❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, २१ मे, २०१८

मा.ल.क.-३

      एका विद्वान महाशयांचा दिवसाचा बहुतेक वेळ त्यांच्या अत्यंत अद्ययावत असलेल्या ग्रंथालयातच जाई. त्यांच्या ग्रंथसंग्रहात देशो-देशीचे अनेक भाषेतले, अनेक विषयांवरचे ग्रंथ होते. त्यांनी स्वतः लिहिलेल्या ग्रंथांनी एक स्वतंत्र कपाट भरलेले होते. काव्य, शास्र, विनोद, व्याकरण, ज्योतिष सारख्या अनेक विषयात ते पारंगत होते. देशाच्या कोणत्याही भागात कुणी अभ्यासक किंवा विद्वान रहातात असे या 'विद्वानमहाशयांना' कळाले की ते तडक आपली प्रवासाची तयारी करत आणि त्या दिशेला मार्गस्थ होत. मग समोरच्या अभ्यासकाला अथवा विद्वानाला ते जाहीर सभा भरवून वादाचे आव्हान करत. मग काय? विद्वानांच्या त्या सभेत ते समोरच्याचे मुद्दे अत्यंत अभ्यासपुर्ण वक्तृत्वाने खोडुन काढत. देशातला असा एकही प्रांत नव्हता की त्या प्रांतातल्या विद्वानाला या महाशयांनी वादविवाद हरवले नव्हते. त्यामुळे देशातल्या समस्त विद्वज्जनांमध्ये या महाशयांची चांगलीच जरब होती. आज त्यांचा मुक्काम 'विद्वानांची नगरी' असलेल्या काशीत होता. दुपारच्या प्रहरानंतर गंगेपलिकडे रहाणाऱ्या एका वेदांचा अभ्यास असलेल्या पंडीतांबरोबर शांकरभाष्यावर त्यांना चर्चा करायची होती. हे पंडीत म्हणजे या विद्वानमहाशयांचे सर्वात मोठे आणि शेवटचे प्रतिस्पर्धी होते. एकदा त्यांना भर सभेत हरवले की मग त्यांना कोणी स्पर्धक रहाणार नव्हते. सकाळपासुन ते त्याच विषयांवरची टिपने काढण्यात व्यस्त होते. ईतक्यात नोकराने अदबीने निरोप दिला "महाराज, गंगेवर नाव आली आहे." विद्वानमहाशयांनी आपले धोतर, पंचा, डोक्यावरचा रुमाल सर्व व्यवस्थीत केले आणि ते गंगेकडे निघाले.

      गंगेचे विशाल पात्र फार सुंदर दिसत होते. सुर्यनारायण मावळतीकडे झुकला होता. गंगेवरुन येणारी हवा प्रसन्न आणि अल्हाददायक होती. होडीही अत्यंत प्रशस्त होती. नावाडी फक्त एका आखुड पंचावर होता. त्याचे काळेभोर पण अत्यंत बांधेसुत, गोळीबंद शरीर ऊघडेच होते. दंडावर करकचून बांधलेला चांदीचा टपोरा ताईत चमकत होता. डोक्याला जुने पण स्वच्छ कापड घट्ट बांधले होते. मानेवर रुळणारे केस वाऱ्यावर भुरभूरत होते. विद्वानमहाशयांना होडीत पाऊल ठेवताना पाहून नावाडी तत्परतेने त्यांना हात द्यायला धावला. पण महाशयांनी त्याच्याकडे तिरस्काराने पहात त्याने पुढे केलेल्या हाताकडे दुर्लक्ष करुन होडीत प्रवेश केला. एका यःकश्चीत नावाड्याचा आधार घेणे त्यांना कमिपणाचे वाटले. महाशय नावेच्या एका टोकाला जावून बसले. दुसऱ्या टोकाला नावाडी ऊभा होता. त्याने हातातल्या बांबूने तळाला रेटा देत नाव हाकारली. थोडी डावीकडे, थोडी ऊजवीकडे कलत, थोडी थरथरत नाव निघाली. पण तेव्हढ्या थरथरीनेही विद्वानमहाशयांचे प्राण भितिने कंठापर्यंत आले होते. पण नाव स्थिर होता होता त्यांनी स्वतःला सावरले.

      नाव किनाऱ्यावरुन जरा खोल पाण्यात येताच नावाड्याने बांबू बाजुला ठेवून दोन्ही हातात वल्ही घेतली आणि तो लयीत नाव वल्हवायला लागला. नावाड्याच्या हालचाली पहात बसलेल्या विद्वानमहाशयांनी आवाजात शक्य तितका कोरडेपणा, तुसडेपणा आणत विचारले "काय रे कोळ्या? किती वेळ लागेल पैलतिर गाठायला?" 
नावाड्याने दोन्ही हात वल्ह्यांसहीत कपाळाजवळ नेत सांगीतले "महाराज आम्ही नाविक, गुहाचे वंशज. कोळी न्हाई. पल्याड जायला निदान दिड तास लागतो जी"
नावाड्याच्या ऊत्तराने महाशय अजुनच चिडले. त्यांच्या पहिल्याच वाक्यात नावाड्याने चुक काढली होती. अहंकारी मानसाचा अहंकार दुखवायला बरोबरीचाच मानूस लागतो असं काही नाही. नावाड्याचा पुर्ण पाणऊतारा करायचा या हेतुने महाराजांनी प्रश्नमालीका सुरुच ठेवली.
"काय रे नावाड्या, काही काव्य वगैरे जाणतोस का?"
"नाही महाराज"
"विस टक्के आयुष्य वाया गेले की रे तुझे. बरं, काही ग्रंथवाचन करतोस?"
"नाही महाराज"
"अरे वेड्या, तुझे तर चाळीस टक्के जीवन व्यर्थ गेले. निदान काही संतसाहीत्य वाचलेस?"
"नाही महाराज"
"अरे रे, तुझे साठ टक्के जगणे निरर्थक झाले. असो, निदान विद्वानांच्या सभेला तरी हजर रहातोस की नाही?"
"नाही महाराज"
"मुर्ख मानसा, तुझे ऐंशी टक्के आयुष्य हकनाक वाया गेले. किमान प्राकृतातील अभंग तरी गेलेत कानावरु की तेही नाही?"
"नाही महाराज"
"तुझ्या ईतकी मुढमती व्यक्ती मी आजवर पाहीली नाही. तु जगतो कसा आणि कशाच्या आधारावर मुढा?"
एवढा अपमान होऊनही नावाडी अत्यंत शांत हसला आणि त्याने त्याचे वल्हवणे एकाग्रतेने सुरुच ठेवले.

      होडी गंगेच्या पात्रात मधोमध, खोल पाण्यात पोहचली होती. हळूहळू वातावरणाचा रंग पालटू लागला. पश्चीमेकडून काळ्या ढगांची फळी पुढे सरकू लागली. मंद वहाणारा वारा सोसाट्याने वाहू लागला. संथ वहाणारी गंगामाई खवळू लागली. पाण्यात जागोजाग भोवरे तयार होवून त्यांचा आकार वाढत चालला. गंगेचे रुप रौद्र होवू लागले. होडी आता दिशाहीन भरकटू लागली. क्षणात वर तर क्षणात पाताळात गेल्यासारखी वरखाली हेलकावू लागली. नावेच्या तळाच्या लाकडी फळ्यांनी एकमेकांची साथ सोडायला सुरवात केली. पाणी आता होडीच्या आत यायला लागले. नावाड्याने डोक्याचे फडके काढून परत घट्ट बांधले. घाबरगूंडी ऊडालेल्या अभ्यासू, बुद्धीमान, सर्व विद्यांमध्ये पारंगत असलेल्या विद्वानमहाशयांना नावाड्याने विचारले 
"महाराज, पोहता येते का"
"नाही हो नावाडीमहाराज"
"माझे किती टक्के आयुष्य कुठे कुठे वाया गेले ते जावूद्या महाराज, पण तुमचे शंभर टक्के आयुष्य आता गंगार्पण होणार. राम राम घ्या आमचा." म्हणत नावाड्याने वल्ही टाकून पाण्यात ऊडी मारली.

मार्मिक लघु कथा


(कथासुत्र-अज्ञात, शब्दांकन-माझे)

मा.ल.क.-२


 एका गावातुन दुसऱ्या गावात जायचे असल्यास मधले काही मैलांचे जंगल पार करुन जावे लागत असे. जंगलातुन जाणारा रस्ता अतिशय सुंदर होता. घनदाट वनराई, मधेच गवताळ कुरणे, विस्तिर्ण जलाशय, लहाण-मोठ्या टेकड्या. पण रस्ता कितीही सुंदर असला तरी निर्जन होता. त्यामुळे वाटमारी करणाऱ्यांचा हा आवडता परिसर होता. गावातुन रस्ता ज्या ठिकाणी जंगलात शिरायचा तेथे एक टुमदार धर्मशाळा होती. कारण कुणालाही जंगल पार करायचे असले की तो या धर्मशाळेत थांबे. सकाळपर्यंत दोघे-चौघे जमा होत. मग एकमेकांच्या सोबतिने जंगल पार केले जाई. एकट्याने जायची सोयच नसायची दरोडेखोरांमुळे. 

      आषाढाचे दिवस होते. पावसाने नुसता धिंगाना घातला होता. दुर कुठेतरी विज कोसळली होती. बोचरे वारे वहात होते. एक एक करत धर्मशाळेत चार जण जमा झाले होते. एकमेकांची ओळख करुन घेत ते शेकोटीभोवती शेकत होते. भरुन आलेल्या आभाळामुळे सकाळ झाल्याचे त्या चौघांच्या ऊशीरा लक्षात आले. मग मात्र त्यांनी बांधून आणलेल्या दशम्या खावून घेतल्या आणि जंगल पार करण्यासाठी त्यांनी धर्मशाळा सोडली. जंगलात शिरायच्या आधी त्यांना मागुन कुणी तरी मारलेल्या “अहो, थांबा माझ्यासाठी” अशा हाका ऐकू आल्या. चौघांनीही मागे पाहीले. एक वाटसरु आपली पिशवी सांभाळत त्यांना येवून सामील झाला. चौघांनाही बरे वाटले. “चला, अजुन एक सोबती मिळाला” पण त्यांचा आनंद काही क्षणच टिकला. कारण सकाळपासुन थांबलेला पाऊस अचानक सुरू झाला. जणू काही येणाऱ्या नविन वाटसरुने येताना आपल्या सोबतच पाऊस आणला होता. पण आता थांबण्यात अर्थ नव्हता. त्या पाचही जणांनी मनातली हिम्मत गोळा केली आणि भर पावसात जंगलामध्ये पाऊल टाकले. मंद गतीने का होईना पण त्यांची पावले रस्ता मागे टाकू लागली. थोड्याच वेळात त्यांच्यात गप्पा सुरु झाल्या. पण त्या चौघांनी नविन आलेल्या वाटसरुला काही आपल्या गप्पांमध्ये सामावून घेतले नाही. त्यांना मनोमन वाटत होते की “हा आला आणि पाऊस सुरु झाला. याच्या येण्याने आपल्या अडचणीत भर पडली” आता मानवी स्वभावच असा आहे त्याला काय करणार. पण नविन वाटसरु मात्र “आपल्याला सोबत मिळाली” या समाधानाने चौघांबरोबर वाट चालत होता. 

      साधारण मैलभर अंतर पार केले असेल पाचही जणांनी. अचानक त्यांच्या समोर प्रचंड आवाज करत लखलखीत विज जमिनीवर ऊतरली. पाचही जणांचे डोळे त्या तेजाने विस्फारले. घाबरलेले ते काही वेळातच सावरले. आपण अगदी थोडक्यात वाचलो याची जाणीव होऊन त्यांच्या अंगावर काटा आला. काही अंतर जाताच परत एकदा त्यांच्या मागे काही अंतरावर विज कोसळली. सगळ्यांनी जलद पावले ऊचलायला सुरवात केली. पण काही वेळातच पुन्हा त्यांच्या डावीकडे, अगदी जवळच विज लखलखली. थोडे दुर जाताच परत तशीच विज समोर ऊतरली. अर्धा मैल पार करेपर्यंत विज सातत्याने त्यांच्या आजुबाजूला कोसळतच राहीली. आता मात्र त्या सगळ्यांच्या लक्षात आले की “आपण काही नशिबाने वाचत नाही आहोत” हा काही तरी वेगळा प्रकार असावा. पाचही जण कोसळत्या पावसात काही क्षण थांबले. विजेचे कोसळणे सुरुच होते. त्यांनी आपापसात बराच विचार केला, खल केला आणि निष्कर्ष काढला की “आपल्या पाच जणांमध्ये कुणीतरी नक्कीच पापी, कुकर्मी, वाईट असणार. त्याच्यासाठीच विज वारंवार कोसळते आहे. वेळीच त्या ईसमाला आपल्यातुन दुर केले नाही तर ही विज काही आपला पिच्छा सोडणार नाही.” पण ‘ती’ व्यक्ती कोण हे कसे ठरवायचे? कुणीही कबुल होईना “मीच तो पापी आहे ज्याच्यासाठी विज सारखी जमिनीवर ऊतरतेय” शेवटी सगळ्यांच्या संगनमताने यावर एक ऊपाय काढला गेला.

      पाऊस कोसळतच होता. समोरच मोठे गवताळ मैदान होते. सगळे एका झाडाखाली ऊभे राहीले. त्यांचे ठरले होते की प्रत्येकाने पाळीपाळीने समोरच्या मैदानात जावून ऊभे रहायचे. ज्याच्यासाठी विज येते आहे तो मैदानात ऊभा राहीला की विजेचे काम सोपे होईल व बाकिच्यांचा जीव वाचेल. ठरल्या प्रमाणे पहिला जीव मुठीत धरुन मैदानात जावून ऊभा राहीला. बराच वेळ झाला पण काही झाले नाही. तो आनंदाने ऊड्या मारत झाडाकडे परतला. आता दुसऱ्याची पाळी होती. तोही जावून खुप वेळ मैदानात ऊभा राहीला पण काहीही झाले नाही. तोही नाचतच झाडाकडे परतला. मग तिसरा गेला. तोही परत आला. त्यानंतर चौथा घाबरत गेला. पण तोही “वाचलो, वाचलो” ओरडत माघारी आला. आता नविन आलेल्या वाटसरुची पाळी होती. विज अजुनही कोसळतच होती. चौघांनीही अतिशय तिरस्काराने त्या वाटसरुकडे पाहीले. नाहीतरी सगळ्यांचे त्याच्याविषयी पहिल्यापासुनच वाईट मत झाले होते. त्यांच्या पैकी एकाने नविन वाटसरुच्या दंडाला धरुन त्याला मैदानाकडे ढकलले. नविन वाटसरु जड पावले टाकत मैदानाकडे निघाला. तो मैदानाच्या मधोमध जाऊन ऊभा राहीला मात्र कडाडून आवाज करत एक लखलखीत विज खाली आली आणि चौघैजण ज्या झाडाखाली ऊभे होते त्यावर कोसळली. 

मार्मिक घु था


(कथासुत्र-अज्ञात, शब्दांकन-माझे)

मा.ल.क.-१

मा.ल.क.-७           

एका छोट्याशा गावात एक अत्यंत गरीब ब्राम्हण मुलगा रहात होता. आई-वडील लहानपणीच वारलेले. नातेवाईकांनीही त्याला दुर लोटलेले. जवळ एकही पै नाही. वडीलांचा भिक्षूकी आणि पौरोहित्य हाच व्यवसाय असल्याने शेती-वाडी काही नाही. गावातच एका बाजुला वडीलोपार्जीत घर. तेही पडलेले. एक भिंत कशिबशी ऊभी होती. त्या भिंतीच्या आधारानेच हा मुलगा कसा तरी दिवस काढत होता. पुढे शिक्षण घ्यायची फार ईच्छा असल्याने माधुकरी मागुन आणि वार लावून शिक्षण घेत होता. गावातील अनेकांनी सांगुन पाहीले की “बाबारे, दिवस आता बदलत आहे. ऊपजिवीकेसाठी गरजेचे असलेले शिक्षण घे.” पण मुलाच्या मनात एकच विचार यायचा “पौरोहित्य हा आपला परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. आजोबांनीही तो केला, वडिलांनीही तोच केला. मग आपण परंपरा मोडून कसे दुसरे शिक्षण घ्यायचे. जे ज्ञान पुर्वापार चालत आले आहे त्याचा प्रवाह मध्येच तोडायचा आपल्याला काय अधिकार आहे? भले मला कुणी कर्मठ म्हटले तरी चालेल पण मी वैदिक शिक्षण घेणारच. 

          तो मुलगा रोज सकाळी पाच घरे माधुकरी मागून आणि. जे मिळे त्याचा कुलदैवताला नैवेद्य दाखवून स्वतः जेवत असे. दुपारपर्यंत त्याचे ‘अध्ययन’ चाले. दुपारी तो ठरलेल्या घरी वाराने जेवायला जाई. थोडा वेळ वामकुक्षी झाल्यानंतर त्याचे पाठांतर चाले. संध्याकाळी तो एकुलत्या एक भिंतीच्या आधाराने पाणी पिवून झोपत असे. असेच दिवसामागुन दिवस गेले, वर्षे गेली. या बारा वर्षात त्याच्या ज्ञानात खुप भर पडली. वेद, वेदांची ऊपांगे, थोडेफार व्याकरण, ज्योतिष असे जमेल ते ज्ञान त्याने आत्मसात केले. पण त्याची माधूकरी मागायची झोळी, एक-दोन धोतरे, आधाराची, पडायला झालेली भिंत यातमात्र काडीचाही फरक पडला नाही. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्याने गावातच पौरोहित्य सुरु केले. पण काळ बदलला होता. त्याच्या ज्ञानाची गावकऱ्यांना फारशी गरज भासत नव्हती. गावातीलच मंदिरात पुजेचे काम करुन मिळणाऱ्या मुठभर तांदुळ आणि काही फळांवर त्याची ऊपजिविका कशीबशी चालली होती. अशा या निष्कांचन अवस्थेमुळे त्याला कुणी मुलगीही देईना. लग्नाचे वय निघून गेले. वय ऊतारवयाकडे झुकू लागले. दातावर मारायलाही पैसा नव्हता. मंदिराचा ‘जुना पुजारी’ म्हणून गावकरी काही बाही देत. पण आता हातातून पुजाही होईना. वयोमानाने आलेल्या विस्मृतीमुळे आता पाठ केलेलेही आठवेणा. काळजी घ्यायला कुणीही नव्हते. संसारच नव्हता. येवून जावून ती एकूलती एक खचलेली भिंत, त्या भिंतीच्या खुंटीला टांगलेली झोळी, भिंतीतच असलेल्या कोनाड्यात असलेले देवघर, एक अंगावरचे व एक वाळत घातलेले असे धडके दोन पंचे एवढाच काय तो त्याचा संसार होता.

           आज सकाळपासुनच पावसाने मुसळधार सुरवात केली होती. माधुकरीला जायला जमत नव्हतेच आजकाल त्याला, पण कुणीतरी गावकरी काही-बाही आणून देई. पण पावसामुळे आज कुणीही ईकडे फिरकले नव्हते. तो ऊपाशीच होता तसेच देवघरातले त्याचे देवही ऊपाशीच होते. वाळत घातलेला पंचा वाऱ्यावर फडफडत होता. त्याच्याही आता दशा निघायला लागल्या होत्या. पावसाचा जोर वाढत होता. वाऱ्यापासुन आणि पावसाच्या फटकाऱ्यांपासुन स्वतःला वाचवण्यासाठी तो आणखी आणखी भिंतीला खेटून, तिच्या पोटात शिरल्यासारखे करुन अंग जास्तीत जास्त आकसुन घेत होता. ईतक्यात विज कोसळल्यासारखा आवाज झाला. हळू हळू खचत ती भिंत धाडकन कोसळली. म्हाताऱ्या ब्राम्हणाच्या सगळ्या दुःखांचा, वेदनेचा क्षणात अंत झाला. ज्या भिंतीने त्याला आयुष्यभर आधार दिला तिनेच त्याला आपल्या पोटात घेतले. कोसळलेल्या भिंतिच्या ढिगावर पाऊस आपले पाणी ओततच होता. भिंतीतल्या दगड-विटांवरचा ईतक्यावर्षांचा मातीचा गिलावा पावसामुळे धुवून निघत होता. 

           सकाळी गावकरी जमले. भिंत कोसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सगळे म्हाताऱ्याच्या काळजीने भिंतीकडे धावले. सगळे गाव गोळा झाले. आणि त्या कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाकडे पहात असताना गावकऱ्यांचे डोळे विस्फारले, तोंडाचा ‘आ’ झाला. समोरच्या ढिगातली प्रत्येक विट सकाळच्या कोवळ्या ऊन्हात लखलखत होती. अस्सल बावनकशी सोन्यापासुन बनवलेल्या त्या विटांखाली ‘गरीब, बिचाऱ्या’ ब्राम्हणाचा ऊपासमारीने सुकलेला देह कुस्करुन गेला होता.

मार्मिक घु था


(कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे.)

गुरुवार, १७ मे, २०१८

ज्ञानेश्वरी


   

   मला जेमतेम वाचता यायला लागले आणि वडीलांनी वाढदिवसाला पुस्तके भेट द्यायला सुरवात केली. सुरवातीला कंटाळा यायचा. इतरांना कशा छान भेटवस्तू मिळतात असे वाटे. मग हळूहळू वाचनाची आवड निर्माण झाली. मला आठवतय, पंधरावा वाढदिवस होता माझा. वडिलांनी ज्ञानेश्वरी भेट म्हणून दिली. मनात ज्ञानेश्वरीचा दरारा होता. हे मोठ्या माणसांचे पुस्तक आहे असं वाटे. मग वडीलांनी कानावर पडणाऱ्या सुंदर चालीच्या ओव्या दाखवल्या ज्ञानेश्वरीतल्या. पसायदान समजावून दिले. मग मात्र ज्ञानेश्वरीची भिती गेली. रोज नविन काय सापडते ते पहाण्यासाठी ज्ञानेश्वरी ऊघडायला लागलो. अशा प्रकारे हा ग्रंथराज माझ्या आयुष्यात आला.

ज्ञानेश्वरी वाचताना मी नवव्या अध्यायात जरा जास्त रेंगाळतो. का ते माहीत नाही पण मला नववा अध्याय जास्त भावतो. ‘राजविद्याराजगुह्ययोगअसे काहीसे जड नाव आहे या अध्यायाला. बऱ्याच जाणकारांच्या मते हा अध्याय समजण्यास जरा अवघड आहे. पण मला मात्र हा खुप सोपा आणि जवळचा वाटतो. जवळचा या साठी की माऊलींनी यात लिहिलेल्या काही ओव्या आजसाठी अगदी चपखल बसतात. कधी कधी वाटते की त्या आजच्यासाठीच लिहिल्यात की काय. आज समाजात ज्या वृत्ती फोफावत आहे, माणसाची जी वृत्ती बनली आहे त्याचे अगदी यथायोग्य वर्णन माऊलींनी केले आहे. दुसरीही एक आवडणारी बाजू म्हणजे या अध्यायातली माऊलींनी वापरलेली भाषा. ज्ञानेश्वरीच्या बहुतेक अध्यायाची सुरवात माऊली सद्गुरुंना नमन करुन करतात. त्यातली अनेक गुढ तत्वज्ञान आणि अध्यात्मज्ञान असलेली आहेत जी समजायला खुप अवघड जातात. किंबहुना तेव्हढी योग्यताही माझ्याकडे नाही. पण या अध्यायाची सुरवात ईतकी रसभरीत आहे की वाचताना अक्षरशः मन मोहरुन येते. इतक्या सुंदर सुंदर उपमा देऊन माऊली आपल्याशी संवाद साधतात की विचारू नका. ही काव्यप्रतिभा पाहून थक्क व्हायला होते.  

माणूस किती नम्र होवू शकतो, समोरच्याला किती मोठेपणा देवू शकतो याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे या अध्यायातील सुरवातीच्या ओव्या. आजकाल कुणाची ऐकायची तयारी नसते, समोरच्याचे विचार स्विकारण्याची तयारी नसते. आपलं मात्र ऐकावे हा हट्ट असतो. आणि ते सांगणेही आपल्या पद्धतीने असते. पण येथे मात्र ज्ञानीयांचा राजा, ज्यांनी विश्वशांतीसाठी पसायदान मागीतले त्यांना ईतके नम्र होताना पाहून मन चकीत होते. मला तुम्हाला काही सांगायचे आहे आणि तुम्ही ते कृपया ऐकावे यासाठी माऊलींनी विनयाची अगदी परिसिमा गाठलीय
माऊली म्हणतात:

अवधारां आवडे तेसणा धुंधूरु। परि महातेजीं मिरवे काय करु।
अमृताचियां ताटीं वोगरु। ऐसी रससोय कैंची॥

मी ईतका लहान आहे आपणापुढे की, काजवा कितीही चमकला, तरी सुर्यापुढे त्याने काय मिरवायचे, किंवा ज्या ताटात आगोदरच अमृत वाढले आहे त्या ताटात मी कोणते पक्वान्न वाढणार? पण तरीही तुम्ही प्रेमाने मी काय सांगतो आहे ते ऐकावे. माऊली स्वःताकडे लहानपण घेऊन समोरच्याला फार मोठेपणा देतात. मी मुलासारखा आहे तुमच्या हे सांगताना ते म्हणतात की:

बाळक बापाचिये ताटीं रिगे। रिगौनि बापातेंच जेवऊं लागे।
कीं तो संतोषललेनि वेगें। मुखचि वोडवि॥

लहान मुल जसे वडीलांच्या ताटात जेवते आणि जेवता जेवता वडीलांनाच घास भरवू लागते आणि वडीलही प्रेमाने तोंड पुढे करतात तद्वत मी ही आपले लहान बालकच आहे असे समजून मला सांभाळून घ्या. हे ईतके मनापासून विनवणे कशासाठी? तर ऐकणाऱ्याच्या भल्यासाठी. बरं आपलं भलं झाले तर यात माऊलींचा काय फायदा? मग कशासाठी ईतका विनय? थोडं विषयांतर करतो. तिन प्रकारचे वैद्य असतात. एक जो आलेल्या रुग्णाला तपासुन औषध लिहुन देतो. दुसरा जो निदान करुन स्वतःजवळील औषध देतो आणि तिसरा जो निदान करुन आपल्याजवळील औषध रुग्णाला स्वतःच्या हाताने भरवतो. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहायची आणि मोकळे व्हायचे. पण त्यांना आपल्या भल्याची काळजी. म्हणून एवढी विनवणी. पण एवढ्या कळवळून सांगीतले तरी आपण ऐकतो का? तर नाही ऐकत. वाचतो का? तर नाही वाचत. वाचत नाही म्हणजे मनन चिंतन करायचा प्रश्नच नाही. बरं, आपण आध्यात्म ठेवूया बाजूला. मला ईतकच म्हणायचं आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी अध्यात्म म्हणून नका वाचू पण तिचं साहित्यिक मुल्य जाणून घेण्यासाठी तरी वाचाल की नाही. त्यातलं काव्य जाणून घेण्यासाठी तरी वाचाल की नाही. किमान माऊलींच्या साहित्यावर जगभर अभ्यास केला जातो, तो का केला जातो ते जाणून घेण्यासाठी तरी वाचाल की नाही. किमानमी ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न केला पण काही समजले नाहीअसं म्हणन्यापुरते तरी वाचा. अनेक अनुवादीत कथा, कादंबऱ्या वाचायच्या. काव्यसंग्रह वाचायचे पण ज्ञानेश्वरीला म्हातारपणी वाचायचा ग्रंथ म्हणून बाजुला सारायचे हे काही बरे नाही. वाचल्याशिवाय कसे कळेल की काय खजिना आहे त्यात. माऊलींच्याच ओवीत सांगू का
माऊली एके ठिकाणी म्हणतात की:

नातरी निदैवाचां परिवरी। लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी।
परि तेथ बैसोनि उपवासु करी। का दरिद्रें जिये॥

जमिनीखाली हजार सुवर्णमुद्रा पुरलेल्या आहेत आणि हा शहाणा त्यावर बसुन दरिद्री जीवन जगतो, उपाशी रहातो. बुडाखाली सोनं पुरलं आहे हे माहितीच नाही तर तो तरी काय करेल. आपलीही काहीशी अशीच अवस्था झाली आहे. जवळ जवळ प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आहे पण त्यात काय मौल्यवान ठेवा आहे हे माहीतीच नाही आपल्याला. मी परत सांगतो, येथे मी अध्यात्मावर बोलतच नाही, ती पात्रताही नाही माझी. मी साहित्यीक दृष्ट्यामौल्यवान ठेवाम्हणतो आहे. इंटरनेट, फेसबुक, टेलीव्हीजन, माहीती तंत्रज्ञानाच्या या जगात आपण नक्की काय सोडून कशामागे धावतो आहे तेच कुणाला समजेनासे झालेय असं मला वाटतं. हातातून काय सुटलय याचे भान नाही आणि कशापाठी धावतोय त्याची जान नाही. यावरुन मला माऊलींची एक ओवी आठवतेय.

बहु मृगजळ देखोनि डोळां। थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा।
तोडिला परिसु बांधिला गळा। शुक्तिकालाभे॥

समोर मृगजळ पाहून तोंडातला नुकताच घेतलेला अमृताचा घोट थुंकून टाकायचा आणि मृगजळामागे धावायचे किंवा पुढे पडलेल्या शिंपल्याची चमक पाहून गळ्यात बांधलेला परीस तोडायचा आणि शिंपला ऊचलायचा. असा काहीसा आपला प्रकार झालाय इंटरनेटच्या जगात. परत एकदा स्पष्ट करतो की मी इंटरनेटला, आजच्या तांत्रीक प्रगतीला अजिबात दोष देत नाहीए पण त्याव्यतिरीक्त सुध्दा आहे ना बरेच काही जे फार सुंदर आहे, छान आहे आणि पटणार नाही पण फार गरजेचही आहे. मी हे का सांगतोय? सुदैवाने घरात ज्ञानेश्वरी आहे, ती वाचणारे वडिलधारेही आहेत. पण दुर्दैवाने वडिलधारे ज्ञानेश्वरी वाचत नाहीत तर तिची पारायणे करतात. माऊलींच्या फोटोची नेमाने पुजा करतात पण कोणी ज्ञानेश्वरी समजुन घेत नाही. घरातल्या लहानांना ती समजावून सांगत नाही. आणि काही कारणांमुळे वडिलधारे नसतील तरी ज्ञानेश्वरी आहेच ना.

असो. या लेखाचा विषय होता माऊलींनी आजच्या काळाला अनुसरुन सातशे पेक्षा जास्त वर्षांपुर्वी लिहिले होते. त्या ओव्या इथे देतोविषय आहेआपली श्रध्दा कशा प्रकारची असते आणि ती कशी दुखावतेआपल्या काय कल्पना असतात ईश्वराविषयी आणि तो नक्की कसा आहे हे सांगता माऊली खुपच परखड मत मांडतात. ते म्हणतात:

जैसा दीपु ठेविला परिवरीं कवणातें नियमी ना निवारी।
आणि कवण कवणिये व्यापारीं राहाटे तेंहि नेणें॥ 

या पेक्षा अजुन किती स्पष्ट लिहावे माऊलींनी? खरं तर यावर अजुन लिहायला हवं पण असो. माऊलींनी फार स्पष्ट लिहिले आहे. लेख मोठा होईल म्हणून अर्थ देत नाही. पण तो सहज समजेल. नाहीच समजला तर विचारा.
माऊली म्हणतात:

मज अनावरणा प्रावरण। भूषणातीतासि भूषण।
मज सकळकारणा कारण।देखती ते॥६२॥

मज सहजातें करिती। स्वयंभातें प्रतिष्ठिती।
निरंतराते आव्हानिती। विसर्जिती गा॥६३॥

मी सर्वदा स्वतःसिद्धु। तो कीं बाळ तरुण वृद्धु। 
मज एकरुपा संबंधु। जाणती ऐसे॥६४॥

मज अकुळाचें कुळ वानिती। मज नित्याचेनि निधनें शिणती।
मज सर्वांतरातें कल्पिती। अरि मित्र गा॥६६॥

सगळ्यात महत्वाची आणि अतिशय स्पष्ट ओवी

जंव आकारु एक पुढां देखती। तवं हा देव येणें भावे भजती।
मग तोचि बिघडलिया टाकिती। नांही म्हणोनि॥

मी आत्मा एक चरारीं। म्हणती एकाचा कैंपक्ष करी।
आणि कोपोनि एकातें मारी। हेंचि वाढविती

खरं तर या पंधरापेक्षा जास्त ओव्या आहेत. पण थांबतो.
थांबता थांबता मला अतिशय आवडणारी ओवी सांगुन संपवतो. ज्ञानोबांची एखादी ओवी आपल्याला लागू व्हावी एवढे कुठले माझे भाग्य पण खालील ओवी मला स्वतःला अगदी तंतोतंत लागू होते.

एथ जाणीव करी तोचि नेणें। आथिलेपण मिरवी तेंची उणें।
आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे। तो कांहींचि नव्हे॥

याचा थोडक्यात अर्थ सांगायचा तर संत भीखा साहिब यांच्या शब्दात

भीखा बात अगम की, कहन सुनन की नाही।
कहे सो जाने ना, जाने सो कहे नाही॥

काय लिहावे, किती लिहावे? मला वाटते प्रत्येकाने एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी. तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक हा मुद्दा अगदी गौण आहे अगदी. असो, बाकीचे परत कधी

(ओघात जे सुचले ते लिहिले. कुणाला काही सांगायची माझी पात्रता नाही. किंवा मी कुणाच्या जीवनशैलीविषयी काही भाष्यही करत नाहीए हे कृपया लक्षात घ्यावे.)

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...