेद विसरुन एकत्र येई. पण त्या दिवशी सगळ्या वर्गाने मिळून त्या वात्रट मुलाला यथेच्छ चोप दिला. अगदी मुलीही मागे नव्हत्या. नंतर आम्ही सगळे मिळून स्टाफरुममध्ये सरांची माफी मागायला गेलो. तर काही झालेच नाही असे हसत हसत सरांनी आम्हाला वर्गाकडे पिटाळले.
एकदा असेच पुस्तक उघडून कोणता धडा घ्यायचाय ते सांगून त्यांनी प्रास्ताविक सुरु केले. बराच वेळ प्रास्ताविक झाल्यावर ते म्हणाले "तर आता आपण मुख्य विषयाकडे वळू." मग किंचीत थांबून, चष्म्याच्या वरुन सगळ्या वर्गाकडे पहात म्हणाले "वळू म्हणजे बैल नव्हे" काही क्षणांच्या शांततेनंतर वर्गात एकदम हास्याचा आगडोंब उसळला. त्यानंतर कधी बाजारच्या दिवशी बाजारओट्यावर किंवा आईने घर सारवायला शेण आणायला पाठवले की मळ्यात नेहमी वळू दिसत. अशावेळी मला चटकन अभ्यास आठवत असे. कोणत्या विषयाचा गृहपाठ राहिलाय, कोणती कविता पाठ करायची राहीलय ते सगळं त्या वळूदर्शनाने डोळ्यापुढून जाई. एवढेच काय सोमवारी शंकराच्या मंदिरात गेल्यावरही नंदीच्या दोन शिंगांमधून पिंडीकडे पहाताना भक्तीभावाऐवजी हास्याचेच भाव चेहऱ्यावर येत. नंदी पाहूनही मला नानासरच आठवत. मला वाटायचे हे फक्त माझ्याच बाबतीत होतेय. पण एक दिवस जिवशास्त्राच्या तासाला कशावरुन तरी विषय निघाला व तो नंदीकिड्यापर्यंत (Antlion) पोहचला. हा किडा मातीत मऊ धुळ गोळा करुन विहिरीसारखे घरटे कसे बांधतो, आत दबा धरुन कसा बसतो, वरच्या घुमटात एखादी मुंगी वगैरे पडली तर तो किडा त्या मुंगीला कसा पाताळात ओढतो वगैरे सर सांगत होते. मग शेवटी सरांनी पुस्तक बाजूला ठेवले व सगळ्या वर्गाला बाहेर काढले. हायस्कुलच्या मागील जागा पडीक होती. तेथूनच मळ्यात जाणारा धुळभरला रस्ता गेला होता. सरांनी आम्हा सगळ्यांना मागे रस्त्यावर नेले व दहा पंधरा मिनिटात त्या किड्याची अनेक घरे दाखवली. त्या घरातली माती एका काडीने हलवल्यावर बाहेर आलेला किडाही दाखवला. आम्ही पुन्हा वर्गात येत असताना बाजूच्या माळावर चरणाऱ्या वळूकडे एका मुलाचे लक्ष गेले. तो मोठ्याने ओरडला "अरे ते पहा काये!"
आम्ही सगळ्यांनी वळून पाहीले व त्या वळूला पाहून सगळे एक साथ नमस्ते म्हणावे तसे ओरडले "नानासरांचा अभ्यास"
आमचे जिवशास्त्राचे सर त्यानंतर कित्येक दिवस "वळू पाहील्यावर मुले 'अभ्यास' असे का ओरडली असतील" याचा विचार करत असावेत.
(फोटो आंतरजालावरुन.)




बुधवार, १५ जून, २०२२

शेंगोळी

मावळे म्हटलं की लोकांना फक्त महाराज आठवतात व ‘महाराज’ म्हटलं की मावळे. पण मावळे म्हटलं की मला त्यांच्या तलवारीपेक्षा तवाच जास्त आठवतो. मावळ्यांना खाण्याचा अजिबातच शौक नाही. समोर वाढलेल्या ताटाबाबत हे फार उदासीन. ‘उदरभरण’ एवढाच हेतू. चवीचवीने खाणे मावळ्यांना माहितच नाही. पण त्यांच्या याच वृत्तीमुळे त्यांची एक वेगळीच खाद्यसंस्कृती झालीय. मावळ्यांसारखीच रांगडी व राकट. प्रत्येक मावळ्याच्या पाठीवर ढाल व त्याच्या बुडाखाली असलेल्या घोड्याच्या पाठीवर असलेल्या गाशामधे तवा. कुठेही आडरानात ओढा किंवा विहिर पाहून घोडा थांबवायचा. तिन दगडं मांडून त्यावर तवा चढवायचा. चार मिरच्या, मिठ व आजूबाजूच्या शेतात जी काही माळवं असतील ती किंवा ती नसतील तर रानातली रानभाजी टाकायची. तलवारीच्या मुठीने ते सगळे जिन्नस गरम तव्यावर रगडायचे. त्याच तव्यावर दोन चार अंगठ्याएवढ्या जाड भाकऱ्या भाजायच्या व पळसाच्या पानावर किंवा सरळ हातावर घेऊन मनसोक्त खायच्या. गाडगंभर ओढ्याचे पाणी रिचवायचे. सवड असेलच तर डेरेदार झाडाचा आडोसा पाहून गाशा पसरायचा व ताणून द्यायची. पहाट होता होता गाशा गुंडाळायचा व पुढच्या मोहीमेवर चालू पडायचे. महाराजांच्या सैन्याला यामुळेच गती असायची. शत्रू ही गती पाहून चकित व्हायचा. मुघल मात्र सुर्यास्ताचे सौंदर्य पहात रमायचे, त्यांचा खानसामा तब्बेतीत मुदपाक लावायचा. मग हंड्या चढायच्या. त्यात मटन रटरटायचं. ते शिजेपर्यंत मुघल सैनिक यथेच्छ अपेयपान करुन, बांद्यांचा नाच वगैरे पाहून मग ताटावर बसायचा. यथेच्छ जेवायचा व रात्रभर बेशुद्ध झाल्यासारखा झोपायचा. शुर असुनही मुघल या सवयीमुळे महाराष्ट्रात जिंकू शकले नाहीत. मावळ्यांची ढाल वार अडवायला जशी कामी येई तशीच चुल्हीला आडोसा म्हणूनही कामी येई. समोर शत्रू असताना हजारभर मावळ्यांनी ढालीवर केलेल्या तलवारीच्या मुठींचा खट खट आवाज समोरच्या पन्नास हजाराच्या छावणीला धडकी भरवायचा ते उगीच नाही.
तर अशा या मावळ्यांच्या मावळात काही गोष्टी खासच पिकतात. मावळातली ज्वारी खावी, बाजरी खावी. मावळातला हुलगा खावा. मावळातली मिर्ची खावी. मावळातला तांदूळ खावा. वसुमतीचा बासमती झाला व मुघलांच्या नादी लागून तो बिर्याणीत वगैरे पडला तरी त्याला मावळातल्या तांदळाची सर नाही. मावळातल्या तांदळाच्या पेजेत वात ठेवून पेटवली तर रात्रभर जळते. तो नाद इतर तांदळांनी करुच नये. प्रत्येक प्रांताची आपापली एक खाद्य संस्कृती असते. ती त्याच प्रांताला शोभते. कोकणाने माशांची मिजास करावी. ती मजा आम्हा मावळवासीयांना नाही जमत. आम्ही कितीही नदीतल्या गोजळा पकडल्या तरी कोकणातली गम्मत नाही. कोकणातली एखादी आक्का ढिगभर फडफडीत भाताबरोबर तव्यावर दोनचारदा उलटी पालटी केलेली माशाची एखादी तुकडी वाढते व माणसाचा पोटोबा तृप्त करते. ती कला आम्हा मावळ्यांकडे नाही. पण कोकणात हुलग्याचा कुळीथ करतात व पिठाची पिठी करतात ते काही सहन होत नाही. हुलगा हलक्या काळजाच्या माणसाचे खाणेच नाही. त्याचे पिठले करुन, वरुन तुप घेऊन भाताबरोबर खाणे हा हुलग्याचा अपमान आहे. वर कुळीथाचे पिठले व भात याचे गुणगाण गाणे हा तर अपराध आहे. मुळात कोकणी माणसाला खरा हुलगाच माहित नाहीए. लाल हुलग्याला आम्ही मावळे हुलगा म्हणतही नाही व मानतही नाही. अगदी सपक. मावळातला हुलगा हा मावळ्यांसारखाच रांगडा. जेवढा बरड जमिनीत, डोंगर उतारावर वाढेल तेवढी जास्त चव. एकरभर रान एका दमात नांगरुन उलथवणाऱ्या बैलांचा आहार म्हणजे हुलगा. शाहीर पिराजी म्हणायचे की ‘वंशाला मुलगा, होडीला व्हलगा व बैलाला हुलगा असावा’. मावळी हुलग्याची रग बैलांनीच जिरवावी, येरांचे ते काम नोव्हे. आवडतात म्हणून आठवड्यातून दोनदा हुलगे खाल्ले तर भल्या भल्या खवय्यांना त्रास होतो. ही रग कोकणातल्या कुळीथामधे नाही. आमच्या हुलग्यांना मांजे म्हणतात. रंगाने काळेभोर व उग्र. हुलग्याचे पिठ मळण्यासाठी त्यात पाणी टाकले तरी सगळ्या घरात त्याचा वास पसरतो असे तिव्र असतात मांजे. या हुलग्याचे लाड करावेत तर ते आम्ही घाटी लोकांनीच. मावळातली बाई हुलग्याचे असंख्य प्रकार करते. बाहेर माघाची थंडी चराचर गोठवते तेंव्हा बहुतेक घरांमधे चुलीच्या वैलावर मोड आलेले हुलगे रटरटत असतात. सकाळचा स्वयंपाक उरकला की चुलीतला विस्तू मागे ओढायचा व बाजूच्या वैलावर मोठं पातेलं ठेवायचं. त्यात भरपुर पाणी, मिठ, दोन चार हिरव्या मिरच्या, हळद व मोड आलेले हुलगे टाकायचे व शेताचा रस्ता धरायचा. दुपारपर्यंत हे पाणी निम्मे आटते. रानात राबून आले की हे कढण पितळीने प्यायचे. दुसऱ्या आहाराची गरजच नाही. पण त्यातल्या त्यात माडगं व शेंगोळी हे प्रकार आमचे जरा जास्तच लाडके. लाडके म्हणजे किती, तर शेंगोळी असेल तेंव्हा मटनाच्या खुमासदार रश्यालाही दुर सारतो आम्ही. ‘मटनाते परौते सर म्हणती’ अशी असते शेंगोळी. मी एवढं शेंगोळीचे गुणगाण गातोय म्हटल्यावर कुणाला वाटेल की एकदा ट्राय करावाच हा पदार्थ. पण ते इतकं सोपंही नाही. एकतर मांजे हुलगे मिळणे कठीण. मिळालेच तर त्यांची उठाठेव करणे अवघड. कारण बरड माळावर उगवलेल्या या धान्यात खडे, माती व इतर कचरा खुप. तो साफ करुन हुलगे दळून आणलेच तर शेंगोळी करणे कौशल्याचे काम. एवढं करुनही शेंगोळी केलीच तरी ती तब्बेतीला झेपायला हवी, चवीची सवय हवी. कारण माझं एक ठाम मत आहे की शेंगोळीची ही आवड वारशानेच तुमच्याकडे येते. उगाच करु नविन पदार्थ ट्राय म्हणून शेंगोळी खाऊन तिची आवड निर्माण होत नाही. एक तर या पदार्थाला रंग नाही, रुप नाही. आपल्या मराठी माणसाची सवय असते की घरी काही खास केलं की ते शेजारी देणे. त्याशिवाय आपल्या घशाखाली घास उतरत नाही. तर एकदा शेंगोळी केली होती व मी ती डिशमधे ठेऊन शेजारी रहाणाऱ्या गुजराती भाभींना नेऊन दिली कौतूकाने. त्यांनी ते पहाताच “ईऽऽ काय्ये हे?” असं म्हणत असा काही चेहरा केला की मी पुन्हा कधी अनोळखी व नॉनमराठी माणसाला शेंगोळीचे आमंत्रण दिलेच नाही. ही काही लॉस्ट रेसेपी नाहीए पण आजकालच्या मुलींना ही हातावर वळता येत नाही. पाटावर वळलेल्या शेंगोळीला हातावरच्या शेंगोळीची चव नाही. माझं लग्न झालं तेंव्हा बायकोला शुन्य स्वयंपाक येत होता. मी एक एक पदार्थ शिकवला. स्वयपाकाच्या बाबतीत पुर्ण अडाणी मुलीला मी पहिला कोणत पदार्थ शिकवला असेल तर तो हा शेंगोळी. आता बायको इतकी छान शेंगोळी वळते हातावर की पहात रहावं. तर शेंगोळी पुराण जरा बाजूला ठेऊयात. बाहेर पाउस पडत असताना जर हातात हुलग्याचे माडगे आले तर स्वर्गच. जर उद्या मला कळाले की स्वर्गात माडगे मिळत नाही तर मी लाख पुण्य केले असले तरी ऐनवेळी स्वर्ग नाकारेण. मुळात जेथे हुलगा नाही, शेंगोळी नाही, माडगं नाही तो स्वर्ग असुच कसा शकतो?
कधी जमलच तर या मला भेटायला. मस्त शेंगोळीचा मेन्यू करु. दुसऱ्या दिवशी पहाटेच हुलगे शिजायला ठेउ. दुपारखाली मस्त त्याचे माडगे करु. शिवनेरी सगळेच पहातात, त्यापलिकडे जाऊन मस्त नाणेघाट पाहू. रात्री झकास मासवड्यांचा बेत करु. झणझणीत रश्यात भाकरी चुरुन खाऊ. खळ्यात गोधड्या अंथरुन स्वच्छ आभाळातला चांद पहात गप्पा मारत झोपू.




शुक्रवार, १० जून, २०२२

माशुक का बुढापा

रात्रीच्या पावसामुळे आजची सुर्यकिरणे बरीचशी शितल आणि स्वच्छ होती. त्यामुळे आजचे सर्वच फोटो सुर्याला सामोरे ठेऊन काढले. तसेही सुर्य पाठीवर घेऊन समोरचे जे रुप दिसते त्याहून सुर्य समोरा असताना दिसणारे वस्तुंचे रुप फार वेगळे व विलोभनिय असते.
मोहर गळाल्यावर आता चिंचेच्या काही पानांनीही माना टाकायला सुरवात केलीय. त्यांची जागा नविन पालवी घेते आहे. कधीकाळी तजेलदार पोपटी रंग मिरवलेली ही पाने आता सुकून शेंदरी होत चालली आहेत. ही सुकनारी पानेही आपलं वेगळं सौंदर्य राखून आहेत.
माशूक का बुढापा, अब लज्जत दिला रहा है
अंगूर का मजा अब, किसमिस मे आ रहा है।
😀😛




Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...