❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, १४ मार्च, २०२२

रामस्वामी-१

एकदा संध्याकाळी रामरक्षेची तयारी करत असताना एक माणूस घरात आला. मी विचारलं कोण हवय तर ईतक्या अगम्य भाषेत बोलला की मला हसुच आलं. आतुन बाबा घाईत बाहेर आले. मी वात वळताना दोघांकडे पहात होतो. बाबांनी विचारलं “कोण हवय?” तो माणूस पुन्हा त्याच अगम्य भाषेत काहीतरी बडबडला. बाबा गोंधळले. हा कोण माणूस आहे?, याचं नक्की काय काम आहे आपल्याकडे? हा कोणत्या भाषेत बोलतोय? काही कळेणा त्यांना. मग त्यांनी त्याच्या छातीवर बोट ठेऊन हातवारे करीत म्हटलं “कोण आहेस तू? काय काम आहे?” मग तो माणूस स्वतःच्या छातीवर दोन्ही हाताची बोटे रोवत म्हणाला “रामस्वामी रामस्वामी” बाबा म्हणाले अरे आमचाही स्वामी रामच आहे रे. तु कोण? काय काम काढलय ईकडे? एवढ्यात आई चहा घेऊन आली. बाबांनी त्याच्यापुढे कपबशी धरत म्हटलं “चहा चहा.” आई म्हणाली “अहो त्याला भाषा कळत नाही आपली पण चहा कळणार नाही का? चहा चहा काय करताय” त्याने कपबशी हातात घेतली आणि नांद्री असं काहीसं पुटपुटला. आई गडबडली. अहो त्याला नकोय का चहा? आपण ऊगाच एखाद्याला संकटात कशाला टाकायचे? बहुतेक त्याला आईच्या एकून हावभावावरुन कळाले असावे काय गडबड झालीय. तो जोरजोरात मान हलवून म्हणाला “तॅंक्यू तॅंक्यू” मग त्याचा चहा संपेपर्यंत आई, बाबा आणि मिही एकदम शांत बसलो. चहा संपल्यावर त्याने कपबशी आत नेऊन ठेवायचा प्रयत्न केला. आईने त्याला तेथेच थांबवले व त्याच्या हातातून कपबशी घेतली. बाबांना म्हणाली “जाऊद्या हो याला. अगदी घरात घुसायला बघतोय मेला” मग बाबांची पुन्हा तिच कसरत सुरु झाली. कोण आहात तुम्ही? काय काम आहे तुमचे? हे दोन प्रश्न विचारताना बाबांनी केलेले हातवारे पाहून मला हसूच आवरेना. समोरचा माणूस चार वेळा छातीवर मुठ आपटून रामस्वामी रामस्वामी बोंबलत होता आणि बाबा म्हणत होते अरे हो रे आम्हीही रामाचे दासच आहोत. त्याच्या ईच्छेविन पान तरी हालते का सांग बरं? तुम्ही कोण? ईतका रामावर विश्वास आहे म्हणजे छानच असणार तुम्ही. पण काम काय आहे माझ्याकडे? मग त्या माणसाने डाव्या हाताची तर्जनी स्वतःच्या छातीवर ठेवून म्हटले ‘रामस्वामी’ आणि दुसऱ्या हाताची तर्जनी बाबांच्या छातीवर ठेवून प्रश्न विचारावा तसे हातवारे केले. तेंव्हा कुठे बाबांना कळले की तो नाव विचारतोय. मग बाबा विनाकारण स्वतःच्या छातीवर बोट ठेवत चार वेळा म्हणाले “मी रंगनाथ, मी रंगनाथ” मग त्यांच्या तासभर गप्पा चालल्या. आईने दोन वेळा चहा आणून दिला. बाबांना त्या माणसाला घालवून द्यायच्या सुचनाही देवून झाल्या तिच्या. पण बाबा छान रमले होते. तासाभराने तो मानूस गेल्यावर बाबा आत येऊन आईला म्हणाले “काय म्हणाला काही कळले नाही. मी काय म्हणत होतो ते त्याला कळले असेल असं वाटत नाही पण माणूस फार छान होता. मी माणसे ओळखायला चुकत नाही कधी” आईने फक्त मान हलवली. बाबा जे करतात त्यावर आईचा फार विश्वास. बाबा म्हणतायेत म्हणजे तो माणूस छानच असणार यावर आईचे मत ठाम. मधे पंधरा विस दिवस गेले. मग तो रामस्वामी पुन्हा एका माणसाला घेवुन घरी आला. या बद्रीचे फाट्यावर गॅरेज होते. तमीळी होता व मराठीही छान बोलायचा. मग बाबांचे व रामस्वामीचे बद्रीला मध्यस्त करुन बोलणे झाले. रामस्वामी विद्युत मंडळाचे टॉवर ऊभरण्यासाठी गावी आला होता. त्याला मराठी शिकायचे होते. कुणीतरी त्याला सांगीतले की तू गुरुजींकडे जा, ते ऊत्तम शिकवतील म्हणून तो बाबांकडे आला होता. त्याला मराठी शिकवावे असं त्याचे म्हणने होते. बाबा एका पायावर तयार झाले. तुही मला तमीळी शिकव बरं का असं म्हणत दुसऱ्याच दिवसापासून आमच्या मराठी शाळेत वर्ग घ्यायला सुरवात झाली. रात्री जेवणं ऊरकली की बाबांसोबत मी कंदील घेवून आमच्या शाळेत जायचो. तिथे हे पाच सहा जण निळ्या चौकडीच्या लुंग्या घालून फार ऊत्सुकतेने हातात पाट्या घेवून बसलेले असायचे. बाबा फळ्यावर अ आ ई लिहायचे व हे धडा व्यवस्थित गिरवतात की नाही हे मी कंदील घेवून पहायचो. ईतकी मोठी माणसे अ आ ई गिरवताना, चुकताना पहाताना मला फार गम्मत वाटायची. माझ्यासारख्या लहान मुलाला जे येतं ते यांना कसं जमत नाही याचं फार हसु यायचं. हळू हळू रामस्वामी मराठी बोलायला शिकला. लिहिता मात्र येत नसे. तुमचा क्ष किती अवघड आहे म्हणायचा. हायला त्याचे प्रत्येक तमिळ अक्षर रांगोळी काढल्यासारखे अवघड व वाटोळे असे. तरीही त्याला मराठीच्या क्ष ची भिती वाटायची. एकदा रामस्वामी घरी आला. आज बाजार आहे ना, चल आपण आईसोबत बाजारात जावू. म्हणून मागे लागला. बाबांनी त्याला किती वेळा सांगीतले की तिला वहिणी म्हण, काकू म्हण, ताई म्हण. पण त्याला ते काही कळत नसे. मी आई म्हणतोय म्हणून तोही आईच म्हणायचा. बाजारात या साठी की त्याला मराठी बोली भाषा कळेल. गमतीही करायचा. आई एखाद्या भाजीवाल्याबरोबर बोलताना “नको, फार महाग आहे” असं म्हणून तिच भाजी घेताना पाहून त्याला वाटले की नको म्हणजे द्या. मग तोही म्हणायचा ही भाजी नको, ती भाजी नको.त्याला म्हणायचे असायचे की ही भाजी द्या, ती भाजी द्या. मग हळू हळू तो छान मराठी बोलायला लागला. आमच्या मराठी शाळेसमोरच त्यांचे मोठमोठे कॅन्व्हासचे तंबू असायचे. बाहेर कितीही छान अल्हादायक हवा असली तरी या तंबुत नेहमी ऊकाडा असायचा. मी अनेकदा या तंबुत जाई. एक जव्हारीने विनलेली बाज, एक रेडीओ आणि चार जर्मलची भांडी असा संसार असे त्यात. आजुबाजूला पाचसहा लुंग्या वाळत घातलेल्या. मी गेलो की रामस्वामी “आव गुर्जी” म्हणून स्वागत करायचा. बटाटे व टोमॅटो घातलेला रस्सा व वर दोन ऊकडलेली अंडी घालून ढिगभर भात वाढायचा. काय सुरेख चव असायची त्याची. मग जेवून झालं की तो रेडिओची बटने फिरवून काहीबाही लावायचा. तंद्री लागायची त्याची ते ऐकताना. एकदा मी रामस्वामीकडे हट्ट केला की मला त्या टॉवरवर घेवून जा. तेथून जमिन कशी दिसतेय ते मला पहायचय. रामस्वामी अर्ध्या तमिळीत अर्ध्या मराठीत म्हणाला “ त्यात काय एवढं. ऊद्याच जावू तुला घेवून” मला रात्रभर झोप आली नाही. सकाळी त्याने हार्नेस आवळले माझ्या कंबरेभोवती आणि काहीतरी काम निघालं म्हणून एकटाच वर गेला. त्यानंतर पंधरा दिवस मी हार्नेस बांधत होतो पण रामस्वामीने मला कधीच टॉवरवर नेले नाही. पळ, खोटारडा आहेस तु असं म्हणून मी चिडलो तेंव्हा त्याने दिवसभर सुट्टी काढली आणि तंबुत बसुन त्याने त्याच तारेच्या काही तारा काढून ईतका सुरेख टॉवर करुन दिला की मी हरखूनच गेलो. एकदा घरी आला. ईडली खाल्लीय का तुम्ही असं विचारलं तेंव्हा आई म्हणाली ते काय असतं? मग त्याने तांदूळ भिजत घातले. दुसऱ्या दिवशी येवून ते पाट्यावर वाटले. त्याचा तो वरवंटा चालवणारा सराईत हात पाहून आई चकीत झाली. मग रितसर त्याने ईडली करुन खावू घातली तेंव्हा आम्ही सगळेच चकित झालो. हा पदार्थ कधीच खाल्लेला नव्हता. आणि आईच्याच किचनमधे बसुन हा रामस्वामी “आवडली का ईडली आई? अजुन घे दोन” असं म्हणत वाढत होता. आईला कधीही तिच्या किचनमधे कुणाची लुडबुड चालत नाही. आणि हा रामस्वामी तिच्याच किचनमधे तिलाच आग्रह करुन करुन वाढत होता. कालांतराने टॉवरचे काम पुर्ण झाले. रामस्वामी नंतर मुंबईला गेला. त्याचे दर आठवड्याला पत्र यायचे. सगळ्यांची ख्याली खुशाली विचारायचा. एकदा त्याचे पत्र आले की मी लग्न करतोय. आईची किती धावपळ. याला काय काय द्यायचे, काय काय घ्यायचे, मद्रासला जावे लागेल आता. ती तयारी वगैरे वगैरे. मग सहा महिने रामस्वामी संपर्कातच राहीला नाही. त्याचे लग्नही राहीले, त्याचे ते मद्रासला जावून गाव पहायचे राहीले. सगळंच राहीले. आई मधेच बाबांना म्हणायची “अहो कार्ड टाकून पहा त्याला. काय झालय काही समजत नाही. ह्या मुडद्यालाही कळत नाही का एखादे कार्ड टाकावे म्हणून” मग रामस्वामी मागेच पडला. फक्त आई त्याची आठवण काढायची मधे मधे. दिवाळी जवळ आली होती. अनारशाचे पिठ कुटण्यासाठी आई मागे लागली होती. अचानक दारात रामस्वामी ऊभा राहीला. “अहो बघा तरी कोण आलय” म्हणेपर्यंत बाबा रामस्वामीच्या मिठित सामावले होते. दोघेही रडत होते. जरा वेळाने रामस्वामीने बाबांना दुर केले व जादूगार जसा टोपीतून ससा काढतो तसे हळूच मागे ऊभ्या असलेल्या मुलीला पुढे केले. “आई, बायको” एवढंच म्हणाला. ती काळीसावळी, पोटरीपर्यंत केस असलेली, मोगऱ्याच्या फुलांनी मढलेली, तेजस्वी डोळे असलेली पोर पाहून आई हरखलीच. जरा म्हणून अक्कल नाही असं म्हणत ऊंबऱ्याच्या आत आलेल्या त्या दोघांना पुन्हा मागे ढकलत आई भाकरी आणायला आत गेली. तुकडा पाणी ओवाळून टाकल्यावर दोघे आत आले. त्या दिवशी रामस्वामी राहीला. सकाळीच “आई जरा काम आहे, हिला न्यायला दोन दिवसात येतो” म्हणत तो गायब झाला. रामस्वामीच्या बायकोला शुन्य मराठी, हिंदी, ईंग्रजी कळत होतं. रामस्वामी महिन्याभराने ऊगवला.

मुंगी साखरेचा रवा

घरातून पळून जायचं मोठं होऊन खुप पैसा कमवायचाहे माझं लहानपणच्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न होतं. ड्रायव्हर व्हायचं, पोस्टमन व्हायचं आणि हे काही नाहीच जमलं तर गेला बाजार निदान पिंजारी तरी व्हायचंच व्हायचं ही देखील स्वप्न होतीच. पिंजारी होऊन त्या भल्या मोठ्या धनुकलीने टॉन्गऽ टॅईऽन्गऽऽ असा मस्त आवाज काढत चौफेर मऊसुत कापूस ऊधळत पिंजून काढायचा. दुसरं काय हवं मग आयुष्यात असं वाटायचं. बाकीची स्वप्ने ही अगदी मनापासूनची होती पण पळून जायचे स्वप्न मात्र आई-बाबांवरच्या रागामुळे होतं. व्हायचं काय की, शाळा सुटल्यावर शाळेपासून ते घरी येईपर्यंत ईतकी प्रलोभने असत की मन अगदी मोहून जाई. मग घरी येऊन अगोदर आईच्या मग बाबांच्या मागे लागून हट्ट करावा लागे. तोही पुर्ण होईलच याची शाश्वती नाही. किती तरी ईच्छा मग अशाच राहून जात. शाळेसमोर बसणाऱ्या मावशीकडची बिस्किटे, पाराखाली दुकान लावणाऱ्या मामांकडे असणारी खेळणी, रामकाकाच्या दुकानात असलेल्या त्या सुरेख वासाच्या कव्हरच्या वह्या, ते निळ्या, विटकरी रंगाचे चमकदार पेन्स, त्यांचे ते लखलखते निब, सुट्टीच्या दिवशी सायकलवर येणारा तो आईस्क्रिमवाला, ती वडाच्या पानावरची घट्टमुट्ट कुल्फी एक की दोन ईच्छा होत्या? त्यात पुन्हा मधेच येणारी आमची यात्रा, मग आत्याच्या गावची यात्रा. त्यातली प्रलोभने वेगळीच. यातल्या एक एका ईच्छेसाठी आईकडे तास तास भर हट्ट करावा लागे. तिचा पदर धरुन ती जाईल तेथे फिरावे लागे, ती सांगेल ती सगळी कामे करावी लागत. एवढं करुनही आई प्रसन्न होईलच याची खात्री नसे. मग तासभर भोकाडही पसरावं लागे. तेंव्हा कुठे मग कुल्फीचा गोळा दाबलेलं ते हिरवेगार वडाचं पान हाती येई. थोडी का यातायात होती. मला वाटतेहजारो ख्वाहीशे ऐसी की हर ख्वाहीश पे दम निकलेही गझल गालीबला त्याचे बालपण डोळ्यापुढे आल्यानेच सुचली असणार. त्याचे आई बाबा काय वेगळे असणारेत का? ईथून तिथून सारखेच असतात हे आई-बाबा. यावर एकच जालिम ऊपाय-पळून जाणे. नको ते सारखं सारखं आई-बाबांपुढे भोकाड पसरायला. मोठं व्हावं, भरपुर पैसा कमवावा, हवी तेवढी बिस्किटं खावीत, हवी तेवढी शाईपेनं घ्यावीत, पाहिजे तेवढ्या वह्या घ्याव्यात. दोन आईस्क्रिमवाले सायकल घेऊन घरापुढेच ऊभे करावेत दिवसभर. वडाच्या पानांना काही तोटा नाहीच्चे. हवी तेवढी झाडे आहेत आपल्या गावात. कुणाला काही विचारायचे नाही कुणाकडे काही मागायचेही नाही. मग हे पळून जायचं अगदी नक्की व्हायचं. पण मग विचार यायचा; पळून जाऊ, पैसाही कमावू पण आजोबा अधून मधून जी काकवी आणतात ती कुठे मिळणार आपल्याला? आजोबांच्या गुऱ्हाळातली काकवी मधाच्याही तोंडात मारेल अशी असायची. गरम पोळीला हे काकवीचे मध लावून खाणे म्हणजे स्वर्ग. आजीच्या हातच्या रेशमी शेवया कुठे मिळायच्या? दुध संपल्यावर ती पातेल्यातली सायी शिंपल्याने खरवडून देते तसं कोण देणार? आणि आईच्या हातच्या मऊसुत पोळ्या मिळतील का? दुधात ही पोळी गुळ कुस्करला की तोंडाला पाणी सुटे. बरं जगात फक्त माझ्या आईच्याच हातच्या पोळ्या मऊ होतात. तिच्यासारखा सांजा आख्ख्या दुनियेत कुणालाच करता येत नाही. मोदकही फक्त तिलाच जमतात. शेजारच्या काकूसुद्धा तिला विचारुनच करतात दर वेळी मोदक यावरुन पहा मग. आणि रात्री बाबांच्या दंडाची ऊशी नसेल तर झोप येईल का? असा भारी दंड कुणाचा असेल का कुठे? मग वाटे नको तो पैसा कमावनं आणि नको ते पळून जाणं.


मग हळू हळू मोठा झालो. नुसताच मोठा झालो. ‘ऊगाच मोठा झालोअसं वाटेपर्यंत मोठा झालो. यथाशक्ती पैसाही कमावला. आता मी माझ्या कोणत्याही ईच्छा पुर्ण करु शकत होतो. पण दुर्दैवाने आता त्या ईच्छाच राहिल्या नाहीत. ऊलटकाय बावळट ईच्छा होत्या आपल्या!” असा स्वतःच्याच ईच्छेंची टिंगल करण्याचा निगरगट्टपणा अंगात आला. मित्र, भाऊ, नातेवाईकआलोच तालूक्याला जाऊनअसं म्हणावं ईतक्या सहजतेने जगभर भटकतात. येताना आवर्जुन माझ्यासाठी चॉकलेट्स, बिस्किटस्, महागडे पेन्स आणतात. तेवढ्यापुरते कौतूकही वाटते. पण आता तो शाईपेनमधला रस राहीला नाही पुर्वीचा. एकदा आईने तिचा वापरताएअरमेलकंपनीचा शाईपेन मला दिला होता तेंव्हा मी तो मुठीत घेऊनच झोपलो होतो रात्रभर. आणि परवा थोरल्याने त्याच्या खिशाचा महागडा क्रॉसचा पेन काढून मला दिला तर मी फक्त एक सही करुन पाहीली छानेम्हणत पेनच्या मगमधे ठेऊन दिला. मला आठवतय, ओट्यावर बसुन बाबा मला शिकवायचे की बांबू कसा धरायचा, कोणत्या बोटाचा त्याला खालून आधार द्यायचा, सुरी कोणत्या ऍन्गलने कशी चालवायची. बोरु तयार झाला की त्याचे टोक कोणत्या कोनात कापायचे. अगदी मनासारखे चारपाच बोरु तयार झाले की मग मोठा तक्ता शाईची दौत घेवून बसायचे देवनागरी अक्षरे गिरवायला शिकवाचे. तो कुरु करु आवाज करत चालणारा बोरु का मिळत नाहीए मला आज? कुठे गेला तो कुरु कुरु असा येणारा नाद? कुठेय ती काळीभोर शाई आणि तिचा तो मिरमिरीत वास? काय करु हे दहा दहा हजाराचे पेन घेऊन? कशात होता माझा आनंद नक्की? वस्तूंमधे होता तर मग आता हाताशी ईतक्या वस्तू असताना तो लहानपणीचा आनंद का होत नाहीए मला? ती पाच पैशाची बिस्किटे खिशात असली की मला जग माझ्या पायाशी आल्यासारखे वाटायचे. दिवसभर ती बिस्किटे पुरवून पुरवून खाताना त्यासमोर ब्रम्हानंद तुच्छ वाटायचा. मग आज ही एवढी वेगवेगळी बिस्किटे, कुकिज का घशाखाली ऊतरत नाहीत? तांब्यात विस्तव टाकून ईस्त्री केलेला माझा शर्ट मऊ रेशमाशीही पैजा घ्यायचा. मग आज हे दुनियाभरचे ब्रॅन्ड माझ्या मनाला, शरीराला का रिझवत नाहीएत? कुठे गेले आजोबा आणि त्यांची तीमधाच्या तोंडात मारणारीकाकवी? कुठय ती आज्जी आणि तिने माझ्या कानशिलावर सुरकुतलेली बोटे मोडून घेतलेल्या आलाबला? ती शाळेबाहेरची मावशी, तो पारावरला दुकानदार, ते रामकाकाचे दुकान कुठाय सगळं?

मला पळून जाऊन खुप खुप मोठं व्हायचं होतं. आज मला पळून जाऊन खुप खुप लहान व्हायचय.
तेंव्हाही पळने शक्य झाले नाही आणि दुर्दैवाने आजही ते शक्य होत नाहीए.



मंगळवार, १ मार्च, २०२२

यार कुछ भी हो यार होता है

लग्नानंतर बायकोला खुष करण्यासाठी मी काही गोष्टी केल्या. पण त्यातला फायदा लक्षात आल्यावर मी त्यातल्या काही पुढे कंटिन्यू केल्या. त्यातल्या दोन म्हणजे पैशाचे पाकिट व मोबाईल स्वतःजवळ न ठेवणे. जे काही लागतील ते तिच्याकडून घ्यायचे. हिशोब ठेवायची भानगड नाही, काटकसर करायची यातायात नाही, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुणाला ‘नाही’ म्हणायचे संकट नाही. मोबाईलचेही तेच. येणारे कॉल व्यवस्थित फिल्टर होऊनच येतात. नको असलेले कॉल बायको परस्पर निकालात काढते. पण या सवयीमुळे एकदोन वेळा अडचणीत आलो आणि मग मोबाईलच्या कव्हरमधे, गाडीच्या सन व्हायजरमागे, लॅपटॉपच्या केसमधे, कार्ड होल्डरमधे वगैरे ठिकाणी ईमर्जन्सिसाठी एखादी मोठी नोट ठेवायची सवय लागली. आता गावी असल्याने या दोन्ही गोष्टी जवळ ठेवाव्या लागतात व सवय नसल्याने त्या कुठेही विसरतात.
परवा बायकोचा टेलेग्रामवर मेसेज आला की दिवसभर तुझा फोन लागत नाहीए. नानाला फोन केलाय. संध्याकाळी येईल तो घरी. त्याच्याच मोबाईलवरुन फोन कर लगेच मला. मेसेज दुपारी पडला होता. मी तो संध्याकाळी पाहीला. खरेच, दोन दिवस मलाही मोबाईल दिसला नव्हता. विसरलो की काय कुठे? असं म्हणत शोधायला ऊठणार तर बेल वाजली. दार ऊघडले तर नानासाहेब दारात ऊभे. ‘संधी मिळूनही शिव्या न देणारा मित्र’ ही कविकल्पना आहे. दोघेही मोबाईल शोधायला सुरवात केली. नानाच्या शिव्या सुरुच होत्या. “तुझा निष्काळजीपणा मला भोगायला लागतो नेहमी. साधा मोबाईल सांभाळता येत नसेल तर व्यर्थ आहे तुझं आयुष्य. (बापरे) वेगेरे वेगेरे.” एकदाचा मोबाईल सापडला. बॅटरी पुर्ण संपली होती. त्याला अगोदर चार्जिंगला लावला. सुरु झाल्यावर सिमकार्डसंदर्भात काही मेसेज पॉपप झाला. शेवटी सिमकार्ड काढण्यासाठी नान्याने मोबाईलचे कव्हर काढले. आतली नोट पाहून त्याने कचकचीत शिवी घातली आणि म्हणाला “गाढवा, मोबाईलच्या कव्हरमधे कुणी दोन हजाराची नोट ठेवतो का? मोबाईल हरवला किंवा कुणी चोरला तर गेले ना दोन हजार फुकट. म्हातारा होत आला पण मोठा काही झाला नाही तू” मी कपाळावर हात मारुन घेतला. च्यायला मोबाईल जर चोरीला गेलाच तर मला पाऊन लाखाला फटका बसल्याचे टेन्शन येईल की दोन हजार गेल्याचे? पण नान्याला काय बोलणार? मी चेहरा निरागस करत म्हणालो “जर कधी माझा मोबाईल हरवलाच तर ज्याला सापडेल त्याला ‘मोबाईल सापडल्याची’ पार्टी करण्यासाठी मी ते पैसे ठेवतो नेहमी. कुत्र्याने नाही का नाथांची भाकरी पळवली तर नाथ त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले! तसच आहे हे.”
त्या दिवशी संध्याकाळी माझ्याच घरात हरवलेला माझाच मोबाईल मिच शोधून काढल्याबद्दल माझ्याच दोन हजारच्या नोटेचा बळी देऊन नान्याने माझ्याकडून पार्टी ऊकळली. 😆😆😆
चालायचंच. यार कुछ भी हो, यार होता है.

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...