❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, २ जानेवारी, २०२३

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव. अशात जर वाफाळती मिसळ समोर आली तर मोह आवरत नाही. एक वेळ रंभा मेनका समोर आल्या तरी चित्त चळणार नाही पण मिसळ म्हटल्यावर ताबा जातोच मनावरचा. ‘जी मेनकेसी परौते सर म्हणती’ अशी मिसळ समोर असल्यावर त्या रंभेला काय चाटायचय? (माफ करा माऊली)
जसा मानवतेला कोणताही धर्म नसतो तसेच मिसळला कोणतेही गाव नसते. हे कोल्हापुर, पुणे व नाशिकवाले उगाच मिसळवरुन भांडत असतात. (मी पुणेकर आहे तरीही हेच मत आहे माझे) मी तिनही शहरांमधे नावाजलेल्या सगळ्या मिसळ खाल्या आहेत. त्या आपापल्या जागी ठिक असल्या तरी गावाकडच्या मिसळची चव त्यांना नाही. एक तर शहरांमधल्या मिसळमधे असणारी शेव ही अस्सल बेसनपिठाची असण्याची शक्यता फार कमी. निर्भेळ बेसन पिठाची शेव रस्स्यामधे पडल्यानंतर तिस सेकंदात मऊ होते. शहरांमधल्या मिसळमधे असणारी शेव ही मिसळ संपत आली तरी कुरकुरीत रहाते बऱ्यापैकी. यावरुन समजा काय ते. आणि मसाल्याचे म्हणाल तर क्वचितच कुणी मिसळसाठी घरी मसाला करत असतील. गावाकडे तेल, बेसन या गोष्टी निर्भेळच वापरल्या जातात. गावाकडे म्हणजे माझ्या गावाचे कौतूक नाही करत मी. तुम्ही कुठल्याही गावात मिसळ खा. ती उत्तमच असेल. गावच्या मिसळचा नाद शहरातल्या मिसळणे करुच नये. शहरी मिसळ म्हणजे मेंढराच्या कळपामधे वाढलेले व स्वत्व विसरलेले वाघाचे बछडे. नुसते रुप वाघाचे, सवयी सगळ्या मेंढीच्या. अशा मिसळमधे फरसानच असेल, बटाटे-पोहेच असतील, चिंच-गुळच असेल काहीही असेल. आजकाल तर चिज मिसळही मिळायला लागलीय. उद्या न्युटेला मिसळ मिळाली तरी आश्चर्य वाटायला नको. बरं तिची सजावट एवढी की नाकापेक्षा मोती जड. स्टिलच्या मोठ्या ताटात, जिलेबीचे दोन वेढे, गुलाबजाम, बासुंदीची वाटी, पापड, बिटाचे तुकडे, लोणचे वगैरे काय वाट्टेल ते असते. मिसळ बिचारी ताटाच्या कोपऱ्यात हिरमुसून बसलेली असते. ‘माणूस अगोदर डोळ्यांनी जेवतो व मग तोंडाने’ असं म्हणतात. हे असलं मिसळच ताट पाहीलं की माझी भुक मरते.
गावाकडे जरा वेशीबाहेर, शेतीभातीने वेढलेले एखादे मिसळचे हॉटेल असते. येथे फक्त मिसळ मिळते. समोरुन अरुंद पण नेटका डांबरी रस्ता गेलेलला असतो, तिनही बाजूने हिरवीगार शेती असते, शेजारीच दोन तिन आंब्यांची झाडे असतात, शेतांमुळे हवेत जास्त गारवा असतो, हॉटेलवाला मित्रच असल्याने मिसळच्या अगोदर गप्पांचा फड जमतो. मिसळही अगदी घरी पंगतीला बसल्यासारखी आग्रह करकरुन वाढली जाते. पाव खाण्याच्या पैजा लावत रस्स्याचे भांडे रिकामे केले जाते, ज्या वेगात ते भांडे रिकामे होते त्याच वेगात हॉटेलवाला ते भरत रहातो. खिशातले रुमाल हातात व मग हातातले रुमाल नाका डोळांपर्यंत जातात. पंगतीत पाळायचे नियम येथेही पाळले जातात. सगळ्यांची मिसळ खाऊन झाल्याशिवाय कुणी हात धुत नाहीत. मग मजेत एकमेकांच्या हातावर पाणी घालत ओट्याच्या कडेला उभे राहून हात धुवायचे. तोवर गोड व घट्ट चहा आलेला असतो. मिसळनंतरचा चहा हा फक्त ‘जिभेच्या शेंड्याला चटका’ म्हणून घ्यायचा असल्याने दोन चहा पाच जणांना पुरतो. मग बिल देताना ‘मी देतो, मी देतो’ असा वाद न होता ‘तू दे, तू दे’चे भांडन होते. एखाद्या कंजुष मित्राच्या खिशाला चाट मारल्याच्या आनंदात, जिभेवर मिसळ व गोड चहाची चव घेऊन मग दिवसाची सुरवात होते. ही असते आमच्या गावाकडची मिसळ.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...