❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

गावाकडच्या गोष्टी

पुण्या-मुंबईत राहून मी गावाकडच्या अनेक गोष्टींसाठी गहिवरुन यायचो. तास तासभर बायकोला काहीबाही सांगत रहायचो. “झालं याचं सुरु!” असं म्हणत बायको जरी मला झटकत असली तरी माझा उद्देश तिला ऐकवण्याचा नसतोच, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. तिच्या निमित्ताने मी स्वतःशीच या गोष्टींची उजळणी करुन घेतो. अर्थात यामागे “आमच्या काळी यंव अन् त्यंव” किंवा “तुम्हा शहरातल्या लोकांना काय माहित गावची मज्जा” असला काहीही सुर नसतो. त्या त्या गोष्टी माझ्या आनंदाचा ठेवा असतात आणि मी त्यांची आठवण काढत रमतो एवढाच या बडबडीचा अर्थ असतो. गाव सोडून पोटामागे जे शहरात आलेत त्या बहुतेकांची कधी ना कधी ही बडबड असतेच असते. ज्यांचं बालपणच शहरात गेलय त्यांना मुळातूनच या गोष्टी, वस्तू, पदार्थ वगैरे माहित नसल्याने त्यांना त्या अभावाचा पत्ताच नसतो.
या गोष्टींमधे लहानपणच्या खेळांपासून ते त्यावेळी आम्ही वापरलेल्या शाईपेन व लाल-निळ्या खोडरबर पर्यंत काहीही असते. पण मुख्य असतात ते खाण्याचे पदार्थ व ते करण्याच्या पद्धती. हा नॉस्टेल्जियाचा झटका महिना पंधरा दिवसातून एकदा येतोच येतो. तो झटका आला की मग रविवारी आयतं समोर आलेलं फ्रेंच ऑम्लेट असो की बंबईय्या अंडा घोटाला असो, बेचवच लागतं. गाईच्या शेणात लपेटून चुल्हीच्या आ(हा)रात भाजलेली गावठी अंडी आठवतात व त्यापुढे फ्रेंच ऑम्लेट अगदी सपक लागतं. गम्मत म्हणजे ही तुलना आजच्या पोरांना सांगायची सोय नसते. कारण ती चव तर त्यांना माहित असायचे दुरच, अंडी अशाप्रकारे शेणात लपेटून भाजतात हेच त्यांना माहित नसते. गाय दोहताना (धुताना) रिकामा पितळी ग्लास घेऊन धार काढणाऱ्याच्या शेजारी उकीडवे बसण्यातली मजा पोरांना माहित नसतेच, शिवाय असे धारोष्ण दुध प्यायल्यावर येणाऱ्या पांढऱ्या मिशाही त्यांना माहित नसतात. ‘धारोष्ण’ म्हणजे काय येथून त्यांचे प्रश्न सुरु होतात. एकदा मी धारोष्ण म्हणजे काय ते सांगुन ते दुध किती गोड लागते हे सांगायच्या अगोदर मुलांनी तोंडे वाकडी केली होती. त्यांना असं गायीच्या सडातून दुध काढून ते लगेच पिणं हा प्रकारच विचित्र वाटला होता, अनहायजेनिक वाटला होता. आज या गोष्टी कौतूकाच्या झाल्या असल्या तरी गावी मात्र आजही या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी आहेत. गावी घरातली मुलंच काय, मांजरही धारोष्ण दुध पिते. जे दुधाचे तेच तुपाचे, तेच मधाचे व तेच रानमेव्यांचे. शहरातल्या मुलांना मधाचे पोळे मधाच्या बाटलीवर असलेल्या स्टिकरवरच पहायला मिळते किंवा ईमारतीच्या नवव्या दहाव्या मजल्यावर असलेले मधाचे पोळे दुरुन दिसते. गावी जरी दुकानात मध मिळत असला तरी तो फार तर सत्यनारायणाच्या पुजेसाठी आणला तर आणतात. खाण्यासाठी मध हवा असला की डोंगरात निरोप पाठवायचा. दोन दिवसात अस्सल मध घरी पोहचतो. या डोंगरातल्या माणसांकडे स्टिलची पिंपे भरुन अस्सल मध साठवलेला असतो. त्यातही कुणाला खास मध हवा असेल तर त्या त्या सिजनच्या अगोदर निरोप धाडला की मधाची बाटली पोहच होते वेळेवर. मग कुणाला औषधासाठी कडुलिंबाच्या रानातला मध हवा असतो तर कुणाला मोहाच्या सिजमधला मध हवा असतो. प्रत्येकाची चव वेगळी, रंग वेगळा व औषधी गुणधर्मही कमीजास्त असतात. मॉलमधल्या मधात असले पर्यात नाहीत. असले तरी ते अवाच्या सवा महाग. त्यातही खात्रीने मिळेलच असेही नाही. अगदी साध्या साध्या गोष्टींची वाणवा असते शहरात. फळबाजारातून कितीही कौतूकाने ड्रॅगन फ्रुट आणले तरी त्याला गावाकडच्या फड्या निवडूंगाच्या बोंडाची सर य़ेत नाही. आणि शहरी पोरांना मुळात फड्या निवडूंगाचे बोंडच माहीत नसल्याने त्यांना त्याचा अभावही जाणवत नाही. त्यांना ड्रॅगन फ्रुटचेच कौतूक. हाच प्रकार विकत आणलेल्या खर्वसाच्या बाबतीत. रानमेव्याच्या बाबतीत. जांभूळ काय विकत घेऊन खायचे फळ आहे का? त्यासाठी दोघांनी झाडावर चढून जांभळाचे घोसच्या घोस खाली चार कोपरे धरुन उभ्या असलेल्या मुलांच्या हातातल्या धोतरात टाकायला हवेत. कोंडाळं करुन ती जांभळं चाखायला हवीत. एकमेकांच्या जांभळ्या झालेल्या जिभा निरखायला हव्यात. तर त्या जांभळांची खरी चव कळते. संध्याकाळी आजोबांनी त्यांच्या धुतलेल्या धोतरावर जांभळी नक्षी पाहीली की मग जो शिव्यांचा भडीमार होतो त्याने जांभळांची खुमारी अधीक वाढते. गाडीची काच खाली करुन पटकुर गुंडाळलेल्या आजीच्या हातून करवंदाचा द्रोण घेऊन खाण्यात धन्यता मानणाऱ्यांना करवंदाच्या जाळीच्या ओरखड्यांची रांगोळी हातापायावर उमटवून घेण्यातली धमाल माहित नसते. हाथगाडीवर मिळणारे सोललेल्या उसाचे तुकडे चघळण्यात काही गोडवा नाही. रानात चांगला काळाभोर उस पाहून तो मित्राच्या सोबत खात खात गावात येण्यातली मजा औरच. रस्त्यावर पडलेल्या चोयट्यांचा माग धरुन कुणीही आपल्या मित्रांचा कंपू धुंडाळू शकतो. हुरड्याच्या पार्ट्या हा प्रकार आता सुरु झाला. गावाकडे या हुरड्याचे कुणाला फारसे कौतूक नाही. कुणी मित्र किंवा पाव्हना रानात आला की सहज चार तुराट्या पेटवून त्यात असेल ती कणसे भाजायची पद्धत आहे आमच्याकडे. त्याला आता आता हुरडा पार्टीचे रुप आलेय. असो. एक ना अनेक गोष्टी. लिहायला बसलो तर कादंबरी होईल.
हे सगळं आठवायचे कारण म्हणजे काल मित्राच्या बायकोने पाठवलेले अस्सल गावठी लोणचे. अगदी आज्जीच्या हातचे असावे तसे. प्रत्येक फोडीला टणक बाठ असलेले लोणचे. हे लोणचे जसजसे मुरत जाते तसतसे ते फुलत न जाता आक्रसत जाते. मऊ न होता जरासे चिवट होते. (वातड नाही) जेवताना बोटांनी हे तुटत नाही, फोड दाताखाली धरुनच खावे लागते. याची गम्मत जेवण झाल्यानंतरही कमी होत नाही. जेवण होता होता ताटातले लोणचे संपते. मग पाणी प्यायल्यावर हात धुवायच्या आधी ही लोणच्याची दशा असलेली बाठ तोंडात टाकायची व हात धुवायचे. नंतर शतपावली करेपर्यंत ही बाठ चोखता येते.
किती साधे साधे पदार्थ असतात हे. लोणचे, खर्वस वगैरे. पण आपण त्यांचे पार भजे करुन टाकलेय. मस्त गुळ टाकून, अगदीच चिमूटभर ईलायची टाकून केलेला खर्वस भन्नाटच. पण त्यात साखरच टाक, जायफळच टाक, केशराच्या काड्याच टाक, ड्रायफ्रुटच टाक असला उद्योग करुन त्या खर्वसाचा जिव गुदमरवून टाकतात लोक. ज्यांना असा खर्वस आवडतो त्यांच्या आवडीबाबत माझा काही आक्षेप नाही पण खर्वस खावा तो गुळ विलायची टाकून चुल्हीवर केलेलाच. चिकाची मुळ चव त्याच खर्वसात असते. लोणच्याचेही तेच. जितके जिन्नस कमी तेवढे लोणचे खुमासदार. पण आजकाल पंजाब, राजस्थान वगैरे भागातल्या रेस्पींची व आपल्या मुळ रेसेपीची ईतकी सरमिसळ झालीय की ते लोणचं खाताना मुळ कैरीची चवच हरवलीय या सगळ्यात. गावाकडे एखाद्या आज्जीने लोणच्याची एक फोड खाल्ली तरी तिचा प्रश्न असे “का गं, औंदा खोबऱ्या आंब्याची कैरी नाय गावली का?” कोणत्या आंब्याच्या कैरीचे लोणचे केलेय हे कळण्याईतकी त्यात कैरीची चव असे व ती चव ओळखणारी आजीची जिभही चवणी असे. अनेकांना माहित असेल किंवा नसेलही, बहुतेक हॉटेल्समधे टेबलवर आणून ठेवलेले आंब्याचे लोणचे हे कैरीचे नसतेच. कैरीचे लोणचे अनलिमिटेड द्यायला परवडणारही नाही. बरेचदा ते भोपळ्याचे लोणचे असते. आपण खातो ते लोणचे नक्की कैरीचेच आहे की अजुन कशाचे हे ओळखता न येण्याईतका त्यात मसालेदार खार असतो व आपले टेस्टबडसनाही मुळ कैरीच्या लोणच्याची सवय राहीलेली नसते. असोच.
गावाकडच्या लोणच्यात मालमसाला कमी असला तरी जिव्हाळा ओतप्रोत असतो. मी शैलाला फोन करुन सांगितले की “लोणचे पाठव रे जरासे. चव नाहीए तोंडाला” तर तिने मोठा डबा भरुन ‘जरासे’ लोणचे पाठवले. सोबत निरोप होता “अजुन पाह्यजे असल तर सांग” चार महिने पुरेल एवढे लोणचे मी आठवड्यात संपवले. परवा पुन्हा तिला फोन करुन सांगितले “लोणचे संपले रे सगळे, थोडेसे पाठव” कालच पुन्हा मोठा डबा भरुन ‘थोडेसे’ लोणचे आलेय. सोबत निरोप आहे “आता तुझ्या वाटेचं संपलं लोणचं. हे पुरवून खा.”
(थोडेसे (?) डिशमधे काढलेय फोटोसाठी. बाकी डब्यातच आहे. गावाकडे ‘जरासे’ म्हणजे ईतके असते.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...