❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

रविवार, १७ मार्च, २०१९

मैत्र - ११


आम्ही माथ्यावर उभे होतो. मी मागे पसरलेल्या गवताकडे पाहीले. ते छान हवेवर डोलत होते. पण आता दुरवरुन यावेत तसे हळू हळू बंदुकींच्या फैरी झडाव्या तसा कडकड आवाज यायला सुरवात झाली. डोलणाऱ्या गवताच्या वर हवा एकदम मृगजळासारखी हलताना दिसायला लागली. अचानक अतिशय गरम हवेचा एक झोत अंगावरुन गेला. डोळ्यांची आग झाली. घसा एकदम कोरडा पडल्यासारखा झाला. धुर दिसत नसला तरी त्याचा वास सगळ्या वातावरणात भरुन राहीला होता. धोंडबाने एका झटक्यात माझा हात ओढला. चांगलाच हिसडा बसुन मी त्याच्या मागे ओढला गेलो. पण आम्ही जाणार कुठे? दोन्ही बाजूला उंच वाळलेले गवत होते. मागच्या बाजूला हरणाच्या वेगाने धावणारा वणवा होता आणि समोर काय होते ते आम्हाला माहीत नव्हते. कदाचीत उतार असेल किंवा खोल दरीही असेल. पण आम्हाला तिकडे पळण्यावाचून दुसरी वाट नव्हती. माझ्या डोळ्यापुढून आई-बाबा, इन्नी यांचे चेहरे तरळून गेले.
आम्ही काहीच मिनिटात समोरच्या कड्यावर पोहचलो. मी फार आशेने खाली पाहीले. वाटले होते उतार असेल. पण तो उतार फक्त दहा एक फुटच दिसत होता. त्यापलीकडे दरी पसरली होती. गडावर बहुतेक बाजुंना किंचीत उतार व लगेच तासल्यासारखे सरळ कडे अशी रचना आहे. उताराच्या पलीकडे एका झाडाचे काही शेंडे बाहेर आलेले दिसत होते. समोरच्या कातळाच्या उताराचा अंदाज येत नव्हता कारण त्यावरुन पावसाचे पाणी वाहुन पांढरे शुभ्र पट्टे उमटले होते. झेब्रा क्रॉसींगसारखा दिसणारा तो उतार नजरभुल करत होता. दहा बारा फुटांचा दिसणारा उतार तेवढ्याच लांबीचा असेल हे खात्रीने सांगता येत नव्हते. आमच्या मागची जमीन जरी जळालेली असली तरी दोन्ही बाजुंना असलेले गवत आम्ही उभे होतो तेथवर येऊन भिडले होते. त्यामुळे समोर दिसणाऱ्या वणव्याला आमच्यापर्यंत पोहचण्यासाठी जळालेल्या जमीनीला वळसा मारावा लागणार होता. अर्थात त्यामुळेच आम्हाला विचार करायला दहा पंधरा मिनिटे जास्त मिळणार होती. हवेचे तापमान खुप वाढले होते. गरम झालेली हवा झपाट्याने वर आकाशाकडे ओढली जात होती व त्या जागी दुरवरची थंड हवा खेचली जात होती. हवेच्या या खेळामुळे ठिणग्यांचा एक तेजस्वी आणि प्रंचड आकार अत्यंत मनमोहक हालचाली करत दुर वरच्या बाजूला सरकत होता. त्याची जागा दुसऱ्या ठिणग्या घेत होत्या. वाळलेल्या गवताचा जळताना होणारा ताड तड, तडाड तड आवाज कर्कश्श वाटत होता. लढाईच्या ऐन धुमाळीत रणवाद्यांवर बेभान टिपरी पडावी तसा भास होत होता. एखाद्या पिवळ्याधम्मक नागाने ओंजळीपेक्षा मोठा फणा काढावा आणि त्या मृत्यूच्या फण्यावरच समोरच्या भक्ष्याने मोहुन जावे तसे मी त्या वणव्याच्या तांडवाकडे मंत्रमुग्ध होऊन पहात होतो. त्या अग्नीशिखांनी माझी सारासार विचार करायची बुध्दी अगदी क्षिण झाली होती. ठोब्बा आणि राम यांचीही अवस्था भितीमुळे काहीशी माझ्यासारखीच झाली होती. शाम, दत्त्या आणि धोंडबा यांचेच मेंदू अत्यंत जलद गतीने विचार करत होते. शकील आम्हा सगळ्यांवर नजर ठेऊन होता.
दत्त्या माझ्याकडे पहात म्हणाला “हैला अप्पा ती भेकर जव्हा भेदरुन पळाली तव्हाच माझ्या ध्यानी यायला पायजे व्हतं. पन कुनाच्या देवाला ठावं हे असं व्हनार हाय ते”
मी नुसताच हुंकार दिला.
माझा थंड प्रतिसाद पाहून दत्त्या जरा गडबडला. त्याने माझ्याकडे वळून पाहिले आणि माझी अवस्था चटकन त्याच्या ध्यानी आली. त्याने गडबडीने माझे वणव्याकडे असलेले तोंड फिरवून दरीकडे केले आणि म्हणाला “आगीनचळ लागला का काय तुला अप्पा? पघू नको आगीकडं नाय तर पार भानावर राह्यचा नाय तु. रानातली आग भानामती करतीय मानसावर. पाखरं बी कव्हा कव्हा घालून घेत्यात त्या जाळात”
आणि खरच, वणव्याकडे पाठ केल्यावर मी एकदम भानावर आल्यासारखा झालो. चेहऱ्याची कातडी काचेसारखी तडकते की काय असे वाटत होते. घशाला भयानक कोरड पडली होती. मी दत्त्याकडे पाणी मागीतले. धोंडबाने चटकन दत्ताकडील पाण्याची बॅग घेतली. तिचे झाकण उघडून तिचे लहानसे तोंड माझ्या तोंडाला लावत म्हणाला “दोनच घोट घे अप्पा”
मी दोन घोट घेतले नाही तोच त्याने पिशवी मागे ओढली आणि माझ्या डोक्यावर थोडे पाणी ओतले. मग प्रत्येकाला दोन दोन घोट बळेच पाजले आणि सगळ्यांची डोकी ओली केली. त्याच्या छोट्याशा कृतीने वणव्याचा त्रास एकदम कमी झाल्यासारखा वाटला. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो म्हणाला “लय खुश नको व्हवू अप्पा. हे घडीभरबी टिकायचं नाय. रस्ता पघायला हवा बाहेर पडायचा. नायतर इथंच मक्याच्या कनसागत भाजुन निघू सम्दी. आगीनडाग द्यायचीबी गरज ऱ्हानार नाय”
ते ऐकून दत्त्या वैतागला “उभारी द्यायची ऱ्हायली बाजूला, तु भ्या कह्याला दावीतो रं. वाटंचं पघा लवकर कायतरी”
शकील दरीकडे पहात म्हणाला “देख धोंडबा, वो सामने पत्तीया दिख रही है. बडा पेड असणार नक्की. आता तो कड्यावर असेल तर कुछ नही हो सकता. पण जर कपारीवर असेल तर आपल्याला जागा मिळेल तेथे. मग खाली उतरायची वाट शोधू. नाहीच सापडली तर वहीपे रात गुजार सकते है. कमसे कम आग से तो बचेंगे”
मला जरा आशा दिसायला लागली. मी विचारले “पण शकील झाड कड्यात असले तर काय करणार? येथून कसे कळणार कपार आहे का नाही ते? काही दिसत नाहीए”
धोंडबाचे डोळे चमकले. “हायला शकील, मपल्या टाळक्यातच आलं नाय ते झाड. द्येव पावला” असे म्हणत त्याने पाठीवरची ब्लँकेटची वळकटी काढून सोडली. कड्याच्या कडेने चालत तो डाव्या बाजुला सरकला आणि खालच्या फांद्यांचा अंदाज घेत बरोबर त्या न दिसणाऱ्या झाडाच्या समोर आला. मागचा वणवा मधे चांगलाच भडकला होता पण अगोदर जळालेल्या निष्पर्ण जमीनीने त्याची गती तेथेच रोखली गेली होती. आता त्याच्या दोन्ही बाजू जळालेल्या जमीनीच्या कडेने वेगाने पुढे सरकत होत्या. महाराजांना पहाताच अफजुल्याने जसे बाहू पसरले असतील तसे वणव्याचे डावे उजवे हात आमच्या दिशेने पसरत होते. फारतर दहा मिनिटात वणव्याचे ते हात एकत्र येऊन आम्हाला कवेत घेणार होते. आता विचार करायलाही वेळ नव्हता. सगळा भार आता रामरायावर होता.
दत्त्या मागे वळून वणव्याकडे पहात थुंकत म्हणाला “थु तुह्यायला. आरं परवा तर गुळ खॉब्रं आन पुरानपोळी खाऊ घातली की तुला. आन असा वैऱ्यासारखा डाव साधीतो काय तू. आम्हाला उलसाक खेट तर खरं मंग सांगतो तुला”
धोंडबा ओरडला “ए शान्या, कांबळं धर. मी उतरतो खाली”
या सगळ्या गडबडीत आमचे फार तर तिन चारच मिनिट गेले असतील. पण तेवढ्या वेळात ठोब्बाच्या भितीने कळस गाठला आणि शेवटी अती भितीमुळे तो एकदम भितीला कोडगा झाला. दत्त्याला नेहमी हलक्या आवाजात दत्तू म्हणून हाक मारणारा ठोब्बा सणक आल्यासारखा ओरडला “ए दत्त्या, बावळटा लक्ष कुठे आहे तुझे? तो धोंडबा काय म्हणतोय ते पहा अगोदर मग थुंक त्या जाळावर काय थुंकायचेय ते”
ठोब्बाचा तो अवतार पाहुन दत्त्या क्षणभर आवाक झाला मग त्याच्या पाठीत हलकासा दणका घालत म्हणाला “आंग आश्शी. असं पाह्यजे मानसानं मर्दावानी. कुठय धोंड्या?”
धोंडबाने ब्लँकटची वळकटी उघडून समोरच्या उतारावरुन खाली सोडली होती. एव्हाना आम्ही सगळे पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या गावातील लोक जसे पाणी चढेल तसे हळू हळू उंच भागाकडे सरकुन एकत्र यायला लागतात तसे वणव्याच्या झळांनी एकत्र येत एका जागी गोळा झालो होतो. धोंडबा मात्र धोका पत्करुन कातळाच्या उतारावर बराच पुढे सरकला होता.
धोंडबा म्हणाला “सम्दी मिळून कांबळं धरा. मी त्याला धरुन खाली खाली सरकत जातो जमन तितकं आन मंग खाली उडी मारतो”
मी घाबरुन म्हणालो “अरे पण धोंडबा खाली कपार नसेल तर काय करणारेस? सरळ खाली दरीत जाशील. दिसायचा नाहीस पुन्हा आम्हाला तू”
“हे पाह्य अप्पा, आता पार वखुत नाय याचा इचार करायला. मी जातो. म्हादेवाचा डोंगर हाय. कव्हा दगाफटका व्हनार नाय. तुम्ही धरा कांबळं आन म्हणा हर हर म्हादेव”
दत्त्या घाईने म्हणाला “दम धोंडबा. तु वर ये पह्यला. मी जातो. आयला तुझं वजान झेपायचं नाय आम्हाला आन सम्द्यांसोबत तुच पाह्यजे इथं. मी उतरतो”
धोंडबाला आणि आम्हा सगळ्यांनाच हे पटले. दत्त्या धोंडबापेक्षा चपळ होता. त्याने लिलया कपार गाठली असती. (पण जर खाली कपार असेल तर.) आम्ही धोंडबाला वर यायला सांगीतले. तोवर दत्ताने पाठीवरची बॅग शाम्याकडे दिली. सोपानाच्या पिशवीतले उपरणे काढून त्याने दोन्ही कान घट्ट झाकत डोक्याला गुंडाळले. सोपानाने त्याच्या कमरेची आकडी काढून ती दत्त्याच्या कमरेला बांधली. कोयती बरोबर उजव्या बाजुला थोडी मागे लटकेल याची काळजी घेतली होती त्याने.
सोपाना म्हणाला “दत्तू जरा जपुन. पातं अंगाखाली येनार नाय हे पघ निट. परवाच धार काढलीय. तेज हाय पातं.”
“व्हय. तु नको काळजी करु. माऊली हाय संगं आपल्या” म्हणत दत्त्याने सोपानाच्या पाठीवर थोपटले मग माझ्याकडे वळत त्याने मला चक्क मिठी मारली. “अप्पा, माऊलीनी कव्हा आपलं वाईट क्येलं नाय पन येळ कव्हा सांगुन येती का! जर माझं काय बरंवाईट झालं तर माझ्या म्हतारीकडं पघा सगळे. रान पघायला दादा हायच”
मला एकदम पोटात कालवल्यासारखे झाले. मी घाबरलो नक्कीच होतो. सगळेच घाबरले होते. पण दत्त्याच्या या वाक्याने सगळ्या प्रसंगाला एक वेगळेच वळन लागले. मी त्याच्या भोवती दोन्ही हात गुंफत म्हणालो “काही होणार नाही रे दत्ता. तु उगाच घाबरु नकोस. की मी उतरु अगोदर?”
मीठी सोडत दत्त्या म्हणाला “तु कह्याला? मी घाबारलो नाय रं. पुन्हांदा तुमी दिसता, नाय दिसता”
धोंड्याने त्याला मागे ओढत म्हटले “आयला काय रडारड लावली रं दत्ता? तु काय मरत नाय. आन म्येला तर तुझ्या दसपींडाला शाक-बुंदी करु आम्ही समदी. तु व्हय पुढं. वनवा भिडन पघता पघता”
“हायला या धोंड्याच्या. काय पाचपोच हाय का नाय? दोस्त मरनाच्या दारात चाल्लाय आन हा दसपींड घालायच्या गप्पा हानतोय. जगलो वाचलो तर सांगतो तुला मी काय हाय ते” म्हणत दत्त्या ब्लँकेटवर पालथा झोपला आणि उतारावरुन हळू हळू मागे सरकायला लागला. गरज नसतानाही आम्ही सगळ्यांनी ब्लँकेट अगदी घट्ट पकडून धरले होते.
मी धोंडबाला म्हणालो “अरे त्याला धिर द्यायचा सोडून असं काय बोललास रे? कसं वाटलं कानांना ते ऐकतानासुध्दा”
“आरं अप्पा, अशा टायमाला मुळूमुळू काम नाय चालत. आता पेटलाय कसा पघ दत्ता. वनवा झक मारल त्याच्याम्होरं. नायतर ‘माझं रान, माझी म्हतारी’ करत रडत गागत ग्येलं असतं ते येडं”
सोपाना म्हणाला “अजबच ग्यान हाय या धोंडबाचं. द्येव करो दत्तूला ठाव मिळूंदे. यवढं मोठं झाड कव्हा कड्यावर उगवत नाय. ठाव असनारच खाली. पर किती खोलावर हाय ते काय कळंना इथुन”
राम, शाम, ठोब्बा सगळेच चवड्यावर बसुन खंडोबाच्या तळीला हात लावावे तसे ब्लँकेट धरल्यासारखे करत होते. सगळ्यांचे डोळे फक्त दत्त्यावर खिळले होते. गवत पुर्ण जळाल्याने मागच्या झळा आता कमी झाल्या होत्या. पण लवकरच अगोदर होती त्यापेक्षा मोठी आग आम्हाला दोन्ही बाजुने वेढणार होती. आम्ही सगळे गवत आणि कातळ यांच्या सिमेवरच होतो. आजुबाजूचे दाट गवत पहाता आगीच्या जिभा अगदी कातळाच्या पलीकडच्या टोकाला सहज पोहचू शकल्या असत्या. जर दत्त्याला खाली ठाव मिळाला तर आणि तरच आम्ही वाचणार होतो. दत्ता आता ब्लँकेटच्या टोकाला पोहचला होता पण कातळाचा उतार अजुनही सहा सात फुट बाकीच होता. आता त्याला ब्लँकेटचा आधार सोडावा लागणार होता. दत्त्याने तेथेच काही सेकंद खोल श्वास घेतला आणि कातळाला अगदी घोरपडीसारखा चिकटला. अंगाचा शक्य तेवढा भाग त्याने कातळाला भिडवला आणि हातातले ब्लँकेट सोडले. त्याने मान आडवी करुन कातळावर गाल घट्ट टेकवल्याने त्याला आम्ही दिसत नव्हतो. पण वरुन आम्हाला त्याच्या हालचाली दिसत होत्या. गोंधळ नको म्हणुन सगळे गप्प झाले. फक्त धोंडबा त्याला सुचना देत होता. “आंगं हाश्शी, भले” म्हणत त्याचा धिर वाढवत होता. दोन्ही बाजुने वणवा झपाट्याने आमच्याकडे सरकत होता पण धोंडबाच्या आवाजात अजिबात घाई नव्हती. तो दत्त्यालाही घाई करत नव्हता.
“दत्तूबा, घाई करु नगस. कातळ सोडू नगस. हातभर राह्यलाय ढाळ. दमानं सरक मागं” धोंडबा सांगत होता तसे दत्ता करत होता. स्वतःचे डोके वापरणे त्याने बंद केले होते. प्रत्यक्ष अॅक्शनमध्ये असलेल्याने आपले डोके न वापरता नेव्हीगेटरचे म्हणने तंतोतंत पाळायचे असते हे ज्ञान या मळ्यातळ्यात राहणाऱ्या पोरांना कुठून येते याचे मला आजही आश्चर्य वाटते. दत्त्याची पायाची बोटे अचानक अधांतरी झाल्यावर त्याला अंदाज आला की आता येथून पुढे आपली खरी कसोटी आहे. तरीही त्याने मान वर करुन आमच्याकडे पाहीले नाहीच. आता तो अत्यंत सावकाश मागे सरकत होता.
धोंडबा वरुन मोठ्याने ओरडला “दत्तूबा, उजव्या पायाची आटनी लाव कड्याला आन डावीकं वळ उलसाक. जरा दमानं घे पन. घाई नाय पाह्यजे”
दत्त्याने त्या प्रमाणे केले. एका पायाने त्याने कड्याच्या कोरेला घट्ट दाबले आणि तिरका होत होत तो कड्याच्या टोकावर आडवा झाला. मग त्याने बोटे घट्ट रोवली आणि प्रथम डावा पाय खाली सोडला. जरा श्वास घेतला आणि मग हळू हळू उजवा पाय खाली सोडून तो पुन्हा सरळ झाला. आता दत्त्याची छाती आणि पोट कातळावर होते आणि कंबरेखालील भाग दरीत लोंबकळत होता. त्याचा शर्ट गोळा होऊन अगदी छातीपर्यंत आला होता. त्याचे पोट नक्की चांगलेच सोलवटले असणार होते.
राम मला म्हणाला “अप्पा, आपल्यालाही असच जावे लागेल ना? तोवर वणवा भिडेल आपल्याला. कसे करायचे?”
मी रामच्या खाद्यावर थोपटले आणि म्हणालो “अरे दत्ता जाईल आता. त्याला ठाव मिळाला की धोंडबा जाईल. दोघे खाली असले की आपल्याला इतकी काळजी घ्यावी लागणार नाही. देवाचे नाव घ्यायचे आणि अंग सोडुन द्यायचे उतारावर. वर देव आणि खाली आपले दत्ता धोंडी आहेत आपल्याला वाचवायला. घाबरु नकोस. रात्री मामांच्या खळ्यात वाफवड्याची आमटी खाऊ आज सगळे मिळून. आहे काय त्यात एवढे घाबरण्यासारखे” मी रामला धिर देत होतो पण माझेच चित्त थाऱ्यावर नव्हते. राहुन राहुन बाबा, इन्नी यांची आठवण येत होती. राम कसाबसा हसला. पण त्याचा चेहरा पाहुन मला अंदाज आला की त्याला बराच धिर आला होता. मित्र सोबत असल्यावर काळजी कशाला करायची? असेच त्याचे डोळे सांगत होते. दत्त्या सिंगल बारवर व्यायाम करावा तसा दोन्ही हातावर सरळ झाला आणि त्याने सगळे शरीर दोन्ही हातांवर तोलत अत्यंत सावकाश दरीत सोडले. आता आम्हाला फक्त त्याच्या हाताची बोटे आणि डोके दिसत होते. तो सरळ आमच्याकडेच पहात होता.
धोंडबाने मोठ्याने ओरडून विचारले “दत्ता काय लागतय का पायाला खाली? वळून पघू नगस”
दत्त्याची हनुवटी कातळावर टेकली होती त्यामुळे त्याला बोलता येत नव्हते. त्याने कशीबशी मान हलवून “नाही” म्हणून सांगीतले. धोंडबाच्या चेहऱ्यावरची काळजी वाढली. तो म्हणाला “दत्तूबा, तुह्या खालीच झाडोरा हाय तव्हा भिती नाय कसली. अदुगर तसाच खाली व्हय पन हात सोडू नगस. पायाला ठाव लागला तर द्येव पावला, नायतर हलक्या अंगानं झाडोऱ्यावर झोकून दे सवताला. आम्ही हाय समदी. ध्यान धरुन मार उडी”
‘आम्ही हाय समदी’ असं जरी धोंडबा म्हणाला तरी दत्ताने उडी मारली आणि खाली ठाव नसला तर आम्ही काय करणार होतो येथुन? हा तो क्षण होता की दत्त्याचे हे दर्शन आमच्यासाठी कदाचीत शेवटचे दर्शन असणार होते. हा जींदगीचा जुगार होता. ही उडी मृत्यूची उडीही ठरु शकणार होती. दत्त्याच्या काळजीने ठोब्बा नकळत उतारावर बराच पुढे सरकला होता. सोपानाने मागुन त्याच्या पँटचा पट्टा घट्ट धरुन ठेवला होता. राम डाव्या कुशीवर झोपुन पुढे सरकला होता आणि त्याचा डावा हात शामच्या हातात घट्ट धरलेला होता. मी आणि शकील दोघेही गुडघ्यावर बसुन दत्ताला धिर देत होतो तर सगळे धोके विसरुन धोंडबा कातळावर सगळ्यात पुढे उभा होता. त्याची दत्तावरची नजर क्षणभरही ढळत नव्हती. दत्त्याने आम्हा सगळ्यांवरुन आळीपाळीने नजर फिरवली आणि हनुवटी मागे घेत त्याने शरीर हळूहळू खाली सोडले. त्याचे डोके मावळत्या सुर्यासारखे हळू हळू कड्याच्या आड दिसेनासे झाले. त्याच्या दोन्ही हाताची बोटे कातळावर दिसत होती. काही क्षण मध्ये गेले. आमचे डोळे दत्त्याच्या बोटांवर रोखलेले होते. त्याने बहुतेक दोन्ही अंगठे वर केले असावेत. निदान मला तरी तसे वाटले.
कड्याच्या पलिकडून दत्त्याचा आवाज आला “ठाव हाय रं खालच्या अंगाला. परस दिड परस आसन फक्त. चाल्लो रे”
खाली ठाव आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे, आमच्या आयुष्याची वाट आहे हे समजण्याच्या अवस्थेत कुणीच नव्हते.
“आलो हो माऊली, संबाळा आता” अशी दत्त्याची आरोळी आली आणि कड्यावरची दत्त्याची बोटे नाहीशी झाली. आमचे सगळ्यांचेच श्वास रोखले गेले. मी मनातल्या मनात “माता रामो, मत्पिता रामचन्द्रः। स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः।” म्हणायला सुरवात केली. माझ्याबरोबर शामनेही म्हणायला सुरवात केली. माझ्या मनातली रामरक्षा याला कशी समजली याचे मला आश्चर्य वाटले पण मग माझ्या लक्षात आले की अतीकाळजी पोटी आणि भितीने मी मोठ्याने स्तोत्र म्हणत होतो. माझे ‘माता रामो’ देखील पुर्ण झाले नाही तोच कड्यापलीकडून दत्त्याची किंकाळी आली “आयंव” ते ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. शकीलने माझा खांदा घट्ट दाबला.
पुढे उभा असलेला धोंडबा जोरात ओरडत म्हणाला “काय नाय वला दत्ता. उगा उलसक लागलं तं बोंबलतो कह्याला? हाय का ठाव खाली. समदी मावतीला का तिथं?"
मला खात्री होती की धोंडबाचे काळीजही लक्ककन हालले असणार पण तो खंबीर रहायचा प्रयत्न करत होता. खाली नक्की काय झालय हे कुणालाच माहित नव्हते तरी ‘चांगलेच झाले असणार’ असं गृहीत धरुन तो दत्त्याला तशाही परिस्थितीत धिर देत होता. दत्ताचे ब्लँकेटला धरुन खाली उरतण्यापासुन ते आता या किंकाळीपर्यंत फार तर पाच मिनिटे झाली असतील पण हा प्रसंग अगदी दिवसभर चालल्यासारखा वाटला होता मला. आताही त्याची किंकाळी ऐकूण काही सेकंदच झाले होते पण मला काळ थांबल्यासारखा वाटत होता. आम्ही होतो तेथील हवा आतापर्यंत शांत होती पण अचानक वावटळ उठावी तसा वारा हलायला लागला. म्हणजे वणवा आता आम्हाला अगदी भिडायच्या बेतात होता. वाराही वेड लागल्यासारखा सारखी दिशा बदलत कसाही वहात होता. ताक घुसळल्यासारखा घुसळला जात होता. आमच्या अंगावर डाव्या बाजुने थपडा मारणारी हवा अचानक पुर्णपणे थांबली. त्यामुळे कानात एकदम दडा बसल्यासारखे झाले आणि काही समजायच्या आत उजव्या बाजुने आमच्या अंगावर ठिणग्यांचा पाऊस पडला. ठिणग्यांनी आम्हाला भाजले वगैरे नाही पण अगदी लखलखत्या उन्हातही त्या भगव्या चमकदार रेषांचा पडदा पाहून माझ्या छातीत धडकी भरली. तो ठिणग्यांचा पाऊस जितक्या अचानकपणे आमच्यावर आदळला तितक्याच झपाट्याने तो कड्याकडे सरकत दिसेनासा झाला आणि गवताच्या जळालेल्या लहान लहान काळ्या कणांचा झोत आमच्या अंगावरुन गेला. निसर्गाचे हे कधीच न पाहिलेले रौद्र रुप पाहुन सगळेच हबकलो. प्रत्येकाचा चेहरा, कपडे उजव्या बाजुने काळवंडले.
खालुन दत्त्याची आरोळी आली “धोंडबा अदुगर कांबळी फेक समदी मंग पिशव्या फेक समद्यांच्या. आन तु ये पह्यला. इथं मांयदांळ जागा हाय. कातळ सोडू नगस पर”
आता खाली काय आहे ते फक्त दत्त्याला माहीत होते. त्यामुळे धोंडबाने क्षणभरही विचार न करता किंवा त्याला काहीही प्रश्न न विचारता ब्लँकेटच्या वळकट्या खाली फेकल्या. आता तो दत्ता सांगेल तसे वागणार होता. त्याने मागोमाग हाताशी येतील त्या पिशव्या फेकल्या. वाघुर काढून त्यात पाण्याची बॅग अडकवून ती पाठीवर बांधली आणि तो पोटावर घसरत पहाता पहाता कातळावरुन कड्याच्या आड दिसेनासा झाला. धोंडबा कड्याच्या आड नाहीसा होताच मला एकदम निराधार झाल्यासारखे वाटले. शकीलला हे जाणवले असावे.
माझ्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला “फिकीर करु नकोस अप्पा. बस कुछ देर की बात है. हम सब निकलेंगे यहाँसे”
खालून धोंडबाचा आवाज आला “एक एक या चटशीरी. कड्याचं पोट पोखरल्यालं हाय. खरचटायचं बी नाय कुनाला. कातळ मातर सोडू नका टिचभरसुदीक. इठूबाला पाठव रे अदुगर शकीलभाऊ. आमी झोळना धरलाय खाली कांबळ्याचा”
या जीवावरच्या प्रसंगात देखील धोंडबाचे डोके हुशारीने काम करत होते. खाली मित्र, वर मित्र असले तरच ठोब्बा मधला प्रवास करु शकणार होता हे त्याने ओळखले होते. मी ठोब्बाला पुढे काढले.
पण तो अजीजी करु लागला “अप्पा शाम आणि मी जातो बरोबर”
मी त्याला बळेच तयार केले “अरे दोघे दोघे गेलात तर ते कुणाला झेलतील झोळीत? गोंधळ नाही व्हायचा का त्यांचा? तु असं कर, शामला जावूदे अगोदर मग तु जा”
तोवर शाम्याने त्याच्या पाठीवरची पिशवी काढून त्यातली चादर काढली. माझ्याकडचा हंटींग नाईफ घेऊन त्याने चादरीच्या पट्ट्या केल्या आणि प्रत्येकाकडे दोन तिन दिल्या. स्वतःही दोन पट्या घेवून त्याने गुडघे गुंडाळले आणि ओरडला “धोंडबा मी येतोय रे” ठोब्बाकडे पाहुन तो म्हणाला “आवाज दिल्यावर लवकर ये ठोब्बा, मी जातो अगोदर. काही होत नाही. घसरगुंडी तर खेळायची आहे. घाबरु नकोस अजीबात”
शाम्याने कड्याकडे पाय केले आणि पोटावर झोपत तो वेगाने मागे मागे सरकत गेला. टोकावर पोहचल्यावर त्याने परत एकदा धोंडबाला आवाज दिला आणि स्वतःला सरळ खाली झोकून दिले. तो गेल्यावर सोपानाने ठोब्बाच्या पायाला पट्या गुंडाळल्या आणि त्याला कातळावर पालथे सोडले.
खालून शाम्या ओरडला “अरे मज्जा येतेय ठोब्बा. सावकाश ये फक्त. घाबरु नकोस बिलकुल”
ठोब्बाने सगळा धिर एकवटला आणि तो घसरत घसरत मागे सरकला आणि कड्यावर पोहचला. शकीलने ओरडुन ठोब्बा आल्याचे शामला सांगीतले. ठोब्बानेही एकदाची उडी मारली. मग राम गेला. मी सोपानाला खुप सांगुनही त्याने मलाच पाठवले. मागोमाग शकीलही आला. सगळ्यात शेवटी सोपाना आला. खाली पोहचल्यावर मात्र लक्षात आले की दत्ता नशिबाने वाचला होता आणि आमचे प्रत्येकाचे लँडींग सुध्दा फारच धोकादायक होते. पण जो खाली जात होता तो वरच्यांना धोक्याची कल्पना देत नव्हता. तेथे ठाव होता पण आडवा तिस पस्तीस फुट लांब आणि जेमतेम पाच फुट रुंद होता. म्हणजे आमची उडी इंचभरही बाहेर पडली असती तर सरळ दरीतच जाणार होती. दत्त्याने आणि धोंडबाने अगदी टोकाला उभे राहून ब्लँकेट ताणून धरले होते. त्यामुळे अगदी अलगद नाही झेलता आले तरी शाम्याला त्यांनी आपटण्यापासुन रोखले होते. खाली पोहचलेला प्रत्येकजन येणाऱ्यासाठी ब्लँकेट ताणुन धरायला मदत करत होता. त्यामुळे शकील आणि सोपानाला तर आम्ही अगदी वरच्या वर झेलले होते. शिवाय आमचे नशिब जोरावर असेल बहुधा कारण कातळ जेथे संपत होता तेथून कडा आतल्या बाजुला वळला होता. कोकणकड्याची दुसरी आवृत्ती. त्यामुळे कड्यावर आदळून कुणी दरीत फेकले गेले नव्हते. तेथे एक प्रकारची पाच फुटाची रुंदी असलेली आडवी गुहाच होती म्हटले तरी चालेल. आम्ही ज्या झाडाच्या भरवशावर दत्ताला धोक्यात घातले होते ते झाड खाली कुठेतरी होते आणि वरपर्यंत आले होते. शेवटी सोपाना आला. आम्ही सगळे कड्याला पाठ टेकून काहीही न बोलता शेजारी शेजारी बसलो होतो. पाच मिनिटे आम्ही दमसास ठिक करतो न करतो तोच लाह्या फुटाव्या तसा आवाज आला आणि आमच्या समोरुन ठिणग्यांचा पाऊस सुरु झाला. पाण्याच्या धबधब्यामागच्या कपारीत बसुन तो पाण्याचा पडदा आरपार पहावा तसे आम्ही त्या खोबणीत बसुन एक दिड मिनिट बरसणारा तो तेजस्वी ठिणग्यांचा धबधबा अनमिष नेत्राने पहात राहीलो. हवेबरोबर तो पडदा मंद हलल्यासारखा होत होता. झाडाच्या फांद्यांवर पडणाऱ्या ठिणग्या आणखी फुटून त्या पडद्याला छेद देत आडव्या उडत होत्या. रामला रहावले नाही.
तो म्हणाला “अप्पा अरे हे असं काही कधी पाहीले नाही रे आयुष्यात. हे पाहील्यानंतर आता येथे बसल्याजागी मी मेलो तरी मला वाईट नाही वाटणार”
दत्त्याने अगदी कडेला उभे राहून त्या पडद्याखाली हात धरायचा प्रयत्न केला पण ठिणग्यांचा तो प्रवाह जवळ दिसत असला तरी कड्यापासुन बराच दुर होता. आम्ही डोळे विस्फारुन निसर्गाचा तो चमत्कार पहात होतो. अचानक कुणी तरी नळ फिरवून पाणी बंद करावे तसा तो प्रकार एकदम थांबला. अगदी चुकार ठिणगीसुध्दा दिसेना झाली. आम्ही समोर पाहीले. बऱ्याच खाली उतरते पठार दिसत होते. उन्हात तेथले गवत आणखी पिवळे धम्मक दिसत होते पण आम्ही ज्या कपारीत बसलो होतो तेथे मात्र अंधारुन आल्यासारखे झाले होते. बहुतेक वरच्या बाजुला हवेत धुर आणि इतर कचरा पसरला असावा. शकीलने घड्याळात पाहिले. अडीच वाजत आले होते. त्या खोबणीत बसुन आम्हाला अर्धा तास तरी झाला असेल.
ठोब्बा म्हणाला “अप्पा भुक लागली रे मला खुप. एखादी दशमी आहे का?”
हे विचारताना त्याच्या डोळ्यात चक्क पाणी होते.
दत्त्या म्हणाला “असं काय करतो इठूबा, आता पोचू आपन मामाकडं. जरा दम धर की. असा बारक्या पोरासारखा काय गागतो भुक लागली म्हनुन”
माझ्या लक्षात आले. ठोब्बाला काही भुक वगैरे लागली नसणार. तो ज्या भयानक मानसीक ताणातुन गेला होता त्याचा हा परिणाम असावा. त्याची वृत्ती मुळातच जरा सुखवस्तु. कधी भुक सहन होणार नाही की कधी कष्ट करणार नाही. अडचणींना, संकटांना पाठ दाखवून नेहमी पळवाट काढणार. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काही सायास करावे लागणार असतील तर त्या वस्तुचा नाद सोडून देणार असा हा ठोब्बा.
मी त्याच्या पाठीवर हात फिरवत विचारले “घाबरलास का ठोब्बा?”
तो मान हलवत म्हणाला “अप्पा मी एकटाच आहे रे घरात. मालतीचे लग्न करायचेय पुढच्या वर्षी. आईची तब्बेत तुला माहीतच आहे कशी तोळामासा असते. मला मरायची परवानगी नाही रे अप्पा इतक्यात”
“अरे असं काय करतो. एवढं काही झालं नाही ठोब्बा. तु कशाला एवढा टोकाचा विचार करतोय? आता काही भिती नाही. येथून पुढची वाट सहज मिळेल आपल्याला. पोहचू आपण लवकर खाली”
वातावरण जरा हलके करावे म्हणून धोंडबा म्हणाला “इठूबा जीव वाचावलाय तुझा. आता सोन्याचं वळं करुन घाल माह्या बोटात. जमन का?”
ठोब्बा मस्त हसला, म्हणाला “तुम्हीच मला ड्रेस शिवा या वेळी. मी मेलो असतो तर मालतीचे लग्न तुमच्या गळ्यात पडले असते”
शाम्या मला कोपराने ढोसत कुजबुजत म्हणाला “कसा वर तोंड करुन बोलतोय बघ. जसं काय मालतीचे लग्न हा एकटाच लावून देणार आहे”
दत्त्या उठत म्हणाला “उठा रे समदी. गप्पा काय हानताय खळ्यात बसल्यावानी? आगीतुन निघालोय आन फुफाट्यात अडाकलोय. धोंडबा, निघायचं पघा. वाट नाय घावली तर कपारीतच मुक्काम करावा लागन”
धोंडबा उठला. त्याने सगळ्यांच्या पिशव्या ज्याच्यात्याच्याकडे दिल्या. तरीही तो काहीतरी शोधत होता. शेवटी त्याने शाम्याला विचारले “तुही पिश्वी कुठशीक हे श्याम? दे जरा माह्याकडं”
शाम इकडे तिकडे शोधत म्हणाला “अरेच्चा, राहीली वाटते वरच. मी चादरीच्या पट्ट्या करायला काढली होती पाठीवरुन. अप्पाचा नाईफही राहीला वरतीच”
“असा कसा रं मुलखाचा इसराळू तू? आरं माह्यावाला कॅन्ड व्हता त्यात. गरजच्या टायमालाच घात कर बामना तू”
धोंडबाला पुढच्या वाटेसाठी वारुणीच्या उर्जेची गरज असावी पण नेमकी शाम्या पिशवीच वर विसरला होता. शकीलने माझ्यासाठी हंटींग नाईफ म्हणून वापरायला किती प्रयासाने नेपाळवरुन मागवलेली माझी कुकरीही वर राहीली होती. त्या नाईफला मी जीवापाड जपत होतो. मी आणि धोंडबाने शाम्याकडे खावू का गिळू अशा नजरेने पाहिले.
शाम्या म्हणाला “असं पाहू नका माझ्याकडे. माझ्यामुळेच तुमच्या गुडघ्याच्या वाट्या जागेवर आहेत. वाट शोधा अगोदर. उशीर झालाय”
दत्त्या माझी बॅग घेत म्हणाला “ए अप्पा जावूंदेना. सोपानाची कोयती हाय ना येळ पडली तर. मंग झालं तर. तुह्यासाठी पुन्ह्यांदा मागवीन शकील दुसरा सुरा. कह्याला त्या बामनाला पिडीतो उगा”
धोंडबाने दत्त्याच्या कमरेचा कोयता घेतला आणि समोरच्या झाडाच्या काही अडचणीच्या फांद्या सपासप तोडल्या. मुख्य फांदी कड्याला दाबूनच वर गेली होती. तिला धरुन तो जरासा खाली सरकला. त्याने निट निरखुन पाहीले आणि म्हणाला “खाली बी ठाव हाय अप्पा. पंधरा एक फुटावं आसन. चांगला मोठा हाय. मी उतरतो. एक एक करुन या समदे. जपुन येवा. जर घसारला कुणी तर दरीत नाय जानार, ठाव मोठा हाय. पन हात पाय मातर मोडनार हे पक्कं. सावध उतरा”
धोंडबा सरसरत खाली उतरला. त्याच्या मागोमाग पुन्हा मगाच्याच क्रमाने आम्ही उतरलो. पंधरा मिनिटात सगळे खालच्या टप्प्यावर होते. हा पट्टा चांगलाच मोठा होता. सगळा कातळच होता. तो डाव्या बाजुला जात खाली उतरत गेला होता. आम्ही आता जीवाच्या संकटातुन वाचलो होतो त्यामुळे सगळे उत्साहात होते. तेथल्या कातळावर आम्ही वेळ न घालवता डाव्या बाजुला सरकायला सुरवात गेली. ती कातळपट्टी साधारण १५० मिटर तरी लांब असावी. सुरवातीला आम्ही सहज पण सावधपणे सरकत होतो. पण जसजसे पुढे जात होतो तसतसं ती पट्टी अरुंद होत चालली होती. एका बाजुला आधारासाठी कडा होता तर दुसरऱ्या बाजुला सरळ खोल दरी होती. मधल्या चार साडेचार फुटांच्या कातळपट्टीवरुन आम्ही एकामागोमाग एक चालत होतो. अर्थात गप्पा बंद होत्या. सगळे गंभीर होतो. नंतर तो रस्ता (?) अरुंद होत होत अगदी अडीच फुट झाला. एक एक पाऊल सावकाश पण भक्कम रोवून आम्ही पुढे जात होतो. ती आडवी पट्टी पार करायला आम्हाला अर्धा तास तरी लागला असेल. या वेळेस मात्र वेळ कसा गेला ते कळले नाही. पुढे चालणारा धोंडबा थांबला. मग सगळेच थांबले. प्रत्येकाला आपल्या समोरच्याची फक्त पाठ दिसत होती, पुढचे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे धोंडबा का थांबला हे मागच्यांना काही कळायला मार्ग नव्हता.
मी ओरडुन विचारले “काय झालं रे धोंडबा? वाट संपली की काय?”
“व्हय वाट सरली रं अप्पा. थांबा वाईच. मी पघतो” धोंडबाचा आवाज आला.
मला वाटले आम्ही अजुनच बिकट परिस्थितीमध्ये सापडलो की काय. कारण एका बाजुला उंच सरळ कडा होता आणि दुसऱ्या बाजुला साधारण १२५ फुट दरी होती. आमच्या पायाखाली तिन सव्वातीन फुटांची जागा होती. धोंडबाच्या सुचनेनुसार आम्ही आहे तेथेच खाली बसलो. मी मात्र उभाच राहीलो. आता मला धोंडबा दिसत होता आणि पुढे काय आहे तेही दिसत होते. धोंडबा जेथे उभा होता त्याच्या समोरचा कडा थोडा पुढे जावून आत कुठेतरी वळाला होता. मला काहीच मार्ग दिसेन.
मी धोंडबाला विचारले “काय आहे रे धोंडबा? काही मार्ग सापडतोय का?”
“व्हईन काय तरी. दम जरा. मला इचार करुंदे अप्पा” म्हणत धोंडबाही खाली बसला.
पाच दहा मिनिटे आम्ही स्तब्ध बसुन होतो. धोंडबाची हाक ऐकायला आली “अप्पा जराशीक म्होरं येतो का?”
मी प्रत्येकाला ओलांडून हळू हळू धोंडबाजवळ पोहचलो. वाट जेथे संपली होती तेथे तिची रुंदी पाच सहा फुट झाली होती. समोर कातळाची भिंत होती. एकाद्या खोलीचा कोपरा असावा तशी तेथे जागा तयार झाली होती.
धोंडबा म्हणाला “अप्पा, तुला इचारीत नाय सांगतोय. आता काय बी कर उतरायला यवढीच जागा हाय”
धोंडबाने हात करुन दाखवलेल्या जागेकडे पाहिले तेंव्हा माझ्या लक्षात आले की आम्ही उभे होतो तो अखंड कातळ होता आणि त्याला समोर मोठी भेग पडली होती. दोन फुट रुंद आणि आतमध्ये किती होती ते दिसत नव्हते. एखादी मशिन वापरुन कोरावे तशी ती फट एका सरळ रेषेत थोडीशी तिरकी होत खाली कुठे तरी गेली होती.
मी म्हणालो “धोंडबा, जर दुसरा मार्ग नसेल काही तर यावर उगाच चर्चा करुन बाकिच्यांचा गोंधळ नको करायला. आपण उतरु. कसं म्हणतो?”
“मी तेच म्हन्तो, समदी एकामागोमाग चाल्लीच हायत तर इथबी नादात उतरतील. म्होरं काय वाढुन ठेवलय म्हादेवाने ते त्यालाच म्हायीत. उतरुच. उजाडन तिथं उजाडन. पह्यला मी उतरतो. माह्यामागं सोपाना, शकील, श्यामला येवूंदे. शेवटी दत्ताला ठिव. तुच पाह्य आता कसं करायचं ते. भक्कम गडी खाल्ल्या अंगाला असलीली बरी. पिशव्या समद्या काढून इथच ठिवा. संगं घेता नाय यायच्या. तसबी त्यात काय लय मोठा खजीना नाय आपला. कापडं आन् भगुनी तर हायती. मी जातो. माझं पाहुन एकाकाला सोड. ध्यानात ठिव अप्पा, पाठ घट्ट दाबून पायाचा, हाताचा आधार घ्येत खाली सर्कायचं हाय”
धोंडबा त्या फटीत उतरला. एका बाजुला पाठ लावल्यानंतर त्याच्या नाकासमोर दिड फुटाची जागा राहीली असावी फक्त.
तो सरकत जरा खाली गेला आणि थांबला. मी त्याने सांगितल्याप्रमाणे एकेकाला जायची खुण केली. कुणीही शंका विचारली नाही, की दुसरा काही मार्ग सुचवला नाही. थोडा फरक इतकाच झाला की दत्ता ऐवजी सोपाना मागे राहीला. आम्ही एकमेकांमध्ये फार थोडे अंतर ठेवून खाली सरकत होतो. फट अगदी व्यवस्थित कोरल्यासारखी सपाट आणि एका रेषेत होती. त्यात ती बरीचशी तिरकी होत खाली उतरल्यामुळे हातापायांवर फारसा ताण येत नव्हता. तरीही सुरवातीला सहज वाटणारी ही पाठीवरची चाल नंतर मात्र त्रासदायक वाटायला लागली. गुडघे आणि तळहात सोलपटुन निघतायेत की काय असं वाटत होतं. दंडात पेटके यायला लागले होते. अवघडल्यामुळे पोटऱ्यांचे स्नायुही दुखायला लागले होते. उतरताना ठोब्बा हट्टाने दत्तामागे उतरला होता.
मध्येच तो ओरडला “मला दम लागलाय अप्पा खुप”
धोंडबा थांबला. दत्त्याने पाठ आणखी भक्कम दाबत ठोब्बाला सांगीतले “इठूबा एक एक करुन तुहे पाय ठिव माह्या खांद्यावर आन घडीभर उभा राह्य जरा. बरं वाटन तुला”
ठोब्बा त्या फटीत दत्त्याच्या खाद्यावर पाय ठेवून अंग सैलावून उभा राहीला. दत्त्याचा कसा जीव निघत असेल याचा मला अंदाज आला. जरा वेळाने ठोब्बानेच “बरं वाटतय रे दत्ता, सरक खाली आता” म्हणत दत्ताला मोकळे केले. फटीच्या डाव्या बाजुने आम्हाला दुरवरच्या डोंगररांगा दिसत होत्या तर उजवी बाजू अंधारात किती आत गेली होती ते समजायला मार्ग नव्हता. वणवा पेटल्यापासुन कोणत्या ना कोणत्या प्रकारे आम्हाला मार्ग सापडत होता, अडचणी दुर होत होत्या. आता देखील ही फट जर दोन्ही बाजुने बंद असती तर अंधारात कुणीही उतरायचे धाडस केले नसते. आणि उतरलो असतोच तर अंधारामुळे नक्कीच आमचा जीव गुदमरला असता. डाव्या बाजुने दिसणारे गडाचे दर्शन आम्हाला कितीतरी आधार देत होते. आम्ही गोगलगायीच्या गतीने, मध्ये मध्ये थांबत उतरत होतो. जवळ जवळ तासभर आमची ही चाल सुरु होती. खाली जावून पुन्हा पुढे काय हा प्रश्न होताच. कारण खाली पुन्हा अतिशय तिव्र उतार दिसत होता. धोंडबा थांबला, मागोमाग सगळेच थांबले.
धोंडबा ओरडुन म्हणाला “संपली रे वाट. पन खाली साताठ फुट तरी उडी मारावी लागन. मी अदुगर मारतो उडी, मंग येवा एकाएकाने दमाने” तासभर आम्ही फक्त एकमेकांचे आवाजच ऐकत होतो. बाजूचे फटीबाहेरील दृष्य आणि नाकासमोरचा खडक याव्यतिरीक्त काही दिसायला मार्गच नव्हता.
धोंडबाने खाली उडी मारली आणि तो खुप मोठ्याने ओरडला “द्येव पावला रं. आरं आपन सरळ वाटंवरच आलोय पार राजदरुज्याच्या. हाना उड्या समद्यांनी” (भिंतीवर असलेल्या एखाद्या उभ्या पाईपमधुन खाली उतरावे आणि जेथे पाईप संपतो तेथून जमीन सात आठ फुट खाली असावी अशी कल्पना केली तर तुमच्या लक्षात येईल आम्ही कसे उतरलो ते.) एकामागोमाग एक सगळ्यांनी खाली उड्या टाकल्या. आम्ही जेथे उभे होतो त्याच्या पलीकडे एक पायवाट होती व दुसऱ्या बाजूला आम्हाला फटीतुन दिसणारा तिव्र उतार होता. मला दिशाभुल झाल्यासारखे झाले होते. आम्ही नागाच्या फण्यासारख्या असलेल्या कड्याच्या खाली उभे होतो त्यामुळे सुर्यही दिसत नव्हता. आम्ही नक्की किती गड उतरलोय, कोणत्या बाजूला आलोय मला काहीच समजेना. फक्त एकच समजत होते की बाजूलाच पायवाट होती म्हणजे आम्ही आता सुरक्षीत होतो.
मी सोपानाला विचारले “पुर्व कोणती आहे रे सोपाना? आणि आपण किती उतरलोय? खिरेश्वर कोणत्या दिशेला आहे? कोतुळ कोणत्या दिशेला आहे?”
सोपाना एकदम हरखला होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद नुसता ओसंडुन वहात होता. मामांनी त्याला आमच्या सोबत वाट दाखवायला पाठवला होता. दुसऱ्यांच्या घरची पोरं त्याच्या हवाली होती, त्याची जबाबदारी होती. आणि गेले काही तास आम्ही ज्या परिस्थितीमध्ये अडकलो होतो त्यातुन सुखरुप बाहेर पडणे फक्त नशिबावर अवलंबुन होते. आता सगळेच सुरक्षीत वाटेवर आल्याने सोपानाच्या डोक्यावरचे आमच्या जबाबदारीचे ओझे एकदम उतरले होते.
तो म्हणाला “असं काय करतो अप्पा? आरं आता चतकोर गड राह्यला उतरायचा फक्त. पल्याडच्या घळीमाग खिरेसर. ह्या अंगानी सरळ वर ग्येलो तर राजदरुज्यावर जात नाय का ही वाट? निट पाह्य जरा. ह्या अंगाला उगवती हाय. आता आलं का ध्यानात. आन तो समोर हाय तो मनाईचा सुळका. ध्यान धरुन पाह्य”
हळू हळू धुकं विरत जावे आणि समोरचा परिसर स्पष्ट होत जावा तसे मला आजुबाजूला अनोळखी वाटणारे डोंगर, टेकड्या, वाटा सगळं काही स्पष्ट होत गेलं. एकेका गोष्टीची ओळख पटत गेली. आम्ही जेथे उभे होतो तिथून मी कितीतरी वेळा गडावर गेलो होतो. अगदी पायाखालची वाट होती ती माझ्या. एवढा कसा भांबावलो मी. आणि आम्ही उतरलो ती फट आजवर आम्हाला कशी दिसली नाही या वाटेने जाताना? मी वर पाहीले तर ज्या खोबणीने आमचे प्राण वाचवले होते ती खोबणही दिसत नव्हती. ना ते मोठे झाड दिसत होते. मी सोपानाला बाहेरच्या बाजुला घेतले आणि विचारले “सोपाना आपण ज्या कातळावरुन घसरलो आणि ज्या कपारीत बसलो ती दाखव मला”
सोपानाने निट निरखून पाहीले आणि मला नेमकी जागा दाखवली. ते झाडही दाखवले. इतक्या खालून पहाताना ती जागा अगदी सुरेख दिसत होती. तिथे काही उतार असेल, कपार असेल किंवा अत्यंत धोकादायक अशी ती जागा असेल असे काही वाटतच नव्हते. उलट तिथे उडी मारुन सहज पार करता येईल असा छोटा टप्पा दिसत होता. दुरुन डोंगर साजरे ही म्हण किती खरी आहे याचा मला चांगलाच प्रत्यंतर आला.
“किती वाजलं रं शकील?” म्हणत धोंडबा तेथेच आडवा पसरला. आम्हा सगळ्यांचेच हात, पाय, पाठ अगदी भरुन आले होते. आम्हीही तिथेच जमिनीवर अंग टाकले. शकीलने पडल्या पडल्याच चार वाजल्याचे सांगीतले. येथून दौलतमामाच्या घरापर्यंतची वाट अवघ्या दिड एक तासाची होती. आम्ही वेळेचा कसलाही विचार न करता आडवे झालो होतो. ठोब्बाच्या डोळ्यात पाणी होते. तो चार चार वेळा धोंडबाला म्हणत होता “वाचवलेस गड्या तू. शिफारस आहे तुझी”
शाम्या म्हणाला “हो ना! आज धोंडबा नसता तर सावडायला सुध्दा राख सापडली नसती आपली कुणाची”
धोंडबा म्हणाला “वाचावलं ते मरुंदे. आयला यवढं गहू त्या आबाच्या मढ्यावर घातले म्या आन तू ती मोलामहागाची दारु घालावली माझ्यावाली. तिची काय ती सोय लावून दे मला अदुगर”
दत्त्या मध्येच उचकला “आयला मला कड्याखाली सोडून समदी निवांत झाल्ता. मी मेलो अस्तो तर ज्यानी त्यानी आपापला रस्ता धरला अस्ता. आन हा धोंड्या माझ्या दसपींडाला शाक बुंदी करायला निगाला व्हता त्याचं काय? कापडं काढा रे सम्दी चटशीरी”
शाम्या हसुन म्हणाला “दत्त्या लेका तुझ्यामुळे आमची शाक-बुंदी राहीली. मेला असता मित्रांसाठी तर तुला स्वर्ग आणि आम्हाला बुंदी भात तरी मिळाला असता”
दत्त्याने बसल्या जागेवरुन शाम्याला लाथ घातली जोरात आणि म्हणाला “ऐतवारी ये, नंद्याला बुंदी पाडायला लावतो पाटीभर. त्यापायी मला कह्याला मारीतो?”
शाम्या दत्त्यापासुन दुर सरकत मोठ्याने हसत म्हणाला “पण दत्ता कार्याच्या बुंदीला जी चव असते ती घरच्या बुंदीला नाही येत नाही ना”
“कापडं काढा ना पटकन, उशिर झालाय मरनाचा” म्हणत दत्त्या स्वतःच उठला आणि प्रत्येकाला शर्ट काढायला लावला. तेंव्हा कुठे आमच्या लक्षात आले कुणाला किती लागलेय ते. सगळ्यांच्याच पाठी लालभडक झाल्या होत्या. हाताचे कोपरे सोलवटले होते. दत्त्याच्या पोटालाही चांगलेच खरचटले होते. रामच्या पायाचा अंगठा रक्ताळला होता. ठोब्बाच्या उजव्या पोटरीचे स्नायु राहुन राहुन आकसत होते आणि त्याच्या पायाला रग लागत होती. पण एकंदरीत अर्धे दारुचे कॅन, महागाचा कुकरीचा दोन पाती असलेला सेट, आमचे काही कपडे, ब्लँकेटस् आणि काही पातेली यांची किंमत देऊन आम्ही सगळे हातीपायी सुखरुप खाली उतरलो होतो.
साडेचार वाजले होते. आमच्याकडे आता काही सामान वगैरे नव्हते. दमलो होतो, दुखावलो होतो पण आता घरची ओढ लागली होती. आम्ही झपाट्याने गड उतरत होतो. दत्त्या म्हटलाही होता की “आज नाय कळनार काय, उद्याच्याला समजन काय काय दुखातय ते” पण उद्याची चिंता उद्या. गड उतरायचा असल्याने फारसे कष्ट नव्हते फक्त काळजी घ्यावी लागत होती.
धोंडबा म्हणाला “जरा दमानं चला रं. नायतर लढाईवरुन आला आन अंगनात ठेच लागून म्येला अशी गत व्हायची.
प्रचंड तहान लागली होती पण या वाटेवर कुठेही पाणी मिळणार नव्हते. जे होते ते आम्ही वरच संपवले होते. ठोब्बाला मात्र आता चालणे अशक्य झाले होते. त्याला एक पाय खालीच टेकवता येत नव्हता. बहुतेक पोटरीतले स्नायु दुखावले असणार होते. अर्ध्या तासाची वाट राहील तेंव्हा मात्र त्याने रस्त्यातच बसकन मारली. शेवटी धोंडबाने त्याला पाठंगुळी घेतले आणि आम्ही चाल जरा सावकाश करुन निघालो. दौलतमामाच्या अंगणात येईतोवर आम्हाला साडेसहा झाले होते. थोड्याच वेळात अंधार पडायला सुरवात होणार होती. दौलतमामा अंगणातच बाजेवर बसला होता. आम्हाला पाहुन तो उठला आणि घरातुन त्याने पाण्याने भरलेले मातीचे छोटे मडके बाहेर आणुन ठेवले. घरात चहा ठेवायला सांगीतला.
“मामा, उलसाक गुळ द्या आता. दोन तास थेंब नाय नरड्यात. पानी प्येलो तर बाधन” असे म्हणत धोंडबाने निःसंकोचपणे मामांकडे गुळ मागितला. “माझं बी टकुरं काम करना झालय” म्हणत दौलतमामा स्वतः आत गेला आणि बशीमध्ये मोठा गुळाचा खडा घेवून आला. सगळ्यांनी गुळ खाल्ला आणि धोंडबाच्या दटावण्यामुळे फक्त एक एक ग्लास पाणी पिला. जरावेळाने चहा आला. गुळ खाल्ल्याने चहाची चव लागली नाही पण तरीतरी आली. दौलतमामाच्या प्रश्नांना उडती उत्तरे देऊन आम्ही निघालो. मी शकीलच्या हातातून चावी घेतली आणि त्याला शेजारी बसवले. मामाचा निरोप घेतला आणि मी हायवेकडे जीप वळवली. अत्यंत खराब रस्ता असुनही हायवेवर येईपर्यंत शकीलचे डोळे मिटले होते. मागे दत्त्या ठोब्बाचा पाय मांडीवर घेवून दोन्ही अंगठ्यांनी त्याच्या शिरा मोकळ्या करत होता. धोंडबाने सोपानाला व्यवस्थित समजावून सांगीतले होते त्यामुळे तो मामीला किंवा मामांना काही सागणार नव्हता. गाडीच्या इंजीनचा आणि मी अधुन मधून बदललेल्या गिअरचा आवाज सोडला तर गाडीत शांतता होती. मामांच्या अंगणात पोहचेपर्यंत पुर्ण अंधार पडला होता. अंगणात मामा, मामी, सोपानचे वडील आणि इन्नी उभे होते. रस्त्यावरची गाडी जेंव्हा अंगणात येऊन उभी राहीली तेंव्हा त्यांचे चिंतेने काळवंडलेले चेहरे सैल झाले. 
इन्नीने आणि राधाकाकूने अंगणात गरम पाण्याचे घंगाळे आणून ठेवले. अंगणातल्या केळीखाली आमच्या अंघोळी उरकल्या. तेथवर लाईटचा फारसा उजेड पोहचत नसल्याने इन्नीच्या किंवा मामांच्या काही लक्षात आले नाही. आहे तेच कपडे घालून आम्ही अंगणात टाकलेल्या घोंगडीवर निवांत बसलो. कढत पाण्यामुळे आता खुप बरे वाटत होते. इन्नीचे सारखे आत बाहेर चालले होते. आम्हाला उशीर झालेला पाहुन आम्ही आज मुक्काम करणार याचा मामींना अंदाज आला होता. त्यामुळे त्यांनी राधाकाकूंना स्वयपाकाचे सांगितले असावे. आठ वाजत आले असावे. मामींनी बाहेर येवून “लगुलग घेते वाढायला, थोडी कळ काढा” असे सांगितले होते. भुका तर दहा जन्म जेवलो नाही अशा लागल्या होत्या. सोपाना कुठे दिसत नव्हता. एवढ्यात इन्नी धावत बाहेर आली. “अप्पा, काय काय झाले मला सांग अगोदर. काय्यएक लपवायचे नाही. अगोदर सांग पाहू. आत सोपानदादा राधाकाकुला काय काय सांगतोय. कुठे कुठे लागलय? कुणाकुणाला लागलय?”
शाम्याने तिला चुप करायचा प्रयत्न केला “अगो गप्प बसशील का जरा. मामांना कळाले तर खरडपट्टी काढतील सगळ्यांची”
तेवढ्यात मामाच बाहेर आले. त्यांनी रागाने आमच्याकडे पाहीले. आता कधीही तोफेला बत्ती मिळणार होती. आम्ही उगाच इकडे तिकडे पहात मामांची नजर टाळत होतो.
इतक्यात मामा कडाडले “कंच्या रांडच्यानं तुम्हाला त्या अंगाला उतराया सांगीतलं व्हतं? अप्पा पुढं ये असा. मुंडकं काय हलवयो नुस्ता. सत्येनारायनाची कथा सांगतुय का म्या? तुह्या मामीनं ध्यान धरुन सांगीतलं व्हतं ना राजदरुज्याकडं जावू नका म्हनून?”
मामांची म्हातारी कुडी संतापाने नुसती थरथरत होती. मामा इतके रागावतील याचा इन्नीलाही अंदाज नव्हता. तिही भेदरुन अंगणातच उभी होती. आमच्या तर मानाच वर होत नव्हत्या. मामांचा आवाज ऐकून मामी आणि राधाकाकूही बाहेर आल्या.
“त्या सोपान्याला बोलव राधे” म्हणत मामा पुन्हा आमच्याकडे वळले. त्यांनी पुन्हा सुरवात करायच्या अगोदर मामी म्हणाल्या.
“आवो असं काय करता? पोरं घाबारली असतील अदुगरच. त्यात तुम्ही आजुन रागेजला तर कसं व्हायचं. भुक्याली हाय पोरं. दोन घास खावूद्या. आली ना देवाच्या किरपेनं घराला सुखरुप, मंग झालं तर. जेवूंद्या पोरांना सुकानं दोन घास. तुमी चला आत”
मामा आत गेले. राधाकाकूंनी सगळी भांडी बाहेर आणून ठेवली. आम्ही थांबणार म्हणुन राधाकाकूने तांदळाची खिर, पुरी, वाटाण्याची उसळ, कुरडया पापड्या असा साग्रसंगीत बेत केला होता. इन्नीही आमच्याबरोबरच जेवायला बसली. समोर वाढलेले ताट पाहुन ‘आत्ताच मामा खरडपट्टी काढुन गेल्याचे’ आम्ही विसरलो आणि जेवणावर तुटून पडलो. जेवताना मामी, राधाकाकू कुणी काही बोलले नाही. आमची जेवणे उरकली. इन्नीने आणि राधाकाकूने सगळे आवरुन पुन्हा अंगण स्वच्छ करुन त्यावर घोंगडी अंथरुन दिली. आम्ही जड पोटाने सुस्त हालचाली करत तेथेच लवंडलो. मामीही उठून आत गेल्या. जरा वेळाने मामा आणि सोपानाचे वडील बाहेर आले. मामांना पाहुन आम्ही सावरुन बसलो.
मामा म्हणाले “रागावला कारं अप्पा? अरं दुसऱ्याची पोरं अशी गडावर जीव गुतवत्यात तव्हा कसं वाटातय ते तुला कसं सांगू? तुम्हाला कायबाय झालं असतं तर बाईला आणि गुर्जीला काय ताँड दाखावलं अस्तं सांग बरं. अजान हाय बाळांनो अजुन तुम्ही. माहितगार मानूस नसन तर जीव घ्येत्यात हे डोंगर. माझं बोलनं मनावं नका घेवू तुम्ही कुनी”
आम्ही काय बोलणार? फक्त माना हलवल्या.
मामा म्हणाले “आता असं करा, धुळवडीपासुन तिन दिस चावडीवर शाहीरांचा आखाडा भरतोय आपल्याकं. पहाटंपर्यंत चालतो. हा ढोलकी तुनतुन्याचा आवाज येतोय तो त्याचाच. घडीभर जावा चावडीकडं. पाटलालाबी बरं वाटन आन तुम्हालाबी एकादी छक्कड ऐकायला मिळन. कसं? जाच तुम्ही. कटाळा आला की या माघारी. राधीला सांगतो अथरुनं घालून ठिवायला अंगनात”
आम्ही रात्री दहा वाजता चावडीच्या मैदानात आलो. आम्हाला पाहुन पाटील लगबगीने पुढे आले. “मामा म्हनलं व्हतं तुमी कालच आलाय म्हनून. लई येळ लावला यायला. चला, जागा करुन देतो” म्हणत पाटलांनी अगदी अगत्याने हात धरुन चावडीच्या अगदी समोरच नेवून बसवले. तेथे बसलेल्या लोकांनीही चटकन आम्हाला जागा करुन दिली. समोर चार कोपऱ्यात टांगलेल्या बल्बच्या पिवळ्या प्रकाशात एक शाहीर चांगला रंगात येवून डफावर थाप मारत गात होता. साथीला एक ढोलकी, तुणतुने आणि लहान झांज होती फक्त. आम्ही बसलो आणि त्याने नविन पाहुने पाहुन एक उडत्या चालीची छक्कड घेतली. पहिल्या ओळीलाच लोकांची टाळी पडली. आम्ही पाठीचे पायाचे दुखने विसरुन समोरील छक्कड, लावण्या ऐकण्यात रंगुन गेलो. थोड्या वेळाने फटके सुरु झाले. हा दत्त्याचा आणि धोंडबाचा अत्यंत आवडता प्रकार. शाहीर आमच्याकडे पाहुन गात होता आणि धोंडबा त्याला “भले शाब्बास!” म्हणत दाद देत होता. पाठीमागची ढोलकी, तुनतुने आणि झांजेने अशी काही लय पकडली होती की मीही नकळत डोलू लागलो होतो. मध्येच शाहीराने नवं कडवं घेताना “ऐका बरं” म्हटलं आणि शेवटी धोंडबा उठलाच. मधल्या मोकळ्या जागेत जात त्याने खिशातला रुमाल काढला. दोन्ही हातात रुमाल ताणून धरत तो पुढे झुकला आणि वर आकाशाकडे तिरकी मान करत, डावीकडे फिरत तो अत्यंत लयीत स्वतःभोवती सुफी अवलिये फिरतात तसा फिरु लागला. त्याला तसे नाचताना पाहून शाहीरानेही डफावर कडक थाप मारुन आदर्श पुरुषाचे वर्णन करणारी फटक्याची पुढली ओळ धोंडबाकडे फेकली. मला वाटले ती खास धोंडबासाठीच असावी.
अंगानं खंबीर, बोलण्यात गंभीर, सरदार हंबिर असावा।



शुक्रवार, ८ मार्च, २०१९

मैत्र - १०

कोणत्याही गोष्टीची अपुर्वाई ही त्या गोष्टीच्या अभावाखेरीज समजत नाही हे अगदी खरय. दरवर्षीच होळी आणि दरवर्षीच पोळी, त्यात काय मोठे कौतुक आहे असं वाटायला लागले होते. पण कालच्या होळीला आम्हा सगळ्यांच्याच गळ्याला बसु पहाणारा फास आकस्मिक सुटला. तेंव्हा कुठे आम्हाला नव्याने होळीचा आनंद समजला. पुरणपोळी तर बाजुलाच, दत्त्या होळीसमोरच्या नुसत्या गुळ खोबऱ्यावर प्रसन्न झाला. संध्याकाळी धोंडबाने त्याच्या आणि दत्त्याच्याही घरचा पोळीचा नैवेद्य गावात आणला होता, तोही दोन दोन. एक होळीसाठी आणि एक पोवळासाठी. त्यादिवशी खरी होळी झाली पोवळाची. त्याला आम्हा सगळ्यांच्या घरच्या पोळीचा घास भरवला गेला होता. आपल्या पोवळ्याचे ते कौतुक पहाताना नानांना आनंदाचे नुसते भरते आले होते. अंगणातल्या बाजेवर बळेच बसवुन त्यांनी आम्हाला स्वतःच्या हाताने गरम गरम भजी भरवली होती. कोर चतकोर पोळी गुळवणीत बुडवून आग्रहाने खायला लावली होती. मी आणि शाम नानांच्या बाजेवर बसुन समोरची होळी पहात होतो. आळीतला प्रत्येकजण येऊन होळीभोवती पाणी फिरवत होता. नैवेद्य अर्पण करत होता आणि रामाला नैवेद्य दाखवून परतत होता. सगळे किती आनंदी दिसत होते. खरंतर नेहमीसारखीच होळी होती पण आम्ही जरा जास्तच आनंदी असल्याने आम्हाला सगळा गावच आनंदात असल्यासारखं वाटत होतं. 

बाजेवरुन उठत शाम म्हणाला “अप्पा, उठायला हवे. सगळे जेवायला वाट पहात असतील. या पोवळाने अगदी वेळेत येऊन लाज राखली रे आपली. कृष्णसुध्दा द्रौपदीने हाक मारेपर्यंत धावला नाही पण पोवळा हाकेशिवाय धावला.”
नाना त्याचे बोलणे ऐकत होते याचे त्याला भानच राहीले नव्हते. पण नानांना ‘लाज राखण्याचा’ संदर्भ लागला नाही. मी ही मग फारसा वेळ न घालवता शकीलच्या गाडीवर बसुन निघालो. आज शकील माझ्याकडे जेवायला येणार होता तर दत्ता शामच्या घरी जेवणार होता. इन्नीला मात्र कधी स्वतःच्या आईच्या हातच्या पोळ्या फारशा आवडल्या नाहीत. तिला धोंडबाच्या आईने केलेल्या, पुर्ण तव्याच्या आकाराच्या, जरा जास्त गोड पुरणपोळ्या आवडायच्या. त्यामुळे ती धोंडबाकडे जेवायला निघाली. धोंडबाला हा एक त्रास होताच. कारण आता तिला घेऊन जायचे, रात्री परत गावात आणुन सोडायचे त्यालाच करावे लागणार होते. राम आणि ठोब्बा मात्र आपापल्या घरी गेले. आज शक्यतो कुणी नेहमीसारखे रात्र जागवत बसणार नव्हते. सकाळी उठुन आम्हाला हरिश्चंद्र गाठायचा होता. त्याचीही तयारी करायची होती प्रत्येकाला. त्यामुळे आम्ही आज जरा लवकरच बैठक मोडली. नैवेद्य दाखऊन झाले होतेच. नानांचा निरोप घेतला. पोवळ्यालाही मनोमन नमस्कार केला आणि आम्ही नानांचे अंगण सोडले.

सकाळी लवकर निघायचे होते त्यामुळे मी पहाटेच ऊठलो होतो. पण आईने हातात पंचामृत आणि फुले असलेले तबक ठेवले आणि इतक्या सकाळी गावाकडे पिटाळले. मी कुरबुरतच ताम्हण घेतले आणि शंकराच्या देवळाकडे निघालो. तरीही बाबा म्हणालेच "अगं, नेहमी काय तू त्यांच्या सहलीची ‘यात्रा’ करतेस? चाललीत मुले भटकायला तर जाऊदे. मामा मामीसाठी काही द्यायचे असेल तर दे. हे काय नैवेद्य आणि पुजेचे व्याप लावतेस त्याच्या मागे?” 
पण आईने नेहमीसारखे दुर्लक्ष केले. मलाही सवय झाली होती या सगळ्यांची. आमच्या गावचे शंकराचे मंदिर शिवकालीन आणि गावापासुन जरा बाजुला आहे. सुर्योदय व्हायचा होता. मी मंदिराच्या आवारातलीच काही धोतऱ्याची पांढरी शुभ्र फुले तोडली. बेलफळासहीत काही बेलपत्री काढल्या. समोरच्या भव्य नंदीच्या वृषणाकडे दुर्लक्ष करत त्याच्या भरदार वशिंडावरुन हात फिरवला. इतक्या लवकर येऊनही दिनकरभटांनी शंकराची पुजा उरकलेली दिसत होती. तरीही मी त्यांनी लावलेल्या त्रिपुंड्रावर माझा घसघशीत त्रिपुंड्र काढला. हलक्या हाताने बेलपत्रांचा लहान थर रचला. वरच्या अभिषेक पात्रात गडव्यातले पाणी ओतले आणि मोठ्याने “शंऽऽभौ हर हर” म्हणत त्या प्रशस्त आणि थंडगार पिंडीला कव घातली. खुप छान वाटले. जरा वेळ तेथेच मांडी घालुन बसलो आणि समोरील चंदनाच्या कासवावरचा शंख उचलुन बेंबीच्या देठापासुन फुंकला. गळ्याच्या शिरा अगदी तटतटुन आल्या. समोरील भस्माच्या पात्रातले थोडे भस्म कपाळाला, गळ्याला लावले. तेच भस्माचे बोट हलकेसे जिभेवर ठेवले आणि प्रसन्न मनाने घरी निघालो. आता आमचे दोन दिवस अगदी निर्विघ्न पार पाडायला शिव शंभो बांधील होता. 

घरी जाताना मी शामकडे डोकावलो. त्याची तयारी होत आली होती. तयारी तशी काही करायची नव्हतीच पण मामा-मामींना काहीतरी घेऊन जाणे, एखादे ब्लँकेट आणि इतर किरकोळ गोष्टी. इन्नी काही दिसली नाही. काकुंना विचारले “काही कोरडा शिधा न्यायचाय का नैवेद्यासाठी?” तर “पाठवलाय” एवढच म्हणाल्या. मला काही समजले नाही. मी शामची वळकटी उचलली आणि दोघेही चालत घरी निघालो. शकीलकडे जायची आवश्यकता नव्हती. वेळेच्या बाबत तो पक्का होता. वेळ आली तर तो रामला आणि ठोब्बाला पारोसं असताना जिपमधे टाकुन घेऊन येईल याची खात्री होती. आम्ही मधल्या वाटेने घरी पोहचलो. दारातच इन्नीचे बुट दिसले. मी शामकडे पाहीले तर त्याने “काय माहीत?” या अर्थाने फक्त खांदे उडवले. दार ढकलुन घरात आलो तर बाबा नुकताच आलेला पेपर वाचत होते. आई किचन ओट्यावर बटाट्याची भाजी परतत होती आणि खाली बसुन इन्नी दशम्या करत होती. मला जरा अंदाज आला. मी ओट्यावर ताम्हण ठेवता ठेवता इन्नीला पायाने ढकल्यासारखे केले. ते आईच्या नजरेतुन सुटले नाही. माझ्या दंडावर हलकासा फटका मारत आई म्हणाली “असं पायाने मारतात का रे अप्पा? पाया पड तिच्या आणि हे ताम्हण येथे कशाला ठेवलेय? उचल आधी येथुन आणि देवघरात ठेव.”
मी ताम्हण उचलुन, इन्नीच्या डोक्यात टपली मारुन तोच हात कपाळाला लावत तिच्या पाया पडल्यासारखे केले. बाहेर आलो तर शाम्या हिरमुसल्यासारखा बसला होता. आता इन्नी सोबत आल्याशिवाय राहत नाही हे त्याच्या लक्षात आले होते. दहा मिनिटात मी माझे सर्व सामान काढुन सोफ्यावर मांडुन ठेवले. इतक्यात धोंडबा आणि दत्ता एकाच सायकलवरुन आले.
दत्त्याने किचनच्या दारात उभे राहुन आईला सांगितले “मोठ्याय, चहा उलसाक पन जराशीक गोडच कर बर्का.”
आईऐवजी इन्नी म्हणाली “चहा कशाला हवाय आता तुला दत्तुदादा? भाई येईल इतक्यात, मग दशम्या खाऊन लगेच निघू.”
“चालंन. पन मला दशम्या नको, रातीची पोळी आसन तर तिच खाईन मी दुधात.” शिळ्या पोळीच्या आठवणीने दत्त्या हुरळला पण एकदम चमकुन म्हणाला “आनी दम दम, काय म्हणलीस आता तु इन्ने? मंग निघु? कुटं?”
दत्त्याच्या जरा उशीरा लक्षात आले होते. ही इन्नी भल्या भल्यांना घोळात घेते बोलताना, दत्त्यातर लिंबु टिंबु होता तिच्या समोर. इन्नीला सकाळी सकाळी घरी पाहुन मला आणि शामला अंदाज आला होताच. दत्त्याला कळाल्यावर तो चिडला “अप्पा हे लचांड येत आसन त मी चाललो घरला. आपला हरिश्चंद्र म्हतारीच्या पायाजवळ ऱ्हातो. काय गड यंघायची गरज नाय त्यापायी.”
इन्नीला आमच्या सोबत यायचे होते. खरंतर तिला हरिश्चंद्रावर येण्यात काही रस नव्हता पण आम्ही अगोदर मढला जाऊन मग पुढे जाणार होतो. मढला बाबांचे मामा-मामी रहात. तिला तेथपर्यंत यायचे होते. आम्ही विरोध करणार हे तिला माहित होते पण दत्ता विरोध करेल असे तिला वाटले नव्हते. मी गावात गेलो होतो तेंव्हा तिने आईला बरोबर फितवले असणार कारण तिने “बघ ग मोठ्याई हा काय म्हणतोय!” म्हटल्यावर आई आम्हा सगळ्यांवरच ओरडली. दत्त्याला क्षणभरातच इन्नीने मोठा वशिला लावल्याचे लक्षात आले. त्याने केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहिले.
इतक्यात आई हॉलमधे येऊन म्हणाली “काय रे दत्ता, लचांड काय म्हणतोस रे तिला. आलाय मोठा ‘येऊ नको’ म्हणनारा. तुम्हाला काय कडेवर न्यायचे आहे का तिला?” 
मोठ्याईपुढे काही चालणार नाही हे लक्षात आल्यावर दत्त्या गप्प बसला. धोंडबाची मात्र चुळबुळ सुरु झाली. मला समजेना, कुठेही जायचं म्हटले की हा धोंडबा नेहमी इन्नीचा कैवार घेणार. मग आज त्याला काय झाले होते कुणास ठाऊक. आई अजुन किचनच्या दारात उभी होती तोवर शकील ठोब्बाला आणि रामला घेऊन आत आला. शोल्डर बॅग सोफ्यावर टाकत हसुन तो आईला म्हणाला “कोणाला कडेवर घेऊन जायचं म्हणतेस बडीअम्मी? दत्तुला?”
शकील आल्याने इन्नीची बाजु आता चांगलीच भक्कम झाली होती. ती म्हणाली “मी येतेय भाई मढपर्यंत. मग तुम्हाला जा पुढे कुठे जायचे तिकडे. तर दत्तुदादा म्हणतोय की इन्नी आली तर मी येत नाही म्हणुन. लहान मुलासारखं काहीतरीच आपलं.”
शकील दत्त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला “चुप रे दत्ता तू, हमेशा तिला परेशान करते रहता है. तु बस ग माझ्या शेजारी जीपमधे. जायेंग सब मिलकर.”
“बघ तर!” म्हणत इन्नी समाधानाने किचनमध्ये वळाली. तिचे बोलणे ऐकुन धोंडबा एकदम रिलॅक्स झाला. दत्त्याचाही चेहरा खुलला. म्हणाला “काय बावळं ध्यान हाय रे हे! मढपोत्तर येनार फक्त हे सांगायला काय धाड भरली होती का हीला? बिनकामाच्या मोठ्याआईच्या शिव्या खाल्या रामपहारी.”
आईने एका ताटात बटाट्याची पिवळी भाजी आणुन ठेवली टिपॉयवर. दुसऱ्या ताटात पाच सहा दशम्या आणुन ठेवल्या, दह्याचा वाडगा आणुन ठेवला. त्यातली एक दशमी उचलत धोंडबाने त्यात थोडी भाजी गुंडाळुन त्याची घट्ट वळकटी केली आणि म्हणाला “जातान खाईन रं म्या. एक काम आलं टाळक्यात. मी सायकल आबाच्या टपरीवं लावतो आन् तिथच थांबतो. लवकर निघा. मला ताटकाळाया लावू नका” 
“अरे थांब, आबाची टपरी उघडली नसेल अजुन” असं मी म्हणेपर्यंत पायात चपला सरकाऊन धोंडबा गेला देखील.

घाई करायला हवी होती. बाहेर चांगलेच फटफटले होते. इन्नी काही आम्हाला सोडणार नव्हती त्यामुळे पुजेचे आणि नैवेद्याचे तिलाच आवरायला सांगितले होते. सगळ्यांचे डबेही तिच पहाणार होती. तिला सोबत घ्यायला सगळेच तयार झाल्याने ती उत्साहात सगळे आवरत होती. शामने आणि शकीलने सगळे सामान जिपमध्ये नेऊन ठेवले. आईने मामांसाठी बरेच काही बांधुन दिले होते, तेही व्यवस्थित एका बाजुला रचले. बाबांचा उत्साह तर आमच्यापेक्षा जास्त होता. त्यांच्या सख्ख्या मामाकडे निघालो होतो आम्ही. त्यामुळे त्यांच्या हजार सुचना सुरु होत्या “मामाला हे विचार, ते विचार, मामीला हे दे, पोरांना आठवणीने खाऊ द्या, परतीला निघताना मामाच्या हातात अमुक पैसे ठेवा. ते घेणार नाही पण तुम्ही ऐकु नका, गोठ्यात चक्कर मारा, गाईगुजींवरुन हात फिरवा, मामाला बरे वाटेल” वगैरे. आम्ही आई बाबांच्या पाया पडुन एकदाचे निघालो. शकील जिप वळवुन आला होता. शंभरदा सांगुनही आईने परत निघताना बजावलेच “अप्पा, पहिला नैवेद्य खिरेश्वराला ठेव. तारामतीवर गेलाच तर गणपतीपुढे फक्त पान सुपारी आणि नारळ ठेव. नारळ वाढवू नकोस. कुणा आल्यागेल्याची तहान भुक भागवेल तो नारळ. हरिश्चंद्राला कापुर दाखवायला विसरु नकोस.” आईचे काही संपत नव्हते. शकील मुद्दाम गाडी रेस करत होता. इन्नी आईच्या प्रत्येक वाक्याला “बरं! हं! ठिके!” करत होती. 

आम्ही चौकातुन उजवीकडे वळालो आणि दोन तिन किलोमिटरनंतर लक्षात आले की धोंडबा राहीलाच की मागे. मग पुन्हा मागे आलो. धोंडबा मैलाच्या दगडावर वाट पहात बसला होता. त्याने हातानेच गाडी थांबवू नका म्हणून खुण केली आणि उडी मारुन जिपमध्ये बसला आणि एकदाची आमची ‘गड हरिश्चंद्रा’ची मोहीम सुरु झाली. 

दत्त्याने तेवढ्यातही धोंडबाला चार शिव्या घालुन घेतल्या “काय भानगड असती रं तुही दर टायमाला? तुझ्यापायी तासभर खोळंबा झाला उगी.”
त्याला बाजुला ढकलुन बसायला जागा करत धोंडबा म्हणाला “ऐ अकलेच्या कांद्या, आता पाच मिनिट नाय झाले तुम्ही माझ्या म्होरुन गेला. मी आवाज द्येतोय तं आपल्याच नादात गेले. कसला रं तासभराचा खोळंबा? सरक तिकडं.”
दत्या हसुन म्हणाला “त्ये एक चुकलच पघ गड्या, पन तु तरी काय लई दिवं पाजाळलंत तव्हा तुही आठवन ऱ्हावी?” 

धोंडबा कितीही सरळ असला तरी मला आबाचे सगळे धंदे माहित होते. रामोशाचे हे पोर सरळ असले तरी त्याचे धंदे सगळे वाकडे होते. मासे, खेकडे पकडणे, सशाची, पोपटाची पिल्ले पकडून गावात विकणे वगैरे. दारू गाळने हा तर त्याचा पिढ्यांपिढ्या चालत आलेला व्यवसाय होता. बापाच्या हाताखाली काम करता करता आबाने या कलेतली पदवी घेऊन बापालाही मागे टाकले होते. आणि याच आबाच्या टपरीवर धोंडबा भल्या सकाळी जाऊन बसला होता. आता तो काही खेकड़े मासे तर आणायला गेला नसणार हे उघड होते. त्याने सीटखाली सरकवलेली पिशवी मी बाहेर ओढायला सुरवात केली तर धोंडबाने "काय नाय रे त्यात अप्पा" म्हणत स्वतःच पिशवी बाहेर काढून माझ्यासमोर उघडून धरली. 
“हे पघ, वाघूर हाय. तेच आनायला आबाकं गेल्तो राती तर म्हनला की टपरीवर हाये. म्हनुन सक्काळ सक्काळ त्याच्या टपरीचा उंबरा झिजावला उलसाक.” असं म्हणत धोंडबाने पिशवीतली पक्षी पकडायची जाळी थोडीशी बाहेर काढुन दाखवली. पण माझी शंका काही फिटली नाही. मला राहून राहून धोंडबाचा संशय येत होता. काही तरी भानगड नक्की होती. मी ती जाळी हाताने बाजूला करुन पिशवीत अजुन काय आहे ते पहायचा प्रयत्न केला. धोंडबा एकदम चिडला.
“काय अप्पा तुबी लावून धरलय उगा. दे ना सोडुन. म्होरं इन्नी बसलीय. लाज काढतो का काय तिच्याम्होरं आता!”
शकीलने जिपचे छत उतरवून ठेवले होते त्यामुळे वारा चांगलाच जाणवत होता. त्यामुळे इन्नीला व्यवस्थित ऐकू गेले नाही तरीही तिच्या तिखट कानांनी काहीतरी ऐकलेच. ती मागे वळुन म्हणाली “काय म्हणतोस रे धोंडीदादा?”
“काय नाय गं. अप्पाला म्हनत व्हतो का इन्नीला घेटलं संग ते बेस केलस. काय करनार व्हतीस दोन दिस आमच्या माघारी गावात राहून. उगा कटाळली अस्ती. नाय का अप्पा?”
मी नुसतीच मान डोलावली. माझ्या डोक्यात अचानक प्रकाश पडला पिशवीत काय असेल याचा आणि मी विषय बदलला. 

अगदी सावकाश गेलो तरी प्रवास फार तर तिन तासांचा होता. विस एक किलोमिटर गेल्यावर माझ्या मामाचे शेत लागले. नको नको म्हणतानाही इन्नीने गाडी थांबवायला लावली आणि रस्त्याच्या कडेलाच असलेल्या मामाच्या घराकडे पळत गेली. दहाच मिनिटात ओढणी सावरत, एका हातात कसलासा पितळी डबा घेऊन इन्नी बांधावरुन धावत येताना दिसली. पाठी मागे “अग थांब की कार्टे जरा. सगळ्यांना बोलाव” म्हणत मामी धावत होती. तिच्या हातात खुरपे होते. बहुतेक रानात निघाली असावी. 
इन्नी गाडीत येवून बसत म्हणाली “भाई, चालव लवकर गाडी जोरात”
दत्ता म्हणाला “दम जरा शकील. हिच्या टाळक्यात काय कांदं भरलत की काय समजना. बिचारी मामी बिन पायतानाचं बांध तुडवीत पळतीय हिच्या मागं ती काय येडी हाय का. तुला जायलाच कुनी सांगीतलं व्हतं म्हन्तो मी?”
इतक्यात धापा टाकत मामी आली. खुरपं घेतलेल्या हातानेच कपाळावरचे केस मागे सारत म्हणाली “पोर म्हणावं का काय हिला. बोहल्यावर उभं ऱ्हायचा टाईम अाला पन फिंदरीचं पोरपन काय जाईना” 
इन्नी हसली. तिच्यावर हातातले खुरपे उगारल्यासारखं करत मामी मला म्हणाली “असं वो काय करता अप्पा. च्या तर घ्या की वाईच. असं कितीक हाय मढ इथून. मस दिस पडलाय अजुन”
मी खाली उतरत म्हणालो “खरच नको मामी. फक्त मढलाच नाही जायचे. हिला मामांकडे सोडून आम्ही हरिश्चंद्रावर जाणार आहोत पुढे. सकाळी उतरु गड. मामा आला की सांग त्याला. आम्ही परवा येताना थांबू जेवायला येथे”
“बरं, तसं त तसं. दमा जरा वाईच” म्हणत मामी परत घराकडे गेली व हातात कापडी पिशवी घेवून आली.
“कालच वांग्याचा तोडा झालाय. चांगली काटेरी पाहुन काढुन ठेवली व्हती. एवढी द्या मामांच्यात. मी इच्यारलं म्हनून सांगा आणि नायीच थांबत त मंग उशीर करु नका. निघा पटशीरी”
मामीने दत्ताकडे पिशवी दिली आणि इन्नीच्या गालांवरुन हात फिरवत म्हटलं “जपून जावा सम्दी. आन आप्पा, पोरीला नेवू नका गडावं. परवा येवा, मी वाट पघते”
शकीलने जिप रस्त्यावर घेतली आणि आम्ही निघालो. आता सरळ मढलाच थांबायचे होते. मी मामीला हात हलवत निरोप दिला.  सकाळचे कोवळे उन असुनही सवयीने तिने एका हाताचा तळवा कपाळावर आडवा धरला होता आणि उजव्या हाताने ती आम्हाला टाटा करत होती.
दत्ताने वानवळ्याची पिशवी सीटखाली टाकली आणि इन्नीला म्हणाला “एक मोठ्याई सोडली तर सगळीच बोबंलत्यात हिला नेवू नका म्हनून पन तू कव्हा कुनाचं ऐकलय आजवर तव्हा आज ऐकनार हे. चल, आपल्याला काय”
इन्नीने पायजवळ पडलेल्या प्लॅस्टीक ग्लासमधला एक ओढून काढला आणि दत्त्याला मारला. 
दत्ता हसत म्हणाला “दुसरं काय येतय तुला. हाताला भेटंल ते फेकायचा नायतर मांजरावानी बोचकारं काढायचं. तू बोलूच नको ना माह्याबराबर.”
इन्नीने एक पाय सिटवरच दुमडला आणि मागे वळत ती दत्त्यावर चिडली “मी बोचकारते काय मांजरी सारखी? दत्तूदादा तू फार आघाऊ झालाएस हां. थांब, मांजर कसं ओरबाडते ते दाखवतेच” असं म्हणत तिने एका हाताने दत्ताला ओरखडे काढायचा प्रयत्न सुरु केला.
धोंडबा जागेवरुन उठला आणि दत्त्याला बाजूला ओढत म्हणाला “आरं काय बारकाली हाय का तुम्ही आता. दत्त्या तू बस पाहू या अंगाला”
मी आणि शाम दत्ताला हसत होतो. शकीलच्या मागे आता धोंडबा बसला होता तरी इन्नी ओनवे होवून दत्त्याला बोचकारे काढायचा प्रयत्न करतच होती. शकीलने उजव्या हाताने स्टेअरींग पकडत दुसऱ्या हाताने इन्नीला सरळ बसवायचा प्रयत्न सुरु केला. दत्त्यावरही तो ओरडला “जरा चुप बैठ ना दत्ता तू पण. खवीसासारखा काय तंग करतो तिला. तूही सरळ बस गं”
इकडे गाडीत काय चाललय याचं ठोब्बाला काही देनंघेणं नव्हते. दोन सिटांमधील जागेत त्याने मस्त ताणून दिली होती. उश्याला ब्लँकेटच्या घड्या घेतल्या होत्या आणि तो कसली तरी कादंबरी वाचण्यात मग्न झाला होता. इन्नीचा हात पोहचू नये म्हणून दत्त्या वरच्या पाईपला धरुन अर्धा अधिक जिपच्या बाहेर लटकला. ते पाहून शकील चिडला. मीही दत्त्याची पँट धरुन त्याला आत ओढायचा प्रयत्न करत होतो तोवर शाम्या जोरात ओरडला “शकील पुढे बघ, पुढे बघ. मरतोय आता”
शकीलने आणि आम्ही समोर पहाणार तोवर एक भलामोठा ट्रक आमच्या गाडीपासून अक्षरशः दोन-तिन इंचावरुन सुसाटत गेला. कसला तरी खळ्ळकन आवाज आला. शकीलचे गाडीवर काहीच नियंत्रण नव्हते त्यामुळे त्याने करता येण्यासारखी गोष्ट केली. करकचून ब्रेक मारले. अर्धवट बाहेर असलेला दत्त्या एक झटका बसून क्षणात जिपच्या आत फेकला गेला. बेसावध असल्याने तो वेडावाकडा होत ठोब्बाच्या अंगावर कोसळला. इन्नीही विंडशिल्डवर जोरात आपटली. टायर्सचा कर्कश्श आवाज करत जिप एक गिरकी घेवून रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीत उतरली. आम्ही जिकडून आलो होतो तिकडे तोंड करुन उभी राहीली. तो ट्रकही काही अंतरावर जावून उभा राहीला होता. कुणीच भानावर नव्हते. ठोब्बाची नेहमीप्रमाणे बोबडी वळली होती. इन्नी चांगलीच भेदरली होती. मी आणि दत्त्या लवकर भानावर आलो. शकील शांत होता. खाली उतरुन त्याने अगोदर इन्नी ठिक आहे का ते पाहीले मग आमच्याकडे वळाला. धोंडबाने तेवढ्यात वॉटरबॅग काढून इन्नीसमोर धरली होती. दत्त्याही तिच्या पाठीवर हात फिरवत होता. ती सावरली होती पण तिच्या अंगाची थरथर जराही कमी झाली नव्हती. झाले असे होते की दत्त्या-इन्नीच्या भांडणात शकील पडल्याने त्याचे रस्त्यावर काही क्षण दुर्लक्ष झाले होते आणि तेवढ्याच वेळात पुढच्या वळणावरुन आलेला ट्रक आम्हाला जोरात घासून गेला होता. जिपचा उजव्या बाजूचा आरसा गेला होता, मागे सामान ठेवायची जाळी असलेली फ्रेम वाकडी झाली होती आणि आम्ही सगळे गाडीतल्या गाडीत माठातल्या पाण्यासारखे चांगलेच हेंदकाळलो होतो. बाकी काहीच नुकसान झाले नव्हते. मानसीक धक्का सगळ्यांनाच बसला होता. पण सगळे सुखरुप आहेत हे पाहून सगळे लवकरच सावरले होते. सकाळी शंकरावर केलेल्या अभिषेकाला शिवशंभो जागला होता. 
दत्त्याने इन्नीच्या डोक्यावरुन हात फिरवत विचारले “कशीय तू बाई? कुठंशीक लागलं पघू? घे, पानी पे अदुगर”
त्याने डोक्यावरून हात फिरवला आणि इन्नीला हुंदकाच फुटला. तिला बोलताही येईना. “शामदादा, अप्पा कुठेय?”
दत्त्याने शाम्याला पुढे ओढलं आणि म्हणाला “हा काय. त्याला काय धाड भरलीय. सम्दी धड आहेत. तू रडू नको बरं. गप्प”
इन्नीची ती भेदरलेली अवस्था पाहून दत्त्या चिडला. “अप्पा जरा हिच्याकं पघ. कंच्या भाडखावने या बेन्याला गाडी चालवायला शिकावली त्ये पघतोच” 
मी इन्नीला बाजूच्या मैलाच्या दगडाला टेकवून बसवलं. धोंडबाला दत्त्यामागे पाठवलं. शकील मातीतच मांडी घालून इन्नीशेजारी बसला. ठोब्बाही त्याला खेटून तेथेच टेकला. 
शकील म्हणाला “अप्पा त्या दत्त्याकडे बघ जरा. त्या ट्रकवाल्याला काही बोलायचे. चुक आपली होती. उलट त्या बिच्याऱ्याने वाचवले आपल्याला”
मला आता कुठे तो ट्रक आठवला. दत्या आणि त्याच्या मागे धोंडबा तिकडे धावला होता. शकीलचे बोलणे ऐकून इन्नीही उठून उभी राहीली. 
“भाई त्या दत्तूदादाकडे पहा जरा. मी ठिक आहे. तो एकाचे दोन करुन ठेवेन. तू जा अगोदर”
राम जिपचा आरसा शोधत होता. मी आणि शकील ट्रककडे निघालो. ट्रक ड्रायव्हर खाली उतरलेला दिसत होता. दत्त्या त्याच्याबरोबर काहीतरी हुज्जत घालत होता. आम्ही पोहचलो तोवर प्रकरण चांगलेच हातघाईवर आले होते. दत्त्या त्या ड्रायव्हरच्या अंगावर धावून जात होता आणि धोंडबा सारखा त्याला मागे ओढत होता. एकुन काय झाले ते मला फारसे कळले नव्हते त्यामुळे मलाही दत्त्यासारखाच प्रचंड राग आला होता. धोंडबाने दत्त्याचा नाद सोडला आणि ड्रायव्हरलाच मिठी घालून मागे ओढले आणि ट्रककडे ढकलले. ड्रायव्हर चांगला सहा फुटांचा धिप्पाड शिख होता. डोक्याला किरमिजी रुमाल गुंडाळलेला, वितभर काळी पांढरी दाढी, निळ्या रंगाचा पठाणी झब्बा आणि आणि खाली पायजमा वगैरे काही नाही. डाव्या पायात बोटभर जाडीचे चांदीचे कडे. छातीवर जानव्यासारखा चामड्याचा पट्टा आणि त्याच्या टोकाला आकडेबाज कट्यार. तो फारसा काही हालचाल करत नव्हता, बोलत नव्हता तरी धोंडबाने त्याला ट्रकच्या दारावर दाबून धरले होते. 
मी ओरडलो “धोंडबा एक कानफटात मार त्याच्या अगोदर मग बोलू काय ते”
मला गप्प करत शकील मोठ्याने म्हणाला “धोंडबा छोड उसको. त्याच्यामुळे वाचलो आपण लोग. सोड त्याला पहले”
दत्त्या चिडला “तू गप रे मिया. धोंड्या तू दोन हान मुस्काडात अदूगर भाडखावाच्या. पोर भेदरली पार आमची ह्याच्या गुनं. तू हान पह्यली मंग इच्यार काय इच्याराचंय ते त्या बेन्याला”
आम्ही काय बोलतोय ते त्या सरदारजीला चांगलेच कळत असावे, कारण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. त्याने मंद हसत धोंडबाचे दोन्ही हात अगदी सहजतेने बाजूला केले आणि म्हणाला “बात ही करनी है ना बेटा? जरा गर्दन तो छोड”
धोंडबालाच काय आम्हालाही त्याच्या ताकदीचा अंदाज आला. कारण एक आख्खे बाजरीचे पोते कवेत घेऊन धोंडबा अगदी सहज खळ्यातून घरी घेवून येई. त्याची पकड सोडवणे इतकं सहज नव्हते. सरदार मागे वळला आणि टाचा उंचावत त्याने ट्रकच्या ड्रायव्हर सिटखाली हात घालून चाचपडायला सुरवात केली. त्याला हवे ते मिळाले असावे. त्याने जरा जोर लावून आतली वस्तू बाहेर ओढून काढली. आमचे लक्ष होतेच. चांगली लांबलंचक, लाल मखमली म्यानावर सोनेरी नक्षी असलेली, पितळेची भक्कम मुठ असलेली तलवार काढून त्याने ती जमीनीवर टेकवली आणि तिच्यावर काठीवर रेलावे तसे रेलत तो काही क्षण आमच्याकडे पहात राहीला. आम्ही आवाक होवून पहात होतो.
काही वेळाने त्याने तलवार हातात घेवून म्यानाबाहेर पाच सहा इंच ओढली आणि दत्त्याकडे पहात म्हणाला “काय म्हणत होतास बेटा तू?”
बरं झालं राम आणि ठोब्बा इन्नीजवळच थांबले होते नाहीतर ठोब्बाची तर बोबडीच वळली असती. आमच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया अगदी वेगवेगळ्या होत्या. मी धोंडबाकडे पाहीले तर तो बाह्या सावरत आजुबाजूला काही हातात येण्यासारखे आहे का हे पहात होता. शकील नेहमीप्रमाणेच शांत होता. दत्त्या चार पावले मागे सरकला होता. तो घाबरला नव्हता तर त्याच्या चेहऱ्यावर इन्नीची काळजी स्पष्ट दिसत होती. शाम्या यातुन मार्ग कसा काढायचा याचा विचार करत होता आणि माझी पाचावर धारण बसली होती. 
शाम्या कसंबसं हसत म्हणाला “अरे वा! सरदारकाका तुम्ही मराठी छान बोलता की”
त्या स्थितितही मला शाम्याचे हसू आले. मला मागे सारत धोंडबा बाह्या सरसावत पुढे आला.
“भ्या कुनाला दावतो रे! मस हथ्यारं पाह्यलीत असली. एका गचांडीवर सुटला असता म्हाताऱ्या पर आता हात नायतर पाय मोडून ठेवतो का नाय ते पघच.”
दत्या त्याला दुजोर देत म्हणाला “न्हाय तं काय. आमच्या माळ्यावं बी दोन चार गंजत पडल्यात. पार पानपताच्या काळातल्या हायीत.”
मग तो मला म्हणाला “अप्पा तू या भानगडीत पडू नको. इन्नीकं पघ तू. मी आणि धोंडबा आवरतं घेतो या सरदारजीचं. व्हय लवकर. इन्नीला इकडं येवू देवू नगस”
शकील हे सगळं शांतपणे पहात नुसताच उभा होता. तो कधी सरदारजीकडे तर कधी आम्हा सगळ्यांकडे पहात होता. इतक्यात रामला आरसा सापडला होता, तो हातात घेवून तो सरळ आम्ही उभे होतो तिकडे आला. त्याच्या मागे मागे इन्नीही आली. वातावरण जरा गंभीर आहे हे पाहून राम गोंधळला. 
इन्नीने मला विचारले “काय झालं रे अप्पा? आणि सगळे असे काय उभे आहेत. धोंडीदा का चिडलाय एवढा?”
मी काहीच बोललो नाही. धोंडबा म्हणाला “इन्ने, तू व्हय गाडीकडं. जरा या म्हाताऱ्याकडे पघतो मंग निघू. जा तू इथून”
मी इन्नीला मागे ओढत म्हणालो “तू कशाला कडमडतेस येथे? जा, जिपमध्ये जावून बस. शकील मिटवील सगळं”
पण इन्नीने माझ्या हातातला हात सोडवून घेतला आणि सरळ त्या सरदारजीपुढे जावून उभी राहीली. एका मुलीला समोर पाहून सरदार जरा गोंधळला असावा. त्याच्याकडे पहात इन्नी म्हणाली “काय चाललय काका? ही तलवार कशाला घेतलीय हातात? भिती दाखवताय का आम्हाला? की मारणार आहात?”
सरदार गोंधळला “तसं नाही मुली. मी काय म्हणतोय की…”
इन्नी भडकली “तसं नाही मग कसं आहे? वडीलांच्या वयाचे आहात तुम्ही. कसं वागताय? ठेवा ती तलवार आतमध्ये. ठेवा म्हणतेय ना”
बापरे! ही इन्नी चांगलीच पेटली. आता सरदारजी आणखी चिडणार आणि प्रकरण चिघळणार असं मला वाटलं. मी शकीलला म्हणालो “शकील बघ बुवा तूच आता. हे कुठल्या कुठे चाललय प्रकरण”
शकील हसत म्हणाला “सामने देख अप्पा”
मी पाहीले तर सरदारजीने तलवार म्यान करुन पुन्हा ट्रकमध्ये टाकली होती. चेहऱ्यावर अगदी गयावया केल्याचे भाव आणत तो म्हणाला “माफ कर बेटा. पण यांनी एखादी जरी मारली असती तरी या वयात काय अब्रू राहीली असती. मालाने भरलेला ट्रक असूनही मी धोका पत्करुन वाचवले तुम्हाला. पण तो पलीकडे उभा आहे तो मुलगा म्हणत होता एक दोन तोंडात मारा याच्या. त्यांना दुर ठेवायला मी असं केलं”
इन्नीने रागाने दत्त्याकडे पाहीलं. “दत्तूदादा, माफी माग यांची. आणि धोंडीदादा तुही माग. काका चुकलं असेल पण असं कुठे तलवार वगैरे दाखवतात का?”
दत्त्याने आणि धोंडबाने दोघांनीही माफी मागीतली. मीही पुढे होवून “काका चुकलं आमचं. आम्हीच गाडीत दंगा करत होतो. माफ करा” म्हणत त्यांच्यात सामील झालो. दोन मिनिटात वातावरण निवळलं. मग पाच दहा मिनिटे सरदारजी फार गप्पा मारत बसले. मुंबईतच जन्म झाला, आयुष्य मुंबई-नाशीक-पुणे करत कसे गेले, ग्रंथसाहीब वाचण्यापुरतीच पंजाबी वापरतो नाहीतर घरी देखील मराठीच कसे बोलतो, इन्नीसारखीच त्याची मुलगी कशी त्याच्यावर दादागीरी करुन त्याला जेवायला लावते वगैरे वगैरे. सरदारजी तसा बराच गोष्टीवेल्हाळ निघाला. “पागल कही के” म्हणत शकील इन्नीला घेवून जिपकडे गेला. आम्हीही मग सरदारजीला पुन्हा एकदा तलवार काढायला लावून प्रत्येकाने हातात घेवून पाहीली. त्याच्या कमरेची कट्यारही कौतूकाने पाहीली. सरदारजीला उशीर होत होता त्यामुळे तो निघायच्या घाईत होता. तो आम्हाला घेऊन जिपकडे आला. चारही टायरवर त्याने हाताची मुठ मारुन पाहीली. गाडीत बसुन थोडी पुढे मग थोडी मागे घेतली “सब चंगा हे जी. अगदी आरामात जावा. मुंबईला आला तर या गरीबाच्या घरी” म्हणत त्याने हात हालवला. ट्रककडे जायच्या अगोदर “बिलकूल मेरी बच्ची जैसी है” म्हणत इन्नीच्या डोक्यावरुन चार चार वेळा हात फिरवला. या सगळ्या भानगडीत अर्धा पाऊन तास निघून गेला होता. अर्थात मामांचा गाव आता जवळ होता. शकील आता सावकाश गाडी चालवत होता. आमच्या गप्पांचे टार्गेट आता दत्ता होता. 
शाम्या म्हणाला “किती तलवारी आहेत म्हणालास दत्ता माळ्यावर?”
“हायला, एकच असली म्हणून काय झालं? पानपतावर लढून कटलेत आमचे खापरपणजे. खांडेनवमीला उगाच पुजत नाय आपन हत्यार” दत्त्याने बाजू मारुन नेली पण इन्नीने त्याला घोळात घेतलेच. 
“दत्तूदादा, माझी शप्पथ घे अगोदर मग विचारते”
“तुही शप्पत. काय झालं?”
इन्नी हसत म्हणाली “तलवार पाहून घाबरला होतास की नाही? अगदी खरं सांगायचं”
“त्यात काय शप्पत घेन्यासारकं हाय. घाबरलो म्हंजी काय, बोबडी वळली व्हती. पर माघार नसती घेतली. तुझ्यापायीच झालं सम्द. काय भागूबाईसारखी रडत व्हती मगाशी. त्यापायी चिडलो. आयला, आता मेलो तरी तुला नेनार नाय कुटं” 
धोंडबा सोडले तर आम्ही सगळेच घाबरलो होतो. यापुढे नको तिथे आगावूपणा न करण्याचे प्रत्येकानेच मनोमन ठरवले होते पण बिचाऱ्याने घाबल्याचे प्रामाणीकपणे कबूल केल्यामुळे टिंगल मात्र एकट्या दत्त्याचीच चालली होती. सरदारजी मात्र आम्हाला चांगला धडा शिकवून गेला होता.

अर्ध्या तासात आम्ही गाडी हायवेवरुन आत वळवली आणि मामांच्या अंगणात उभी केली. घरी कुणी असण्याची शक्यता फारच कमी होती. पण मामांचे शेत घरापासूनच सुरु होत असल्याने कुणी तरी गाडी पहाणार होतेच. आम्ही अंगणात आलो. मस्त शेणाने सारवलेले अंगण. चारी बाजूने दोन फुटांची भिंत. खुंटीला टांगलेली दोन इरली, शेतीचे सामान, समोर दोन भली थोरली आंब्याची झाडे. बाजुलाच बांधलेली दोन गोंडस वासरे. सगळं पाहून प्रसन्न वाटलं. गाडीचा आवाज ऐकून मामा बाहेर आले. मागोमाग मामीही आल्या. आम्हाला पाहून त्यांना कोण आनंद झाला होता. मामांनी घाईने अंगणातच घोंगडी अंथरली. राधाकाकूने गुळाचा खडा आणि पाण्याची केळी समोर आणून ठेवली. दमलो नव्हतो पण तहान खुप लागली होती. समोर खास पाहुण्यांसाठी राखून ठेवलेला घरचा लोण्यासारखा गुळ. (माझे आजोबाच घरच्या गुऱ्हाळातून मामांच्यासाठी दोन ठेपी बाजूला ठेवत) आम्ही निवांत गुळ खात सगळी पाण्याची केळी खाली केली. पाच दहा मिनिटे बाबा कसे आहेत, आईचे काय चालले आहे वगैरे चौकशी झाल्यावर आम्ही उठलो.
“मामा, आम्ही निघतो आता. इन्नीला सोडायला आलो होतो. उशीर होईल”
“आता ग बया. हे काय इपरीत?” म्हणत मामींनी तळहाताने नथ झाकत गालावर हात ठेवला. 
मामींना समजेनाच पोरं अजुन अंगणातच आहेत. ना खळ्याकडे उधळली, ना डोंगरावर कांचन करवंदीत धडपडली, ना घाट उतरली. निघाली कुठे लगेच.
दत्त्या म्हणाला “कसय ना मामीबाय, आज हरिश्चंद्र यंघायचाय. रातीचा मुक्काम गुहेत. सकाळी निवद-नारळ करुन दुपारपर्यंत गड उतरु. जेवायला इथं. असा सगळा कार्येक्रम हाये. तव्हा निघूंद्या आम्हाला”
“आरं पर पेज-पापड तर खावून जाशान का नाय! बसा घडीभर. वैलावर पानी उकळतच असंन. कितीसा येळ लागतोय?” म्हणत मामीने राधाकाकूला नजरेनेच आत पाठवले. 
सवयीने डोक्यावरचा पदर उजव्या हाताने ओढून, नथीला झटका देत मामी म्हणाल्या “बाय कशी हाय आमची? सम्दी बरी हायीत ना? आन हे धुळवडीचं काय काढलय हरिश्चंद्रावर अप्पा? तुमी दरसाल चैत्रात जाता नव्हं?”
“हो, मे महिन्यातच जातो पण यावेळी जरा बदल म्हणून चाललोय. चांदण्यात गड पाहू आज रात्री”
मामी म्हणाल्या “बरं तसं करा. पन अप्पा हे पाह्य, सावर्न्याकडं सरकू नका अजाबात. खुबी फाट्यावरुन खिरेसरात उतरा आन निवद नारळ करुन खिंडीतून वर सरका. राजदरुज्याकं फिरकू नका. शाम तूला सांगतीय मी. ऐकलं का ध्यान धरुन?”
शाम्याने मुंडी हालवली. खरं तरं मामींने त्याच्या मनातले ओळखले होते. त्याच्या डोक्यात सावर्ण्यातून साधलं करीत वर जायचे होते. हा रस्ता फार विचित्र आहे. मला फारसे धाडस वगैरे करण्यात जास्त रस नसल्याने मी नकोच म्हणतो होतो पण आता मामींनी वॉर्नींगच दिल्यामुळे शाम्या आता निमुट आमच्या मागुन येणार होता. 
धोंडबाकडे पहात मामी म्हणाल्या “धोंडीभाऊ वाघूर आणलं का नाय?”
धोंडबा म्हणाला “त्याबगर काय गड यंघायला मजा हाय का मामीबाय!”
“वाटलच. तू कसा येसीन मोकळ्या हातानं” म्हणत मामींनी राधाकाकूला आवाज दिला “राधे, जरा मसाला एकत्र करुन बांधून दे पोरांना आन साताठ लिंबं दे सोबत”
राधाकाकूने पेजेचे वाडगे आणि मिरगुंडाच्या पापडाचे ताट आणून समोर ठेवले. शाम्यासाठी एका वाटीत काळे मिरे ठेचून आणून दिले. मसाल्याची पुडी आणि काही पिवळीधम्मक लिंबं धोंडबाच्या समोर ठेवली. पेज-पापड खावून आम्ही चांगले ताजेतवाने झालो. बाबांनी मामांसाठी दिलेले सर्व साहित्य धोंडबाने तोवर अंगणात काढून ठेवले होते. इन्नी पंधरा मिनिटात कपडे बदलून आली होती. मामांकडेही सगळेच लाड करत तिचे त्यामूळे तिची आज मजा होती. आम्ही निघालो तो मामांनी “जरा दमा” म्हणत थांबवले. सोपानाला हाक मारली आणि आमच्यासोबत देत म्हणाले “याला राहुंद्या संगं. गड पाठ हाय त्याला आन तसाही शामरावाचा काय भरोसा नाय. कसं? आन जाताना दौलतमामाच्या अंगणात गाडी लावा. सोपाना दाखवीनच तुम्हाला घर” 
सोपाना हा मामांचा नातू. धोंडबाच्या वयाचा असेल. हुशार पोरगा. त्याची सोबत म्हणजे आम्हाला बरेच झाले. सोपानाही लगेच कमरेला आकडी लावून तयार झाला. इन्नीला सोडून, सोपानाला घेवून आम्ही निघालो. सावर्णे तसही जमणार नव्हतेच. कारण खिरेश्वराला नारळ देवून परत मागे फिरुन सावर्णे गाठायचे तर वेळ जाणार होता.

शकीलने गाडी हायवेवर घेतली आणि खुबीफाट्याकडे वळवली. इन्नी गाडीत नसल्याने नकळत एक मोकळेपणा आला होता. गाडी रस्त्याला लागताच धोंडबा म्हणाला “अप्पा, तू काय डोक्याने अधू हाय कारं? हायला पंध्रा दिसांमागं त्या आबाकडून गव्हाची दारू गाळून घेतलीय लिटरभर. त्याच्या डोंबलावर अर्धं पोतं घातलं त्यापायी गव्हाचं. आन तू इन्नीम्होरं लाज काढायला निगाला. वाट लावली अस्ती तिनं सगळ्या सहलीची. तू माग आता, देतो का तुला घोटभरतरी पघच”
हा आबा आमची फर्माईश असली की सिजनप्रमाणे कधी मोहाच्या फुलांची, चिकूची, सफरचंदांची अशी दारू गाळून द्यायचा. त्यात तो नेहमी करायचा ती अजिबात भेसळ नसायची. गुळ आमच्या गुऱ्हाळातलाच असे. चवीसाठी मिरच्या टाकी फक्त. बहुतेक सगळी प्रोसेस धोंडबाच्या नजरेखालीच होई. आबाने कधी फसवले नाही या बाबत. त्याला स्वतःला वेगवेगळे प्रयोग करायला आवडायचे. ते प्रयोग तो आमच्या फर्माईशीवर करी. आमचेही काम होई आणि त्याचेही काम होई. आज धोंडबाने एक कॅन आणला होता त्यामुळे मी आणि शाम्या दोघेही खुष होतो. ठोब्बा, दत्ता आणि शकील या भानगडीपासून दुर असत. 
मी धोंडबाच्या गळ्यात हात घालून म्हणालो “अगोदर नाही सांगायचे का धोंडबा. मला कसं माहित असणार काय आणलय तू ते. तू आबाकडे गेला म्हणून मला काळजी वाटली इतकच”
शकीलने गाडी फाट्यावरुन खिरेश्वराकडे वळवली. रस्ता खुप खराब होता. आम्ही कसेबसे गावात पोहचलो. सोपानाने दौलतमामाचे घर दाखवले. तेथे गाडी लावली. सगळे सामान व्यवस्थित बांधलेले होते. त्याची वाटणी केली. माझ्याकडचे सामान नको नको म्हणत असतानाही सोपानाने उचलले. तोवर दौलतमामाने भली मोठी ताडपत्री आणून गाडीवर टाकली. आम्ही वेळ न घालवता निघालो. निघताना दौलतमामाने आवर्जून कॅन्व्हासची पाच लिटरची वॉटरबॅग भरुन दिली. ही एक चांगली सोय झाली. आम्ही गावाबाहेर आलो. थोड्याच वेळात मंदिरात पोहचलो. येथे एक नारळ वाढवला. खोबरे खाल्ले आणि मंदिराच्या शिल्पकाम पहाण्यात वेळ न घालवता निघालो. सोपान आणि धोंडबाचे तेवढ्या वेळात बरेच बोलणे झाले होते. गडावर वाघूर लावायची जागा दोघांनीही ठरवली होती. संध्याकाळीही चित्तुर हमखास उतरतील अशा जागा सोपानाला माहित होत्या. सोपानामुळे धोंडबाला बरीच मदत होत होती. शिकार हा दोघांचाही आवडीचा विषय. जी काही मजा करायची ती गड उतरताना करायची हे अगोदरच ठरले होते त्यामुळे आम्ही झपाट्याने गड चढत होतो. ठोब्बालाच जरा सावरायला लागत होते. काटक असुनही मुळात आळशी. ट्रेकींगला न्यायला अगदी नालायक. जवळ काही सामान नसतानाही तो टंगळमंगळ करत चालत होता. सगळ्यात पुढे सोपाना आणि धोंडबा होते. मागोमाग राम, शकील आणि शाम. मी सगळ्यात शेवटी ठोब्बाची शेपटी पिळत चालत होतो. अडीच तिन तासाची चाल होती फक्त. पेज-पापडाची भर होती पोटात. पाणी वगैरे चालताना पिता येणार होते. सुरवातीपासून आम्ही चाल टिकवून धरली होती. उन्हही जाणवायला लागली होती. धोंडबाने शर्ट काढून डोक्यावर घेतला होता. त्याचे पाहून बाकीच्यानीही तेच केले होते. माझ्या डोक्यावर पाण्याची पिशवी आडवी ठेवली होती. तिचे वजन जाणवत असले तरी पिशवी कॅन्व्हासची असल्याने डोकं अगदी थंड व ओलसर रहात होते. ठोब्बाची चाल पाहून मी बाजूची चांगली पाच साडेपाच फुटाची फांदी कमरेच्या हंटींग नाईफने मोठ्या कष्टाने तोडली आणि व्यवस्थित साळून त्याच्या हातात देत म्हणालो “हे घे ठोब्बा आणि आता चाल पकड हां गुमान नाही तर मी मागून पोटरीवर फटके मारीन शिंपटीने”
मध्येच धोंडबाने पाणी मागीतले म्हणून वॉटर बॅग मी पुढे पाठवली. ती दहा मिनिटाने पुन्हा फिरत फिरत माझ्याकडे आली तेंव्हा अर्धी रिकामी झाली होती. ओझे बरेच कमी झाले होते. अडीच वाजले असावेत. आम्ही टोलारखींड चढलो आणि डाव्या बाजूला वळलो आणि बालेकिल्ला गाठला. शकीलचे म्हणने होते की सरळ गणेशगुहा गाठूयात पण धोंडबाचे आणि सोपानाचे अगोदरच काही ठरले असावे. सावलीची जागा पाहून दत्त्याने चादर अंथरली. तिन वाजेपर्यंत आम्ही गड चढलो होतो त्यामुळे मला शकीलची घाई समजेना. चालताना जाणवले नसले तरी चांगलेच दमायला झाले होते. मी ठोब्बाकडून पिशवी घेतली आणि त्यावर रेलत मी चादरीवर आरामात लवंडलो. उन रनरनत असुनही सह्याद्री सुरेख आणि राकट दिसत होता. राम माझ्या पोटाची उशी करुन लवंडला. मग नाईलाजाने शकीलही घाम पुसत बसला. आजचा स्वयपाक रात्री नवाच्या पुढे सुरु करायचा असल्याने घाई अर्थातच नव्हती. फक्त मेन्यु काय असणार ते धोंडबाच्या नशिबावर अवलंबून होते. जर त्याच्या वाघरात दोन चार चित्तूर सापडले तर फर्मास भात रस्सा मिळणार होता नाहीतर खिचडी ठरलेलीच होती. सगळेच सावलीत निवांत होवून पसरले. शाम्याने पिशवीतून दोन सफरचंदे काढली आणि एक शकीलकडे फेकून तो ते कुरतडत बसुन राहीला. सोपाना आणि धोंडबाची मात्र घाई चालली होती. 
सोपाना म्हणाला “पल्याडच्या बाजूला वाघूर लावलं तर दोन तिन चित्तुर सापडतील नशिबात असन तर. तासभर लावू वाघूर नायतर वर गडावर लावू”
मग धोंडबा आणि सोपाना ती जाळी आणि खुंट्या घेवून पलीकडच्या लहानशा मैदानावर उतरले. दहाच मिनिटात दोघेही घामाघूम होवून परतले आणि आमच्या शेजारी लवंडले.
धोंडबानी सोपानाला विचारले “धान टाकलय का सोपाना? न्हायतं नुसतं वाघूर लावून आपन निवांत बसायचो”
सोपानाने मान डोलावली. त्यांनी वाघूर लावले होते म्हणजे आता तास दिडतासतरी आम्ही येथून हालत नव्हतो. सगळेच शांत पडले होते तरी धोंडबाने सुचना केली “आता गदारोळ करु नका रं कुणी. गप ऱ्हावा उलसक”
धोंडबा माझ्या शेजारीच लवंडला. मी त्याच्या पायावर पाय टाकले आणि तोंडावर रुमाल टाकून झोपलो. दहा मिनिटांची डुलकी लागली तरी खुप होती. वारा पडला होता. कुणी कुणाशी बोलत नव्हते. मध्येच एखादा पक्षी कर्कश्श शिळ घालत होता. गडावर सगळीकडे उगवलेले गवत पिवळे पडले होते. हिरवळ नावालाही दिसत नव्हती. दुरवर काही गुरे चरताना दिसत होती पण गुराखी दिसत नव्हते. तेही बहूधा सावलीला लवंडले असावेत. पलिकडून दत्त्याच्या हलकेच घोरण्याचा आवाजही यायला लागला. हा दत्त्या म्हणजे बाजारात मिळणाऱ्या बाहूलीसारखा होता. ती बाहूली आडवी केली की डोळे मिटायची तसं दत्त्या कुठेही, कधीही आडवा झाला की पाच मिनिटात घोरायला लागतो. 
शकीलने मला हलवत विचारलं “अप्पा जागा आहेस का? चेस खेलेगा. दो बाजी लगा लेते है बैठे बैठे”
मी तोंडावरचा रुमाल न काढताच ‘नको’ म्हणून मान डोलावली. दहा पंधरा मिनिटे गेली असतील शांततेत इतक्यात धोंडबाने त्याच्या अंगावरचे माझे पाय झटकले आणि घाईत उठत ओरडला “सोपाना, कडका आला जनू. ऐकला का?”
सोपाना झाडाला टेकून लिंबू चोखत बसला होता. तोही ताडकन उठला आणि म्हणाला “व्हय रं, ऐकला. पन यवढ्यात काय घावनार हाय? तरीबी पघूया का?”
मी चिडून उठत म्हणालो “काय रे धोंडबा, नुकताच डोळा लागला होता रे. काय गोंधळ आहे तुमचा”
धोंडबा म्हणाला “काय नाय रं. जरा कडका ऐकल्यागत वाटलं. वाघरात कायतरी घावलं असनार. मी आन सोपाना पघतो. तू पड” 
मी उठल्यामुळे माझ्या पोटावर डोके ठेऊन झोपलेला रामही उठला. मग त्याने पलिकडे झोपलेल्या शाम्यालाही पायाने ढोसून उठायला भाग पाडले. 
शाम्या जागाच असावा. कारण उठतानाच तो म्हणाला “धोंडबा अरे मीही ऐकली खसफस. काहीतरी नक्की असेल. चल मीही येतो”
“तू गप झोप ना निवांत. काय आसंन तर हिकडच आनू ना आमी? का तिकडच भाजून खानारे?” धोंडबा उगाच करवादला आणि उठला. त्याच्या मागे मागे सोपानाही गेला. 
शाम्याची उत्सुकता पाहून राम म्हणाला “काही नसेल रे शाम. दिवसभर जाळं लावले तरी काही सापडत नाही कधी कधी. यांना दहा पंधरा मिनिटात काय सापडणार आहे? चल पलिकडची घळ पाहू आपण” 
“थांब रे. पाहू तर खरं काय होतय ते. नसेल काही तर निघू पुढे. खुप झाली विश्रांती” म्हणत शाम्या परत चादरीवर आडवारला आणि धोंडबा गेला त्या दिशेला हाताव मान टेकवून पहात राहीला. मला खिचडीही चालणार होती आणि भाजलेले बटेरही चालणार होते त्यामुळे मला फारसा रस नव्हता शिकारीत. माझा तर शक्यतो विरोधच असे या सगळ्याला पण शाम्याच्या आणि धोंडबाच्या इच्छेखातर गप्प बसावे लागे. मी मांडी घालून चादरीचे निघालेले धागे हाताने तोडत बसलो होतो इतक्यात पलिकडून धोंडबाची मोठी आरोळी ऐकायला आली “शिकार फत्ते झाली रं अप्पा. म्हादेव पावला आज”
आम्ही बसलो होतो तेथून ते दिसत नव्हते. हळू हळू ती लहाणशी घळ चढून दोघेही वर आले. मला प्रथम धोंडबाचा वर केलेला हात दिसला मग हळू हळू दोघेहे घळ चढून आले. शाम्याचा सगळा जीव त्याच्या डोळ्यांमध्ये आला होता. धोंडबा आणि सोपाना जवळ आले. धोंडबाच्या हातात चित्तूर नव्हते तर भला थोरला करड्या रंगाचा ससा होता. धोंडबाने त्याचे दोन्ही कान मुठीत गच्च पकडले होते. सशाचा पुढचा उजवा आणि मागचा डावा पाय दोऱ्याने घट्ट बांधलेले होते. हे काम सोपानाचे असणार. धोंडबाने खाली बसता बसता तो गोजीरवाना ससा शाम्याच्या मांडीवर ठेवला. त्याच्या आणि सोपानाच्या चेहऱ्यावरुन आनंद नुसता ओसंडून वहात होता. मी सशाचे कान धरुन त्याला माझ्या मांडीवर घेतले. चांगलाच जाडजूड आणि जड होता तो. डोळे अगदी गुंजासारखे लाल होते. त्याच्या पाठीवरुन हात फिरवताना मला त्याच्या शरीराची थरथर स्पष्ट जाणवली. शाम्या आता उड्या मारायचाच बाकी होता. मला काय करावे ते समजेना. मी कमरेचा हंटींग नाईफ बाहेर काढला. शाम्या माझ्याकडेच बघत होता. 
तो ओरडला “थांब थांब अप्पा. मारु नकोस इतक्यात. आपण रात्री नवाच्या पुढे चुल मांडणार आहोत. तोवर खराब होईल मटण”
मी त्याच्याकडे रागाने पहात म्हणालो “बामणा, मारत नाहीए मी त्याला. पायाची दोरी तोडतोय त्याच्या. जाऊदे त्याला त्याच्या मार्गाने”  
शाम्याच्या हुशार मेंदूने क्षणात सगळा विचार केला. अप्पाला विरोध करायचा म्हणजे सहलीचे मातेरे होणार आणि ससा सोडून दिला तर रात्रीच्या जेवणाची सगळी गम्मत जाणार. दोन्ही बाजूने तो अडचणीत होता. त्याचा एकमेव आधार म्हणजे शकील. तो त्याला म्हणाला “शकील बघ रे तुच. आता या अप्पाला मी काही सांगू शकत नाही. तुला जे योग्य वाटेल ते करुयात. मी काही बोलणार नाही”
शकीलने काढून ठेवलेले बुट पायात घातले. नाड्या आवळताना तो मला म्हणाला “देख अप्पा. मलाही नाही आवडत असं प्राणी मारुन खायला. तु बेहरत जानता है. पण मग तू अगोदरच का नाही विरोध केला. धोंडबाचे आणि सोपानचे कष्ट वायाला घालवणार आहेस का? ते वाघूर लावत होते तब क्यू कुछ नही बोला तू? आणि आता मांडीवर खरगोश घेतल्यावर तुझ्यातली करुणा जागी झाली याला काय अर्थ आहे? या फिर खरगोश का गोश्त तुझे पसंद नही इस लिए रहम आ रहा है तुझे? ही दया नाही अप्पा कमकुवत मनाचे लक्षण आहे हे. कमजोर दिल अौर रेहमत से भरा दिल दोनो फर्क होता है अप्पा”
शाम्या म्हणाला “नाही तर काय!”
मी कळवळून म्हणालो “अरे पण शकील, मला काय माहित ससा सापडेल म्हणून. एखादे बटेर सापडेल जाळ्यात असं वाटलं मला”
“म्हणजे बटेर मारायला तुला काही वाटणार नाही पण फक्त ससा मारायचा नाही असं काही आहे का?”
“तसं नाही रे. बटेर तर नेहमी पहातोच ना आपण मारताना. मला आवडतोही त्याचा रस्सा”
“म्हणजे तुला ससा मारताना पहायची सवय नाही म्हणून सोडून द्यायचाय का? दे मग सोडून”
आता मला काही समजेना. “शकील शब्दात पकडू नकोस उगाच. करा काय करायचे ते” असं म्हणत मी ससा शाम्याकडे सोपवला. त्याने त्याला लगेच त्याच्या सॅकमधे मान बाहेर राहील असा ठेवून दिला. 
दत्त्या माझ्याकडे पाहून म्हणाला “अप्पा तुझं काय चुकीचं नाय वला. पन चालतय एवढं. उसातली रानडुकरं नाय मारत का दरसाली आपन. मंग तव्हा? आन ससा हाय चांगला थोरला. तुला टोपी करु की त्याच्या कातड्याची. मंग तर झालं?”
“आयला दत्त्या, टोपीचा विषय नाहीए. तो अजुन क्रुरपणा नाही का होणार? अरे काय डोक्यावर पडलाय का तू. पहिल्यांदा सोडून दे तो ससा”
धोंडबाने दत्त्याला मागे ओढले “हायला, शकीलन आनलय बरुबर त्याला जाग्यावर तर तू कह्याला काडी टाकीतो अजून त्यात? व्हय तिकडं. घड्या कर चादरीच्या अदुगर. निगायला होवं”
आम्ही आवराआवर केली. उन्हं कलायला लागली होती. संध्याकाळी मटण खायला रामही असणार होता तरी शाहजुक सारखा तो शाम्याला म्हणाला “शाम त्याला धान खावू घाल आणि पाणी पाज मग ठेव पिशवीत”
मी पाण्याची पिशवी रागाने ठोब्बाच्या अंगावर फेकली आणि सगळ्यांच्या पुढे निघालो. तासाभराची चाल होती. उन्हं आता पिवळी पडायला सुरवात झाली होती. बहुतेक सगळा सह्याद्री पिवळाच दिसत होता. आम्ही समोरच्या लहान मैदानात घुसलो. काही ठिकाणी वाळलेलं गवत अगदी खांद्यापर्यंत येत होत. आम्हाला अजुन कुणी गड उतरताना दिसले नव्हते. शाम्याची आता मात्र घाई चालली होती. तारामतीच्या गुहांवर त्याने मनोमन काठ मारली आणि मुक्काम उघड्या आकाशाखाली कड्यावर करायचा असं त्यानं ठरवलं. तसही मला गुहेमध्ये नेहमीच घुसमटल्यासारखे होते. थंडी किंवा पाऊस असेल तर गोष्ट वेगळी. आज दिवस सुरेख होता, हवाही छान होती. चांदण्या जरी फारशा दिसल्या नाही तरी चांदणं झकास पडणार होते. त्यामुळे मीही कोकणकड्यावरच मुक्काम करावा या मताचा होतो. गडावर येवून सुर्यास्त नाही पाहीला मग काय पाहीले असं शाम्याचे मत होते त्यामुळे त्याची घाई सुरु होती. ठोब्बा काठी टेकत चालत होता. शाम्याने मला मागे टाकले आणि तो माझ्या समोर चालू लागला. त्याच्या सॅकमधला ससा माझ्याकडे केविलवाना होऊन पहातोय असं मला वाटत होतं. माझी चलबिचल पाहून धोंडबाने शाम्याला हाक मारुन मागे घेतले. पाच वाजत आले होते. आम्ही येताना जरी घाई केली असली तरी मध्ये बराच वेळ गेला होता. आज काही देवदर्शन आणि नैवेद्य करायचे नसल्याने धोंडबाने आम्हाला सरळ कोकणकड्यावरच नेले. समोर कोकण कडा पाहताच सगळ्यांनी सामान खाली टाकले आणि धावत सुटलो. अगदी कड्याच्या जवळ गेल्यावर सगळे थांबले आणि मग हळू हळू पुढे जावून सह्याद्रीचे ते अनेकदा पाहीलेले रौद्र रुप पुन्हा एकदा डोळे विस्फारुन पहात राहीलो. हा कोकणकडा नेहमीच पहाणाऱ्यावर गारुड करतो. धोंडबाचे समोर कमी आणि शाम्याकडे जास्त लक्ष होते. शाम्याला काय विचित्र सवय होती माहीत नाही पण कोकणकड्यावर उभे राहून त्याने नेहमी एकच इच्छा व्यक्त केली होती “या कड्यावरुन उडी मारायला हवी” ही गम्मत नसायची. हे बोलताना त्याचे डोळे विलक्षण चमकायचे. व्यसनी मानसाला इप्सीत अमली पदार्थ मिळाल्यावर त्याचा चेहरा जसा होतो तसा कोकणकडा पाहून शाम्याचा चेहरा व्हायचा. त्यामुळे कोकणकडाच काय अगदी शिवनेरीवर जरी आम्ही कधी गेलो तरी धोंडबा नेहमी शाम्याच्या आसपास असे. ठोब्बा पालथे पडुन समोर पहात “भारी आहे रे! खरच भारीच आहे” असं काहीतरी पुटपुटत होता. तेवढ्यात रामने हातातली पाण्याची बाटली पुढे होत खाली ओतली. पाणी खाली गेल्यासारखे वाटले आणि क्षणात त्याचा फवारा उलट्या दिशेने वर उडाला. सुर्याच्या मावळत्या किरणांची एक लाल रेष त्यात कापुस पिंजल्यासारखी चमकली. सुर्याच्या मावळत्या किरणात हवेतले धुळीचे कण चमकत असल्याने पुर्ण दरीत एक प्रकारचा लाल द्रव भरल्यासारखा वाटत होता. व्हिजिबीलीटी कमी झाल्यामुळे या इफेक्टला चांगलीच खोली आली होती. सुर्य़ मावळायला अजुन वेळ होता. धोंडबा आणि सोपाना मागच्या मागे गायब झालेले मला समजलेच नाही. सगळ्यात अगोदर दत्त्या मागे फिरला. त्याने जरा दुर कातळ सोडून चांगलीशी जागा पाहीली. येताना तरवडाची मोठी डहाळी त्याने तोडून आणली होती, तिने जमीन साफसुफ केली. खाली घोंगडी अंथरुन त्यावर दोन चादरी टाकल्या. चादरीच्या चारी कोपऱ्यांवर आमचे सगळे सामान व्यवस्थित रचून ठेवले आणि मला हाक मारली. मग एक एक करत सगळे चादरीवर येवून लवंडलो. समोरचे दृष्य आणि आजूबाजूचा परिसर पाहून आमचा श्रमपरीहार झाला होता. प्रसन्न वाटत होते. मी टीशर्ट काढून पिशवीत कोंबले आणि ब्लँकेटसची मोठी वळकटी टेकायला घेतली व पाय पसरले. एकमेकांच्या नादाने जाणवले नसले तरी मुक्कामावर पोहचल्यावर मात्र समजले की बालेकिल्ल्याने चांगलाच दम काढला होता माझा. शाम्याने ससा बाहेर काढून त्याला पुन्हा धान खायला घातले आणि माझ्या शेजारी लवंडला. दत्ता, राम आणि ठोब्बा लाकडे गोळा करायला गेले. सगळीकडे लालसर तांबूस प्रकाश पसरला होता. खालची जमीन अजुन गरम लागत होती. सुर्य जवळ जवळ अस्ताला टेकला होता. सुर्यास्त झाला. चंद्रोदयाला वेळ होता. मी आणि शाम्या चादरीवर लोळत होतो. शकील अजुन कड्यावरच्या खडकावरच बसला होता एकटाच. बऱ्याच वेळाने दत्त्या आणि बाकीचे सरपण घेवून आले. दत्त्याने हंटींग नाईफने फुटभर व्यासाचा खड्डा केला. लहान लहान लाकडे त्यात रचून ठेवली. बाजूलाच वाऱ्याची दिशा पाहून शेकोटी पेटवली. बराच वेळ झाला तरी धोंडबा आणि सोपाना आले नव्हते. त्यांना शोधायला मी रामला पाठवणारच होतो तेवढ्यात दुरुन धोंडबाचीच हाळी आली. थोड्याच वेळात दोघेही आले. सोपानाच्या डोक्यावर सरपणाची लहानसशी मोळी होती तर धोंडबाच्या हातात पाण्याने भरलेली बादली. 
मी विचारले “आयला तुला कुठे बादली मिळाली धोंडबा?”
“अरे कुंडावर काय ना काय असतच रे” म्हणत धोंडबा सप्पय बसला आणि त्याने त्याच्या पिशवीतू ‘तो’ खास कॅन काढला. प्लॅस्टीकचे ग्लास काढले. इन्नीने दिलेल्या चकल्यांचे तुकडे झाले होते. त्याही काढून ठेवल्या. लिंबाच्या फोडी केल्या आणि त्याने रामला हाक मारली “ओ रामभाऊ, चला.” 
मी धोंडबाला थांबायला सांगीतले आणि शकीलला आणायला गेलो. त्याची आज काय तंद्री लागली होती कुणास ठाऊक. त्याला हाक मारुन बोलावले आणि आम्ही दोघेही पुन्हा चादरीवर येवून बसलो. धोंडबाने ग्लास भरला आणि “भुताखेतांच्या नावानं होऽऽ” म्हणत अर्धा खड्यात रचलेल्या लाकडांवर ओतला व उरलेला अर्धा शेकोटीवर ओतला. धुग धुग जळणारी शेकोटी एकदम ठिणग्या फेकत भडकली. 
“हायला हे आबा हाय जरा कामातून गेलेलं पन वस्तू बाकी एक नंबर बनीवतय” म्हणत धोंडबा मनापासुन हसला. त्याने चार ग्लास भरले. भरपुर पानी ओतले आणि आमच्या हातात दिले. आम्ही ‘चांगभलं’ चा गजर करत एका दमात ग्लास रिकामे केले आणि चकल्यांच्या तुकड्यांची मुठ भरली. आबाची कमाल छाती जाळीत पोटात उतरलेली अगदी स्पष्ट जाणवली. मी रामकडे पाहीले तर तो अजुन हातातल्या ग्लासकडे द्विधा मनःस्थित पहात होता. बिअरपर्यंतच त्याची मजल होती. आज हे हार्ड ड्रिंक त्याला झेपत नव्हते. “तू पे रे राम, उलशीकच दिलीय, बाकी नुस्त पानीच वतलय म्या” म्हणत धोंडबाने हाताने बळेच तो ग्लास रामच्या तोंडला लावला. 
दत्त्या म्हणाला “हैला, धोंड्या त्ये पेत नाय तं कह्याला पाजीतो रे त्याला? आन ठेव आता ते सम्द एकांगाला. यवढ्या तेवढ्याने ढगात जातो तू आन आमच्या डोक्याला कहार करतो”
धोंडबा हसुन म्हणाला “आरं रोज रोज हाय का ही मजा? आन तसबी म्हादेवाच्या डोंगरावं बसलोय आन वानूरी नाय असं कव्हा झालय का?”
शाम्या खो खो हसुन म्हणाला “धोंडबा, वानूरी नाही रे. वारूणी म्हण”
“त्येच ते. काय बी म्हणलं तरी जाती डोक्यातच ना? मंग झालं तर”
माझ्या तोंडातली कडवट चव अजुन गेली नव्हती तोवर धोंडबाने माझा दुसरा ग्लास भरला आणि म्हणाला “हे खास गोष्टी साटी हाय. अदुगर घे मंग सांगतो”
मी निमूटपणे तोंड वाकडे करत तोही ग्लास रिकामा केला आणि धोंडबाकडे पाहीले. “सांगतो जरा टायमानं” म्हणत धोंडबा उठला. दत्त्याने शेकोटीत अजुन लाकडे टाकली. सोपाना माझ्याकडे आश्चर्यचकीत होवून पहात होता. मी दारु पितो यावर त्याचा   कदाचित विश्वास बसत नसावा. उगवतीला आता धुळवडीचा पिवळा धम्मक चंद्र दिसायला लागला होता. शकील आणि ठोब्बा काहीतरी गप्पा मारत बसले होते. राम नुसताच चकल्या खात बसला होता. बराच वेळ आम्ही थंड हवेचा आणि शेकोटीचा आनंद घेत बसलो. मला आता हलके हलके आणि छान वाटायला लागले होते. 
दत्त्याने धोंडबाला विचारले “चुल पेटवायची का धोंडबा? आठ वाजत आलं अस्तील”
धोंडबाने काही उत्तर द्यायच्या ऐवजी उठून शेकोटीतले एक लाकूड काढले आणि खड्यातील लाकडांमध्ये टाकले. तासाभरापुर्वी त्यात ओतलेल्या दारुमूळे लाकडे भप्प आवाज करत पेटली. 
माझ्याकडचा हंटींग नाईफ घेवून धोंडबा सोपानाला म्हणाला “सोपाना तो ससुला उचल. जरा वाघराकडं चक्कर मारु. ते मोठं भगुन घे संग”
सोपानाने ससा उचलायच्या अगोदर मी त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि सोपानाकडे दिला. धोंडबा हसला. यासाठी तर त्याने जास्तीचा ग्लास दिला होता मला. दोघेही अंधारात निघून गेले. मागोमाग शाम्याही गेला. चुल आता चांगली पेटली होती. धोंडबा येईपर्यंत त्यात चांगले निखारे पडणार होते. शकील गप्प गप्प होता. 
मी त्याला विचारले “काय रे शकील, तासभर झाला तू अगदी शांत शांत आहेस. काय झालं?”
“कुछ नही अप्पा. ही आपली शेवटची सहल ठरते की काय असं वाटलं. या महिन्यात आपल्या परिक्षा संपतील. एक दिड महिन्यात निकालही लागेल. मग कोण कुठे कुठे ॲडमिशन घेईल अल्ला जाने. शाम्या काहीही झाले तरी मेडीकलला जाणार, इन्नीचे केमीकल नक्की आहे. तुझं आणि माझं इंजिनिअरींगचे नक्की झालय. मी मुंबईला आणि तू पु्ण्याला. राम, ठोब्बा काय करतात कुणास ठाऊक. दत्ता आणि धोंडबा काही घर सोडणार नाही. आता काही शाम्याच्या ओट्यावरचा कट्टा भरणार नाही. अम्मीच्या शेवया खायला कुणी जमा होणार नाही. मोठ्याईची बोलणी खायला फक्त दत्त्ता असणार येथे. कैसे होगा अप्पा? मुश्कील है यार ये सब”
आधीच देशी व्होडका डोक्यात गेली होती त्यात शकीलचे हे बोलणे ऐकून मला एकदम भरुन आले. मी हा विचारच केला नव्हता.  बरं यावर काही उपायही नव्हता. रामवर व्होडकाचा अम्मल असावा. तो जोरात म्हणाला “मी कुठेही जाणार नाही. कुणाला जावू देणार नाही. आपण येथेच भाजी भाकरी कमाऊन खावू. इन्नीसाठीही घरजावई पाहू”
हे ऐकून मी हसायला हवं होतं पण मलाही त्या जास्तीच्या ग्लासने भावूक केले होते. मी म्हणालो “तसच करुयात. काय करायचेय पैसे कमावून. आणि एवढी सोन्यासारखी बहीण कशाला द्यायची कुणाच्या घरी? आपण कुणीच गाव सोडायचे नाही” शकील नुसताच केविलवाना हसला. ठोब्बा मात्र एकदम गंभीर झाला. 
“पन मी म्हंतो, कह्याला यवढा इचार करायचा? माऊलीनी आयुक्ष दिलय, ते थोडं असं थोडं तसं असायचंच. दोस्ती कव्हा तुटत अस्ती का अप्पा? पण ज्याला त्याला वाट असती आपापली. ती चालायलाच लागती” 
मी नुसताच हुंकारलो.
“आन हे पघ अप्पा, तुम्ही डाक्टर, इजेनर नाय झाले तर आमी कुणाच्या भरवशावर गावात छाती काढून चालायचं?
राम वैतागला “ओ दत्तात्रयमहाराज, प्रवचन बास करा आणि त्या धोंडबाला हाक मारा. नवू वाजत आलेत. अजुन कशात काही नाही. भुक लागलीय मला”
दत्त्या बुड झटकत उठला आणि अंधारात नाहीसा झाला. मी कॅनमधून थोडी ग्लासात ओतून घेतली आणि शकीलला घेऊन कड्याकडे असलेल्या कातळाकडे निघालो. चांदनं अगदी लख्ख पडले होते. दुरवरच्या डोंगरांच्या कडा वॉटरकलरमधल्या चित्रासारख्या निळसर काळ्या दिसत होत्या. शकील आणि मी कुठले कुठले शेर आठवत, एकमेकांना सांगत कातळावर आरामात बसलो. थोड्या वेळाने धोंडबाची हाक आली म्हणून आम्ही उठलो. शकील उठता उठता म्हणाला 
दोस्त दो चार निकलते हैं कहीं लाखों में
जितने होते है सिवा उतने ही कम होते है
मी त्याच्या पाठीवर थाप मारली. त्यानेही माझ्या गळ्यात हात टाकला आणि आम्ही शेकोटीकडे परतलो.
धोंडबा म्हणाला “अप्पा वैतागनार नसशीन तर इचारतो.”
“तुला कधी पासुन माझ्या चिडण्याची चिंता वाटायला लागली धोंडबा. आणि आता चिडलो काय आणि नाही चिडलो काय, काय फरक पडणारे”
शकील पाठीत गुद्दा मारुन म्हणाला “अप्पा, आँसमासे उतर अब निचे. निरवानिरवीची काय वार्ता करतो. निट बोल जरा त्याच्याशी”
मी जीभ चावून म्हणालो “काय झालं धोंडबा? तांदूळ विसरला की मसाला?”
“ते नाय. इकडं पघ जरा”
मी धोंडबाकडे पाहीले. त्याने मागे धरलेले हात समोर केले. त्याच्या दोन्ही हातात दोन दोन चित्तूर होते. हाताच्या बोटांमध्ये त्यांचे पाय धरल्याने ते वटवाघळासारखे उलटे लटकलेले होते. फडफड करुन दमले असावेत त्यामुळे शांत असावेत. 
मी विचारले “अरे पण संध्याकाळी कसे काय सापडले हे जाळीत? रात्री सापडत नाहीत ना?”
“अरं जमीनीवर खेळनारा पक्षी हाय हा. घावला. एकाला दोघं सापडले अस्तील. काय करु? सशाचं पन मटान मोकार पडलय. चांगला गबदूल व्हता”
“बघ तुला सुचेल ते कर. नाहीतर शाम्याला विचार”
“शाम्याच म्हनला अप्पाला इचार. आता यातले दोन सोडून देतो आन दोन भाजतो. सशाचा रस्सा करु. कसं?”
“तू आणि शाम मिळून ठरवा आणि वाढा लवकर जेवायला. भुका लागल्यात धोंडबा” 
मी आणि शकील पुन्हा चंद्राकडे पहात गप्पा मारत पडलो. धोंडबा आणि शाम स्वयपाकाला लागले. दत्त्या त्यांना हवे ते पिशवीतून काढून देत होता. पिशवी इन्नीने भरल्यामुळे गरजेच्या सगळ्या गोष्टी त्यात होत्या. मामींनीही मसाला बांधून दिला होता. शाम्याने पहिल्यांदा चार कांदे चिरुन तळून घेतले. त्यात पाणी टाकून चांगले उकळवले व भिजवलेला तांदूळ घालून पातेले शेकोटीतले विस्तव बाहेर ओढून त्यावर ठेवले. अर्ध्या तासात त्याचा कांदाभात तयार होणार होता. मसाल्याची आणि लिंबाच्या रसाची पेस्ट करुन त्यात दोन्ही बटेर घोळवून तेही शेकोटीच्या आहारावर ठेवले. तोवर धोंडबाने मोठे पातेले चुलीवर ठेवून कांदा, बाकीचा मसाला परतुन त्यात मटण शिजायला टाकले. वरुन थोडे बेसनपिठ पेरुन झाकण ठेवले आणि आमच्यात येवून बसला. दत्ताही निवांत झाला. धोंडबाने पुन्हा कॅन बाहेर काढला आणि माझा व त्याचा ग्लास भरला. मला नको होते पण आता मन एकदम तरल झाले होते. दत्त्याने आग्रह केल्यावर सोपानानेही कमरेचा पावा काढला आणि कसलीशी अनोळखी सुरावट वाजवायला सुरवात केली. राम पेंगूळला होता. दत्त्या त्याला जागं ठेवायचा प्रयत्न करत होता. शाम्याने सकाळचे नियोजन सांगितले. लवकर उठून तो अगोदर अभिषेक करुन येणार होता. मग सगळ्यांनी कुंडावर अंघोळी करुन तारामती चढायचे होते. दुपारपर्यंत तारामती उतरुन राजदरवाज्याने गड उतरायचा होता. स्वयपाक झाला होता. धोंडबाने पिशवीवर बांधलेल्या पत्रावळी सोडल्या होत्या. कांदे, लिंबू कापून घेतले होते. चंद्र अगदी डोक्यावर आला होता. त्यामूळे वेगळ्या प्रकाशाची गरजच नव्हती. सगळयांच्या पत्रावळीत दत्त्याने गुलाबी कांदाभात वाढला. रस्सा आणि मटण वाढले. बटेरचेही तुकडे करुन भाताच्या ढिगावर ठेवले. शकीलच्या पत्रावळीत मसाला पावडर आणि तेल मिक्स करुन चटणी वाढली. शाम्याने कांदाभात शकीलसाठीच केला होता. त्यामूळे त्याला वेगळ्या भाजीची गरज नव्हती. रस्सा अगदी चवदार झाला होता. बटेरही अगदी खोबऱ्यासारखे भाजले होते. अर्ध्या तासात आम्ही सगळा भात आणि रस्सा संपवून भांडी अगदी घासल्यासारखी लख्ख केली. हात वगैरे धुवून, तृप्त होवून बाराच्या आसपास आम्ही लवंडलो. थंड हवा सुटली होती. सगळीकडे दुधासारखे चांदणे पडले होते. व्होडका जरा जास्तच झाली होती. शकील आणि शाम्या पडल्या पडल्या काहतरी गप्पा मारत होते. माझे डोळे आपसुक मिटले आणि मी अगदी काही मिनिटातच झोपी गेलो. 

सकाळी जाग आली तेंव्हा चांगलेच फटफटले होते. मी आणि धोंडबा सोडून सगळे उठून मंदिराकडे गेले होते. मी धोंडबाला उठवले. बाजूची बादली घेवून दोघेही पलीकडील घळीत जावून आलो. आम्ही येवून सगळे सामान आवरुन, बांधून ठेवले. थोड्याच वेळात सगळे येताना दिसले. शाम्याने कद घातला होता. हातात लहानसे ताट होते. म्हणजे याचा अभिषेक उरकला होता. सगळ्यांच्याच अंघोळी उरकल्या होत्या. शाम्याने कपडे बदलले. ज्याने त्याने सामान पाठीवर व्यवस्थित घेतले आणि आम्ही निघालो. मला काही देवदर्शन करायची इच्छा नव्हती. मी आणि धोंडबाने कुंडात अंघोळी केल्या. कपडे बदलले आणि आम्ही सगळे तारामतीकडे निघालो. मला चालताना चांगलाच शिण जाणवत होता. रात्रीच्या व्होडकाचा परिणाम असावा. मी बळेच सगळ्यांच्या मागे ओढल्यासारखा चालत होतो. उन कोवळे होते. हवा अल्हाददायक होती पण मला उत्साह वाटत नव्हता. मी तारामतीच्या पायथ्यालाच बसकन मारली आणि म्हणालो “तुम्ही जा रे सगळे. मी थांबतो येथेच झाडाखाली. मला नाही चढवणार आता अजिबात” कुणीही आढेवेढे घेतले नाही. शकीलने रामला माझ्या सोबत थांबायला सांगीतले आणि सगळे तारामतीकडे निघाले. या धोंडबाने सगळा घात केला होता. उगाच त्याने आबाकडून ती व्होडका आणली होती. पण त्यामुळे कालची संध्याकाळ फारच सुरेख गेली होती. मी आणि रामने तेथेच ताणून दिली. मला पुन्हा झोप लागली. काही वेळाने दत्त्याने मला हलवून जागे केले.
“आले इतक्यात तुम्ही? की गेलेच नाही?” मी आश्चर्याने विचारले.
“आयला अप्पा झोप म्हनायची का झोपंचं भुत. अकरा वाजून गेलं. हाय कुटं तू!”
खरच की. मी आजुबाजूला पाहीले तर उन्हं चांगलीच लखलखायला लागली होती. सगळे घाम पुसत माझ्या आजुबाजूला टेकले होते.
शाम्या म्हणाला “काय अप्पा, येथेच झोपलास तू. अरे काय दृष्य दिसते वरुन. भारी”
“जावूदे रे. किती वेळा पाहीलय ते. भुक लागलीय मला. खाऊन घेवू आणि गड उतरायला सुरवात करु”
“मी बी तेच म्हंनार व्हतो” म्हणत धोंडबाने पिशवीतून दशम्या काढल्या. दोन कांदे हाताने फोडले. एका दशमीवर मसाला ठेवून त्यात तेल कालवले आणि सगळ्यांच्या मध्ये ठेवले. सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या. दहा मिनिटात सगळ्या दशम्या संपल्या. चटणी कालवलेली दशमी माझ्या हातात देत शकील म्हणाला “ही घे. तुला आवडते ना चटणीत भिजलेली दशमी? आता आवरा जल्दी आणि निघा”
पोट गच्च भरल्यामुळे मी पुन्हा आडवे व्हायचा प्रयत्न केला पण दत्त्या एकदम अंगावर आला “अप्पा आता नाटाक करु नको बर्का. सुर्य बोडक्यावर आलाय पार. उन्हात तळायचय का? हाल अदुगर. उठ पह्यला”
आम्ही सगळेच मग बुड झटकत उठलो आणि राजदरवाज्याच्या वाटेकडे निघालो. मी सोडून बाकी सगळे अगदी ताजेतवाने होते. दत्ता सगळ्यांच्या पुढे काठी घेवून चालला होता आणि धोंडबा सगळ्यांच्या मागे होता. चालताना वाळलेल्या गवतातून टप्पोरे नाकतोडे उंच उड्या मारत होते. मध्येच दोन भेकरं आमच्या वाटेवरुन आडवी पळाली. गवत संपले आणि समोर जळून काळे झालेले लहानसे सपाट मैदान लागले. आम्ही गवतातून एकदम उघड्यावर आलो. उन्हाचा चटका चांगलाच जाणवला. मला समजेना आम्ही नक्की कुठे आलो ते. या बाजूला कसे काय पठार असेल? रस्ता तर चुकलो नाही. मी सोपानाला पुढे घेतले. तोही बावचळला होता. त्याने आजुबाजूच्या डोंगररांगा निरखून पाहील्या आणि म्हणाला “आपन राजदरुज्याच्या बाजुलाच हाय पण वाटवर नाय. वाट हरावली जनू”
मी हबकलोच. गडावर वाट हरवने म्हणजे काय असते ते मला चांगले माहित होते. 
“अरे सोपाना, तुला पुढे रहायला काय झाले होते? तु असल्यामुळे सगळेच निष्काळजीपणे चालले होते ना? आता काय करायचे?”
दत्त्या म्हणाला “अप्पा यवढा घाबरतो कशापायी? गडावरच अडाकलोय ना? का चंद्रावर अडाकलोय? घावन वाट. जरा दम काढ. त्याला इचार करुदे.” आम्ही त्या जळून काळ्याभोर झालेल्या मैदानाच्या मधोमध उभे होतो. मागे सगळे खांद्याइतके उंच गवत पसरले होते तर समोर कातळ खाली कुठे तरी उतरत होता. दरी होती की उतार होता ते येथून दिसत नव्हते. सगळेच वाटेचा अंदाज घेत आजुबाजूला पहात होते. 
इतक्यात धोंडबा अगदी बेंबीच्या देठापासुन ओरडला “आरं पळा म्होरच्या अंगाला. वनवा पेटलाय मागं. थांबू नका, पळा”
मी त्याला थांबवत म्हणालो “तुझं काय मधेच आता. कुठे दिसला तुला वणवा? आणि आपण अगोदरच जळालेल्या जमीनीवर आहोत. काय होणारे? घाबरवू नकोस सगळ्यांना”
धोंडबा घाबरलेल्या आवाजात म्हणाला “आरं तिन परस तरी जाळ आसन. आन चारी बाजूला पघ. सम्दीकडं गवातच हाय. या टिचभर जागत नुसत्या गर्मीनं मरु. पळायचं पघ. हरनावानी पळतोय ह्यो गवताचा वनवा. आवरायचा नाय आपल्याला” (३ परस=साधारण २० फुट उंच)
शकीलला आणि दत्ताला अंदाज आला. त्यांनी राम, शाम आणि ठोब्बाला पुढे काढले. शकीलने दत्तालाही हात धरुन पुढे काढले आणि धोंडबाला आवाज देवून सांगीतले “धोंडबा पळ. अप्पाको निकाल वहाँसे जल्दी”
आम्ही माथ्यावर उभे होतो. मी मागच्या गवताकडे पाहीले. ते छान हवेवर डोलत होते. पण आता हळू हळू बंदुकींच्या फैरी झडाव्या तसा कडकड आवाज यायला सुरवात झाली. डोलणाऱ्या गवताच्या वर हवा एकदम मृगजळासारखी हलताना दिसायला लागली. एकदम अतिशय गरम हवेचा एक झोत अंगावरुन गेला. डोळ्यांची आग झाली. घसा एकदम कोरडा पडल्यासारखा झाला. धोंडबाने एका झटक्यात माझा हात ओढला. चांगलाच हिसडा बसुन मी त्याच्या मागे ओढला गेलो. पण आम्ही जाणार कुठे? दोन्ही बाजूला उंच वाळलेले गवत होते. मागच्या बाजूला हरणाच्या वेगाने धावणारा वणवा होता आणि समोर काय होते ते आम्हाला माहीत नव्हते. कदाचीत उतार असेल किंवा खोल दरीही असेल. पण आम्हाला तिकडे पळण्यावाचून दुसरी वाट नव्हती.  माझ्या डोळ्यापुढून आई-बाबा, इन्नी यांचे चेहरे तरळून गेले.

क्रमश:

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...